Tag Archive for: साधना

साधना, योग आणि रूपांतरण – २२१

उत्तरार्ध

चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला हव्याहव्याशा वाटायच्या त्यातील तुमचे स्वारस्य नाहीसे होते. परंतु हे चेतनेमधील ‘परिवर्तन’ असते; आम्ही ज्याला ‘रूपांतरण’ म्हणतो ते हे नव्हे. कारण रूपांतरण हे मूलभूत आणि परिपूर्ण असते, तो काही केवळ बदल नसतो अथवा परिवर्तन नसते, तर ते चेतनेचे प्रत्युत्क्रमण (reversal) असते. म्हणजे यामध्ये व्यक्तीचे अस्तित्व हे जणू काही अंतर्बाह्य पालटते, आणि त्यामुळे व्यक्ती पूर्णतः एका वेगळ्या अवस्थेमध्ये प्रवेश करते.

प्रत्युत्क्रमित झालेल्या या चेतनेमध्ये व्यक्ती ही जीवन आणि वस्तुमात्रांच्या ऊर्ध्वस्थित झालेली असते आणि तेथून त्यांच्याशी व्यवहार करते. ती चेतना प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी असते आणि ती व्यक्तीच्या बाह्यवर्ती सर्व कृतींना तेथून दिशा दर्शन करत असते. उलट सामान्य चेतनेमध्ये व्यक्ती बाहेर आणि खालच्या बाजूस स्थित असते. बाहेरून, खालून ती केंद्रस्थानी पोहोचण्याचा प्रयत्न करत असते आणि असे करत असताना ती स्वतःच्याच अज्ञानाच्या व अंधतेच्या ओझ्यामुळे दबली जाते. त्यांच्या अतीत जाण्यासाठी ती अत्यंत निकराचा प्रयत्न करत असते. वस्तु प्रत्यक्षात कशा आहेत, त्यांचे वास्तव काय आहे याबाबत सामान्य चेतना अज्ञ असते, ती त्यांचे फक्त बाह्य आवरणच पाहू शकते. परंतु खरी चेतना ही केंद्रस्थानी असते, ती वास्तवाच्या हृदयस्थानी असते आणि तिला सर्व गतिविधींच्या उमगाबद्दलची थेट दृष्टी असते. ती अंतरंगामध्ये आणि ऊर्ध्वस्थित वसलेली असल्याने तिला सर्व गोष्टींचा व शक्तींचा उगमस्रोत आणि कार्यकारणभाव ज्ञात असतो.

मी पुन्हा एकदा सांगते की, हे प्रत्युक्रमण अचानकपणे घडून येते. तुमच्यामधील काहीतरी खुले होते आणि अचानकपणे तुमचा एका नवीन जगामध्ये प्रवेश झाला असल्याचे तुम्हाला आढळते. प्रारंभी हे परिवर्तन अंतिम आणि निर्णायक स्वरूपाचे असेलच असे नाही. ते परिवर्तन चिरस्थायी रूपात स्थिरस्थावर होऊन, तो तुमचा प्रकृतिधर्म होण्यासाठी कधीकधी अधिक कालावधीची आवश्यसकता असते. परंतु एकदा का हे परिवर्तन घडून आले की मग ते तेथे कायम राहते; तत्त्वतः कायमसाठी ते तेथे स्थिर होते. आणि नंतर मग कशाची गरज असेल तर ती म्हणजे ते परिवर्तन क्रमाक्रमाने व्यावहारिक जीवनाच्या तपशिलात अभिव्यक्त करण्याची!

रूपांतरित चेतनेचे पहिले आविष्करण हे नेहमीच अचानकपणे झाल्यासारखे दिसते. तुमचे एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये, हळूहळू, क्रमाक्रमाने परिवर्तन होत आहे हे तुम्हाला जाणवतही नाही; तर आपण अचानकपणे एका नवीन चेतनेमध्ये जागृत झालो आहोत किंवा नव्याने जन्माला आलो आहोत असे तुम्हाला जाणवते. कोणत्याही मानसिक प्रयत्नांमुळे तुम्ही या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. कारण हे रूपांतरण नक्की कसे असते याची कल्पना मनाच्या साहाय्याने तुम्ही करू शकत नाही. कोणतेच मानसिक वर्णन येथे पुरेसे ठरू शकत नाही. (पूर्णयोगांतर्गत) संपूर्ण रूपांतरणाचा आरंभबिंदू हा असा असतो.

– श्रीमाताजी (CWM 12 : 80-81)

साधना, योग आणि रूपांतरण – २२०

आपल्याला संपूर्ण रूपांतरण अपेक्षित आहे, म्हणजे शरीर आणि त्याच्या सर्व कृती यांचे रूपांतरण आपल्याला अपेक्षित आहे. परंतु अन्य कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी, पहिली पायरी अगदी अनिवार्य असते आणि ती म्हणजे चेतनेचे रूपांतरण. या रूपांतरणासाठी अभीप्सा असणे आणि ती प्रत्यक्षात उतरविण्याचा संकल्प असणे हा अर्थातच आरंभबिंदू आहे, त्याशिवाय काहीच होणे शक्य नाही. परंतु या अभीप्सेबरोबर जर व्यक्तीमध्ये आंतरिक खुलेपणा, उन्मुखता असेल, एक प्रकारची ग्रहणशीलता असेल तर अशी व्यक्ती या रूपांतरित चेतनेमध्ये एका प्रयत्नामध्ये प्रवेश करू शकते आणि स्वतःला तेथे सुस्थिर करू शकते. तसे म्हटले तर, चेतनेमधील हे परिवर्तन काहीसे आकस्मिक (abrupt) असते. म्हणजे जेव्हा हे परिवर्तन घडून येते तेव्हा ते अचानकपणे घडून येते, जरी या परिवर्तनाची पूर्वतयारी ही संथपणे आणि दीर्घकाळ चालू असण्याची शक्यता असली तरीसुद्धा जेव्हा हे परिवर्तन घडून येते तेव्हा मात्र ते अचानकपणे घडून येते.

मी येथे फक्त मानसिक दृष्टिकोनात होणाऱ्या परिवर्तनाविषयी बोलत नाहीये तर स्वयमेव चेतनेमधील परिवर्तनाविषयी बोलत आहे. हे अगदी संपूर्ण आणि परिपूर्ण असे परिवर्तन असते, म्हणजे त्याच्या मूलभूत अवस्थेमध्येच एक प्रकारची क्रांती घडून येते. एखादा चेंडू आतून बाहेरच्या बाजूस उघडावा तशी ही प्रक्रिया असते. (म्हणजे येथे चेंडूची आतली बाजू बाहेर आणि बाहेरची बाजू आतमध्ये जाते.) रूपांतरित चेतनेला प्रत्येक गोष्ट नवीन आणि निराळी वाटते; एवढेच नाही तर सामान्य चेतनेला एखादी गोष्ट जशी दिसते त्याच्या जवळजवळ उलट अशा पद्धतीने ती गोष्ट रूपांतरित चेतनेला दिसते. सामान्य चेतनेमध्ये असताना तुम्ही अतिशय संथपणाने, एकापाठोपाठ एक अनुभव घेत घेत, अज्ञानाकडून खूप दूरवर असणाऱ्या आणि बरेचदा संदिग्ध ज्ञानाच्या दिशेने प्रगत होता. परंतु रूपांतरित चेतनेमध्ये मात्र तुमचा आरंभबिंदू ज्ञान हा असतो आणि तुम्ही ज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रगत होत जाता. तथापि, ही केवळ एक सुरुवात असते. कारण आंतरिक रूपांतरणाचा परिणाम म्हणून बाह्यवर्ती चेतना, बाह्यवर्ती सक्रिय व्यक्तित्वाचे विविध स्तर आणि विविध घटक हे संथपणे आणि क्रमाक्रमाने रूपांतरित होतात. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 12 : 80)

साधना, योग आणि रूपांतरण – २१८

उत्तरार्ध

योगसाधना करताना पुष्कळजण मन, प्राण, शरीरात स्थित असतात, अधूनमधून अथवा काही प्रमाणात उच्च मनाने आणि प्रदीप्त मनाने उजळून जातात. पण ‘अतिमानसिक परिवर्तना’च्या (supramental change) तयारीसाठी, ‘अंतर्ज्ञान’ (Intuition) आणि ‘अधिमानस’ (Overmind) यांप्रत (शक्य तितक्या लवकर, व्यक्तिश: तशी वेळ येताच) उन्मुख होणे आवश्यक असते. कारण त्यामुळे समग्र अस्तित्व आणि समग्र प्रकृती अतिमानसिक परिवर्तनासाठी सुसज्ज बनवता येऊ शकेल. शांतपणे विकसित होण्यासाठी व विशाल होण्यासाठी चेतनेला मुभा द्या आणि मग हळूहळू या गोष्टींचे ज्ञान होत जाईल.

शांती, विवेक, अलिप्तता (पण उदासीनता किंवा अनुत्साह नव्हे) या बाबी फार महत्त्वाच्या आहेत, कारण त्यांच्या विरोधी असणाऱ्या गोष्टी रूपांतर-क्रियेत खूपच अडथळा निर्माण करतात. अभीप्सेची उत्कटता असली पाहिजे पण ती शांती, विवेक, अलिप्तता या सर्वांच्या बरोबरीने असायला हवी. घाई नको, आळस नको, राजसिक अति-उत्कंठा नको आणि तामसिक नाउमेदीचा हतोत्साहदेखील नको. तर स्थिर आणि सातत्यपूर्ण पण शांत आवाहन व कार्य हवे. साक्षात्कार झालाच पाहिजे असा अट्टाहास असता कामा नये, तर अंतरंगातून आणि वरून येण्यास त्याला मुभा दिली पाहिजे. त्याचे क्षेत्र, त्याचे स्वरूप, त्याच्या मर्यादा यांचे अचूक निरीक्षण केले पाहिजे. श्रीमाताजींची शक्ती तुमच्यात कार्य करू दे, मात्र त्यामध्ये कोणत्याही निम्न गोष्टींची मिसळण होऊ नये यासाठी सावध राहा. पुष्ट झालेल्या अहंभावाच्या कृती किंवा सत्याचा वेश धारण केलेली अज्ञानाची शक्ती या गोष्टी तर तिची जागा घेत नाही ना याची काळजी घ्या. विशेषत: प्रकृतीमधील सर्व अंधकार आणि अचेतनता यांचा निरास होवो अशी अभीप्सा बाळगा. अतिमानसिक परिवर्तनाच्या तयारीसाठी आवश्यक असणाऱ्या या मुख्य अटी आहेत; पण त्यांपैकी एकही गोष्ट सोपी नाही, आणि प्रकृती सज्ज झाली आहे असे म्हणण्यासाठी, त्यापूर्वी या अटींची परिपूर्ती होणे आवश्यक असते.

जर योग्य दृष्टिकोन प्रस्थापित करता आला (आत्मिक, निरहंकारी आणि केवळ दिव्य शक्तीलाच उन्मुख असणारी वृत्ती) प्रस्थापित करता आली तर ही प्रक्रिया पुष्कळ जलद गतीने होऊ शकते. योग्य वृत्ती स्वीकारणे आणि ती टिकवून ठेवणे, तसेच पुढे जाऊन स्वत:मध्ये बदल घडविणे अशा प्रकारचा हातभार तुम्ही लावू शकता. सर्वसाधारण बदल घडून येण्यासाठी साहाय्यकारी ठरेल अशी ही एक गोष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 333-334)

साधना, योग आणि रूपांतरण – २१७

चैत्य पुरुष (psychic being) अग्रस्थानी आणा आणि मन, प्राण व शरीरावर त्याची सत्ता चालवीत त्याला तिथे सुस्थिर करा. ज्यामुळे चैत्यपुरुष त्याच्या एकाग्र अभीप्सेची, विश्वासाची, श्रद्धेची आणि समर्पणाची शक्ती त्या तिघांपर्यंत पोहोचवू शकेल. आणि प्रकृतीमधील अनुचित असे जे काही आहे, जे ‘प्रकाश’ आणि ‘सत्य’ यांपासून दूर जाऊन, अहं व प्रमादाकडे वळले आहे त्याचा थेट आणि तात्काळ बोध तो चैत्यपुरुष मन, प्राण व शरीराला करून देऊ शकेल.

सर्व प्रकारचे अहंकार काढून टाका; तुमच्या चेतनेच्या प्रत्येक गतिविधीमधून ते अहंकार काढून टाका. वैश्विक चेतनेचा विकास करा. अहं-केंद्रित दृष्टिकोन विशालतेत, निर्व्यक्तिकतेत (impersonality), वैश्विक ‘ईश्वरा’च्या जाणिवेत, वैश्विक शक्तींच्या बोधात, वैश्विक आविष्काराच्या, (ईश्वरी) लीलेच्या आकलनात आणि साक्षात्कारात लीन होऊ द्या.

जीवात्मा हा ‘ईश्वरी’ अंश असतो, ‘जगन्माते’पासून त्याची उत्त्पत्ती झालेली असते आणि तो आविष्करणाचे साधन असतो. (तुमच्या) अहंने ज्याची जागा घेतली आहे तो जीवात्मा शोधून काढा. ‘ईश्वरा’चा अंश असल्याची आणि त्याचे एक साधन असल्याची जाणीव ही सर्व अभिमानांपासून, अहंच्या जाणिवेपासून किंवा त्याच्या हक्कापासून, श्रेष्ठतेच्या आग्रहीपणापासून, मागणी वा इच्छावासानांपासून मुक्त असली पाहिजे. कारण हे सर्व घटक जर तिथे असतील तर, ती खरी गोष्ट नाही असे समजावे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 333)

साधना, योग आणि रूपांतरण – २१६

चैत्य पुरुष (psychic being) हा हृदयकेंद्राच्या मागे स्थित राहून मन, प्राण आणि शरीराला आधार पुरवत असतो. चैत्य किंवा आंतरात्मिक रूपांतरणामध्ये (psychic transformation) तीन मुख्य घटक असतात.
१) निगूढ अशा आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीराच्या खुलेपणामुळे (opening), पृष्ठवर्ती मन, प्राण आणि शरीर यांच्या पाठीमागे असलेल्या साऱ्याची व्यक्तीला जाणीव होते.
२) चैत्य पुरुषाच्या किंवा आत्म्याच्या खुलेपणामुळे, चैत्य पुरुष अग्रस्थानी येऊन मन, प्राण आणि शरीर यांचे शासन करतो आणि त्यांना ‘ईश्वरा’कडे वळवितो.
३) समग्र कनिष्ठ अस्तित्व आध्यात्मिक सत्याप्रत उन्मुख होते, या शेवटच्या गोष्टीला परिवर्तनाचा आंतर-आध्यात्मिक भाग (The psycho-spiritual part) असे म्हणता येईल.

आंतरात्मिक रूपांतरण हे व्यक्तीला तिच्या व्यक्तिगततेच्या अतीत, वैश्विकतेमध्ये घेऊन जाऊ शकते. एवढेच काय पण, गुह्य (occult) उन्मुखतासुद्धा वैश्विक मन, वैश्विक प्राण आणि वैश्विक जडभौतिकाशी व्यक्तीचा संबंध प्रस्थापित करते. अंतरात्म्याला सर्व जीवनाशी, सृष्टीशी (all existence) असलेल्या संपर्काची जाणीव असते. त्याला ‘आत्म्या’ची एकात्मता सर्वत्र अनुभवास येते, त्याला वैश्विक प्रेम आणि इतर साक्षात्कारांची प्रचिती येते आणि ती त्या अंतरात्म्यास वैश्विक चेतनेकडे घेऊन जाते.

परंतु हा सर्व ऊर्ध्वस्थित असणाऱ्या आध्यात्मिकतेस उन्मुख झाल्याचा परिणाम असतो. आणि तो परिणाम मन, प्राण व शरीरामध्ये आध्यात्मिक प्रकाशाचे आणि सत्याचे प्रतिबिंब पडल्यामुळे किंवा त्या प्रकाशाचा आणि सत्याचा मन, प्राण व शरीरामध्ये अंतःप्रवेश झाल्यामुळे घडून येतो. जेव्हा व्यक्ती मनाच्या पलीकडे चढून जाते आणि तेथे राहून, वरून सर्वांचा कारभार चालवू लागते तेव्हा मूलभूत आध्यात्मिक रूपांतरणास (spiritual transformation) सुरुवात होते किंवा ते रूपांतरण शक्य होते.

आंतरात्मिक रूपांतरणामध्येसुद्धा व्यक्ती एक प्रकारे मन, प्राण आणि शरीर यांच्या अतीत जाऊ शकते आणि परत येऊ शकते परंतु शिखरस्थानी असलेल्या चेतनेमध्ये म्हणजे जेथे ‘अधिमानसा’चे स्थान असते तेथे, मानवी मनाच्या वर असणाऱ्या इतर स्तरांमध्ये, व्यक्ती अजूनपर्यंत स्थित झालेली नसते. जेव्हा सृष्टीच्या दोन गोलार्धांमध्ये असणारे किंवा कनिष्ठ आणि ऊर्ध्व गोलार्ध यांच्यामध्ये असणारे झाकण, आच्छादन दूर केले जाते आणि ‘अधिमानसा’च्या ऐवजी ‘अतिमानस’ जेव्हा सृष्टीची चालकशक्ती बनते तेव्हा अतिमानसिक रूपांतरण (supramental transformation) घडून येणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 332-333)

साधना, योग आणि रूपांतरण – २१५

स्थितप्रज्ञ असणे याचा अर्थ व्यक्तीचे केवळ विचारी मन (thinking mind) आत्म-साक्षात्कारामधील आध्यात्मिक चेतनेमध्ये सुस्थिर असणे असा होतो. त्यामुळे प्रकृतीच्या अन्य घटकांचे ‘रूपांतरण’ होईलच असे काही आवश्यक नाही. उच्चतर चेतनेचा ‘प्रकाश’ आणि तिची ‘शक्ती’ खाली उतरविणे; चैत्य अस्तित्व (psychic) आणि मन, प्राण व शरीराची केंद्र खुली होणे; आंतरात्मिक आणि उच्चतर चेतनेच्या कार्याला प्रकृतीने संमती देणे आणि तिच्याप्रत स्वीकारशील रीतीने खुले होणे; आणि सरतेशेवटी प्रकृतीने अतिमानसाप्रत खुले होणे, या साऱ्या ‘रूपांतरणा’साठी आवश्यक असणाऱ्या अटी असतात.

उच्चतर चेतना (higher consciousness) ही अशी एक गोष्ट असते की जी मनुष्याच्या मन, प्राण आणि शरीर यांच्या ऊर्ध्वस्थित असते. ती संपूर्णपणे आध्यात्मिक स्वरूपाची असते. ती प्राप्त करून घेणे याचा अर्थ एवढाच की, व्यक्ती तेथे इच्छेनुसार जाण्यास सक्षम असते किंवा व्यक्ती तिच्या चेतनेच्या कोणत्यातरी एखाद्या घटकानिशी तेथे निवास करू शकते आणि त्या दरम्यान तिचे इतर घटक मात्र जुन्या पद्धतीनेच कार्यरत असतात. समग्र अस्तित्व जेव्हा अंतरात्म्याच्या साच्यामध्ये ओतले जाते (remoulded) तेव्हा ‘आंतरात्मिक रूपांतरण’ (psychic transformation) घडून येते. समग्र अस्तित्वाचे जेव्हा आध्यात्मिकीकरण केले जाते तेव्हा ‘आध्यात्मिक रूपांतरण’ (spiritual transformation) घडून येते. आणि समग्र अस्तित्वाचे जेव्हा अतिमानसिकीकरण केले जाते तेव्हा ‘अतिमानसिक रूपांतरण’ (supramental transformation) घडून येते. व्यक्ती केवळ उच्चतर चेतनेविषयी जागरूक झाली किंवा सामान्य मर्यादित अर्थाने व्यक्तीने ती उच्चतर चेतना प्राप्त करून घेतली म्हणून या सर्व गोष्टी, आपोआप घडून येतात, असे होत नाही.

अर्थात शरीर हे त्याचे अधिष्ठान असते. शरीर, प्राण आणि मन व त्याच्या उच्चतर पातळ्या या सर्वांचा समावेश कनिष्ठ गोलार्धामध्ये होतो. आत्म-सुसूत्रीकरणाचे (self-formulation) साधन असणारे ‘अतिमानस’ (Supermind) आणि ‘दिव्य’ सत्-चित्-आनंद यांचा समावेश ऊर्ध्व गोलार्धामध्ये होतो. कनिष्ठ आणि ऊर्ध्व या दोन गोलार्धाच्या मधोमध ‘अधिमानस’ (Overmind) असते. ‘अधिमानस’ हे कनिष्ठ गोलार्धाच्या शिखरस्थानी असते. अधिमानस हा या दोन्ही गोलार्धातील मध्यावधी किंवा संक्रमणकारी स्तर असतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 331-332)

साधना, योग आणि रूपांतरण – २१४

आध्यात्मिकीकरण (Spiritualisation) म्हणजे उच्चतर शांती, शक्ती, प्रकाश, ज्ञान, विशुद्धता, आनंद इत्यादीचे अवतरण. या गोष्टी ‘उच्च मना’पासून ‘अधिमानसा’पर्यंतच्या (Higher Mind to Overmind) कोणत्याही उच्च स्तराशी संबंधित असू शकतात. कारण त्यांपैकी कोणत्याही स्तरावर ‘आत्म्या’चा साक्षात्कार होऊ शकतो.

आध्यात्मिकीकरणाद्वारे व्यक्तिनिष्ठ रूपांतरण घडून येते. यामध्ये साधनभूत प्रकृतीचे इतपतच रूपांतरण घडते की जेणेकरून त्या प्रकृतीकडून, ‘विश्वात्म्या’ला जे कार्य करून घ्यायचे असते त्याचे ती (सुयोग्य) साधन होऊ शकेल. हे होत असताना अंतरंगातील आत्मा स्थिर, मुक्त आणि ‘ईश्वरा’शी एकत्व पावलेला असा राहतो.

परंतु हे व्यक्तिगत रूपांतरण अपूर्ण असते. जेव्हा ‘अतिमानसिक’ परिवर्तन (Supramental change) घडून येते तेव्हाच साधनभूत ‘प्रकृती’चे संपूर्ण रूपांतरण होऊ शकते. तोपर्यंत प्रकृती अनेक अपूर्णतांनी भरलेली असते. परंतु उच्चतर स्तरावरील आत्म्याला त्याने काही फरक पडत नाही कारण तो या सर्वापासून मुक्त असतो, त्याच्यावर या गोष्टींचा कोणताही परिणाम होत नाही. आंतरिक पुरुष देखील अगदी आंतरिक शरीरापर्यंत मुक्त आणि अप्रभावित राहू शकतो. ‘अधिमानस’ हे परिणामकारक ‘दिव्य ज्ञाना’च्या कार्याच्या मर्यादांच्या, ‘दिव्य शक्ती’च्या कार्याच्या मर्यादांच्या अधीन असते. ते आंशिक आणि मर्यादित ‘दिव्य सत्या’दी गोष्टींच्या अधीन असते. केवळ ‘अतिमानसा’मध्येच संपूर्ण ‘सत्-चेतना’ (Truth consciousness) व्यक्तीमध्ये अवतरित होऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 404)

साधना, योग आणि रूपांतरण – २१३

‘दिव्य चेतने’च्या विविध अवस्था असतात. त्याचप्रमाणे रूपांतरणाच्या देखील विविध अवस्था असतात.

प्रथम असते ते आंतरात्मिक रूपांतरण (psychic transformation). यामध्ये सर्व गोष्टी ‘ईश्वरा’शी आंतरात्मिक चेतनेच्या माध्यमातून संपर्कात असतात.

नंतर असते ते आध्यात्मिक रूपांतरण (spiritual transformation). यामध्ये सर्व गोष्टी वैश्विक चेतनेमधील ‘ईश्वरा’मध्ये विलीन होतात.

तिसरे असते ते अतिमानसिक रूपांतरण (supramental transformation). यामध्ये सर्व गोष्टींचे दिव्य विज्ञानमय चेतनेमध्ये अतिमानसिकीकरण होते.

या अंतिम रूपांतरणाबरोबर मन, प्राण आणि शरीर यांचे संपूर्ण रूपांतरण (संपूर्णपणाच्या माझ्या संकल्पनेनुसार) होण्यास सुरुवात होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 414)

साधना, योग आणि रूपांतरण – २१२

आंतरात्मिकीकरण (psychisation) आणि आध्यात्मिकीकरण (spiritualisation) या दोन्हींमध्ये फरक आहे. आध्यात्मिकीकरणामध्ये होणारे परिवर्तन हे वरून अवतरित होते, तर आंतरात्मिकीकरणामध्ये होणारे परिवर्तन हे अंतरंगामधून घडून येते. आंतरात्मिकीकरणामध्ये मन, प्राण आणि शरीर यांच्यावर अंतरात्म्याचे वर्चस्व निर्माण होते आणि त्यातून हे परिवर्तन घडून येते.

*

तुम्ही पत्रामध्ये वर्णन केलेल्या दोन्ही भावना योग्य आहेत. त्यातून साधनेमधील दोन आवश्यकतांचे सूचन होते.

त्यातील एक आवश्यकता म्हणजे अंतरंगात प्रवेश करायचा आणि चैत्य पुरुष (psychic being) व बाह्यवर्ती प्रकृती यांच्यामधील अनुबंध पूर्णत: खुला करायचा.

दुसरी आवश्यकता म्हणजे ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘दिव्य शांती, शक्ती, प्रकाश, आनंद’ यांच्याप्रत उन्मुख व्हायचे आणि त्यांच्यामध्ये आरोहण करायचे आणि प्रकृतीमध्ये व शरीरामध्ये त्यांचे अवतरण घडवून आणायचे.

वरील दोन्ही प्रक्रियांपैकी, म्हणजे आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक प्रक्रियांपैकी कोणतीच प्रक्रिया एकमेकींशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. आध्यात्मिक आरोहण आणि अवतरण घडून आले नाही तर प्रकृतीचे आध्यात्मिक रूपांतरण होऊ शकणार नाही. आणि संपूर्ण आंतरात्मिक खुलेपण आले नाही आणि चैत्य पुरुष व बाह्यवर्ती प्रकृती यांच्यामध्ये अनुबंध निर्माण करण्यात आला नाही तर ‘रूपांतरण’ परिपूर्ण होऊ शकणार नाही.

या दोन प्रक्रियांमध्ये विसंगती नाही. काही जण आंतरात्मिक (चैत्य) रूपांतरणापासून सुरुवात करतात तर काहीजण आध्यात्मिक रूपांतरणापासून सुरुवात करतात. तर काही जण दोन्ही रूपांतरणास एकत्रितपणे सुरुवात करतात. दोन्हीसाठी आस बाळगायची आणि गरजेनुसार आणि प्रकृतीच्या कलानुसार श्रीमाताजींच्या शक्तीला कार्य करू द्यायचे हा सर्वोत्तम मार्ग आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 380, 383)

साधना, योग आणि रूपांतरण – २११

मी ‘चैत्य पुरुषाच्या रूपांतरणा’विषयी कधीही काही सांगितलेले नाही तर मी नेहमीच, ‘प्रकृतीच्या आंतरात्मिक रूपांतरणा’विषयी (psychic transformation) लिहिले आहे की जी अगदी भिन्न गोष्ट आहे. मी कधीकधी प्रकृतीच्या आंतरात्मिकीकरणाविषयी (psychisation) लिहिले आहे. चैत्य अस्तित्व हा उत्क्रांतीमधील, मनुष्यामध्ये असणारा ‘ईश्वरा’चा अंश असतो. आणि म्हणून चैत्य अस्तित्वाचे आंतरात्मिकीकरण (psychisation) हे व्यक्तीला सद्यकालीन उत्क्रांतीच्या अतीत घेऊन जाणार नाही मात्र ‘ईश्वरा’कडून किंवा ‘उच्चतर प्रकृती’कडून जे काही येते त्याला प्रतिसाद देण्यास ते व्यक्तीला सक्षम बनवेल. आणि असुर, राक्षस, पिशाच्च किंवा व्यक्तीमधील पशुता किंवा दिव्य परिवर्तनाच्या मार्गामध्ये अडथळा बनून उभ्या ठाकणाऱ्या कनिष्ठ प्रकृतीच्या कोणत्याही अट्टहासाला प्रतिसाद देण्यापासून ते व्यक्तीला परावृत्त करेल.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 380-381)