Tag Archive for: साधना

जीवन जगण्याचे शास्त्र – ०५

(सहजस्फूर्त असण्याचे महत्त्व काय असते याबाबत श्रीमाताजींनी केलेले विवेचन आपण गेल्या दोन भागात पाहिले. त्या आता त्याच संदर्भातील अधिक बारकावे उलगडवून दाखवत आहेत.)

आता प्रश्ना असा निर्माण होतो की, “सहजस्फूर्त (spontaneous) कसे व्हायचे?”

“सहजस्फूर्त असण्यासाठी तुम्ही संपूर्णतया साधे असले पाहिजे.” आणि त्यातून मग पुन्हा आणखी एक प्रश्न निर्माण होतो की, संपूर्णतया साधे कसे बनायचे?

“संपूर्णतया साधे बनण्यासाठी तुम्ही पूर्णतया प्रामाणिक (sincere) असले पाहिजे.”

आणि आता पुन्हा प्रश्न निर्माण होतो, पूर्णतया प्रामाणिक बनायचे म्हणजे काय?

“पूर्णतया प्रामाणिक असणे म्हणजे तुमच्या व्यक्तित्वामध्ये कोणतीही दुफळी नको किंवा कोणतीही विसंगती अथवा कोणताही विरोधाभास नको.”

तुमचे व्यक्तित्व जर तुकड्यातुकड्यांनी बनलेले असेल तर त्या तुकड्यांमुळे तुमच्या व्यक्तित्वामध्ये एक प्रकारची दुफळी तयार होते. हे तुकडे केवळ वेगवेगळेच असतात असे नाही तर, बऱ्याचदा ते परस्पर विसंगत असतात. उदाहरणार्थ, तुमच्यामधील एक भाग दिव्य जीवनाची आस बाळगत असतो; ईश्वराला जाणण्याची, त्याच्याशी ऐक्य पावण्याची, त्याच्यासमवेत पूर्णतया जीवन जगण्याची आस बाळगत असतो. आणि त्याच वेळी तुमच्यामधील दुसरा एक भाग मात्र असा असतो की, जो इच्छावासना, आसक्ती बाळगून असतो. त्यांना तो भाग ‘गरजा’ असे संबोधतो आणि तो भाग या गोष्टींच्या नुसत्या प्राप्तीची अभिलाषाच बाळगतो असे नाही तर, त्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर तो अस्वस्थसुद्धा होतो. इतर कोणत्याही विसंगतीपेक्षा ही विसंगती सर्वात जास्त सुस्पष्ट असते.

अशा आणखीही काही विसंगती असतात. उदाहरणार्थ, व्यक्तीला ईश्वराप्रति संपूर्ण समर्पण करण्याची इच्छा असते, ईश्वरी संकल्पाला आणि ईश्वराच्या मार्गदर्शनाला पूर्णपणे शरण जावे अशी तिची इच्छा असते. आणि जेव्हा तसा खरोखरच अनुभव येतो तेव्हा आपण कोणीच नाही, आपण काहीच करू शकत नाही, इतकेच काय पण जर ईश्वर अस्तित्वात नसता तर आपण जगूच शकलो नसतो आणि काहीच करू शकलो नसतो, आपण कोणीच नसतो… हा अनुभव व्यक्तीला येतो. (व्यक्ती जेव्हा ईश्वराप्रति खरोखरच प्रामाणिकपणे आत्मदान करण्याचा प्रयत्न करते तेव्हा, योगमार्गावर येणारा हा सार्वत्रिक अनुभव असतो.)

वास्तविक, संपूर्ण आत्मदानाच्या मार्गावरील एक साहाय्य या भूमिकेतून तो अनुभव आलेला असतो. परंतु हा अनुभव येतो तेव्हा, तुमच्या व्यक्तित्वामध्ये एक भाग असा असतो की, जो अचानक भयंकर बंड करून उठतो आणि म्हणतो, “पण का? मला ‘मी’ म्हणून अस्तित्वात राहायचे आहे, मी पण कोणीतरी आहे, मला सर्व गोष्टी स्वतःच करायच्या आहेत, मला माझे (स्वतंत्र) व्यक्तिमत्त्व हवे आहे.” आणि मग स्वाभाविकपणे, पहिल्या भागाने (आत्मदान केलेल्या भागाने) जे काही केले होते ते दुसऱ्या भागाकडून नामशेष केले जाते. ही उदाहरणे अपवादात्मक आहेत असे नाही तर, हे असे नेहमी घडत असते. मी तुम्हाला यासारखी, व्यक्तित्वातील परस्परविरोधाची अगणित उदाहरणे सांगू शकते. म्हणजे जेव्हा तुमच्यामधील एखादा भाग पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा, दुसरा भाग आडवा येतो आणि सर्व काही उद्ध्वस्त करून टाकतो. आणि तुम्हाला परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 08 : 283-284)

जीवन जगण्याचे शास्त्र – ०४

(सहजस्फूर्त असणे म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय, यासंबंधीचा विचार कालच्या भागात आपण केला. मनोकल्पित रचनांच्या पलीकडे जात, अंत:प्रेरणेवर विसंबून कार्य कसे करायचे याचाही निर्देश त्यामध्ये देण्यात आला होता. आता योगसाधनेमधील त्याची आवश्यकता व त्यामधील धोके श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

तुम्ही योगसाधना करू इच्छित असाल आणि तुम्ही योगमार्गामध्ये प्रवेश केलात तर, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनोरचनांच्या हातचे बाहुले बनता कामा नये, ही गोष्ट अतिशय आवश्यक असते. तुम्हाला जर तुमच्या अनुभवांवर विश्वास ठेवायचा असेल तर, जे अनुभव यावेत असे तुम्हाला वाटते किंवा त्याविषयी तुमची जी कल्पना असते, जे रूप पाहण्याची तुम्हाला इच्छा किंवा अपेक्षा असते, तशा मनोमय रचना तुमच्या मनामध्ये निर्माण न करण्याची अतिशय काटेकोर काळजी तुम्ही घेतली पाहिजे.

कारण मनोमय रचना या बऱ्याचदा एक प्रकारच्या वास्तव रचना (real formation) असतात, ती एक खरी निर्मिती असते. आणि तुम्ही तुमच्या कल्पनेच्या साहाय्याने अशी रूपं तयार करता की, जी काही ठरावीक प्रमाणात तुमच्यापासून स्व-तंत्र असतात आणि ती रूपं जणू बाहेरून आल्यासारखी तुमच्यापाशी परत येतात आणि ती रूपं तुम्हाला ‘अनुभव आल्याचा’ भास निर्माण करतात. परंतु हे ईप्सित असलेले अनुभव किंवा ज्याच्या मागे तुम्ही धावत असता ते किंवा तुम्हाला अपेक्षित असणारे अनुभव सहजस्फूर्त नसतात आणि ते आभासी असल्याने त्यामध्ये जोखीम असते. कधीकधी तर ते अतिशय धोकादायक असे भ्रम असतात.

म्हणून जेव्हा तुम्ही मानसिक साधनेचे (mental discipline) अनुसरण करत असता तेव्हा, तुम्ही विशिष्ट अनुभवांविषयी कोणतीही पूर्वकल्पना न करण्याची किंवा ते प्राप्त व्हावेत अशी अभिलाषा न बाळगण्याची सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे. कारण तसे केलेत तर, तुम्हीच तुमच्यासाठी या अनुभवांचा एक भ्रम तयार करता. योगाच्या क्षेत्रामध्ये, ही अगदी काटेकोर आणि कठोर सहजस्फूर्तता अगदी अपरिहार्य असते. या मार्गावर खात्रीने आणि निर्भयपणे पुढे जायचे असेल तर, त्यासाठी, तुमच्यामध्ये कोणतीही आकांक्षा किंवा इच्छा किंवा बेसुमार कल्पना असता कामा नयेत; किंवा ज्याला मी ‘आध्यात्मिक स्वप्नरंजन’ (spiritual romanticism) म्हणते ते असता कामा नये किंवा चमत्कारसदृश गोष्टींची आवडदेखील असता कामा नये; या सर्व गोष्टी तुम्ही अगदी काळजीपूर्वक दूर सारल्या पाहिजेत. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 08 : 282-283)

जीवन जगण्याचे शास्त्र – ०३

(सर्वसाधारणपणे मनुष्य प्राधान्याने मानसिक जीवन जगत असतो. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन, जीवन सहजस्फूर्तपणे कसे जगता येते आणि त्यामुळे ते अधिक सुकर कसे होते, यासंबंधी श्रीमाताजी येथे मार्गदर्शन करत आहेत.)

एखादी गोष्ट विचारपूर्वक, आखणी करून, ठरवून, स्वतःच्या व्यक्तिगत इच्छेने साध्य करण्याचा खटाटोप न करणे म्हणजे सहजस्फूर्त (spontaneous) असणे होय. खरी सहजस्फूर्तता काय असते हे समजावे म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण सांगते.

श्रीअरविंदांनी ‘आर्य’ नियतकालिकासाठी लेखन सुरू केले तेव्हाची ही गोष्ट आहे. त्यामध्ये त्यांनी जे लेखन केले ते केवळ मानसिक ज्ञान नव्हते किंवा ती मनोमय रचनादेखील नव्हती. लेखनाआधी ते त्यांचे मन शांत करत असत आणि टंकलेखन यंत्रासमोर बसत असत आणि मग जे काही लेखन करायचे असे, ते वरून म्हणजे उच्चतर स्तरांवरून, जणू काही अगदी तयार होऊन येत असे. उच्चतर स्तरांवरून येणाऱ्या त्या ज्ञानाला आणि एवढेच नव्हे तर, त्याच्या अभिव्यक्तीला श्रीअरविंदांच्या माध्यमातून, त्यांच्या मनाच्या शांत अवस्थेत वाव मिळत असे. तेव्हा श्रीअरविंदांना टंकलेखन यंत्रावरून फक्त बोटे फिरवावी लागत असत आणि त्यानंतर ते लेखन (अगदी सहजगत्या) कागदावर उमटत असे. अशा रितीने श्रीअरविंद ‘आर्य’ मासिकाची दरमहा चौसष्ट छापील पाने होतील एवढे लेखन करत असत. या पद्धतीमुळेच ते एवढे लेखन करू शकत असत. श्रीअरविंद जर केवळ मानसिक स्तरावर खटपट करून लेखन करत असते तर, त्यांच्या हातून असे आणि एवढे लेखन झाले नसते. ही असते खरी मानसिक सहजस्फूर्तता!

आणि याबाबत आणखी थोडे पुढे जाऊन सांगायचे तर असे म्हणावे लागेल की, (व्यक्तीला जर लेखनात व भाषणात अशी सहजस्फूर्तता विकसित करायची असेल तर) तिला जे लिहायचे असते किंवा जे बोलायचे असते त्याचा तिने अगोदर विचार करता कामा नये किंवा तिने त्याची आधीच आखणी करता कामा नये. (त्यापेक्षा) तिला तिचे मन शांत करता आले पाहिजे आणि एखाद्या धारकपात्राप्रमाणे (receptacle) ते मन उच्चतर चेतनेच्या दिशेने वळविता आले पाहिजे आणि जे काही वरून येते, जे काही ग्रहण केले जाते ते त्या व्यक्तीने मानसिक निश्चल-नीरवतेमध्ये आविष्कृत केले पाहिजे. ही खरी सहजस्फूर्तता ठरेल.

अर्थातच, ही गोष्ट काही साधीसोपी नाही. त्यासाठी पूर्वतयारीची आवश्यकता असते. तुम्ही आणखी खाली प्रत्यक्ष व्यवहारात उतरलात तर मग, ते अधिकच अवघड होते. कारण सहसा, तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट तर्कसंगत रितीने करायची असते तेव्हा, तुम्हाला जे काही करायचे असते त्याचा तुम्हाला आधी विचार करावा लागतो; ती कृती करण्यापूर्वी तुम्हाला योजना आखावी लागते. अन्यथा खऱ्या अंतःप्रेरणेऐवजी (inspiration), त्यापासून कित्येक योजने दूर असणाऱ्या सर्व प्रकारच्या इच्छाआकांक्षा आणि आवेगांवरच तुम्ही हेलपाटत राहण्याची शक्यता असते. आणि तसे झाले तर, (खऱ्या अंतःप्रेरणेऐवजी) ‘कनिष्ठ प्रकृती’ तुम्हाला कृती करण्यास भाग पाडत आहे, असा त्याचा सरळसरळ अर्थ होईल. त्यामुळे, जोपर्यंत तुम्ही प्रज्ञेच्या आणि निर्लिप्ततेच्या अवस्थेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत, तुम्ही तुमच्या दैनंदिन कृतींमध्ये सहजस्फूर्ततेचा अवलंब करता कामा नये. अन्यथा तुम्ही सर्वाधिक विस्कळीत आवेगांच्या आणि प्रभावांच्या हातचे बाहुले बनून राहण्याचा धोका संभवतो. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 08 : 281-282)

जीवन जगण्याचे शास्त्र – ०२

ज्या क्षणी आविष्काराचा खटाटोप नाहीसा होतो तेव्हा, तो आविष्कार सहजस्वाभाविक होऊन जातो. एखादे फूल जसे सहजतेने उमलते, त्याचे सौंदर्य अभिव्यक्त करते; कोणताही गाजावाजा न करता किंवा कोणत्याही आवेशाविना अगदी सहजतेने आपला सुगंध पसरविते तसा तो आविष्कार असतो. या सहजतेमध्ये मोठी शक्ती सामावलेली असते, ती शक्ती निर्भेळ असते; त्यामुळे त्यातून कोणत्याही विघातक प्रतिक्रिया उद्भवत नाहीत; उद्भवल्याच तर त्या अगदीच अल्प असतात.

प्राणाच्या (vital) शक्तीवर फार विसंबून राहता कामा नये कारण ती कर्ममार्गावरील प्रलोभक (tempter) असते. तिच्यामुळे तुम्हाला त्वरित परिणाम अनुभवता येतात त्यामुळे तिच्या जाळ्यामध्ये फसण्याचा नेहमीच धोका असतो. कर्म चांगले करण्याच्या आपल्या अतिउत्साहामुळे, त्या शक्तीचा उपयोग करण्याच्या नादात, आपण वाहवत जातो. मात्र असे केल्यामुळे, योग्य दिशेने चाललेल्या आपल्या सर्व प्रयत्नामध्ये अचानकपणे बाधा निर्माण होते आणि आपण जे काही करत असतो त्यामध्ये भ्रांतीचे आणि विनाशाचे बीज पेरले जाते.

सहजता, सहजता! हे ईश्वेरा, तुझ्या उपस्थितीची विशुद्धता किती मधुर आहे!

– श्रीमाताजी (CWM 01 : 17)

जीवन जगण्याचे शास्त्र – ०१

एका साधकाने श्रीमाताजींच्या सान्निध्यात काम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने ‘मला काही संदेश द्यावा,’ अशी विनंती त्यांना केली.

तेव्हा श्रीमाताजींनी त्याला असा संदेश दिला की,
“साधेसरळ असा,
आनंदी राहा,
अविचल राहा,
शक्य तितक्या उत्तम रीतीने कर्म करा,
माझ्याप्रति खुले, उन्मुख राहा,
तुमच्याकडून एवढेच अपेक्षित आहे.”

‘जीवन जगण्याचे शास्त्र’ ही आपली नवीन मालिका या संदेशावर आधारित आहे. वाचक त्याचे स्वागत करतील अशी आशा आहे. धन्यवाद!

संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

आत्मसाक्षात्कार – २४

(‘अतिमानव होणे म्हणजे काय’, ही संकल्पना श्रीअरविंदांनी येथे सुस्पष्ट करून सांगितली आहे. हा मजकूर दीर्घ असल्याने क्रमश: देत आहोत…)

परमेश्वराचे परिपूर्ण पात्र बनणे आणि दिव्य अतिमानव बनणे; हे तुमचे कार्य आहे आणि हे तुमच्या अस्तित्वाचे ध्येय आहे आणि त्याचसाठी तुम्ही इथे आहात. या व्यतिरिक्त इतर जे काही तुम्हाला करावे लागेल ते म्हणजे एकतर तुमची तयारी करून घेणे आहे किंवा तो मार्गावरील आनंद आहे; अन्यथा ते म्हणजे उद्देशापासून स्खलन, ध्येयच्युती आहे. या मार्गाच्या आधारे मिळणारी सत्ता वा शक्तिसामर्थ्य किंवा मार्गावरील आनंद हे तुमचे गंतव्य आणि प्रयोजन नसून, (परमेश्वराचे परिपूर्ण पात्र बनणे आणि दिव्य अतिमानव बनणे) हेच तुमचे गंतव्य आणि प्रयोजन आहे; त्या ध्येयपूर्तीच्या आनंदामध्ये तुमच्या अस्तित्वाची महानता आणि आनंद सामावलेला आहे. तुम्हाला मार्गावरील हा आनंद मिळत आहे कारण तुम्हाला ज्याचा वेध लागला आहे, तो (ईश्वर) देखील या मार्गावर तुमच्यासोबत आहे. तुम्ही तुमची सर्वोच्च शिखरे सर करावीत यासाठीच आरोहणाची शक्ती तुम्हाला प्रदान करण्यात आली आहे.

तुमचे काही कर्तव्य असेलच तर ते हेच आहे! तुमचे ध्येय काय असावे असे जर तुम्ही विचारत असाल, तर ते ध्येय हेच असावे. तुम्ही जर सुखाची अभिलाषा बाळगत असाल तर उपरोक्त गोष्टीइतका आनंद तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत लाभणार नाही. कारण स्वप्नांचा आनंद असो, झोपेचा आनंद असो किंवा स्व-विस्मृतीचा आनंद असो, हे सारे आनंद खंडित वा मर्यादित असतात. पण उपरोक्त आनंद मात्र तुमच्या समग्र अस्तित्वाचा आनंद असतो. तुम्ही जर असे विचारत असाल की, माझे अस्तित्व काय आहे, तर ‘ईश्वर’ हेच तुमचे अस्तित्व आहे आणि इतर सर्वकाही ही त्याची केवळ खंडित वा विपर्यस्त रूपे आहेत. तुम्ही जर ‘सत्य’ शोधू पाहात असाल, तर ते ‘सत्य’ हेच आहे. सातत्याने तेच तुमच्या दृष्टीसमोर असू द्या आणि सर्व गोष्टींमध्ये तुम्ही त्याच्याशीच एकनिष्ठ राहा. (क्रमश:)

श्रीअरविंद (CWSA 12 : 150)

आत्मसाक्षात्कार – १८

‘केवळ ईश्वराचा साक्षात्कार पुरेसा नाही’, असे जेव्हा मी म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की, असा साक्षात्कार चेतनेमध्ये चिरस्थायी परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुरेसा नसतो. मानवी प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवायचे असेल तर, त्यासाठी ‘ईश्वराच्या गतिशील शक्ती’च्या कार्याची आवश्यकता असते.

…‘ईश्वरी चेतना’ धारण करण्याची क्षमता सर्वच आधारांमध्ये, म्हणजे प्राकृतिक रचनांमध्ये नसते, हे खरे आहे आणि या प्राकृतिक साधनाची क्षमता वृद्धिंगत करण्याचा ते कोणता प्रयत्नही करत नाहीत. एकदा का तुम्ही त्या ईश्वरी चेतनेमधून खाली उतरलात की मग, तुम्ही अगदी एखाद्या सामान्य माणसासारखेच होऊन जाता. आणि म्हणून, जेव्हा ईश्वराचे अवतरण होते तेव्हा ते धारण करण्यासाठी म्हणून, व्यक्तीने स्वतःच्या प्राकृतिक साधनाच्या क्षमता, त्याच्या जटिलतेनिशी आणि बहुअंगांनिशी वृद्धिंगत करत नेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.

– श्रीअरविंद (Evening Talks with Sri Aurobindo : 349-350)

आत्मसाक्षात्कार – १७

(अहंकारापासून मुक्त होण्याचा एक मार्ग म्हणजे वासना-मुक्ती. परंतु हा मार्ग काहीसा कोरडा, रुक्ष आणि दूरवरचा आहे, अशी टिपण्णी श्रीमाताजींनी केली आहे आणि त्याच्या तुलनेत अधिक वेगवान मार्ग कोणता तो त्या सांगत आहेत.)

अहंकारापासून मुक्त होण्याची समस्या जर शारीरिकरित्या सोडवायची असेल तर धैर्य आणि निश्चय बाळगून (स्वत:ला) झोकून द्या. वासनांच्या मागे धावण्याचा दूरचा, दुष्कर, कष्टदायक आणि निराशाजनक मार्ग सोडून, व्यक्तीने साधेपणाने, संपूर्णतया, कोणत्याही अटी न लादता जर त्या ‘परमोच्च सत्या’प्रत, ‘परमोच्च संकल्पशक्ती’प्रत, ‘परमपुरुषा’प्रत स्वत:ला समर्पित केले; अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी जर स्वत:चे संपूर्ण अस्तित्व, संपूर्णतया ‘त्या’च्या हाती सोपविले, तर अहंकारापासून सुटका करून घेण्याचा तो सर्वात वेगवान आणि क्रांतिकारी मार्ग आहे.

लोकं म्हणतील की, हा मार्ग आचरणात आणणे खूप अवघड आहे. परंतु या मार्गात एक प्रकारची ऊब आहे, उत्कटता आहे, उत्साह आहे, प्रकाश आहे, सौंदर्य आहे, उत्कट आणि सर्जनशील जीवन आहे.

…संपूर्ण, समग्र, परिपूर्ण, नि:शेष आणि कोणत्याही अटीविना जे आत्मदान केले जाते, त्यालाच मी सकारात्मक मार्ग (positive way) म्हणते.

फक्त स्वत:साठी न जगता, स्वत:शी निगडित असे काहीही न ठेवता आणि स्वत:चा विचार न करता, सर्वाधिक सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत असे जे काही आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्ये निमग्न राहणे यामध्ये इतका अगाध आनंद आहे की, त्याची तुलना दुसऱ्या कशाशीच करता येऊ शकत नाही. ही एकच गोष्ट अर्थपूर्ण आहे, प्रयत्न करून पाहण्यायोग्य आहे. इतर सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ कालापव्यय असतो. वळणावळणाच्या रस्त्याने, धीम्या गतीने, कष्टपूर्वक, टप्याटप्प्याने वर्षानुवर्षे पर्वत चढत जाणे (पिपीलिका मार्ग) आणि अदृश्य पंख पसरवून, थेट शिखराकडे झेपावणे (विहंगम मार्ग) यामध्ये जो फरक आहे तो येथे आहे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 268-269)

आत्मसाक्षात्कार – १५

साधक : आम्ही जेव्हा कोणताही एखादा प्रयत्न करतो, तेव्हा आमच्यामध्ये असे काहीतरी असते की, ते लगेचच स्वत:वर खूष होऊन जाते, बढाया मारू लागते आणि एवढ्या-तेवढ्या प्रयत्नांनीच संतुष्ट होऊन जाते आणि परिणामी सारे काही बिघडून जाते. तेव्हा यापासून सुटका कशी करून घ्यायची?

श्रीमाताजी : आपण जेव्हा काहीतरी करत असतो तेव्हा आपल्यातीलच कोणीतरी त्यावर सदोदित लक्ष ठेवत असतो, निरीक्षण करत असतो. आणि मग कधीकधी तो गर्वाने फुलून जातो. तेव्हा साहजिकच, आपल्या प्रयत्नांमधील सामर्थ्य पुष्कळ प्रमाणात कमी होते.

काम करत असताना, जीवन जगत असताना व्यक्तीला स्वत:चे निरीक्षण करण्याची सवय असते. स्वत:चे निरीक्षण केलेच पाहिजे; परंतु त्याहूनही अधिक आवश्यक असते ते संपूर्णपणे प्रामाणिक राहण्याचा व सहजस्वाभाविक असण्याचा प्रयत्न करणे. व्यक्ती जे काही करत असते त्याबाबत ती अगदी सहजस्वाभाविक असली पाहिजे; म्हणजे व्यक्तीने सतत स्वत:चे निरीक्षण करत राहणे, स्वत:ला जोखत राहणे, स्वत:चे मूल्यमापन करत राहणे, कधीकधी तर खूपच कठोरपणे मूल्यमापन करणे, असे करू नये. खरेतर, स्वत:वरच खुश होऊन स्वत:चीच पाठ थोपटून घेणे जितके वाईट, तितकीच ही गोष्टदेखील वाईट असते; या दोन्हीही गोष्टी सारख्याच घातक असतात.

व्यक्ती अभीप्सेबाबत (aspiration) इतकी प्रामाणिक असली पाहिजे की, तिला आपण अभीप्सा बाळगत आहोत हेदेखील कळता कामा नये; जणू काही ती स्वत:च अभीप्सा बनून राहिली पाहिजे. जेव्हा हे खरोखर प्रत्यक्षात उतरेल तेव्हा व्यक्तीने खऱ्या अर्थाने काही असामान्य शक्ती प्राप्त केलेली असेल.

…व्यक्ती जेव्हा स्व-केंद्रित राहात नाही, ती म्हणजे काम करत असताना स्वत:कडे पाहणारा अहंकार असत नाही, तर व्यक्ती स्वत: ती कृतीच बनून जाते, त्याही पलीकडे जात, ती स्वत:च एक अभीप्सा बनून जाते तेव्हा, ते खरोखर चांगले असते. म्हणजे जेव्हा अभीप्सा बाळगणारी व्यक्ती म्हणूनसुद्धा ती शिल्लक राहत नाही, तर ती व्यक्ती म्हणजे स्वयमेव अभीप्साच बनून जाते आणि जेव्हा अशी व्यक्ती संपूर्ण एकाग्र अशा आवेगाने (ईश्वराप्रत) झेपावते तेव्हा ती खरोखरच खूप प्रगत होते. अन्यथा, नेहमीच एक प्रकारची क्षुद्र स्व-संतुष्टता, क्षुद्र आत्मप्रौढी आणि स्वत:बद्दलची कीव अशा सर्व प्रकारच्या गोष्टींचा व्यक्तीमध्ये शिरकाव होतो आणि सारे काही बिघडून जाते. अवघड असते हे सारे!

– श्रीमाताजी (CWM 06 : 402)

आत्मसाक्षात्कार – १२

(प्राणाच्या पृथगात्मतेविषयीचा (individualised) विचार आपण काल केला. आज आपण मनाच्या पृथगात्मतेविषयी श्रीमाताजी काय सांगत आहेत ते समजावून घेऊ.)

तुम्हाला जर स्वयमेव तुमच्या शारीर-मनाची (physical mind) जाणीव झाली तर… बरेच जणं त्याला ‘चव्हाटा’ (public square) असे संबोधतात, कारण तेथे प्रत्येक गोष्ट असते, तेथून प्रत्येक गोष्ट जात असते, पुन्हा परतून येत असते… सर्व संकल्पना तेथे (मनामध्ये) जातात, त्या एका जागी प्रवेश करतात, दुसरीकडून बाहेर पडतात. काही इथे असतात, काही तिथे असतात. अशा रितीने मन म्हणजे जणू एक चव्हाटाच असतो. त्यामध्ये कोणतीही सुव्यवस्था नसते आणि त्यामुळे बहुधा संकल्पना तिथे एकत्र येतात, एकमेकांवर आदळतात आणि मग सर्व तऱ्हेचे गोंधळ उडतात.

परंतु मग कधीतरी एखाद्या दिवशी व्यक्ती सजग होते आणि विचार करू लागते की, ‘माझं मन’ असे मी कशाला बरं म्हणू शकेन? किंवा ‘माझं मन’ म्हणजे काय? व्यक्तीला स्वतःच्या पद्धतीने विचार करायलादेखील अनेक वर्षं लागतात. ही एक साधीशी गोष्ट करण्यामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक वर्षं सजगतेने, अतिशय काळजीपूर्वक, अगदी सयुक्तिक, अतिशय सुसंगत असे काम करावे लागते; सुव्यवस्था लावावी लागते, निवड करावी लागते, घडण करावी लागते. व्यक्तीला असे वाटत असते की, माझी माझी स्वतःची अशी एक विचारसरणी आहे, पण असे अजिबात नसते.

व्यक्ती ज्या लोकांशी संवाद साधत असते, ती जी पुस्तके वाचत असते आणि तिची जी काही मनोवस्था (mood) असते त्यावर ती पूर्णतः अवलंबून असते. तुमचे पचन व्यवस्थित झाले आहे की तुम्हाला अपचन झाले आहे; खुली हवा नसलेल्या एका खोलीत तुम्ही स्वतःला बंदिस्त करून घेतले आहे की, तुम्ही स्वच्छ मोकळ्या हवेत आहात; तुमच्या नजरेसमोर एखादे सुंदर दृश्य आहे, स्वच्छ सूर्यप्रकाश आहे की पाऊस पडत आहे, अशा सगळ्या गोष्टींवर तुमचे त्या त्या वेळचे विचार अवलंबून असतात. आणि तुम्हाला त्याची जाणीवसुद्धा नसते. तुमच्याशी संबद्ध नसलेल्या, पूर्णपणे असंबद्ध अशा ढिगभर गोष्टींचा तुम्ही विचार करत राहता. मात्र एक सुव्यवस्थित, सुसंगत, तर्कसंगत विचारसरणी तयार होण्यासाठी बारकाईने तपशिलवार, प्रदीर्घ काम करण्याची आवश्यकता असते.

यामधील गमतीचा भाग असा की, जेव्हा तुम्ही अशा तऱ्हेची एक सुंदर, सुरचित, सशक्त, शक्तिशाली मानसिक रचना घडविण्यामध्ये यशस्वी होता, नेमकी तेव्हाच तुम्हाला पहिली गोष्ट सांगण्यात येते ती अशी की, “तुम्हाला ईश्वराशी ऐक्य पावण्यासाठी सक्षम व्हायचे असेल तर, या सर्व मानसिक रचना तुम्ही मोडून काढल्या पाहिजेत.” (अर्थात हेही तितकेच सत्य आहे की,) जोपर्यंत तुम्ही ती रचना घडवलेली नसते, तोपर्यंत तुम्ही ईश्वराशी एकरूपही होऊ शकत नाही कारण तोपर्यंत तुम्ही म्हणजे नुसता एक वस्तुंचा ढिगारा असता, तुम्ही ‘तुम्ही’ नसता आणि त्यामुळे त्या वस्तुंच्या ढिगाऱ्याखेरीज ईश्वराला देण्यासारखे तुमच्यापाशी काहीच नसते. आत्मदान करता येण्यापूर्वी व्यक्ती आधी स्वतंत्रपणे अस्तित्वात असली पाहिजे. मी (प्राणाबाबतीत) जे सांगितले तेच मी आत्ता पुन्हा येथे (मनाबाबत) सांगितले. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 258-259)