Tag Archive for: साधना

(व्यक्ती बाह्य परिवर्तन [म्हणजे स्वत:च्या मन, प्राण व शरीरात परिवर्तन] करू इच्छित असेल तर, आंतरिक अनुभूती व साक्षात्कार या गोष्टींची त्यास मदत होते का? असा प्रश्न एका साधकाने विचारला आहे; त्याला श्रीमाताजींनी दिलेल्या उत्तरातील हा अंशभाग…)

आपल्यामध्ये परिवर्तन घडावे ही प्रामाणिक इच्छा जर व्यक्तीकडे असेल तर तिला आंतरिक अनुभूती व साक्षात्कार यापासून खूप साहाय्य मिळते; कारण त्यातून व्यक्तीला परिवर्तनासाठी आवश्यक असणारी शक्ती आणि परिवर्तनासाठी आवश्यक असणारा आधार मिळतो. मात्र परिवर्तन घडावे अशी खरी प्रामाणिक इच्छा त्या व्यक्तीकडे असली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 04 : 349)

साधक : आध्यात्मिक जीवनासाठी स्वत:ला सज्ज करायचे तर त्यासाठी कोणत्या मूलभूत सद्गुणाची जोपासना केली पाहिजे?

श्रीमाताजी : वास्तविक मी ही गोष्ट अनेकदा सांगितली आहे, पण त्याबद्दल पुनश्च एकदा सांगण्याची ही संधी आहे. तो गुण आहे प्रामाणिकपणा (sincerity). हा प्रामाणिकपणा निरपेक्ष आणि परिपूर्ण असला पाहिजे, कारण प्रामाणिकपणा हेच अध्यात्म-मार्गावरील तुमचे एकमेव संरक्षण असते.

तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर अगदी पुढच्याच पावलावर तुम्ही पडणार व तुमचा कपाळमोक्ष होणार हे निश्चित. आपल्या सभोवार सर्व प्रकारच्या शक्ती, इच्छा, प्रभाव, जीव वावरत असतात आणि तुमच्या प्रामाणिकपणामध्ये एखादी तरी लहानशी फट आढळते का, याच्या ते शोधातच असतात आणि तशी फट दिसताच तिच्यामधून ते झपाट्याने तुमच्यामध्ये शिरकाव करतात आणि तुम्हाला गोंधळात टाकतात.

म्हणून, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी, कोणत्याही गोष्टीला प्रारंभ करण्यापूर्वी, कोणतीही गोष्ट करून पाहताना सर्वप्रथम याची खात्री करून घ्या की, तुम्ही प्रामाणिक आहात ना? आणि एवढेच नव्हे तर, अधिकाधिक प्रामाणिक बनण्याचा तुम्ही प्रयत्न कराल ना? (तुम्हाला स्वत:बद्दल ही खात्री पटणे आवश्यक आहे.) कारण प्रामाणिकपणा हेच तुमचे एकमेव संरक्षण असते.

– श्रीमाताजी (CWM 08 : 247-248)

(जीवनाच्या रूपांतरणासाठी खुलेपणा कसा आवश्यक आहे ते कालच्या भागात आपण पाहिले. आणि या रूपांतरणासाठी खुलेपणाबरोबरच अभीप्सा आणि नकार या दोन गोष्टी किती मोलाच्या आहेत, हे येथे श्रीमाताजी सांगत आहेत…)

तुम्ही जे जाणता असे तुम्हाला वाटते त्या गोष्टींवर अडून राहणे; तुम्हाला जे संवेदित होते, तुम्हाला जे आवडते त्यालाच चिकटून राहणे; तुमच्या सवयींना आणि तथाकथित गरजांना धरून राहणे; हे जग आत्ता जसे आहे तशा त्या जगाशीच संबंधित राहणे; हे चिकटून राहणेच (to cling) तुमचे हातपाय जखडून टाकते. या सर्व गोष्टींचे बंध तुम्ही एकेक करून सोडून दिले पाहिजेत. सर्व बंधने तुम्ही मोकळी केली पाहिजेत. हे आत्तापर्यंत अनेकदा सांगितले गेले आहे पण लोकं त्याच त्याच गोष्टी कुरवाळत राहतात.

…अगदी अशी माणसे असतात की जी अतिशय वाक्चतुर असतात, जी इतरांना शिकवण देतात, अशी माणसेदेखील कशाला ना कशाला तरी चिकटून असतात. ती त्यांच्या दृष्टिकोनाला, त्यांच्या भावनापद्धतींना चिकटून असतात. त्यांना ज्या पद्धतीने प्रगती करण्याची सवय लागलेली असते त्या पद्धतीला ती माणसे चिकटून राहतात. त्यांच्या दृष्टीने प्रगती करण्याची त्यांची सवय हीच जणू काही एकमेव पद्धत असते.

तुमच्यावर कोणतेही बंध असता कामा नयेत. तुम्ही अगदी मुक्त असले पाहिजे…अगदी मुक्त! अभीप्सेव्यतिरिक्त अन्य सर्व गोष्टीत परिवर्तन करण्यासाठी तुम्ही नेहमीच सज्ज असले पाहिजे.

आपल्याला परिपूर्णते‌ची, दिव्य प्रकाशा‌ची, दिव्य प्रेमा‌ची, सत्याची आवश्यकता असली पाहिजे. आपल्याला परम परिपूर्णत्व‌ मिळवायचे आहे. तुम्हाला त्याची गरज वाटली पाहिजे, आस लागली पाहिजे…

फक्त परमेश्वरच तुमची ही आस पूर्ण करू शकतो.

पुढे चालत राहा, वाटचाल करत राहा.

– श्रीमाताजी (Conversation with a Disciple, October 7, 1964)

 

(पूर्वार्ध)

(व्यक्तीच्या मनात जे पूर्वग्रह, पूर्वकल्पना असतात त्यामुळे तिच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये कसा अडथळा येतो, हे श्रीमाताजींनी सांगितले आणि आता त्या पुढे सांगत आहेत…)

व्यक्ती जर अगदी सहजस्वाभाविक रितीने खुली होऊ शकली… (श्रीमाताजी हातांची ओंजळ खुली करून दाखवितात.) अशा साधेपणाने खुली होऊ शकली आणि अशा रितीने, येणारी प्रत्येक गोष्ट स्वीकारण्यासाठी व्यक्ती तयार झाली तर, कदाचित काहीतरी (प्रगती) घडून येईल. अर्थातच, तुमच्यापाशी प्रगतीची तृष्णा असली पाहिजे. काही जाणून घेण्याची, स्वतःचे रूपांतरण करण्याची तळमळ तुमच्यामध्ये असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिव्य प्रेम व सत्या‌विषयीची आस तुमच्यामध्ये असेल आणि ती आस जर तुम्ही तशीच कायम ठेवू शकलात तर तुम्ही वेगाने प्रगती करता. खरोखर, ही आस, ही गरजच महत्त्वाची असते. इतर गोष्टी तितक्याशा महत्त्वाच्या नसतात. जर कशाची जरुरी असेल तर ती असते आस बाळगण्याची! (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (Conversation with a Disciple, October 7, 1964)

ज्या क्षणी आविष्काराचा खटाटोप नाहीसा होतो तेव्हा, तो आविष्कार सहजस्वाभाविक होऊन जातो. एखादे फूल जसे सहजतेने उमलून, त्याचे सौंदर्य अभिव्यक्त करते; कोणताही गाजावाजा न करता किंवा कोणत्याही आवेशाविना अगदी सहजतेने आपला सुगंध पसरविते तसा तो आविष्कार असतो. या सहजतेमध्ये मोठी शक्ती सामावलेली असते, ती शक्ती निर्भेळ असते; त्यामुळे त्यातून कोणत्याही विघातक प्रतिक्रिया उद्भवत नाहीत; उद्भवल्याच तर त्या अगदीच अल्प असतात.

प्राणाच्या (vital) ताकदीवर फार विसंबून राहता कामा नये कारण ती ताकद ही कर्ममार्गावरील प्रलोभक (tempter) असते. तिच्या जाळ्यामध्ये फसण्याचा नेहमीच धोका असतो कारण तिच्यामुळे तुम्हाला तात्काळ परिणामांची चव चाखता येते. कर्म चांगले करण्याच्या आपल्या पहिल्या उत्साहाच्या आणि उत्सुकतेच्या भरात, त्या ताकदीचा उपयोग करण्याच्या नादात, आपण वाहवत जातो. मात्र त्यामुळे, योग्य दिशेने चाललेल्या आपल्या सर्व प्रयत्नामध्ये अचानकपणे बाधा निर्माण होते आणि आपण जे काही करत असतो त्यामध्ये भ्रांतीचे आणि विनाशाचे बीज पेरले जाते.

सहजता, सहजता! हे ईश्वरा, तुझ्या उपस्थितीची विशुद्धता किती मधुर आहे!

– श्रीमाताजी (CWM 01 : 17)

चैत्य पुरुष (अंतरात्मा, psychic being) जेव्हा प्रबल आणि अग्रस्थानी आलेला असतो तेव्हा तो उघडपणे मदत करतो. इतकेच नव्हे तर तो मन, प्राण आणि शारीरिक प्रकृती यांचे देखील सुशासन करू शकतो. सत्य काय आणि मिथ्या काय, ईश्वरी काय किंवा असुरी काय, योग्य काय आणि अयोग्य काय, याविषयीचे स्पष्ट संकेत तो देतो. एवढेच नाही तर, विरोधी शक्तींचे सर्व हल्लेसुद्धा तो परतवून लावतो.

*

‘आंतरात्मिक दृष्टिकोन (psychic attitude) बाळगण्याची खरी आवश्यकता आहे,’ हा तुमचा विचार योग्यच आहे. आंतरात्मिक दृष्टिकोन बाळगल्यामुळे प्रगती साधीसरळ, सहजस्वाभाविक, आनंदमय आणि सुलभ होऊ शकते. चिकाटी बाळगा, साधना सोडून देण्याचे काहीच कारण नाही. उद्भवणाऱ्या अडीअडचणींमुळे नाउमेद होऊ नका. सरतेशेवटी विजय आणि चिरस्थायी शांती निश्चित आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 339 & 340)

साधनेमध्ये होणाऱ्या प्राणिक आवेगांच्या भेसळीतून जेव्हा साधक मुक्त होईल आणि तो जेव्हा श्रीमाताजींप्रत साधेसुधे व प्रामाणिक आत्मार्पण करू शकेल तेव्हाच त्या साधकातील चैत्य पुरुष, अंतरात्मा (Psychic Being) पूर्णत: खुला होईल. जर त्यामध्ये कोणतेही अहंकारी वळण असेल किंवा प्रेरणेमध्ये अप्रामाणिकता असेल, प्राणिक मागण्यांच्या दबावाखाली येऊन साधना केली जात असेल किंवा पूर्णपणे वा अंशत: कोणत्यातरी आध्यात्मिक वा इतर आकांक्षा पूर्ण करण्यासाठी साधना केली जात असेल; अभिमान, प्रौढी किंवा सत्तापिपासा, पद मिळविण्यासाठी किंवा इतरांवर प्रभाव पडावा म्हणून किंवा योगिक शक्तीच्या साहाय्याने कोणतीतरी प्राणिक इच्छा भागवण्याची ऊर्मी म्हणून साधना केली जात असेल तर, चैत्य पुरुष मुक्त होणार नाही किंवा तो जर मुक्त झालाच तर तो अंशत:च किंवा काही काळासाठीच मुक्त होईल आणि परत बंदिस्त होऊन जाईल कारण तो प्राणिक कृतींनी झाकला गेलेला असेल. आंतरात्मिक अग्नी प्राणिक धुरामुळे घुसमटून, विझून जातो.

तसेच, साधनेमध्ये फक्त मनच पुढाकार घेत असेल आणि अंतरात्म्याला मागे ठेवत असेल किंवा भक्ती वा साधनेतील इतर क्रिया अंतरात्मिक रूप धारण करण्याऐवजी अधिक प्राणिक बनत असतील, तरीदेखील तशीच अ-क्षमता निर्माण होते. शुद्धता, साधासरळ प्रामाणिकपणा आणि कोणत्याही ढोंगाची किंवा मागणीची ज्यामध्ये भेसळ झालेली नाही अशी निरहंकारी आत्मार्पण-क्षमता या चैत्य पुरुषाच्या पूर्ण प्रकटीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या अटी आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 349)

 

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला केलेले मार्गदर्शन…)

तुमचे मन अपेक्षांनी आणि इच्छांनी अतिव्याप्त आहे. साधना करणे शक्य झाले पाहिजे असे जर तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही अपेक्षा आणि इच्छा या गोष्टी तुमच्यामधून काढून टाकल्या पाहिजेत आणि अविचलता, निरपेक्षता, साधेपणा आणि समर्पण या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत. सर्वप्रथम तुम्ही याच गोष्टी संपादन केल्या पाहिजेत. बाकीच्या गोष्टी नंतर येतील; कारण (अविचलता, निरपेक्षता, साधेपणा आणि समर्पण) या गोष्टीच साधनेचा खरा पाया आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 139)

(श्रीअरविंद यांनी एका श्रीकृष्ण-भक्ताला केलेले मार्गदर्शन…)

तुम्ही श्रीकृष्णासमीप साधेसरळपणाने का जात नाही? त्यासाठीचा साधासरळ मार्ग म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायचा. तुम्ही प्रार्थना केलीत तर ती प्रार्थना श्रीकृष्ण ऐकतो यावर विश्वास ठेवा. तुम्हाला त्याच्याकडून प्रतिसाद मिळण्यास वेळ लागत असला तरी, तो सारे काही जाणतो आणि तो तुमच्यावर प्रेम करतो यावर विश्वास ठेवा. आणि (तुम्हाला कधी प्रतिसाद द्यायचा त्या) वेळेची निवड करण्याबाबत तो सर्वाधिक सूज्ञ आहे, याची खात्री बाळगा.

परंतु त्या दरम्यान, तुम्ही शांतपणे तुमची भूमी (आधार) स्वच्छ करा. म्हणजे जेव्हा तो येईल तेव्हा त्याला काट्याकुट्यामधून, दगडधोंड्यांमधून वाट काढावी लागणार नाही. हे माझे सांगणे आहे आणि मी काय सांगत आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. कारण तुम्ही ज्या अडचणी सांगत आहात त्या सर्व मानवी अडीअडचणींची, संघर्षांची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि त्यावरील उपायही मला माहीत आहेत. त्यामुळे, संघर्ष व अडीअडचणी ज्यामुळे कमी होतील, त्यांचा कालावधी ज्यामुळे कमी होईल अशा गोष्टींवर म्हणजे आंतरात्मिक वळण, श्रद्धा, साधासरळ आणि परिपूर्ण विश्वास व भरवसा या गोष्टींवर मी नेहमी भर देत असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 487-488)

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुम्हाला तुमच्या प्राणाचे शुद्धीकरण करायचे असेल तर, खोटेपणाबरोबर, मिथ्यत्वाबरोबर तुमचा प्राण जी तडजोड करत आहे ती काढून टाकली पाहिजे. आणि त्याच्यावर साधे सरळ आंतरात्मिक सत्य कोरून ठेवण्याची सवय तुम्ही लावून घेतली पाहिजे. म्हणजे मग त्या प्राणामध्ये शिरकाव करण्यास कोणालाच वाव मिळणार नाही. तुमच्या प्राणामधील जो भाग अशा प्रकारच्या तडजोडी करत आहे त्या भागावर हा धडा पक्का कोरून ठेवता आला तर, (तुमच्या हातून घडलेल्या) या चुकीच्या गोष्टीमधूनही निश्चितपणे काहीतरी चांगले निष्पन्न होईल.

तुमच्या प्राणिक अस्तित्वाच्या दरवाजावर श्रीमाताजींची पुढील सूचना चिकटवून ठेवा — “येथून पुढे, या दरवाजाच्या आतमध्ये खोटेपणाला, मिथ्यत्वाला प्रवेश नाही.” आणि ती सूचना काटेकोरपणे अंमलात आणली जात आहे ना, हे पाहण्यासाठी दरवाजावर एका पहारेकऱ्याची नेमणूक करा.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 104-105)