Posts

साधनेची मुळाक्षरे – ३०

श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधील मजकूर –

‘योगसाधने’मध्ये प्रार्थना किंवा ध्यान या दोन्हीचे खूप महत्त्व असते, अगदी खोल अंत:करणातून उदित झालेली प्रार्थना ही भावनांच्या किंवा अभीप्सेच्या शीर्षस्थानी असायला हवी; ईश्वरविषयक आनंद किंवा प्रकाश यांच्या समवेत आतून जिवंतपणे उमलून येणारी बाब म्हणून ‘जप’ किंवा ध्यान व्हायला हवे. जर ह्या गोष्टी केवळ यांत्रिकपणे केल्या आणि केवळ कर्तव्य म्हणून केल्या तर त्या रूक्षपणा आणि निरसता यांच्याकडे झुकतात आणि त्यामुळे त्या प्रभावहीन ठरण्याची शक्यता असते.

तुम्ही अमुक एखादा परिणाम घडून येण्यासाठी, एक साधन म्हणून जरुरीपेक्षा जरा जास्तच प्रमाणात ‘जप’ करत आहात असे मला वाटते, असे जेव्हा मी म्हणालो, तेव्हा मला असे म्हणावयाचे होते की, – तुम्ही विशिष्ट गोष्टी घडून येण्यासाठी एक प्रक्रिया म्हणून, एक साधन म्हणून जपाचा अधिक उपयोग करत आहात आणि म्हणूनच मला तुमच्यामध्ये मानसिक, आत्मिक अशी अवस्था विकसित व्हावी असे वाटत होते, कारण जेव्हा चैत्य पुरुष पुढे आलेला असतो तेव्हा प्रार्थनेमध्ये आनंद आणि जिवंतपणा यांचा अभाव नसतो; तेव्हा त्यामध्ये अभीप्सा असते, एक धडपड, एक आस असते; अशा वेळी भक्तीचा अखंड पाझर चालू राहण्यामध्ये कोणतीही अडचण नसते. मन जेव्हा शांत, स्थिर असते, अंतर्मुख आणि ऊर्ध्वमुख असते तेव्हा ध्यानामध्ये कोणतीही अडचण येत नाही किंवा त्यामध्ये रस वाटत नाही असेही होत नाही. ध्यान ही ज्ञानाभिमुख अशी एक प्रक्रिया आहे आणि ती ज्ञानाच्या माध्यमातूनच प्रगत होते; ती मस्तकाशी संबंधित बाब आहे, हृदयाशी नाही; तेव्हा तुम्हाला जर ध्यान हवे असेल तर, तुम्ही ज्ञानाकडे पाठ फिरविता कामा नये.

हृदयामध्ये चित्त एकाग्र करणे हे ध्यान नव्हे; तर ती आपल्या ‘प्रियकरा’ला, ‘ईश्वरा’ला दिलेली हाक आहे. ‘पूर्णयोग’ म्हणजे केवळ ‘ज्ञानयोग’ नव्हे – ज्ञानयोग हा एक मार्ग झाला; परंतु आत्मदान, समर्पण, भक्ती हा पूर्णयोगाचा पाया आहे आणि अंतिमत: हा पाया नसेल तर काहीच होऊ शकत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 226-227)

साधनेची मुळाक्षरे – २७

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही ‘ध्यान’ कशाला म्हणता? डोळे मिटणे आणि मन एकाग्र करणे याला? सत्य चेतना खाली उतरविण्यासाठी तिला हाक देण्याची ही केवळ एक पद्धत आहे.

सत्यचेतनेशी जोडले जाणे आणि तिचे अवतरण जाणवणे, केवळ हीच गोष्ट महत्त्वाची आहे आणि जर का ती कोणत्याही पारंपरिक पद्धतीविना होत असेल – जसे ते माझ्या बाबतीत नेहमीच होत असे – तर ते अधिक चांगले आहे. ध्यान हे एक केवळ साधन किंवा उपकरण आहे, चालता, बोलता, काम करतानासुद्धा साधनेमध्ये असणे ही खरी प्रक्रिया आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 300)

साधनेची मुळाक्षरे – २६

प्रश्न : ध्यानाची उद्दिष्टे काय असायला हवीत किंवा ध्यानाच्या संकल्पना काय असायला हव्यात?

श्रीअरविंद : जी तुमच्या प्रकृतीशी आणि तुमच्या सर्वोच्च आकांक्षांशी अनुरूप असतील ती! परंतु जर का तुम्ही मला निरपवाद उत्तर विचारत असाल, तर मला असे म्हटले पाहिजे की, ध्यानासाठी म्हणजे मननासाठी किंवा चिंतनासाठी ‘ब्रह्म’ हे नेहमीच सर्वोत्कृष्ट उद्दिष्ट असते आणि सर्वांतर्यामी असणाऱ्या ‘देवा’वर, ‘देवा’मध्ये निवास करणाऱ्या सर्वांवर आणि सर्व काही ‘देव’च आहे या संकल्पनांवर मनाने आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. मग तो ‘देव’ ‘अवैयक्तिक’ आहे की ‘वैयक्तिक’ आहे, की सापेक्ष असा ‘एकमेव आत्मा’ आहे, या गोष्टीने वस्तुतः फारसा काही फरक पडत नाही. पण मला तरी (सर्वं खल्विदं ब्रह्म) ही संकल्पना सर्वोत्तम वाटते. कारण ती सर्वोच्च आहे आणि तिच्यामध्ये, म्हणजे ‘सर्व काही ब्रह्म आहे’ या संकल्पनेमध्ये, इहलौकिक सत्य असो अथवा पारलौकिक सत्य असो, किंवा सर्व अस्तित्वाच्या अतीत असणारे सत्य असो, त्या सर्व सत्यांचा समावेश होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 294-295)

साधनेची मुळाक्षरे – २५

प्रश्न : ध्यानासाठी अगदी आवश्यक असणारी आंतरिक व बाह्य परिस्थिती कोणती?

श्रीअरविंद : मूलभूत अशी काही बाह्य परिस्थिती आवश्यक नाही, परंतु ध्यानाच्या वेळी एकांत व विलगपणा असेल आणि त्याचबरोबर शरीराची स्थिरता असेल, तर ध्यानासाठी या गोष्टींची मदत होते. नवोदितांसाठी या गोष्टी बऱ्याचदा अगदी आवश्यक असतात. परंतु बाह्य परिस्थितीमुळे व्यक्तीवर मर्यादा पडता कामा नयेत. एकदा ध्यानाची सवय झाली की मग, कोणत्याही परिस्थितीत म्हणजे, पहुडलेले असताना, उठता-बसता, चालताना, एकटे असताना किंवा इतर लोकांसमवेत असताना, शांततेमध्ये किंवा गलक्यामध्ये, कोणत्याही परिस्थितीत ध्यान करता आले पाहिजे.

मनाचे सैरावैरा भरकटणे, विस्मरण, झोप, शारीरिक आणि स्नायुगत अधीरता व अशांती या ध्यानाच्या आड येणाऱ्या साऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ‘संकल्पाची एकाग्रता’ ही आंतरिक परिस्थिती सर्वप्रथम महत्त्वाची आहे.

दुसरी आवश्यक परिस्थिती म्हणजे उत्तरोत्तर वाढणारे पावित्र्य आणि जेथून विचार व भावनांचा उदय होतो, त्या आंतरिक चेतनेची (चित्ताची) स्थिरता. म्हणजे राग, दुःख, निराशा, ऐहिक घटनांविषयीची चिंता या साऱ्या अडथळा निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियांपासून चित्त मुक्त असले पाहिजे. मानसिक आणि नैतिक पूर्णत्व या दोन्ही गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे जोडलेल्या असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 295)

साधनेची मुळाक्षरे – २४

प्रश्न : ध्यान म्हणजे नक्की काय?

श्रीअरविंद : ‘ध्याना’ची भारतीय संकल्पना स्पष्ट करण्यासाठी इंग्रजीमध्ये Meditation आणि Contemplation हे दोन शब्द वापरले जातात.

मनन –
एकाच विषयाचा वेध घेण्यासाठी म्हणून विचारांच्या एका सलग मालिकेवर मनाचे लक्ष केंद्रित करणे म्हणजे ‘मनन’ (Meditation).

चिंतन –
एकाग्रतेच्या बळावर, वस्तुचे, प्रतिमेचे किंवा संकल्पनेचे ज्ञान, मनामध्ये स्वाभाविकरित्या उदित व्हावे म्हणून, कोणत्यातरी एकाच वस्तुवर, प्रतिमेवर किंवा संकल्पनेवर मन एकाग्र करणे म्हणजे ‘चिंतन’ (Contemplation). हे दोन्ही प्रकार ही ध्यानाचीच दोन रूपं आहेत. कारण विचारावर असू दे, दृश्यावर असू दे किंवा ज्ञानावर असू दे, पण मानसिक एकाग्रता हे ध्यानाचे तत्त्व आहे.

आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता –
ध्यानाचे इतरही काही प्रकार आहेत. एके ठिकाणी सामी विवेकानंदांनी तुम्हाला तुमच्या विचारांपासून अलग होऊन मागे उभे राहायला सांगितले आहे. मनात विचार जसे येत आहेत तसे येत राहू देत, तुम्ही नुसते त्यांचे निरीक्षण करत राहायचे आणि ते काय आहेत हे जाणून घ्यायचे. याला ‘आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता’ असे म्हणता येईल.

मुक्तिप्रद ध्यान –
आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता ही दुसऱ्या एका प्रकाराकडे घेऊन जाते. मनामधून सर्व विचार काढून टाकणे; जेणेकरून, ते मन एक प्रकारची विशुद्ध सावध अशी पोकळी बनले पाहिजे म्हणजे त्यामध्ये दिव्य ज्ञान अवतरू शकेल आणि त्याचा ठसा उमटवू शकेल; त्यामध्ये सामान्य मानवी मनाच्या कनिष्ठ विचारांची लुडबुड असणार नाही आणि काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूने लिहावे तितकी स्पष्टता त्यामध्ये असेल. अशा प्रकारे, सर्व मानसिक विचारांचा त्याग ही योगाची एक पद्धत असल्याचे ‘गीते’मध्ये सांगितले आहे, असे तुम्हाला आढळून येईल आणि या पद्धतीला गीतेने पसंती दिलेली दिसते. ह्याला ‘मुक्तिप्रद ध्यान’ असे म्हणता येईल. कारण या ध्यानामुळे विचारांच्या यांत्रिक पद्धतीच्या गुलामीमधून मनाची मुक्तता होते. वाटले तर विचार करायचा किंवा नाही वाटले तर विचार करायचा नाही, असे करण्यास मनाला या ध्यानामुळे, मुभा मिळते. तसेच, स्वतःच्या विचारांच्या निवडीला मुभा मिळते किंवा वाटले तर, विचारांच्या अतीत होऊन, आपल्या तत्त्वज्ञानामध्ये ज्याला ‘विज्ञान’ असे म्हटले जाते त्या सत्याच्या शुद्ध बोधाप्रत जाण्याची मनाला मुभा मिळते.

‘मनन’ ही मानवी मनाला सर्वाधिक सोपी असणारी प्रक्रिया आहे पण त्याचे परिणाम अल्प असतात. ‘चिंतन’ ही अधिक कठीण पण परिणामांच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. आत्म-निरीक्षण आणि विचारमालिकांपासून मुक्ती (मुक्तिप्रद ध्यान) या गोष्टी सर्वाधिक कठीण आहेत परंतु त्याचे फळ मात्र विशाल आणि महान असे असते. व्यक्ती स्वतःच्या कलानुसार आणि क्षमतेनुसार यापैकी कोणत्याही प्रकाराची निवड करू शकते. योग्य पद्धती म्हणायची झाली तर, ध्यानाच्या या सर्वच प्रकारांचा वापर करावा, प्रत्येक पद्धत तिच्या तिच्या स्थानी आणि तिच्या तिच्या उद्दिष्टांसाठीच वापरण्यात यावी. परंतु यासाठी एका दृढ श्रद्धेची, स्थिर धैर्याची आणि ‘योगा’चे आत्म-उपयोजन (self-application) करण्यासाठी प्रचंड ऊर्जेची आवश्यकता असते.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 293-294)

विचार शलाका – ३५

प्रश्न : ध्यानासाठी अत्यावश्यक अशी आंतरिक व बाह्य परिस्थिती कोणती?

श्रीअरविंद : मूलभूत अशी काही बाह्य परिस्थिती आवश्यक नसते, परंतु ध्यानाच्या वेळी एकांत व विलगपणा असेल आणि त्याचबरोबर शरीराची स्थिरता असेल, तर ध्यानासाठी या गोष्टींची मदत होते. नवोदितांसाठी या गोष्टी बऱ्याचदा अगदी आवश्यक असतात. परंतु बाह्य परिस्थितीमुळे व्यक्तीवर मर्यादा पडता कामा नयेत.

एकदा ध्यानाची सवय झाली की मग, कोणत्याही परिस्थितीत म्हणजे, पहुडलेले असताना, उठताबसता, चालताना, एकटे असताना किंवा इतर लोकांसमवेत असताना, शांततेमध्ये किंवा गोंगाटामध्ये कोणत्याही परिस्थितीत ध्यान साधता आले पाहिजे. मनाचे सैरावैरा भरकटणे, विसराळूपणा, निद्रा, शारीरिक आणि नसांची अधीरता, अशांती या साऱ्या ध्यानाच्या आड येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ‘संकल्पाची एकाग्रता’ ही आंतरिक परिस्थिती सर्वप्रथम महत्त्वाची आहे.

दुसरी आवश्यक परिस्थिती म्हणजे चढतेवाढते पावित्र्य आणि जेथून विचार आणि भावनांचा उदय होतो, त्या चित्ताची स्थिरता. म्हणजे राग, दुःख, निराशा, ऐहिक घटनांविषयीची चिंता या साऱ्या अडथळा निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियांपासून चित्त मुक्त असले पाहिजे. मानसिक पूर्णत्व आणि नैतिकता या दोन्ही गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे जोडलेल्या आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 295)

विचार शलाका – ३४

प्रश्न : ध्यानाची संकल्पना काय असली पाहिजे किंवा ध्यानाचे उद्दिष्ट काय असले पाहिजे ?

श्रीअरविंद : जे तुमच्या प्रकृतीशी आणि तुमच्या सर्वोच्च आकांक्षांशी अनुरूप असेल ते! परंतु जर तुम्ही मला नेमके उत्तर विचारत असाल, तर मी म्हणेन की, ध्यानासाठी म्हणजे मननासाठी किंवा चिंतनासाठी ‘ब्रह्म’ हे नेहमीच सर्वोत्कृष्ट उद्दिष्ट असते आणि मनाने सर्वांतर्यामी असणाऱ्या ‘देवा’वर, ‘देवा’मध्ये निवास करणाऱ्या सर्वांवर आणि सर्व काही ‘देव’च आहे या संकल्पनेवर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. मग तो देव ‘अवैयक्तिक’ आहे की ‘वैयक्तिक’ आहे, की सापेक्ष असा ‘स्वतः’मधीलच देव आहे, या गोष्टीने वस्तुतः फारसा काही फरक पडत नाही. पण मला तरी ही संकल्पना सर्वोत्तम वाटते. कारण ती सर्वोच्च आहे आणि तिच्यामध्ये, म्हणजे ‘सर्व काही ब्रह्म आहे’ या संकल्पनेमध्ये, इहलौकिक सत्य असो अथवा, पारलौकिक सत्य असो, किंवा सर्व अस्तित्वाच्या अतीत असणारे सत्य असो, या सर्व सत्यांचा समावेश होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 294-295)

विचार शलाका – ३२

प्रश्न : ध्यान म्हणजे नेमके काय?

श्रीअरविंद : ‘ध्याना’ची भारतीय संकल्पना स्पष्ट करण्यासाठी इंग्रजीमध्ये meditation आणि contemplation हे दोन शब्द उपयोगात आणले जातात. एकाच विषयाचा वेध घेण्यासाठी म्हणून विचारांच्या एका सलग मालिकेवर मनाचे लक्ष केंद्रित करणे म्हणजे ‘ध्यान’. एकाग्रतेच्या आधारे, वस्तुचे, प्रतिमेचे किंवा संकल्पनेचे ज्ञान, मनामध्ये स्वाभाविकरित्या उदित व्हावे म्हणून, कोणत्यातरी एकाच वस्तुवर, प्रतिमेवर किंवा संकल्पनेवर, एकाग्रता करणे म्हणजे ‘चिंतन’. हे दोन्ही प्रकार ही ध्यानाचीच दोन रूपं आहेत. कारण विचारावर असू दे, दृश्यावर असू दे किंवा ज्ञानावर असू दे, पण मनाची एकाग्रता करणे हे ध्यानाचे तत्त्व आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 293-294)

साधनेची मुळाक्षरे – २६

मानसिक प्रयत्नांचे जिवंत आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन कसे करायचे, त्यासाठी कोणती साधना करायची? या प्रश्नाला उत्तर देताना श्रीअरविंद यांनी दोन मार्ग सांगितले आहेत. त्यातील हा दुसरा मार्ग….

दुसरा मार्ग म्हणजे मस्तकामध्ये, मानसिक केंद्रामध्ये करावयाची एकाग्रता. त्यामुळे जर का पृष्ठस्तरीय मनामध्ये शांतता येऊ शकली तर, आतील, व्यापक, अधिक गहन असे आंतरिक मन खुले होते. हे मन आध्यात्मिक अनुभूती आणि आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्यास अधिक सक्षम असते. पण एकदा का येथे एकाग्रता साध्य झाली की मग, व्यक्तीने मनाच्या वर असणाऱ्या ऊर्ध्वस्थित शांत मानसिक चेतनेप्रत स्वतःला खुले केले पाहिजे. कालांतराने चेतना ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत आहे अशी व्यक्तीला जाणीव होते आणि अंततः चेतना, आजवर ज्यामुळे शरीरामध्येच बंदिस्त केली गेली होती, त्या झाकणाच्या वर पलीकडे चढून जाते. आणि मस्तकाच्या वर असलेले केंद्र तिला गवसते, तेथे ती अनंतत्वामध्ये मुक्त होते. तेथे ती चेतना वैश्विक ‘आत्म्या’च्या, दिव्य ‘शांती’च्या, ‘प्रकाशा’च्या, ‘शक्ती’च्या, ‘ज्ञाना’च्या, ‘आनंदा’च्या संपर्कात येते आणि त्यामध्ये प्रवेश करते आणि प्रकृतीमध्येदेखील या गोष्टींचे अवतरण अनुभवास यावे म्हणून ती, तेच होऊन जाते. मनामध्ये स्थिरता प्रस्थापित व्हावी म्हणून अभीप्सा बाळगत, मस्तकामध्ये एकाग्र होणे आणि ‘आत्म्या’चा व ऊर्ध्वस्थित अशा ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेणे हा एकाग्रतेचा दुसरा मार्ग होय. मात्र मस्तकामध्ये चेतनेचे केंद्रीकरण करणे हा, त्याहूनही वर असणाऱ्या केंद्राप्रत चढून जाण्याच्या तयारीचा केवळ एक भाग असतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा कदाचित व्यक्ती स्वतःच्या मनामध्ये आणि त्याच्या अनुभवांमध्येच बद्ध होण्याची शक्यता असते. किंवा व्यक्ती आध्यात्मिक विश्वातीतामध्ये (transcendence) चढून तेथे जीवन जगण्याऐवजी, फार फार तर, ऊर्ध्वस्थित ‘सत्या’चे केवळ प्रतिबिंबच प्राप्त करून घेऊ शकते. काही जणांना मानसिक एकाग्रता सोपी वाटते; तर काही जणांना हृदयकेंद्रावर एकाग्रता साधणे अधिक सोपे जाते; काही जणांना या दोन्ही केंद्रांवर आलटूनपालटून एकाग्रता करणे शक्य होते – जर एखाद्याला हृदय केंद्रापासून सुरुवात करणे शक्य झाले, तर ते अधिक इष्ट असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 07)

साधनेची मुळाक्षरे – १२

‘ईश्वरी’ प्रभावाप्रत स्वत:ला खुले करणे हे या (पूर्ण)योगाचे संपूर्ण तत्त्व आहे. ईश्वर तुमच्या उर्ध्वदिशेस विद्यमान असतो आणि जर तुम्हाला त्याची जाणीव झाली तर, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्यास आवाहन करायचे असते. ते ईश्वरीतत्त्व तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये ‘शांती’च्या, ‘प्रकाशा’च्या, कार्यकारी ‘शक्ती’च्या रूपाने अवतरते; ‘आनंद’रूपाने अवतरते; साकार किंवा निराकार रूपात ते ‘दिव्य अस्तित्व’ अवतरते. व्यक्तीला जोपर्यंत याची जाणीव होत नाही तोपर्यंत, तिने श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणासाठी आस बाळगली पाहिजे. अभीप्सा, धावा, प्रार्थना ह्या सगळ्या गोष्टी एकाच गोष्टीची विविध रूपे आहेत आणि या साऱ्याच गोष्टी सारख्याच प्रभावी आहेत. यांपैकी, तुमच्यापाशी जी कोणती गोष्ट येते वा जी तुम्हाला अगदी सहजसोपी, स्वाभाविक वाटते ती गोष्ट तुम्ही अवलंबावी.

दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करायची (काहीजण डोक्यामध्ये वा डोक्याच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करायचे आणि तेथे त्यांना आवाहन करायचे. व्यक्ती यांपैकी कोणतीही गोष्ट करू शकते किंवा वेगवेगळ्या वेळी दोन्ही गोष्टी करू शकते – जे तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जे करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ते करावे. विशेषत: सुरुवातीला एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, मनाच्या हालचाली हद्दपार करायच्या. अशा शांत मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतिशील तयारी सुरू होते. परंतु लगेचच कोणती अनुभूती आली नाही तरी तुम्ही उतावीळ होता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी बराच वेळ लागतो; तुमची चेतना सज्ज होईपर्यंत तुम्हाला वाटचाल करत राहावी लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 106)