Tag Archive for: तत्त्वज्ञान

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १८

आपण हे समजावून घेतले की हठयोग, प्राण आणि शरीराच्या साहाय्याने, शारीरिक जीवन आणि त्याच्या क्षमता यांच्या अलौकिक पूर्णत्वाचे लक्ष्य करतो. त्याचप्रमाणे राजयोग हा मनाच्या साहाय्याने, मानसिक जीवनाच्या क्षमतांच्या विस्ताराचे आणि त्याच्या असाधारण अशा पूर्णत्वाचे लक्ष्य बाळगतो. असे करत असताना तो आध्यात्मिक अस्तित्वाच्या प्रांतामध्ये प्रवेश करतो. पण या प्रणालीचा दोष हा आहे की, त्यामध्ये समाधीच्या असामान्य स्थितीवर अतिरिक्त भर दिला जातो. हा दोष प्रथमतः भौतिक जीवनापासून एक प्रकारच्या दूरस्थपणाकडे घेऊन जाणारा ठरतो. वास्तविक हे भौतिक जीवन म्हणजे आपला आधार आहे आणि हे असे क्षेत्र आहे की, ज्यामध्ये आपल्याला आपले मानसिक आणि आध्यात्मिक लाभ उतरवायचे असतात. विशेषतः या प्रणालीमध्ये आध्यात्मिक जीवन हे समाधी-अवस्थेशी खूपच संबद्ध केले जाते. आध्यात्मिक जीवन आणि त्याचे अनुभव हे जागृत अवस्थेमध्ये आणि अगदी कार्याच्या सामान्य वापरामध्ये देखील पूर्णतः सक्रिय आणि पूर्णतः उपयोगात आणता येतील असे करावयाचे, हे आपले उद्दिष्ट आहे. आपल्या समग्र अस्तित्वाचा ताबा घेण्याऐवजी आणि त्यामध्ये अवतरित होण्याऐवजी, आपल्या सामान्य अनुभवाच्या मागे असणाऱ्या सुप्त प्रदेशामध्ये निवृत्त होण्याकडेच राजयोगाचा कल असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 37)

राजयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १७

 

आंतरात्मिक कारणांसाठी, हठयोगाप्रमाणेच राजयोगदेखील प्राणायामाचा अवलंब करतो; परंतु संपूर्णतः एक आंतरात्मिक प्रणाली म्हणून तिचा उपयोग न करता, अनेक साधन-मालिकांमधील एक साधनापद्धती म्हणून तो प्राणायामाचा अवलंब करतो आणि अगदी मर्यादित अर्थाने, तीन चार मोठ्या उपयोगांसाठी तो त्याचा वापर करतो. राजयोगाचा आरंभ आसन आणि प्राणायामापासून होत नाही, राजयोग मनाच्या नैतिक शुद्धीकरणावर प्रथम भर देतो. आणि ही गोष्ट सर्वांत महत्त्वाची आहे. कारण त्याच्याशिवाय राजयोगाचा क्रम अनुसरू पाहाणे म्हणजे त्यामध्ये अडथळे उत्त्पन्न होण्याची, त्याचा मार्ग अवरूद्ध होण्याची, अनपेक्षित मानसिक, नैतिक आणि शारीरिक संकटांचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता असते. प्रस्थापित प्रणालीमध्ये या नैतिक शुद्धीकरणाची दोन गटांमध्ये विभागणी केलेली आहे. पाच यम आणि पाच नियम असे हे दोन गट आहेत. यम या सदराखाली सत्य-बोलणे, अहिंसा, चोरी न करणे इ. गोष्टींसारख्या वर्तणुकीबाबतीतील नैतिक स्व-संयमनाच्या गोष्टींचा समावेश होतो. परंतु वस्तुतः या गोष्टी म्हणजे एकंदरच नैतिक स्वनियंत्रणाची आणि शुद्धतेची जी सर्वसाधारण आवश्यकता आहे त्याच्याकडे निर्देश करणाऱ्या गोष्टी आहेत, असे समजले पाहिजे. ज्या योगे, राजसिक अहंकार आणि त्याचे आवेग, मानवामध्ये असणाऱ्या इच्छाआकांक्षा यावर विजय प्राप्त करून, त्या शांत होत होत, त्यांचे परिपूर्ण शमन होईल, अशी कोणतीही स्वयंशिस्त ही अधिक व्यापक अर्थाने, ‘यम’ या सदरात मोडण्यासारखी आहे. राजसिक मानवामध्ये एक नैतिक स्थिरता, आवेगशून्यता निर्माण व्हावी, आणि त्यातून अहंकाराचा अंत घडून यावा, हे याचे उद्दिष्ट असते. नियमित सरावाची एक मानसिक शिस्त, ज्यामध्ये ईश्वरी अस्तित्वावर ध्यान ही सर्वोच्च साधना गणली जाते, अशा साधनापद्धतींचा समावेश ‘नियमा’मध्ये केला जातो. ज्याच्या आधारावर उर्वरित सर्व योगाची पायाभरणी होऊ शकेल अशी सात्विक स्थिरता, शुद्धता आणि एकाग्रतेची तयारी करणे, हे या नियमांचे उद्दिष्ट असते.

यमनियमांच्या आधारे जेव्हा पाया भक्कम झालेला असतो तेव्हाच आसन आणि प्राणायामाची साधना येते आणि तेव्हाच त्यांना परिपूर्ण फले लागू शकतात. मनाच्या नियंत्रणाद्वारे आणि नैतिक अस्तित्वाद्वारे, केवळ आपली सामान्य जाणीव ही अगदी योग्य अशा प्राथमिक स्थितीत येऊ शकते; परंतु योगाच्या अधिक महान उद्दिष्टांसाठी आवश्यक असणारे उच्चतम अशा चैत्य पुरुषाचे आविष्करण किंवा उत्क्रांती त्याद्वारे घडून येत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 538-539)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १५

राजयोग

 

मनुष्याने शरीरामध्ये स्वतःचे पूर्णत्व साध्य करणे हे हठयोगाने दिलेले साधन आहे. पण जेव्हा एखादा मनुष्य देहाच्या वर उठतो तेव्हा तो त्रासदायक आणि निम्नतर प्रक्रिया म्हणून हठयोगाचा त्याग करतो आणि राजयोगामध्ये उन्नत होतो. मानव आता ज्या युगामध्ये उत्क्रांत झाला आहे त्या युगाशी मिळताजुळता असा हा योगमार्ग आहे. देह म्हणजेच मी, अशी समजूत बाळगणारी जाणिवेची अवस्था म्हणजे ‘देहात्मक बोध’. या देहात्मक बोधाच्या वर, उच्चतर जाणिवेमध्ये उन्नत होणे, ही राजयोगाच्या यशाची पहिली आवश्यक अट आहे. राजयोग्याच्या बाबतीत अशी एक वेळ येते की जेव्हा, त्याचा देह हा त्याला त्याचा वाटत नाही किंवा तो त्याच्या देहाची कोणतीही चिंता करत नाही. त्याला त्याच्या शारीरिक दुःखाने काळजी वाटत नाही किंवा शरीरसुखाने त्याला आनंदही होत नाही; ते त्या शरीरापुरतेच संबंधित असतात आणि तो राजयोगी त्यांना कोणताच थारा देत नसल्याने, या गोष्टी कालांतराने निघूनही जातात. तामसिक जडतत्त्व न उरल्यामुळे आणि आता तो राजसिक आणि आंतरात्मिक मनुष्य असल्याने, त्याची सुख व दुःखं ही हृदय आणि मनाशी संबंधित असतात. स्वतःच्या हृदयामध्ये किंवा स्वतःच्या बुद्धिमध्ये किंवा दोन्ही ठिकाणी, त्याला ईश्वराचा साक्षात्कार व्हावा म्हणून, त्याला हृदयातील आणि मनातील सुखदुःखांवर विजय प्राप्त करून घ्यावा लागतो. हृदयामध्ये ईश्वराचे दर्शन घेण्याची राजयोग्याला आस लागलेली असते.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 507)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १३

हठयोग

 

हठयोगाचे परिणाम हे डोळे दिपविणारे असतात आणि लौकिक किंवा शारीरिक मनाला त्याची सहजी भुरळ पडते. आणि तरीही एवढ्या सगळ्या खटाटोपामधून सरतेशेवटी नक्की काय मिळविले, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. शारीरिक प्रकृतीचे उद्दिष्ट, केवळ शारीरिक जीवनाचे जतन, त्याचे उच्चतम पूर्णत्व, अगदी शारीरिक जीवनाचा महत्तर उपभोग घेण्याची क्षमता, या साऱ्याच गोष्टी एका विशिष्ट अर्थाने, अस्वाभाविक स्तरावर घडून येतात. हठयोगाची उणीव अशी की, या कष्टकर आणि अवघड प्रक्रियांसाठी प्रचंड वेळ खर्च करावा लागतो आणि खूप शक्तिवेच करावा लागतो. तसेच हठयोगामध्ये माणसांवर सामान्य जीवनापासून इतकी समग्र पराङ्मुखता (Severance) लादली जाते की, मग त्याच्या परिणामांचा या लौकिक जीवनासाठी उपयोग करणे, हे एकतर अव्यवहार्य ठरते किंवा मग ते उपयोजन आत्यंतिक मर्यादित ठरते. हा जो तोटा आहे त्याच्या मोबदल्यात, अन्य जगांमध्ये, अंतरंगामध्ये ज्या अन्य जीवनाची, मानसिक, गतिशील जीवनाची प्राप्ती आपल्याला होते; तीच प्राप्ती आपल्याला राजयोग, तंत्रमार्ग इ. अन्य मार्गांनी, कमी परिश्रमकारक पद्धतींनी आणि तुलनेने कमी कठोर नियमांच्या आधारे होऊ शकते. दुसरे असे की, याचे शारीरिक परिणाम म्हणून प्राप्त होणारी वाढीव प्राणशक्ती, दीर्घकाळ टिकून राहणारे तारुण्य, आरोग्य, दीर्घायुष्य या साऱ्या गोष्टींचा जर वैश्विक कृतींच्या एका सामायिक संचितामध्ये विनिमय केला नाही, त्यांचा सामान्यांच्या जीवनासाठी उपयोग केला नाही आणि जसा एखादा कंजुष मनुष्य सर्व काही स्वतःकडेच राखून ठेवतो त्याप्रमाणे, केवळ स्वतःसाठीच त्याचा वापर केला, तर मग ही प्राप्ती खूपच अल्प स्वरूपाची आहे. हठयोगामुळे मोठे परिणामही साध्य होतात पण त्याची किंमत अवाजवी असते आणि त्याने अतिशय अल्प हेतूच साध्य होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 35)

दिव्यत्वाचा शोध घेणे हेच आध्यात्मिक सत्याच्या आणि आध्यात्मिक जीवनाच्या धडपडीचे खरोखर पहिले कारण आहे; हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे आणि त्याव्यतिरिक्त बाकी सारे शून्यवत् आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 05)

हठयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ११

प्राकाम्य – इंद्रिय आणि मनावर पूर्णतया पटुता म्हणजे प्राकाम्य. प्राकाम्यामध्ये टेलिपथी, अतिंद्रिय दृष्टी या व यासारख्या असामान्य समजल्या जाणाऱ्या गोष्टींचा समावेश होतो.

व्याप्ती – इतर व्यक्तींचे विचार, त्यांची शक्ती, त्यांच्या भावना ग्रहण करण्याची शक्ती आणि स्वतःचे विचार, भावना, शक्ती आणि व्यक्तिमत्त्व यांचे इतरांवर प्रक्षेपण करण्याची शक्ती म्हणजे व्याप्ती.

ऐश्वर्य – घटनांवर नियंत्रण, ईशत्व, समृद्धी आणि इच्छित अशा सर्व वस्तुमात्रांवर नियंत्रण म्हणजे ऐश्वर्य.

वशिता – मौखिक किंवा लिखित शब्दांच्या त्वरित आज्ञापालनाची शक्ती म्हणजे वशिता.

इशिता – जड किंवा बुद्धिविहीन असणाऱ्या सर्व वस्तुमात्रांवर आणि प्रकृतीच्या सर्व शक्तींवर परिपूर्ण नियंत्रण म्हणजे इशिता.

यापैकी काही शक्तींचा संमोहनाची किंवा इच्छाशक्तीची लक्षणे या सदराखाली युरोपमध्ये नुकताच शोध लागला आहे; परंतु प्राचीन काळातील हठयोग्यांच्या किंवा अगदी आत्ताच्याही काही आधुनिक हठयोग्यांच्या सिद्धीच्या तुलनेत, युरोपियन अनुभव अगदीच तोकडे आणि अशास्त्रीय आहेत. प्राणायामातून विकसित झालेल्या इच्छाशक्तीची गणना आध्यात्मिक नव्हे तर, आंतरात्मिक शक्तीमध्ये केली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 505-506)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १०

हठयोग

ज्या गतिशील ऊर्जेमुळे हे ब्रह्मांड चालत राहाते त्या प्राणिक शक्तीवर प्रभुत्व म्हणजे ‘प्राणायाम’. प्राणाचे किंवा प्राणिक शक्तीचे, मानवी शरीरातील सर्वाधिक लक्षात येणारे कार्य म्हणजे श्वासोच्छ्वास, जो सामान्य माणसांना जीवनासाठी आणि हालचालींसाठी आवश्यक असतो. हठयोगी त्यावर विजय मिळवितो आणि स्वतःला त्यापासून वेगळे राखतो. परंतु या एवढ्या एकाच प्राणिक क्रियेवर त्याचे लक्ष केंद्रित झालेले नसते.

हठयोगी पाच मुख्य प्राणिक शक्तींमधील आणि इतर लहानमोठ्या पुष्कळ प्राणिक शक्तींमधील भेद जाणू शकतो. त्या प्रत्येक प्राणिक शक्तींना त्याने स्वतंत्र नामाभिधान दिलेले आहे आणि हे जे प्राणिक प्रवाह कार्यरत असतात, त्या सर्व असंख्य प्राणिक प्रवाहांवर नियंत्रण ठेवायला तो योगी शिकतो. जशी आसनं असंख्य आहेत, तशीच प्राणायामाच्या विविध प्रकारांची संख्याही पुष्कळ मोठी आहे. आणि जोपर्यंत मनुष्य त्या साऱ्या प्रकारांवर प्रभुत्व मिळवीत नाही, तोपर्यंत तो मनुष्य परिपूर्ण हठयोगी आहे, असे मानले जात नाही. आसनांमधून प्राप्त झालेली प्राणिक ऊर्जा, जोश, सुदृढ आरोग्य या गोष्टींवर प्राणजयामुळे शिक्कामोर्तब होते; प्राणजयामुळे व्यक्तीला, तिला हवे तितक्या काळ जीवन जगण्याची शक्ती प्रदान करण्यात येते. आणि प्राणजयामुळे चार शारीरिक सिद्धींमध्ये, पाच आंतरात्मिक सिद्धींचीही भर पडते…

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 505)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०९

हठयोग

लघिमा, अणिमा, गरिमा आणि महिमा या चार शारीरिक सिद्धींचा विकास करून, त्यायोगे शारीरिक प्रकृतीवर विजय प्राप्त करून घेणे, हे हठयोगाचे दुसरे उद्दिष्ट असते.

‘लघिमे’च्या योगे मनुष्य, त्याचे प्राकृतिक तत्त्व असल्याप्रमाणे वाऱ्यावर स्वार होऊन, हवेमध्ये विहार करू शकतो.

परिपूर्ण ‘अणिमे’च्या योगे, व्यक्ती सूक्ष्म देहाची प्रकृती ही स्थूल देहामध्ये उतरवू शकते. त्यामुळे अग्नी त्याला जाळू शकत नाही, शस्त्रास्त्रांचे घाव त्यावर बसू शकत नाहीत, हवेविना गुदमरायला होत नाही किंवा पाणी त्याला बुडवू शकत नाही.

परिपूर्ण ‘गरिमा’ सिद्धीच्या योगे, ज्यामुळे हिमस्खलनाचा धक्काही बसणार नाही अशा प्रकारची दृढ स्थिरता व्यक्ती विकसित करू शकते.

परिपूर्ण ‘महिमा’ सिद्धीच्या योगे तो, आपल्या स्नायूंचा विकास न करताही, हर्क्युलसपेक्षाही अधिक पराक्रम करू शकतो.

या अशा प्रकारच्या सिद्धी आता पूर्णतेने माणसांमध्ये पाहावयास मिळत नाहीत परंतु हठयोगातील सर्व योग्यांकडे काही अंशी त्या असायच्या. जी व्यक्ती थोडीशी का होईना, परंतु योगसाधनेमध्ये खोलवर गेलेली आहे किंवा ज्या व्यक्तीने सिद्धींचा व्यक्तिशः अनुभव घेतलेला आहे, अशी कोणतीही व्यक्ती त्यांच्या अस्तित्वावर शंका उपस्थित करू शकणार नाही.

ज्याला तप किंवा वीर्य किंवा योगाग्नी असे म्हणण्यात येते, ती योगिक शक्ती देहामध्ये विकसित करणे, हे हठयोगाचे तिसरे उद्दिष्ट असते. शरीरातील सगळी वीर्य शक्ती मेंदूपर्यंत ओढणे आणि शरीराच्या शुद्धीसाठी आणि शरीराचे विद्युतीभवन होण्यासाठी आवश्यक असेल, तेवढीच ती शक्ती खाली उतरविणे, म्हणजे ‘ऊर्ध्वरेत बनणे’ हे हठयोगाचे चौथे उद्दिष्ट असते.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 504-505)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०८

हठयोगाचे उद्दिष्ट

शुद्ध हठयोग हा शरीराच्या माध्यमातून परिपूर्णत्व गाठण्याचे साधन आहे. त्याच्या प्रक्रिया ह्या शारीरिक, तणावयुक्त, अवाढव्य, जटिल आणि अवघड असतात. आसन, प्राणायाम आणि शरीराची शुद्धी या गोष्टी त्याच्या केंद्रस्थानी असतात. आधुनिक किंवा मिश्रित हठयोगामध्ये आसनांची संख्या मर्यादित झाली आहे; पण तरीसुद्धा ती आसने पुष्कळ आणि वेदनादायी आहेत. प्राचीन किंवा शुद्ध हठयोगामध्ये तर त्यांची संख्या अगणित होती आणि पूर्वीचे हठयोगी ती सर्व आसने करत असत. आसन म्हणजे शरीराची एक विशिष्ट अशी स्थिती होय. आणि ती सुयोग्य स्थिती असते किंवा त्यावर विजय मिळविलेली अशी स्थिती असते. तांत्रिक भाषेत बोलावयाचे झाले तर, मनुष्य जेव्हा कितीही तणावयुक्त किंवा वरकरणी पाहता अशक्य अशा एका स्थितीमध्ये, शरीराला त्या ताणाची जाणीव होऊ न देता, हटातटाने काहीही करावे न लागता, जेव्हा अनिश्चित काळपर्यंत राहू शकतो; तेव्हा त्याने त्या आसनावर विजय मिळविला आहे, असे म्हटले जाते. आसनांचे पहिले उद्दिष्ट ‘शरीरजय’ हे असते. कारण शरीर दिव्य बनण्यापूर्वी शरीरावर विजय मिळविणे आवश्यक असते. शरीराने प्रभुत्व गाजविता कामा नये तर, शरीरावर प्रभुत्व गाजविता यायला हवे, ह्या दृष्टीने हा शरीरजय आवश्यक असतो…

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 504-505)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०७

विश्व हा भ्रम आहे, विश्व मिथ्या आहे या मताशी मी सहमत नाही. ब्रह्म हे जसे विश्वातीत केवलतत्त्वामध्ये आहे तसेच ते येथेही आहे. जे अज्ञान आपल्याला अंध बनविते आणि आपल्या अस्तित्वाचे सत्य स्वरूप ओळखण्यास तसेच, या विश्वामध्ये असणाऱ्या व विश्वाच्या अतीतही असणाऱ्या ब्रह्माचा साक्षात्कार करून घेण्यास प्रतिरोध करते अशा अज्ञानावर मात केली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 329)