Tag Archive for: अहंकार

विचार शलाका – ०७

अहंकार स्वत:चा अधिकार सोडण्यास नकार देतो त्यामुळेच जीवनात नेहमी सर्व तऱ्हेची कटुता येते.

*

सारे जे काही घडत असते, ते आपल्याला केवळ एकमेव धडा शिकविण्यासाठीच घडत असते; तो म्हणजे, जर आपण अहंकाराचा त्याग केला नाही तर शांती ना आपल्याला मिळेल, ना इतरांना! आणि तेच, जीवन जर अहंकारविरहित असेल तर तो एक अद्भुत चमत्कार ठरतो.

*

अहंकाराच्या लीलेविना कोणतेही संघर्ष झाले नसते. आणि नाटके करण्याची प्राणाची प्रवृत्ती नसती तर जीवनात नाट्यमय घटनाही घडल्या नसत्या.

*

तुमच्या अडचणींच्या प्रमाणावरूनच तुम्हाला किती अहंकार आहे ते तुमचे तुम्हाला कळते.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 257-258)

लोक काय करतात, काय विचार करतात किंवा काय म्हणतात यामुळे व्यथित होणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे आणि व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्व, फक्त ईश्वराच्याच प्रभावाखाली आले नसल्याचा आणि ते पूर्णतः ईश्वराभिमुख झाले नसल्याचा तो पुरावा आहे. मग अशा वेळी, प्रेम, सहिष्णुता, समंजसपणा, धीर या सगळ्या गोष्टींनी युक्त असे ईश्वरी वातावरण स्वतःबरोबर बाळगण्याऐवजी, दुसऱ्याच्या अहंकाराला प्रत्युत्तर म्हणून कठोरपणा आणि दुखावलेल्या भावनांनिशी व्यक्तीचा अहंकारच स्वत: बाहेर उफाळून येतो आणि त्यामुळे विसंवाद अधिकच वाढीस लागतो. ईश्वराचे विभिन्न व्यक्तींबाबत विविध पद्धतीने कार्य चालू असते, हे अहंकाराला कधीच उमगत नाही आणि व्यक्तीने स्वतःच्या अहंकारी दृष्टिकोनातून गोष्टींचे मूल्यमापन करणे, ही एक अशी मोठी चूक असते की ज्यामुळे, गोंधळच वाढीला लागतो. आपण आवेगाने आणि असहिष्णुतेने जे जे काही करतो ते ईश्वरी असू शकत नाही कारण ‘ईश्वर’ शांती आणि सुसंवादामध्येच कार्य करतो.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 279)

प्रत्येकामध्ये असणाऱ्या क्षुद्र अहंकाराला, दुसऱ्यामधील (खरे किंवा खोटे) दोष शोधणे आणि ते दोष खरे आहेत की खोटे आहेत याची पर्वा न करता, त्याविषयी बोलत राहणे आवडते. वास्तविक, अहंकाराला त्यांच्याबाबतीत निर्णय देण्याचा अधिकारच नसतो कारण अहंकारापाशी योग्य दृष्टिकोन किंवा योग्य वृत्ती नसते. स्थिर, निःस्वार्थी, नि:पक्षपाती असणारा आणि सर्वांविषयी करुणा व प्रेम बाळगणारा ‘आत्मा’च प्रत्येक व्यक्तीमधील सामर्थ्य व दुर्बलता योग्य प्रकारे पाहू शकतो, जोखू शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 351-352)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १९

(धम्मपदातील कालच्या वचनाचे विवेचन करताना, त्याची अकरणात्मक बाजू (Negative) आधी श्रीमाताजींनी सांगितली. ती आपण काल विचारात घेतली. आता त्या सकारात्मक बाजू (Positive) सांगत आहेत. वाचकांच्या सोयीसाठी धम्मपदातील ते वचन पुन्हा देत आहोत.)

धम्मपद : नैतिक नियमांचे पालन करून, किंवा बहुविध प्रकारच्या ज्ञानाने, किंवा ध्यानधारणेच्या सरावाने किंवा विजनवासातील जीवन जगण्याने किंवा “जे या संसारी जगात जगतात त्यांना अनभिज्ञ असलेला असा मुक्तीचा आनंद मला लाभला आहे” असा विचार करणाऱ्या व्यक्तीला भिक्षु म्हटले जात नाही. भिक्षुंनो, सावध असा, जोपर्यंत तुम्ही सर्व इच्छावासनांचा निरास करीत नाही तोपर्यंत सावध असा.

श्रीमाताजी : बुद्धाने असे म्हटले आहे वा त्याने म्हटल्याचे सांगितले गेले आहे की, जेव्हा व्यक्ती सर्व वासनाविकारांपासून मुक्त होते तेव्हा ती अनिवार्यपणे अनंत अशा आनंदामध्ये प्रवेश करते. पण हा आनंद कदाचित काहीसा कोरडा, रुक्ष असू शकतो आणि मला तरी तो काही सर्वात जवळचा मार्ग वाटत नाही.

या देहाने ही समस्या सोडवायची असेल तर धैर्य आणि निश्चय बाळगून झोकून द्या; वासनांच्या मागे धावण्याचा लांबचा, दुष्कर, कष्टदायक आणि निराशाजनक मार्ग सोडून, जर व्यक्तीने स्वत:ला साधेपणाने, पूर्णपणाने, विनाअट, नफ्यातोट्याची कोणतीही समीकरणे न मांडता, त्या परमोच्च सत्याप्रत, परमोच्च संकल्पशक्तिप्रत, परमोच्च अस्तित्वाप्रत समर्पित केले; स्वत:चे संपूर्ण अस्तित्व, अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी जर ‘त्या’च्या हातात संपूर्णतया सोपविले, तर तो अहंकारापासून सुटका करून घेण्याचा सर्वात वेगवान आणि क्रांतिकारी मार्ग आहे. लोकांना वाटेल की, तो आचरणात आणणे खूप अवघड आहे, परंतु तेथे एक प्रकारची ऊब आहे, उत्कटता आहे, उत्साह आहे, प्रकाश आहे, सौंदर्य आहे, उत्कट आणि सर्जशनशील जीवन आहे.

हे खरे आहे की, वासनांशिवाय अहंकार दीर्घकाळ अस्तित्वात राहू शकत नाही. व्यक्तीच्या जाणिवा इतक्या घट्ट झालेल्या असतात की, जेव्हा अहंकार धुळीला मिळतो तेव्हा व्यक्तीच्या अस्तित्वाचाच काही भाग जणूकाही धुळीला मिळतो आणि आपण निर्वाणामध्ये प्रविष्ट होण्यास सज्ज झालो आहोत, असे त्या व्यक्तीला वाटते.

त्या सर्वोच्च अस्तित्वाच्या वैभवामध्ये अहंकाराचा विलय असा आपण येथे खऱ्या निर्वाणाचा अर्थ घेत आहोत. संपूर्ण, समग्र, परिपूर्ण, नि:शेष आणि देवघेवीविना असे जे आत्मदान, त्यालाच मी सकरणात्मक मार्ग (Positive Side) म्हणते.

स्वत:चा कोणताही विचार न करणे, स्वत:साठी न जगणे, स्वत:शी काहीही निगडित न करणे, आणि सर्वाधिक सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत असे जे आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्ये निमग्न राहणे ह्यामध्ये इतका अगाध आनंद आहे की, त्याची तुलना दुसऱ्या कशाबरोबरच होऊ शकत नाही.

ही एकच गोष्ट अर्थपूर्ण आहे, प्रयत्न करून पाहण्याजोगी आहे. इतर सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ कालापव्यय असतो.

वळणावळणाच्या रस्त्याने, धीम्या गतीने, कष्टपूर्वक, पायरीपायरीने वर्षानुवर्षे पर्वत चढत जाणे आणि अदृश्य पंख पसरवून, थेट शिखराकडे झेपावणे यामध्ये जो फरक आहे, तो येथे आहे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 267-269)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

धम्मपद : वास्तविक जी व्यक्ती अजूनही अशुद्ध आहे. अजूनही जिच्या ठिकाणी आत्म-संयम आणि निष्ठा यांचा अभाव आहे, अशी व्यक्ती खरंतर भिक्षुची पीत वस्त्र धारण करण्याच्या योग्यतेची नसते.

श्रीमाताजी : बौद्ध धर्म ज्याला अशुद्धी म्हणून संबोधतो, त्यात मुख्यत: अहंकार आणि अज्ञान या गोष्टींचा अंतर्भाव होतो; कारण बौद्धांच्या दृष्टिकोनातून, सर्वात मोठा कलंक म्हणजे अज्ञान; पण बाह्य गोष्टींचे किंवा प्रकृतीच्या नियमांचे किंवा तुम्ही जे काही शाळेमध्ये शिकता त्याबाबतीतले अज्ञान नव्हे; तर वस्तुमात्राच्या गूढतम सत्याबद्दल असलेले अज्ञान, आपल्या अस्तित्वाच्या मार्गदर्शक तत्त्वाबद्दल, आपल्या जीवितसाराबद्दल असणारे अज्ञान, धर्माबद्दल असणारे अज्ञान.

येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, आत्मसंयमाचा अभाव व सत्यनिष्ठेचा अभाव या दोन दोषांवर येथे भर देण्यात आलेला आहे. सत्यनिष्ठा म्हणजे प्रामाणिकपणा, सचोटी; धम्मपदाने सर्वाधिक धिक्कार ढोंगीपणाचा केला आहे. आपल्याला आध्यात्मिक जीवन जगावयाचे आहे असे भासवायचे आणि तसे जगावयाचे नाही, आपल्याला सत्यशोधन करावयाचे आहे असे भासवायचे आणि तसे करावयाचे नाही, दिव्य जीवनासाठी स्वत:चे जीवन समर्पित केले असल्याचे ज्यातून दिसून येईल अशा बाह्य गोष्टी धारण करावयाच्या (उदा. पीत वस्त्रे परिधान करावयाची) पण आंतरिकरित्या मात्र स्वत:, स्वत:चा स्वार्थ आणि स्वत:च्या गरजा यातच गुंतलेले असावयाचे, ह्या सर्व गोष्टींची धम्मपद निंदा करते.

धम्मपदाने आत्मसंयमावर किती भर दिला आहे हे पाहण्यासारखे आहे. कारण बुद्धाच्या शिकवणीनुसार, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. बुद्धाने मध्यममार्गावर, सुवर्णमध्यावर नेहमीच भर दिला आहे. तुम्ही कोणत्याही एका बाजूला अधिक झुकलेले असता कामा नये, किंवा कोणत्याही एखाद्या गोष्टीचा अतिरेक करणे वाईटच. प्रत्येक गोष्टीत समतोल हवा, परिमितता हवी.

म्हणूनच, आंतरिक समतोल असणे, कृतीमध्ये समतोल असणे, प्रत्येक बाबतीत परिमितता असणे, प्रामाणिक असणे, सचोटी व निष्ठा असणे, हे गुण तुम्हाला आध्यात्मिक जीवन आचरण्यासाठी पात्र बनवितात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 190)

(श्रीमाताजी जाणीव विशाल कशी करावी ह्या संबंधीचे मार्गदर्शन करत आहेत..)
अजून एक मार्ग आहे. तो म्हणजे पृथ्वीवरील सर्व गोष्टींशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या गोष्टीविषयीचा तुमचा दृष्टिकोन संकुचित असतो आणि दुसऱ्यांचा दृष्टिकोन आणि त्यांची धारणा यामुळे तुम्ही दुखावले जाता, तेव्हा तुम्ही तुमची जाणीव बदलून ती दुसऱ्याच्या ठिकाणी केंद्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इतरांच्या विचार करण्याच्या भिन्नभिन्न पद्धतींशी एकरूप होण्याचा हळूहळू प्रयत्न केला पाहिजे.

पण हा मार्ग… काहीसा धोक्याचा आहे. कारण दुसऱ्यांच्या विचारांशी आणि इच्छांशी एकरूप होणे म्हणजे त्यांच्या ढीगभर मूर्खपणाशी व वाईट इच्छांशी एकरूप होण्यासारखे आहे. (श्रीमाताजी हसतात.) आणि त्याचे असे काही परिणाम होऊ शकतात की, जे तितकेसे इष्ट नसतात. तरीसुद्धा काही लोक हे सहजपणे करत असतात. उदाहरणार्थ, ज्यावेळी त्यांचा दुसऱ्यांशी मतभेद होतो, तेव्हा ते आपली जाणीव विशाल करण्यासाठी दुसऱ्यांच्या ठिकाणी आपण आहोत असे समजण्याचा प्रयत्न करतात आणि त्या गोष्टींकडे स्वत:च्या दृष्टिकोनातून नव्हे, तर दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची जाणीव विशाल होते; पण मी आधी सांगितलेल्या पद्धतींमुळे जाणीव जेवढी विशाल होते, तेवढी ती या पद्धतीमुळे होत नाही. त्या पद्धती अधिक निरुपद्रवी असतात. त्या पद्धतींनी तुम्हाला काही अपाय होत नाही, तर त्यांचा तुम्हाला लाभच अधिक होतो. त्या पद्धती तुम्हाला अधिक शांत करतात.

जाणीव व्यापक करण्याचे बौद्धिक मार्गही बरेच आहेत. जेव्हा तुम्ही कशाने तरी कंटाळला असाल, जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला दुःखदायक किंवा अत्यंत अप्रिय वाटत असेल, तेव्हा जर तुम्ही कालाच्या अनंततेचा किंवा अवकाशाच्या असीमतेचा विचार करायला लागलात, जे काही आत्तापर्यंत घडून गेलेले आहे व जे काही पुढे घडणार आहे त्या सगळ्याचा विचार करायला लागलात आणि अनंत काळातील हा क्षण म्हणजे जणू काही ‘आला क्षण, गेला क्षण’ असा आहे हे जर तुम्हाला जाणवले तर मग या अनंत काळाच्या तुलनेत, अशा एखाद्या गोष्टीने अस्वस्थ होणे हे तुम्हाला अगदीच किरकोळ, हास्यास्पद वाटू लागते. अशी गोष्ट इतकी नगण्य ठरते की, तिची जाणीव होण्याइतका सुद्धा वेळ नसतो, तिला काही स्थान नसते, महत्त्व नसते कारण खरोखर अनंत काळाच्या अनंततेमध्ये एक क्षण तो काय?… तुमच्या जर हे लक्षात येऊ शकले आणि ते जर तुम्ही डोळ्यासमोर आणू शकलात, तुम्ही जर असे चित्र रंगवू शकलात की, आपण किती लहानशी व्यक्ती आहोत, आपण ज्या पृथ्वीवर आहोत ती सुद्धा किती लहान आहे आणि जाणिवेतील एक क्षण, जो तुम्हाला आत्ता दुखावतो आहे किंवा अप्रिय वाटतो आहे, तो सुद्धा तुमच्या जीवनातील एक लहानसा क्षण आहे; तसेच तुम्ही पूर्वी काय काय होतात आणि पुढे काय काय व्हाल ते आणि आत्ता जी गोष्ट तुमच्या मनावर परिणाम करत आहे ती, कदाचित दहा वर्षानंतर तुम्ही पूर्णपणे विसरूनही जाल किंवा तुम्हाला त्याची आठवण झाली तर तुम्ही म्हणाल, ‘मी त्या गोष्टीला इतके महत्त्व कसे दिले?”… हे सगळे मुळात जर तुम्हाला जाणवू शकले आणि नंतर तुम्हाला तुमच्या खुज्या व्यक्तित्वाची जाणीव झाली तर.. आणि हे व्यक्तित्वसुद्धा कसे? तर अनंत काळांतील जणू एखादा क्षण. नाही नाही, क्षणाइतकेही नाही, कळणारही नाही इतका क्षणाचाही अंशभाग म्हणावे असे तुमचे व्यक्तित्व आहे, ह्याची जाणीव तुम्हाला झाली तर?

जर तुम्हाला अशीही जाणीव झाली की, हे सबंध जग यापूर्वीही आविष्कृत झाले आहे आणि यापुढेही अनंत काळपर्यंत आविष्कृत होत राहणार आहे; समोर, पाठीमागे, सर्व बाजूंनी… तर तुम्हाला एकदम असे वाटू लागेल की तुमच्या बाबतीत जे काय घडले आहे, त्याला इतके महत्त्व देणे हे किती हास्यास्पद आहे!… खरोखरीच तुम्हाला असे वाटू लागेल, की तुम्ही तुमच्या स्वत:ला, तुमच्या जीवनाला आणि तुमच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टींना जे महत्त्व देत आहात ते किती असमंजसपणाचे आहे.

जर तुम्ही असे योग्य प्रकारे केलेत तर केवळ तीन मिनिटांच्या अवधीत सर्व अप्रियपणा एकदम झटकला जाईल, अगदी खोलवर गेलेले दुःख देखील झटकून टाकता येईल. अशा रीतीने फक्त एकाग्रता करायला पाहिजे, आपण अनंतत्वात आणि शाश्वततेत आहोत अशी कल्पना केली पाहिजे. तर मग सर्वकाही निघून जाईल. त्यातून तुम्ही स्वच्छ होऊन बाहेर पडाल. हे सर्व योग्य रीतीने कसे करायचे हे जर तुम्हाला कळले तर तुम्ही सर्व आसक्तीपासून मुक्त होऊ शकाल, एवढेच नव्हे तर, मी सांगते की, अगदी खोलवर गेलेल्या दु:खापासूनसुद्धा तुम्ही मुक्त होऊ शकाल आणि त्यामुळे तुम्ही लगेच तुमच्या क्षुद्र अहंकारातूनही बाहेर याल.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 344-346)

“पूर्णत्वप्राप्तीसाठी पहिली पायरी म्हणजे स्वत:विषयी जागृत होणे. आपल्या अस्तित्वाचे भिन्न भिन्न भाग व त्या प्रत्येकाची निरनिराळी कार्ये यांविषयी जागृत होणे. हे भाग एकमेकांपासून अलगपणे पाहण्यास तुम्ही शिकले पाहिजे; तेव्हाच तुम्हाला तुमच्या ठिकाणी घडणाऱ्या क्रिया व तुम्हाला कृतिप्रवण करणारे अनेक आवेग, प्रतिक्रिया आणि परस्परविरोधी इच्छा यांचा उगम कोठे आहे हे स्पष्टपणे सापडू शकेल… या क्रियांचे विशेष काळजीपूर्वक निरीक्षण करून, त्यांना उच्चतम ध्येय-न्यायासनासमोर आणून, आपण त्याने दिलेला निर्णय मानण्याची मनापासून खरी इच्छा बाळगली असेल, तरच आपल्यामधील अप्रमादशील विवेकशक्ती जागृत होण्याची आशा आपण बाळगू शकू.” श्रीमाताजींनी ‘जीवनाचे शास्त्र’ या लेखमालिकेमध्ये वरील विचार मांडले होते.

त्यावर भाष्य करताना त्या म्हणतात – आपल्यामधील ह्या आंतरिक हालचालींचा कोठे, कसा उगम होतो यासंबंधी आपल्याला स्पष्ट कल्पना आली पाहिजे. कारण आपल्या अस्तित्वामध्ये परस्परविरोधी प्रवृत्ती असतात. काही प्रवृत्ती तुम्हाला एका बाजूस खेचतात, दुसऱ्या प्रवृत्ती तुम्हाला दुसऱ्या बाजूस खेचतात आणि त्यामुळे जीवनामध्ये सगळा गोंधळ माजतो.

तुम्ही स्वत:चे नीट निरीक्षण केलेत तर असे दिसून येईल की, अस्वस्थ होण्याजोगे तुमच्याकडून काही घडले तर, लगेचच तुमच्या त्या कृतीचे समर्थन करण्यासाठी मन अनुकूल कारणे देऊ लागते. हे मन कोणत्याही गोष्टीला मुलामा देण्यासाठी तयारच असते. आणि त्यामुळेच अशा परिस्थितीमध्ये स्वत:ला जाणणे कठीण होऊन बसते. मनोमय अस्तित्वाच्या या छोट्या छोट्या खोटेपणाकडे स्पष्टपणे पाहण्यासाठी आणि स्वत:ला खऱ्या अर्थाने जाणण्यासाठी व्यक्ती पूर्ण प्रामाणिकच असावी लागते.

सबंध दिवसातील तुमच्या हालचाली, क्रियाप्रतिक्रिया तुम्ही एकामागून एक यंत्रवत अखंडपणे नुसत्या न्याहाळत बसलात, तर त्याने तुमची प्रगती होऊ शकणार नाही. या निरीक्षणातून तुम्हाला प्रगती करून घ्यावयाची असेल, तर तुमच्या अंतरंगांतील असे काहीतरी, असा एखादा उत्तम भाग तुम्ही शोधून काढला पाहिजे की, जो प्रकाशयुक्त असेल, सदिच्छायुक्त असेल आणि प्रगतीसाठी अत्यंत उत्सुक असेल; आणि त्यामुळे त्याच्या प्रकाशात तुम्ही स्वत:ला तपासू शकाल. तो प्रकाशयुक्त भाग समोर ठेवून, चित्रपटात जशी एकामागून एक चित्रे सरकतात, त्याप्रमाणे दिवसभरातील तुमच्या सर्व कृती, सर्व भावना, सर्व आवेग, उर्मी, विचार त्याच्या समोरून सरकत जाऊ देत. त्यानंतर त्यामध्ये सुसंगती लावण्याचा प्रयत्न करा; म्हणजेच असे पाहा की, अमुक एका गोष्टीनंतरच दुसरी गोष्ट का घडली?

तुमच्यासमोरील प्रकाशमय पडद्याकडे निरखून पाहा. काही गोष्टी त्याच्या समोरून जातात, सहज सरळ जातात. दुसऱ्या काही गोष्टींची थोडीशी छाया पडते आणि काही गोष्टी अशा असतात की, त्यांची अतिशय काळीकुट्ट आणि आपल्याला आवडणार नाही अशी छाया पडते. तुम्ही या बाबतीत अत्यंत प्रामाणिक, प्रांजळ असले पाहिजे. एखादा खेळ खेळत असल्याप्रमाणे अगदी प्रामाणिकपणे हे काम करा.

”अमुक परिस्थितीमध्ये मी अशी एक कृती केली, माझ्या मनात अशा अशा भावना होत्या, मी अमुक एका रीतीने त्यावेळी विचार केला. खरेतर, माझे ध्येय आहे आत्मज्ञान आणि आत्मप्रभुत्व! पण आत्ता माझी कृती या ध्येयाला धरून होती की नाही?” असा विचार करा. जर ती कृती तुमच्या ध्येयाला धरून घडली असेल, तर त्या प्रकाशमय पडद्यावर तिची काळी छाया पडणार नाही; ती कृती पारदर्शक असेल. मग त्या कृतीविषयी चिंता करण्याचे तुम्हाला कारण नाही.

ती कृती तुमच्या ध्येयाशी सुसंगत नसेल तर मात्र तिची छाया पडेल. मग तुम्ही विचार करा – “का बरे ही अशी छाया पडली? आत्मज्ञान आणि आत्मप्रभुत्व यांविषयीच्या माझ्या संकल्पाच्या विरोधी असे या कृतीमध्ये काय होते?” बहुतेक वेळा तिचा संबंध अचेतनेशी, बेसावधपणाशी असल्याचे तुम्हाला आढळून येईल. तेव्हा मग आपण केलेल्या बेसावध गोष्टींमध्ये तिची नोंद करा आणि ठरवा की, पुढच्या वेळेस अशी एखादी गोष्ट करण्यापूर्वीच मी सावध राहण्याचा प्रयत्न करीन.

इतर काही बाबतीत तुम्हाला असे आढळून येईल की, ज्याची छाया पडली ती गोष्ट म्हणजे तुमचा क्षुद्र घृणास्पद अहंकार होता, अगदी काळा; आणि तुमची कृती, तुमचे विचार विकृत करावयास तो आला होता. नंतर हा अहंकार तुम्ही तुमच्या प्रकाशकेंद्रासमोर ठेवा आणि स्वत:ला विचारा, ‘मला अशी कृती, असे विचार करावयास लावण्यास, ह्या अहंकाराला काय बरे अधिकार आहे?’

त्यासंबंधीचे कोणतेही विसंगत असे समर्थन ग्राह्य न मानता, तुम्ही शोध घेतला पाहिजे आणि मग तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा एक असा भाग एका कोपऱ्यामध्ये दिसेल की, जो विचार करत असतो, म्हणत असतो, “नाही, नाही, मला इतर काहीही चालेल पण हे मात्र नाही.”

तुम्हाला असे स्पष्ट दिसेल की, तो भाग म्हणजे क्षुद्र अभिमान, आत्मप्रीती असते. कुठेतरी दडून असलेली अहंकाराची एक छुपी भावना असते, अशा शेकडो गोष्टी असतात.

या सर्व गोष्टी तुमच्या ध्येयप्रकाशात बघा. ”ह्या अमुक एका वृत्तीची जोपासना करणे हे माझ्या आत्मशोधाशी, ध्येयप्राप्तीशी मिळतेजुळते आहे का? मी हा काळा कोपरा प्रकाशासमोर ठेवीत आहे. प्रकाश त्यामध्ये शिरून तो काळा भाग नाहीसा होईपर्यंत मी हे करणार आहे.” तुम्ही हे केल्यानंतर खरोखरी हे नाटक संपते. मात्र तुमच्या सबंध दिवसाचे नाटक एवढ्याने संपत नाही, हे तर स्पष्टच आहे. कारण त्या प्रकाशासमोरून तुम्हाला आणखी कित्येक गोष्टी न्यावयाच्या राहिलेल्या असतात.

मात्र हा खेळ, तुम्ही पुढे चालू ठेवलात आणि अत्यंत मनःपूर्वकतेने तुम्ही हा खेळ पुन्हा पुन्हा खेळत राहिलात तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते की, त्यानंतर सहा महिन्यांनी तुम्ही तुम्हालाच ओळखू शकणार नाही. तुम्ही स्वत:शीच म्हणाल, ”काय? मी अशी होते? अवघडच होते माझे सारे.”

– श्रीमाताजी
(CWM 04 : 38-39)

प्रत्येक मनुष्य जाणताअजाणता विश्वशक्तीचे साधन असतो; एखाद्याला त्याच्या अंतरंगात विश्वशक्तीची उपस्थिती असल्याचे ज्ञान असते; इतरांच्या ठिकाणी हे ज्ञान नसते; हाच काय तो माणसामाणसांत भेद असतो. कृतीकृतीत वा साधना साधनामध्येही काही सारभूत भेद नसतो, म्हणून साधनत्वाचा अहंकारी अभिमान बाळगणे हा मूर्खपणा आहे. Read more