Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २५३

प्राणाचे रूपांतरण

प्राणशक्ती (Vitality) म्हणजे जीवन-शक्ती. जेथे कोठे जीवन असते, मग ते वनस्पतींमध्ये असू दे, प्राण्यांमध्ये असू दे किंवा माणसामध्ये असू दे, तेथे जीवन-शक्ती असते. प्राणाशिवाय जडभौतिकामध्ये जीवन असू शकत नाही, प्राणाशिवाय कोणतीही जिवंत कृती घडू शकत नाही. प्राण ही एक आवश्यक अशी शक्ती असते आणि जर प्राण हा साधनभूत म्हणून तेथे नसेल तर, शारीरिक अस्तित्वामध्ये कोणतीच गोष्ट निर्माण होऊ शकत नाही किंवा केली जाऊ शकत नाही. इतकेच काय पण साधनेसाठीसुद्धा प्राणशक्तीची आवश्यकता असते.

हा प्राण जितका उपयुक्त ठरू शकतो तेवढाच तो घातकदेखील ठरू शकतो. प्राण पुनर्जीवित न होता जर तसाच राहिलेला असेल, आणि तो जर इच्छावासना आणि अहंकाराचा गुलाम झालेला असेल तर, तो घातक ठरू शकतो. अगदी आपल्या सामान्य जीवनातसुद्धा मनाद्वारे आणि मानसिक इच्छाशक्तीद्वारे या प्राणाचे नियंत्रण करावे लागते, अन्यथा तो अव्यवस्था निर्माण करू शकतो किंवा अनर्थ घडवू शकतो. लोकं जेव्हा प्राणप्रधान मनुष्यासंबंधी बोलतात तेव्हा ती, मन किंवा आत्म्याद्वारे नियंत्रित न झालेल्या प्राणशक्तीचे वर्चस्व असलेल्या व्यक्तीविषयी बोलत असतात.

प्राण हा एक चांगले साधन बनू शकतो पण तो अगदी वाईट मालक असतो. या प्राणाला मारायची किंवा त्याला नष्ट करायची आवश्यकता नसते पण त्याला आंतरात्मिक आणि आध्यात्मिक नियमनाने शुद्ध करण्याची आणि त्याचे रूपांतर करण्याची आवश्यकता असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 106)

साधना, योग आणि रूपांतरण – २१७

चैत्य पुरुष (psychic being) अग्रस्थानी आणा आणि मन, प्राण व शरीरावर त्याची सत्ता चालवीत त्याला तिथे सुस्थिर करा. ज्यामुळे चैत्यपुरुष त्याच्या एकाग्र अभीप्सेची, विश्वासाची, श्रद्धेची आणि समर्पणाची शक्ती त्या तिघांपर्यंत पोहोचवू शकेल. आणि प्रकृतीमधील अनुचित असे जे काही आहे, जे ‘प्रकाश’ आणि ‘सत्य’ यांपासून दूर जाऊन, अहं व प्रमादाकडे वळले आहे त्याचा थेट आणि तात्काळ बोध तो चैत्यपुरुष मन, प्राण व शरीराला करून देऊ शकेल.

सर्व प्रकारचे अहंकार काढून टाका; तुमच्या चेतनेच्या प्रत्येक गतिविधीमधून ते अहंकार काढून टाका. वैश्विक चेतनेचा विकास करा. अहं-केंद्रित दृष्टिकोन विशालतेत, निर्व्यक्तिकतेत (impersonality), वैश्विक ‘ईश्वरा’च्या जाणिवेत, वैश्विक शक्तींच्या बोधात, वैश्विक आविष्काराच्या, (ईश्वरी) लीलेच्या आकलनात आणि साक्षात्कारात लीन होऊ द्या.

जीवात्मा हा ‘ईश्वरी’ अंश असतो, ‘जगन्माते’पासून त्याची उत्त्पत्ती झालेली असते आणि तो आविष्करणाचे साधन असतो. (तुमच्या) अहंने ज्याची जागा घेतली आहे तो जीवात्मा शोधून काढा. ‘ईश्वरा’चा अंश असल्याची आणि त्याचे एक साधन असल्याची जाणीव ही सर्व अभिमानांपासून, अहंच्या जाणिवेपासून किंवा त्याच्या हक्कापासून, श्रेष्ठतेच्या आग्रहीपणापासून, मागणी वा इच्छावासानांपासून मुक्त असली पाहिजे. कारण हे सर्व घटक जर तिथे असतील तर, ती खरी गोष्ट नाही असे समजावे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 333)

साधना, योग आणि रूपांतरण – १२९

एक क्षण असा येईल की, जेव्हा तुम्ही कर्ते नसून फक्त एक साधन आहात, हे तुम्हाला अधिकाधिक जाणवू लागेल. सुरुवातीला तुमच्या भक्तीच्या शक्तीने ‘दिव्य माते’बरोबर असलेला तुमचा संपर्क इतका प्रगाढ होईल की, तिचे मार्गदर्शन मिळावे, तिची थेट आज्ञा किंवा प्रेरणा मिळावी, नेमकी कोणती गोष्ट केली पाहिजे याबाबत खात्रीशीर संकेत मिळावा, ती गोष्ट करण्याचा मार्ग सापडावा आणि त्याचा परिणाम दिसून यावा, म्हणून तुम्ही सदा सर्वकाळ फक्त एकाग्रता करणे आणि सारे काही तिच्या हाती सोपविणे पुरेसे ठरेल. आणि मग कालांतराने तुमच्या हे लक्षात येईल की, दिव्य ‘शक्ती’ आपल्याला केवळ प्रेरणा देते किंवा मार्गदर्शनच करते असे नाही तर ती आपल्या कर्माचा आरंभही करते आणि तीच ते कर्म घडवते देखील! तेव्हा तुम्हाला तुमच्या साऱ्या गतिविधी, हालचाली, कृती या तिच्यापासूनच उगम पावत आहेत, तुमच्या साऱ्या शक्ती या तिच्याच आहेत; तुमचे मन, प्राण, शरीर यांना तिच्या कार्याचे सचेत आणि आनंदी साधन बनले असल्याची, तिच्या लीलेचे माध्यम बनले असल्याची जाणीव होईल; या जडभौतिक विश्वामध्ये आपण तिच्या आविष्करणाचे साचे बनलो आहोत अशी जाणीव तुम्हाला होईल. एकत्वाच्या आणि अवलंबित्वाच्या अवस्थेएवढी दुसरी कोणतीही आनंदी अवस्था असू शकत नाही; कारण ही पायरी तुम्हाला तुमच्या अज्ञानजन्य दुःखपूर्ण व तणावपूर्ण जीवनाच्या सीमारेषेच्या पलीकडे, तुमच्या आध्यात्मिक अस्तित्वाच्या सत्यामध्ये, सखोल शांतीमध्ये आणि त्याच्या उत्कट आनंदामध्ये घेऊन जाते.

हे रूपांतरण होत असताना, अहंकारात्मक विकृतीच्या सर्व कलंकापासून तुम्ही स्वतःला अ-बाधित ठेवण्याची नेहमीपेक्षाही अधिक आवश्यकता असते. तसेच आत्म-दानाच्या आणि त्यागाच्या शुद्धतेला कलंक लागेल अशी कोणतीही मागणी वा कोणताही आग्रहदेखील तुम्ही धरता कामा नये. कर्म किंवा त्याचे फळ यासंबंधी कोणतीही आसक्ती तुमच्यामध्ये असता कामा नये, तुम्ही कोणत्याही अटी त्या दिव्य शक्तीवर लादता कामा नयेत. मी त्या दिव्य शक्तीचे साधन बनलो आहे असा कोणताही ताठा, घमेंड किंवा अहंकार तुम्हाला असता कामा नये. त्या दिव्य शक्तींचा वापर तुमच्या मनाच्या, प्राणाच्या किंवा शरीराच्या वैयक्तिक समाधानासाठी किंवा वापरासाठी करून, तुमच्या माध्यमाद्वारे कार्यरत असणाऱ्या त्या शक्तींची महानता तुम्ही विकृत करता कामा नये. तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा, तुमच्या अभीप्सेची शुद्धता तुमच्या अस्तित्वाच्या साऱ्या स्तरांना, साऱ्या प्रतलांना व्यापणारी असली पाहिजे, ती निरपेक्ष असली पाहिजे; तेव्हा मग अस्वस्थ करणारा प्रत्येक घटक, विकृत करणारा प्रत्येक प्रभाव तुमच्या प्रकृतीमधून एकेक करून निघून जाईल. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 32 : 12-13)

साधना, योग आणि रूपांतरण – १११

साधकासाठी बाह्य संघर्ष, अडचणी, संकटे या गोष्टी म्हणजे अहंकार आणि रजोगुणात्मक इच्छा-वासना यांच्यावर मात करण्याची आणि संपूर्ण समर्पण प्राप्त करून घेण्याची केवळ साधने असतात. जोपर्यंत व्यक्ती यशप्राप्तीवर भर देत असते तोपर्यंत ती व्यक्ती अंशतः का होईना पण अहंकारासाठी कर्म करत असते; आणि हे असे आहे, हे दाखवून देण्यासाठी तसेच पूर्ण समता यावी म्हणून अडीअडचणी आणि बाह्य अपयश या गोष्टी येत राहतात. विजयाची शक्ती प्राप्त करून घेऊ नये, असा याचा अर्थ नाही; परंतु केवळ नजीकच्या कार्यातील यश हीच काही सर्वस्वी महत्त्वाची गोष्ट नसते; ग्रहण करण्याची शक्ती आणि एक महत्तर, अधिक महत्तर सुयोग्य दृष्टी प्रक्षेपित करण्याची शक्ती आणि आंतरिक ‘शक्ती’चे विकसन याच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. आणि हे सारे अतिशय शांतपणे आणि धीराने, नजीकच्या विजयामुळे उत्तेजित न होता किंवा अपशयाने खचून न जाता केले पाहिजे.
*
कर्माचा एक मोठा उपयोग असा असतो की, कर्म हे प्रकृतीची परीक्षा घेते आणि साधकाला त्याच्या बाह्यवर्ती अस्तित्वाच्या दोषांसमोर उभे करते, अन्यथा ते दोष त्याच्या नजरेतून निसटण्याची शक्यता असते.
*
कर्माच्या माध्यमातून योगसाधना हा पूर्णयोगाच्या साधना-प्रवाहामध्ये प्रवेश करण्याचा सर्वात सोपा आणि सर्वात जास्त प्रभावी मार्ग आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 241-242), (CWSA 29 : 241), (CWSA 32 : 256-257)

साधना, योग आणि रूपांतरण – ०७

‘ईश्वरा’कडे जाण्याचा ‘ध्यान’ हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग आहे, असे म्हणता येणार नाही. कारण, तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. ध्यानामुळे जर (‘ईश्वर शक्ती’चे) अवरोहण (descent) घडून आले नाही तर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही…

‘कर्म’ हा तुलनेने बराच साधासरळ मार्ग आहे. परंतु, त्यामध्ये व्यक्तीचे मन ‘ईश्वरा’ऐवजी, फक्त कर्मावरच खिळलेले असता कामा नये. ‘ईश्वर’ हेच साध्य असले पाहिजे आणि कर्म हे केवळ एक साधन होऊ शकते.

प्रेम, भक्ती, …या गोष्टी ‘ईश्वरा’कडे पोहोचण्याचे जवळचे मार्ग असतात किंवा असू शकतात. (असू शकतात असे म्हणण्याचे कारण की) प्रेम आणि भक्ती या गोष्टी जर अधिक प्राणप्रधान (Vital) असतील तर, हर्षभरित अपेक्षा आणि विरह, अभिमान, नैराश्य या गोष्टींमध्ये (सी-सॉ सारखी) दोलायमान स्थिती होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे प्रेम व भक्तीचा मार्ग जवळचा न राहता, दूरवरचा, वळणावळणाचा होतो. ‘ईश्वरा’कडे धाव घेण्याऐवजी, थेट झेपावण्याऐवजी, व्यक्ती स्वतःच्या अहंकाराच्या भोवती भोवतीच घोटाळत राहण्याची शक्यता असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 212)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१०)

केवळ ‘अतिमानव’ बनण्याच्या कल्पनेने या ‘योगा’कडे (पूर्णयोगाकडे) वळणे ही प्राणिक अहंकाराची एक कृती ठरेल आणि ती या योगाचे मूळ उद्दिष्टच निष्फळ करेल. जे कोणी त्यांच्या सर्व जीवनव्यवहारामध्ये असे उद्दिष्ट ठेवतात त्यांना निरपवादपणे आध्यात्मिक आणि अन्य प्रकारची दुःखं सहन करावी लागतात. प्रथम विभक्तकारी अहंकार (separative ego) दिव्य चेतनेमध्ये विलीन करून, त्याद्वारे दिव्य चेतनेमध्ये प्रवेश करणे आणि दुसरे म्हणजे, मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करण्यासाठी अतिमानसिक चेतना या पृथ्वीवर अवतरित करणे हे या ‘योगा’चे ध्येय आहे. (अहंकार दिव्य चेतनेमध्ये विलीन करत असताना, त्या अनुषंगाने, व्यक्तीला स्वतःच्या खऱ्या जीवात्म्याचा (individual self) शोध लागतो; हा जीवात्मा म्हणजे मर्यादित, व्यर्थ आणि स्वार्थी मानवी अहंकार नसतो तर तो ‘ईश्वरा’चा अंश असतो.) बाकी सर्व गोष्टी म्हणजे या दोन ध्येयांचे परिणाम असू शकतात, परंतु त्या या ‘योगा’चे प्राथमिक उद्दिष्ट असू शकत नाहीत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 21)

अमृतवर्षा २०

कर्म करणे हा साधनेचा एक चांगला मार्ग आहे, कारण तुम्हाला एखादे कर्म जर योग्य प्रकारे करायची इच्छा असेल तर तुम्ही म्हणजे ते ‘कर्म’च बनला पाहिजेत, ती ‘कर्म करणारी व्यक्ती’ नव्हे. अन्यथा तुम्हाला ते कधीच योग्य रीतीने करता येणार नाही. कारण ‘कर्म करणारी व्यक्ती’ असे तुम्ही राहिलात आणि त्यातही तुमचे विचार भरकटत असतील तर निश्चितपणे असे होईल की, तुम्ही जर काही नाजूक गोष्टी हाताळत असाल तर त्या मोडतील, तुटतील; तुम्ही स्वयंपाक करत असाल तर तुमच्या हातून एखादा पदार्थ करपून जाईल, तुम्ही जर खेळत असाल तर तुम्ही हराल. तेव्हा कर्मामध्ये मोठी साधना असते हे लक्षात घ्या आणि तुम्हाला ती साधना चांगल्या रीतीने करायची असेल तर (कर्म करत असताना स्वत: कर्मरूप होणे) हाच एक मार्ग आहे.

…अगदी सगळ्या गोष्टींबाबत हे असेच असते. कोणतीही गोष्ट जर ती योग्य प्रकारे केली तर ती योग-साधनेचा भाग बनू शकते. आणि योग्य प्रकारे केली नाही तर अगदी (तुमच्या) तपस्येचादेखील काही उपयोग होऊ शकणार नाही आणि परिणामी तुमची प्रगतीसुद्धा होणार नाही. कारण परत तेच! तुम्ही जर तपस्या करत असाल आणि ती करत असताना सदासर्वकाळ स्वत:कडे पाहात असाल आणि मनातल्या मनात स्वत:शीच बोलत असाल, ‘माझी प्रगती होत आहे ना? माझे भले होईल ना? मी यशस्वी होईन ना?” तर तेव्हा तो तुमचा अहंकार असतो, तो हळू हळू वाढत जातो आणि सर्व जागा व्यापून टाकतो, मग तो अन्य कशालाच जागा उरू देत नाही. आध्यात्मिक अहंकार हा सर्वात वाईट असतो कारण तो त्याच्या स्वत:च्या हीनपणाबद्दल पूर्णपणे बेसावध असतो, त्याला असे वाटत असते की, मी अगदी दैवी नसलो तरी मी खूप श्रेष्ठ आहे….

(वर उल्लेख केल्याप्रमाणे, व्यक्ती स्वत: कर्मरूप बनून न जाता, कर्म करणारी आणि ते करताना सातत्याने स्वत:कडेच बघत राहणारी व्यक्ती म्हणून शिल्लक राहिली आणि) पुन्हापुन्हा स्वत:कडे मागे वळून बघत राहिली, म्हणजेच ती अगदी कोत्या अहंकाराच्या मर्यादांमध्ये स्वत:ला कोंडून घेत राहिली तर त्यातून न्यूनगंड, स्वत:च्या मर्यादा, स्वतःचा क्षुद्रपणा, अक्षमता या सर्व गोष्टी निर्माण होतात. व्यक्तीने आपली दारे खुली केली पाहिजेत, स्वत:ला व्यापक केले पाहिजे. आणि त्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वत:वर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, व्यक्ती जे काही कर्म करत असते त्या कर्मावर लक्ष केंद्रित करायला तिला जमले पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 04 : 362-364]

विचारशलाका ३६

 

सर्वसाधारणपणे आपण ‘अज्ञाना’मध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला ‘ईश्वर’ काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती या अदिव्य शक्ती असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना आणि अचेतनेचा जणू एक पडदाच विणतात की, ज्यामुळे ‘ईश्वर’ आपल्यापासून झाकलेला राहतो.

जी चेतना, ‘ईश्वर’ काय आहे ते जाणते आणि त्यामध्ये जाणीवपूर्वक अधिवास करते, अशा उच्चतर आणि गहन, सखोल चेतनेमध्ये आपला प्रवेश व्हायचा असेल तर, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींपासून आपली सुटका झाली पाहिजे आणि ‘दिव्य शक्ती’च्या कृतीसाठी आपण स्वतःला खुले केले पाहिजे; म्हणजे मग ती दिव्य शक्ती आपल्या चेतनेचे ‘दिव्य प्रकृती’मध्ये परिवर्तन घडवून आणेल. ‘दिव्यत्वा’च्या या संकल्पनेपासून आपण प्रारंभ केला पाहिजे – त्याच्या सत्याचा साक्षात्कार चेतनेच्या विकसनातून आणि तिच्या परिवर्तनामधूनच होणे शक्य आहे.

– श्रीअरविंद [CWSA 28 : 07-08]

विचारशलाका ३४

आळस आणि निष्क्रियता यांचा परिणाम म्हणजे तमस, तामसिकता. त्यातून व्यक्ती अचेतनतेमध्ये जाऊन पडते आणि ती गोष्ट प्रगती व प्रकाशाच्या पूर्णपणे विरोधी असते. अहंकारावर मात करणे आणि केवळ ‘ईश्वरा’च्या सेवेमध्ये जीवन व्यतीत करणे, हा खरी ‘चेतना’प्राप्त करून घेण्याचा निकटतम व आदर्श मार्ग आहे.

– श्रीमाताजी [CWM 13 : 212]

आध्यात्मिकता ४६

सर्व अहंकार आणि सर्व अंधकार नाहीसा करण्यासाठी, कृतज्ञतेची शुद्ध, उबदार, मधुर आणि तेजस्वी ज्योत आपल्या हृदयामध्ये कायमच प्रज्वलित असली पाहिजे. साधकाला त्याच्या उद्दिष्टाप्रत घेऊन जाणारा जो परमेश्वर, त्या ‘परमेश्वराच्या कृपे’बद्दल कृतज्ञतेची ज्योत कायमच तेवत राहिली पाहिजे. व्यक्ती जितकी अधिक कृतज्ञ राहील, जेवढी तिला ‘ईश्वरी कृपे’च्या कृतीची अधिक जाण होईल आणि त्याबद्दल ती जेवढी अधिक कृतज्ञ राहील, तेवढा मार्ग जवळचा होईल.

– श्रीमाताजी : Conversations with disciple, July 15, 1964