Tag Archive for: अहंकार

व्यक्तित्वाची घडण व्हावी यासाठी अहंकाराची आवश्यकता होती. पण म्हणूनच त्याचा विनाश हा तितकाच अवघड असतो. (अहंकाराचे उच्चाटन करण्याचा) एक अवघड पण चांगला मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे अहंकाराचे रूपांतरण करायचे आणि त्याला ईश्वराचे साधन बनवायचे. अहंकार रूपांतरित होऊन, तो जर ईश्वराला समग्रतया समर्पित झाला, तर तो अतिशय सशक्त आणि परिणामकारक साधन बनू शकतो. हा प्रयत्न अतिशय अवघड आहे आणि त्यासाठी निरपवाद आणि दृढ प्रामाणिकपणाची आवश्यकता असते. ज्यांच्यापाशी प्रबळ संकल्पशक्ती आहे, उत्कट अभीप्सा आणि अविचल प्रामाणिकपणा आहे, त्यांनी हा प्रयत्न करण्यास हरकत नाही.

• श्रीमाताजी (CWM 16 : 425)

 

(भाग ०४)

व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं आहे. पण प्रत्येक वेळी या अप्रामाणिकपणाचा उद्भव एक सारख्याच गतीविधीतून होतो — ती गतीविधी कधी इच्छांमधून उद्भवलेली असते तर, कधी व्यक्ती स्वत:च्या वैयक्तिक उद्दिष्टांसाठी जी धडपड करत असते, त्यातून उद्भवलेली असते. म्हणजे अहंभावामधून, अहंकारातून निर्माण झालेल्या मर्यादांच्या सरमिसळीतून आणि वासनांमधून उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या विकृतींमधून या अप्रामाणिकपणाचा उद्भव होतो.

व्यक्ती जरी प्रामाणिक बनण्याची धडपड करत असली तरीसुद्धा तिच्यामध्ये जोपर्यंत अहंकार शिल्लक असतो तोपर्यंत ‘मी पूर्णपणे प्रामाणिक आहे,’ असे ती व्यक्ती म्हणू शकत नाही. व्यक्तीने अहंकाराच्या पलीकडे जायला पाहिजे, स्वत:ला संपूर्णपणे दिव्य संकल्पा‌च्या (divine Will) हाती सोपविले पाहिजे, समर्पित केले पाहिजे. हातचे काहीही राखून न ठेवता आणि लाभहानीचा कोणताही विचार मनात न ठेवता हे समर्पण केले पाहिजे… तेव्हाच व्यक्ती संपूर्णतया प्रामाणिक असू शकते, तत्पूर्वी मात्र ती प्रामाणिक नसते.

अर्थात, व्यक्तीने आहे त्यापेक्षा अधिक प्रामाणिक होण्याचा प्रयत्न करू नये, असा याचा अर्थ नाही. एखादी व्यक्ती असेही म्हणण्याची शक्यता आहे की, ‘ठीक आहे, मी माझा अहंकार नाहीसा होण्याची वाट पाहीन आणि मग प्रामाणिक होईन,’ (परंतु असे करता कामा नये.) व्यक्तीने ती सध्या जेवढी प्रामाणिक आहे त्यापेक्षा, अधिक प्रामाणिक बनण्याचा प्रयत्न अवश्य केला पाहिजे. किंवा असेही म्हणता येईल की, व्यक्तीने जर प्रामाणिकपणे प्रयत्नच केला नाही, तर तिचा अहंकार कधीच नाहीसा होणार नाही.

प्रामाणिकपणा हा खऱ्या साक्षात्काराचा पाया आहे, तो साक्षात्काराचे साधन आहे, तोच मार्ग आहे आणि प्रामाणिकपणा हेच एक साध्य आहे. तुमच्याकडे प्रामाणिकपणा नसेल तर, तुम्ही हमखास असंख्य घोडचुका करत राहता आणि तुम्ही स्वतःला व इतरांना जी हानी पोहोचविलेली असते, त्याचे तुम्हाला सातत्याने निवारण करत बसावे लागते.

प्रामाणिक असण्यामध्ये एक अद्भुत आनंद असतो. प्रामाणिकपणाच्या प्रत्येक कृतीमध्येच प्रामाणिकपणाचे स्वतःचे असे एक फल अंतर्भूत असते. आपले शुद्धिकरण झाले आहे ही भावना किंवा ऊर्ध्वमुख होत झेपावत जाणे किंवा व्यक्तीने मिथ्यत्वाचा अगदी एखादा छोटासा कण दूर केला तरी त्यामुळे तिला मिळालेला मुक्तीचा अनुभव या गोष्टी हे प्रामाणिकपणाचे फलित असते. प्रामाणिकपणा हे सुरक्षाकवच असते, तेच संरक्षण असते, प्रामाणिकपणा हाच मार्गदर्शक असतो आणि अंतिमतः प्रामाणिकपणा ही एक रूपांतरकारी शक्ती असते.

– श्रीमाताजी (CWM 08 : 399-400)

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

स्वत:चीच फसवणूक करणारा प्राणिक अहंकार, मानसिक उद्धटपणा, अहंगंड, पांडित्य-प्रदर्शन, शारीरिक अस्तित्वामध्ये असणारी तमोमय जडता या गोष्टींपासून सुटका करून घेण्यासाठी अस्तित्वाच्या सर्व अंगांमध्ये संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा (central sincerity) असणे ही एकच आवश्यक अट असते. ‘संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा’चा अर्थ दुसऱ्या शब्दांत सांगायचा झाला तर, केवळ परमसत्या‌चा निरपवाद आग्रह धरणे आणि त्याव्यतिरिक्त आता दुसरे काहीही नको असे वाटणे, असा होतो.

अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर, व्यक्तीमध्ये समजा कधी मिथ्यत्वाचा शिरकाव झालाच तर, लगेचच तिला एकप्रकारची अस्वस्थता जाणवेल आणि अशा वेळी त्या मिथ्यत्वाचे कोणतेही समर्थन न करता, स्वतःचे कठोर मूल्यमापन (self-criticism) करण्याची व्यक्तीची तयारी झालेली असेल. तिच्यामध्ये प्रकाशाप्रत सजग खुलेपणा येईल आणि सरतेशेवटी ही तयारी संपूर्ण अस्तित्वाचेच शुद्धिकरण घडवून आणेल.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 379)

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला आवश्यक गुण आहे विनम्रता!

*

खरी आणि प्रामाणिक विनम्रता हे आपले संरक्षक-कवच असते. अहंकार नाहीसा होणे आवश्यकच असते आणि तो नष्ट करण्याचा सर्वात खात्रीचा मार्ग म्हणजे विनम्रता.

*

विनम्रता आणि प्रामाणिकपणा या गोष्टी सर्वोत्तम संरक्षक-कवचाप्रमाणे असतात. त्यांच्याविना प्रत्येक पावलावर धोका असतो; आणि (साधकामध्ये) या गोष्टी असतील तर विजय निश्चित असतो.

– श्रीमाताजी (CWM 14 : 153)

अहंकाराचा अभाव म्हणजे समता नव्हे, तर इच्छावासना आणि आसक्तीचा अभाव म्हणजे समता. म्हणजे मी असे म्हटले आहे की, ‘समता‌’ या शब्दामधून इच्छावासना आणि आसक्तीचा अभाव यांचा निर्देश होतो; अहंकाराची जाणीव नाहीशी होईल का, ती सूक्ष्म आणि व्यापक रूपामध्ये टिकून राहील, हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 133)

स्वत:चीच फसवणूक करणारा प्राणिक अहंकार, मानसिक उद्धटपणा, अहंगंड, पांडित्य-प्रदर्शन, शारीरिक अस्तित्वामध्ये असणारी तमोमय जडता या गोष्टींपासून सुटका करून घेण्यासाठी अस्तित्वाच्या सर्व अंगांमध्ये संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा असणे ही एकच अट आहे. आणि त्याचाच अर्थ असा होतो की, ‘परमसत्या‌’चा निरपवाद आग्रह बाळगणे आणि त्याव्यतिरिक्त आता दुसरे काहीही नको असे वाटणे.

तसे झाले तर मग, व्यक्तीमध्ये मिथ्यत्वाचा शिरकाव झालाच तर लगेचच व्यक्तीला एक प्रकारची अस्वस्थता जाणवेल आणि अशा वेळी कोणतेही समर्थन न करता, स्वतःचे कठोर मूल्यमापन (self-criticism) करण्याची व्यक्तीची तयारी झालेली असेल. तिच्यामध्ये प्रकाशाप्रत सतर्क खुलेपणा येईल आणि सरतेशेवटी ही तयारी संपूर्ण अस्तित्वाचेच शुद्धिकरण घडवून आणेल.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 379)

नैराश्यापासून सुटका – २६

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

निराशेला कवटाळून बसू नका, जे जे योग मार्गाचे अनुसरण करतात त्यांना त्यांच्या अहंचे अडथळे जाणवतातच. परंतु जर खरीखुरी अभीप्सा असेल तर, उच्चतर चेतनेचा नेहमीच विजय होतो.

*

सातत्याने ईश-स्मरण ठेवावे आणि शांती व स्थिरतेमध्ये जीवन जगावे; जेणेकरून ‘ईश्वरी शक्ती‌’ तुमच्यामध्ये कार्य करू शकेल आणि ‘ईश्वरी प्रकाश’ तुमच्यामध्ये येऊ शकेल. दैनंदिन जीवनातील किरकोळ गोष्टी फक्त पृष्ठस्तरीय चेतनेमध्येच (surface consciousness) चालू राहिल्या पाहिजेत; पण त्यांनी पृष्ठस्तरीय चेतनेची फार मोठी जागादेखील व्यापता कामा नये. ‘ईश्वरी शक्ती‌’ आणि ‘ईश्वरी प्रकाश’ यांच्या द्वारे जोपर्यंत पृष्ठस्तरीय चेतनेचा ताबा घेतला जात नाही आणि दैनंदिन जीवनातील किरकोळ गोष्टी जोपर्यंत त्यांच्या थेट नियंत्रणाखाली येत नाहीत तोपर्यंत, त्या पृष्ठस्तरीय चेतनेपुरत्याच मर्यादित राहिल्या पाहिजेत.

अहंकार या किरकोळ गोष्टींना अति महत्त्व देतो. त्या अहंकारालाच नाउमेद केले पाहिजे. “माझ्यासाठी नाही तर ईश्वरा‌साठी,” हाच तुमच्या समग्र चेतनेचा, विचारांचा आणि कृतींचा मूलमंत्र म्हणून विकसित झाला पाहिजे. अर्थात या सर्व गोष्टी एकाच वेळी पूर्ण करता येतील असे नाही, पण शक्य तितक्या लवकर मनामध्ये (“माझ्यासाठी नाही तर ईश्वरा‌साठी,”) हा मूलमंत्र सातत्याने निनादत राहिला पाहिजे.

• श्रीअरविंद (CWSA 31 : 187, 219)

नैराश्यापासून सुटका – १५

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

अभिमाना‌पासून तुम्ही स्वतःची जेवढी लवकरात लवकर सुटका करून घ्याल तेवढे अधिक बरे. जो कोणी अभिमानाला खतपाणी घालतो तो विरोधी शक्तींच्या अंमलाखाली जातो. खऱ्या प्रेमाचा आणि अभिमानाचा काहीही संबंध नसतो; मत्सराप्रमाणेच (jealousy) अभिमान हा देखील प्राणिक अहंकाराचाच एक भाग असतो.

*

त्वरित परिणाम दिसून आले नाहीत तरी, नाउमेद न होणे हे अतिशय महत्त्वाचे असते, कारण अशावेळी आंतरिक शक्ती क्षीण होते. जेव्हा ती आंतरिक शक्ती क्षीण होते तेव्हा, ’तपोभंग‌’ होतो. पूर्वीचे ऋषीमुनी याविषयी नेहमी तक्रार करत असत. कारण ज्या ज्या वेळी असा तपोभंग होत असे तेव्हा तेव्हा पूर्वपदावर येण्यासाठी त्यांना प्रत्येक वेळी अगदी पहिल्यापासून पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागत असे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 245, 182)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३२

माझे प्रेम सततच तुमच्या सोबत आहे. पण तुम्हाला जर ते जाणवत नसेल तर त्याचे कारण हेच आहे की, तुम्ही ते स्वीकारण्यास सक्षम नाही. तुमची ग्रहणशीलता (receptivity) कमी पडत आहे, ती तुम्ही वाढविली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही स्वत:ला खुले (open) केले पाहिजे. व्यक्ती जेव्हा आत्मदान करते तेव्हाच ती स्वत:ला खुली करू शकते. तुम्ही नक्कीच कळत वा नकळतपणे, ईश्वरी प्रेम आणि शक्ती तुमच्याकडे खेचू पाहत आहात. ही पद्धत चुकीची आहे. कोणतेही हिशोब न मांडता, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता, स्वत:स अर्पण करा म्हणजे मग तुम्ही ग्रहणक्षम होऊ शकाल.
*
अगदी या आध्यात्मिक क्षेत्रातसुद्धा अशी पुष्कळ माणसं आहेत की जी, वैयक्तिक कारणांसाठी, अगदी सर्व तऱ्हेच्या वैयक्तिक कारणांसाठी (योगसाधनादी) सर्व गोष्टी करत असतात. काही जण जीवनामुळे उद्विग्न झालेले असतात, काही जण दुःखी असतात, काही जणांना अधिक काही जाणून घेण्याची इच्छा असते, काही जणांना आध्यात्मिक दृष्ट्या कोणीतरी महान व्यक्ती बनायचे असते, इतरांना शिकविता यावे म्हणून काही जणांना काही गोष्टी शिकायच्या असतात, योगमार्ग स्वीकारण्याची खरोखरच हजारो वैयक्तिक कारणं असतात. पण एक साधीशी गोष्ट अशी की, ईश्वराप्रति आत्मदान करावे, जेणेकरून ईश्वरच तुम्हाला हाती घेईल आणि ‘त्याची’ जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तो तुम्हाला घडवेल आणि ते सारे त्याच्या शुद्धतेनिशी व सातत्यानिशी घडवेल. आणि हे खरोखरच सत्य असते, पण असे करणारे फार जण आढळत नाहीत. खरेतर या आत्मदानामुळेच व्यक्ती ध्येयाप्रत थेट जाऊन पोहोचते आणि मग तिच्याकडून कोणत्या चुका होण्याचे धोकेही नसतात. पण इतर प्रेरणा मात्र नेहमीच संमिश्र असतात; अहंकाराने कलंकित झालेल्या असतात आणि स्वाभाविकपणेच त्या तुम्हाला कधी इकडे तर कधी तिकडे भरकटवत राहतात. कधीकधी तर त्या तुम्हाला ध्येयापासून खूप दूरही नेतात.

– श्रीमाताजी (CWM 14 : 148), (CWM 07 : 190)

आत्मसाक्षात्कार – १७

(अहंकारापासून मुक्त होण्याचा एक मार्ग म्हणजे वासना-मुक्ती. परंतु हा मार्ग काहीसा कोरडा, रुक्ष आणि दूरवरचा आहे, अशी टिपण्णी श्रीमाताजींनी केली आहे आणि त्याच्या तुलनेत अधिक वेगवान मार्ग कोणता तो त्या सांगत आहेत.)

अहंकारापासून मुक्त होण्याची समस्या जर शारीरिकरित्या सोडवायची असेल तर धैर्य आणि निश्चय बाळगून (स्वत:ला) झोकून द्या. वासनांच्या मागे धावण्याचा दूरचा, दुष्कर, कष्टदायक आणि निराशाजनक मार्ग सोडून, व्यक्तीने साधेपणाने, संपूर्णतया, कोणत्याही अटी न लादता जर त्या ‘परमोच्च सत्या’प्रत, ‘परमोच्च संकल्पशक्ती’प्रत, ‘परमपुरुषा’प्रत स्वत:ला समर्पित केले; अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी जर स्वत:चे संपूर्ण अस्तित्व, संपूर्णतया ‘त्या’च्या हाती सोपविले, तर अहंकारापासून सुटका करून घेण्याचा तो सर्वात वेगवान आणि क्रांतिकारी मार्ग आहे.

लोकं म्हणतील की, हा मार्ग आचरणात आणणे खूप अवघड आहे. परंतु या मार्गात एक प्रकारची ऊब आहे, उत्कटता आहे, उत्साह आहे, प्रकाश आहे, सौंदर्य आहे, उत्कट आणि सर्जनशील जीवन आहे.

…संपूर्ण, समग्र, परिपूर्ण, नि:शेष आणि कोणत्याही अटीविना जे आत्मदान केले जाते, त्यालाच मी सकारात्मक मार्ग (positive way) म्हणते.

फक्त स्वत:साठी न जगता, स्वत:शी निगडित असे काहीही न ठेवता आणि स्वत:चा विचार न करता, सर्वाधिक सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत असे जे काही आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्ये निमग्न राहणे यामध्ये इतका अगाध आनंद आहे की, त्याची तुलना दुसऱ्या कशाशीच करता येऊ शकत नाही. ही एकच गोष्ट अर्थपूर्ण आहे, प्रयत्न करून पाहण्यायोग्य आहे. इतर सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ कालापव्यय असतो. वळणावळणाच्या रस्त्याने, धीम्या गतीने, कष्टपूर्वक, टप्याटप्प्याने वर्षानुवर्षे पर्वत चढत जाणे (पिपीलिका मार्ग) आणि अदृश्य पंख पसरवून, थेट शिखराकडे झेपावणे (विहंगम मार्ग) यामध्ये जो फरक आहे तो येथे आहे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 268-269)