Tag Archive for: अहंकार

नैराश्यापासून सुटका – २६

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

निराशेला कवटाळून बसू नका, जे जे योग मार्गाचे अनुसरण करतात त्यांना त्यांच्या अहंचे अडथळे जाणवतातच. परंतु जर खरीखुरी अभीप्सा असेल तर, उच्चतर चेतनेचा नेहमीच विजय होतो.

*

सातत्याने ईश-स्मरण ठेवावे आणि शांती व स्थिरतेमध्ये जीवन जगावे; जेणेकरून ‘ईश्वरी शक्ती‌’ तुमच्यामध्ये कार्य करू शकेल आणि ‘ईश्वरी प्रकाश’ तुमच्यामध्ये येऊ शकेल. दैनंदिन जीवनातील किरकोळ गोष्टी फक्त पृष्ठस्तरीय चेतनेमध्येच (surface consciousness) चालू राहिल्या पाहिजेत; पण त्यांनी पृष्ठस्तरीय चेतनेची फार मोठी जागादेखील व्यापता कामा नये. ‘ईश्वरी शक्ती‌’ आणि ‘ईश्वरी प्रकाश’ यांच्या द्वारे जोपर्यंत पृष्ठस्तरीय चेतनेचा ताबा घेतला जात नाही आणि दैनंदिन जीवनातील किरकोळ गोष्टी जोपर्यंत त्यांच्या थेट नियंत्रणाखाली येत नाहीत तोपर्यंत, त्या पृष्ठस्तरीय चेतनेपुरत्याच मर्यादित राहिल्या पाहिजेत.

अहंकार या किरकोळ गोष्टींना अति महत्त्व देतो. त्या अहंकारालाच नाउमेद केले पाहिजे. “माझ्यासाठी नाही तर ईश्वरा‌साठी,” हाच तुमच्या समग्र चेतनेचा, विचारांचा आणि कृतींचा मूलमंत्र म्हणून विकसित झाला पाहिजे. अर्थात या सर्व गोष्टी एकाच वेळी पूर्ण करता येतील असे नाही, पण शक्य तितक्या लवकर मनामध्ये (“माझ्यासाठी नाही तर ईश्वरा‌साठी,”) हा मूलमंत्र सातत्याने निनादत राहिला पाहिजे.

• श्रीअरविंद (CWSA 31 : 187, 219)

नैराश्यापासून सुटका – १५

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

अभिमाना‌पासून तुम्ही स्वतःची जेवढी लवकरात लवकर सुटका करून घ्याल तेवढे अधिक बरे. जो कोणी अभिमानाला खतपाणी घालतो तो विरोधी शक्तींच्या अंमलाखाली जातो. खऱ्या प्रेमाचा आणि अभिमानाचा काहीही संबंध नसतो; मत्सराप्रमाणेच (jealousy) अभिमान हा देखील प्राणिक अहंकाराचाच एक भाग असतो.

*

त्वरित परिणाम दिसून आले नाहीत तरी, नाउमेद न होणे हे अतिशय महत्त्वाचे असते, कारण अशावेळी आंतरिक शक्ती क्षीण होते. जेव्हा ती आंतरिक शक्ती क्षीण होते तेव्हा, ’तपोभंग‌’ होतो. पूर्वीचे ऋषीमुनी याविषयी नेहमी तक्रार करत असत. कारण ज्या ज्या वेळी असा तपोभंग होत असे तेव्हा तेव्हा पूर्वपदावर येण्यासाठी त्यांना प्रत्येक वेळी अगदी पहिल्यापासून पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागत असे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 245, 182)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३२

माझे प्रेम सततच तुमच्या सोबत आहे. पण तुम्हाला जर ते जाणवत नसेल तर त्याचे कारण हेच आहे की, तुम्ही ते स्वीकारण्यास सक्षम नाही. तुमची ग्रहणशीलता (receptivity) कमी पडत आहे, ती तुम्ही वाढविली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही स्वत:ला खुले (open) केले पाहिजे. व्यक्ती जेव्हा आत्मदान करते तेव्हाच ती स्वत:ला खुली करू शकते. तुम्ही नक्कीच कळत वा नकळतपणे, ईश्वरी प्रेम आणि शक्ती तुमच्याकडे खेचू पाहत आहात. ही पद्धत चुकीची आहे. कोणतेही हिशोब न मांडता, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता, स्वत:स अर्पण करा म्हणजे मग तुम्ही ग्रहणक्षम होऊ शकाल.
*
अगदी या आध्यात्मिक क्षेत्रातसुद्धा अशी पुष्कळ माणसं आहेत की जी, वैयक्तिक कारणांसाठी, अगदी सर्व तऱ्हेच्या वैयक्तिक कारणांसाठी (योगसाधनादी) सर्व गोष्टी करत असतात. काही जण जीवनामुळे उद्विग्न झालेले असतात, काही जण दुःखी असतात, काही जणांना अधिक काही जाणून घेण्याची इच्छा असते, काही जणांना आध्यात्मिक दृष्ट्या कोणीतरी महान व्यक्ती बनायचे असते, इतरांना शिकविता यावे म्हणून काही जणांना काही गोष्टी शिकायच्या असतात, योगमार्ग स्वीकारण्याची खरोखरच हजारो वैयक्तिक कारणं असतात. पण एक साधीशी गोष्ट अशी की, ईश्वराप्रति आत्मदान करावे, जेणेकरून ईश्वरच तुम्हाला हाती घेईल आणि ‘त्याची’ जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तो तुम्हाला घडवेल आणि ते सारे त्याच्या शुद्धतेनिशी व सातत्यानिशी घडवेल. आणि हे खरोखरच सत्य असते, पण असे करणारे फार जण आढळत नाहीत. खरेतर या आत्मदानामुळेच व्यक्ती ध्येयाप्रत थेट जाऊन पोहोचते आणि मग तिच्याकडून कोणत्या चुका होण्याचे धोकेही नसतात. पण इतर प्रेरणा मात्र नेहमीच संमिश्र असतात; अहंकाराने कलंकित झालेल्या असतात आणि स्वाभाविकपणेच त्या तुम्हाला कधी इकडे तर कधी तिकडे भरकटवत राहतात. कधीकधी तर त्या तुम्हाला ध्येयापासून खूप दूरही नेतात.

– श्रीमाताजी (CWM 14 : 148), (CWM 07 : 190)

आत्मसाक्षात्कार – १७

(अहंकारापासून मुक्त होण्याचा एक मार्ग म्हणजे वासना-मुक्ती. परंतु हा मार्ग काहीसा कोरडा, रुक्ष आणि दूरवरचा आहे, अशी टिपण्णी श्रीमाताजींनी केली आहे आणि त्याच्या तुलनेत अधिक वेगवान मार्ग कोणता तो त्या सांगत आहेत.)

अहंकारापासून मुक्त होण्याची समस्या जर शारीरिकरित्या सोडवायची असेल तर धैर्य आणि निश्चय बाळगून (स्वत:ला) झोकून द्या. वासनांच्या मागे धावण्याचा दूरचा, दुष्कर, कष्टदायक आणि निराशाजनक मार्ग सोडून, व्यक्तीने साधेपणाने, संपूर्णतया, कोणत्याही अटी न लादता जर त्या ‘परमोच्च सत्या’प्रत, ‘परमोच्च संकल्पशक्ती’प्रत, ‘परमपुरुषा’प्रत स्वत:ला समर्पित केले; अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी जर स्वत:चे संपूर्ण अस्तित्व, संपूर्णतया ‘त्या’च्या हाती सोपविले, तर अहंकारापासून सुटका करून घेण्याचा तो सर्वात वेगवान आणि क्रांतिकारी मार्ग आहे.

लोकं म्हणतील की, हा मार्ग आचरणात आणणे खूप अवघड आहे. परंतु या मार्गात एक प्रकारची ऊब आहे, उत्कटता आहे, उत्साह आहे, प्रकाश आहे, सौंदर्य आहे, उत्कट आणि सर्जनशील जीवन आहे.

…संपूर्ण, समग्र, परिपूर्ण, नि:शेष आणि कोणत्याही अटीविना जे आत्मदान केले जाते, त्यालाच मी सकारात्मक मार्ग (positive way) म्हणते.

फक्त स्वत:साठी न जगता, स्वत:शी निगडित असे काहीही न ठेवता आणि स्वत:चा विचार न करता, सर्वाधिक सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत असे जे काही आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्ये निमग्न राहणे यामध्ये इतका अगाध आनंद आहे की, त्याची तुलना दुसऱ्या कशाशीच करता येऊ शकत नाही. ही एकच गोष्ट अर्थपूर्ण आहे, प्रयत्न करून पाहण्यायोग्य आहे. इतर सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ कालापव्यय असतो. वळणावळणाच्या रस्त्याने, धीम्या गतीने, कष्टपूर्वक, टप्याटप्प्याने वर्षानुवर्षे पर्वत चढत जाणे (पिपीलिका मार्ग) आणि अदृश्य पंख पसरवून, थेट शिखराकडे झेपावणे (विहंगम मार्ग) यामध्ये जो फरक आहे तो येथे आहे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 268-269)

आत्मसाक्षात्कार – १५

साधक : आम्ही जेव्हा कोणताही एखादा प्रयत्न करतो, तेव्हा आमच्यामध्ये असे काहीतरी असते की, ते लगेचच स्वत:वर खूष होऊन जाते, बढाया मारू लागते आणि एवढ्या-तेवढ्या प्रयत्नांनीच संतुष्ट होऊन जाते आणि परिणामी सारे काही बिघडून जाते. तेव्हा यापासून सुटका कशी करून घ्यायची?

श्रीमाताजी : आपण जेव्हा काहीतरी करत असतो तेव्हा आपल्यातीलच कोणीतरी त्यावर सदोदित लक्ष ठेवत असतो, निरीक्षण करत असतो. आणि मग कधीकधी तो गर्वाने फुलून जातो. तेव्हा साहजिकच, आपल्या प्रयत्नांमधील सामर्थ्य पुष्कळ प्रमाणात कमी होते.

काम करत असताना, जीवन जगत असताना व्यक्तीला स्वत:चे निरीक्षण करण्याची सवय असते. स्वत:चे निरीक्षण केलेच पाहिजे; परंतु त्याहूनही अधिक आवश्यक असते ते संपूर्णपणे प्रामाणिक राहण्याचा व सहजस्वाभाविक असण्याचा प्रयत्न करणे. व्यक्ती जे काही करत असते त्याबाबत ती अगदी सहजस्वाभाविक असली पाहिजे; म्हणजे व्यक्तीने सतत स्वत:चे निरीक्षण करत राहणे, स्वत:ला जोखत राहणे, स्वत:चे मूल्यमापन करत राहणे, कधीकधी तर खूपच कठोरपणे मूल्यमापन करणे, असे करू नये. खरेतर, स्वत:वरच खुश होऊन स्वत:चीच पाठ थोपटून घेणे जितके वाईट, तितकीच ही गोष्टदेखील वाईट असते; या दोन्हीही गोष्टी सारख्याच घातक असतात.

व्यक्ती अभीप्सेबाबत (aspiration) इतकी प्रामाणिक असली पाहिजे की, तिला आपण अभीप्सा बाळगत आहोत हेदेखील कळता कामा नये; जणू काही ती स्वत:च अभीप्सा बनून राहिली पाहिजे. जेव्हा हे खरोखर प्रत्यक्षात उतरेल तेव्हा व्यक्तीने खऱ्या अर्थाने काही असामान्य शक्ती प्राप्त केलेली असेल.

…व्यक्ती जेव्हा स्व-केंद्रित राहात नाही, ती म्हणजे काम करत असताना स्वत:कडे पाहणारा अहंकार असत नाही, तर व्यक्ती स्वत: ती कृतीच बनून जाते, त्याही पलीकडे जात, ती स्वत:च एक अभीप्सा बनून जाते तेव्हा, ते खरोखर चांगले असते. म्हणजे जेव्हा अभीप्सा बाळगणारी व्यक्ती म्हणूनसुद्धा ती शिल्लक राहत नाही, तर ती व्यक्ती म्हणजे स्वयमेव अभीप्साच बनून जाते आणि जेव्हा अशी व्यक्ती संपूर्ण एकाग्र अशा आवेगाने (ईश्वराप्रत) झेपावते तेव्हा ती खरोखरच खूप प्रगत होते. अन्यथा, नेहमीच एक प्रकारची क्षुद्र स्व-संतुष्टता, क्षुद्र आत्मप्रौढी आणि स्वत:बद्दलची कीव अशा सर्व प्रकारच्या गोष्टींचा व्यक्तीमध्ये शिरकाव होतो आणि सारे काही बिघडून जाते. अवघड असते हे सारे!

– श्रीमाताजी (CWM 06 : 402)

आत्मसाक्षात्कार – ११

(कालच्या भागात श्रीमाताजींनी शरीराच्या पृथगात्मतेविषयी (individualisation) सांगितले होते. आज आता आपण प्राणाच्या पृथगात्मतेविषयी त्या काय सांगत आहेत ते समजावून घेऊ.)

तुम्ही जर सहजपणे तुमच्या शरीरातून बाहेर पडलात आणि प्राणिक विश्वामध्ये (vital world) प्रवेश केलात तर, (तुमच्यापैकी बहुतेकांना हे जमत नाही कारण बहुधा शरीराप्रमाणेच प्राणिक अस्तित्वदेखील फारसे व्यक्तिविशिष्ट झालेले नसते.) तेथे तुम्हाला सर्व गोष्टींची एकमेकांमध्ये सरमिसळ झालेली आहे आणि त्या गोष्टी एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत, विभागलेल्या आहेत असे आढळेल. तिथे सर्व प्रकारची स्पंदनं, शक्तींचे प्रवाह असतात; ते येत असतात, जात असतात; एक-दुसऱ्याशी भांडत असतात; ते एकमेकांना नष्ट करू पाहत असतात, एक दुसऱ्याचा ताबा घेऊ पाहत असतात; एकमेकांना शोषून घेत असतात आणि परस्परांना बाहेर हाकलून देत असतात… आणि तिथे हे असेच चालत राहते. परंतु या सगळयामधून स्वतःचे खरे व्यक्तिमत्त्व शोधणे हे अतिशय कठीण काम असते.

कारण या सगळ्या गोष्टी म्हणजे विविध शक्ती असतात, गतिविधी असतात, इच्छावासना असतात, स्पंदने असतात. अर्थात तिथे स्वतंत्र व्यक्तित्व, व्यक्तिविशिष्टता, पृथगात्मकता (individualised) लाभलेल्या काही व्यक्तीसुद्धा असतात, व्यक्तिमत्त्वं असतात. परंतु त्या व्यक्ती म्हणजे एक प्रकारच्या शक्ती असतात. ज्यांना त्या प्राणिक विश्वामध्ये असे स्वतंत्र, पृथगात्म व्यक्तित्व असते ते एकतर शूरवीर असतात किंवा दानव असतात. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 258)

आत्मसाक्षात्कार – १०

(कालच्या भागात आपण स्वतंत्र, पृथगात्म (individualised) व्यक्तित्व म्हणजे काय ते पाहिले. येथे आता श्रीमाताजी शरीराच्या पृथगात्मतेविषयी सांगत आहेत.)

(ईश्वरापासून) विभक्त करणारा अहंकार नाहीसा होण्यासाठी, व्यक्तीला स्वतःचे समग्रतया, पूर्णतया, हातचे काहीही राखून न ठेवता आत्मदान करता आले पाहिजे. आणि असे आत्मदान करण्यासाठी, व्यक्तीची ‘व्यक्ती’ म्हणून घडण झालेली असली पाहिजे. त्यासाठी, ती स्वतंत्र, पृथगात्म (individualized) होणे आवश्यक असते.

तुमचे शरीर जर आत्ता आहे त्याप्रमाणे ताठर, कडक, (rigid) नसते, (आत्ता ते फारच अलवचीक आहे.) समजा, ते तसे नसते आणि (श्रीमाताजी निर्देश करून दाखवितात) तुम्हाला जर अशी सघन त्वचाच नसती तर, काय झाले असते? ज्याप्रमाणे तुम्ही प्राणिक व मानसिक क्षेत्रामध्ये असता (म्हणजे स्वतंत्र अस्तित्व नसलेले आणि एकमेकांमध्ये मिसळलेले असे) जर तुम्ही शरीराने असता, म्हणजे प्राणिक व मानसिक क्षेत्रामधील तुमच्या अस्तित्वाचे केवळ प्रतिबिंबच म्हणता येईल असे जर तुम्ही (शरीराने) बाह्यतःदेखील असता तर काय झाले असते? तसे असते तर, तुमची अवस्था एखाद्या जेलीफिशपेक्षासुद्धा वाईट झाली असती. प्रत्येक गोष्टच दुसऱ्या प्रत्येक गोष्टीत मिसळत राहिली असती, विरघळत राहिली असती… आणि मग केवढा मोठा गोंधळ उडाला असता बघा! आणि म्हणून सुरुवातीला असा अगदी जड, कठीण, सघन देहाकार असण्याची आवश्यकता होती.

आता मात्र आपण त्याच्याबद्दल तक्रार करत राहतो. आपण म्हणतो, “हे शरीर किती बद्ध, जखडबंद आहे. किती त्रासदायक आहे हे! ते घडणसुलभ नाही, ते लवचीक नाही. ईश्वरामध्ये विलीन होण्यासाठी लागणारी तरलता, प्रवाहीपणा त्याच्यामध्ये नाही.”

परंतु शरीर तसेच असणे आवश्यक होते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 257-258)

आत्मसाक्षात्कार – ०८

(‘ईश्वरामध्ये आपला अहंकार विलीन करायचा असेल तर, तो कसा करावा, असा प्रश्न एका साधकाने विचारला आहे. त्यावर श्रीमाताजींनी खूप विस्तृत उत्तर दिले आहे.

अहंकार विलीन करण्यापूर्वी आधी व्यक्तीचे स्वत:चे स्वतंत्र असे व्यक्तित्व, एक पृथगात्म व्यक्तित्व, (individualised) निर्माण व्हावे लागते, व्यक्तीचे असे स्वतंत्र व्यक्तित्व नसते तेव्हा तिची अवस्था कशी असते, त्याची आवश्यकता का असते; इत्यादी सर्व गोष्टी श्रीमाताजी येथे तपशिलवार सांगत आहेत. हा भाग विस्तृत असल्याने तो क्रमश: देत आहोत. पण नंतर हे सर्व भाग एकत्रितपणे वाचल्यास सर्व विषय अधिक नेमकेपणाने लक्षात येईल, हे येथे नमूद करावेसे वाटते.)

श्रीमाताजी : ‘ईश्वरा’मध्ये व्यक्तीने आपला अहंकार कसा विलीन करायचा, असे तुम्हाला विचारायचे आहे का? अहंकार विलीन करायचा असेल तर, त्यासाठी व्यक्ती आधी, पूर्णपणे स्वतंत्र, पृथगात्म (individualised) झाली पाहिजे. अन्यथा, अहंकाराचे ईश्वरामध्ये विलीनीकरण करणे शक्य होणार नाही. पूर्णपणे पृथगात्म होणे म्हणजे काय? आणि बाहेरच्या सर्व प्रभावांना प्रतिकार करण्याची क्षमता असणे म्हणजे काय, हे तुम्हाला माहीत आहे का?

काही दिवसांपूर्वी मला एक पत्र आले होते. त्यात त्या पत्रलेखकाने लिहिले होते की, (आध्यात्मिक ग्रंथांव्यतिरिक्त) सामान्य साहित्य उदा. कादंबऱ्या, नाटके इ. पुस्तके वाचण्याबाबत तो जरा नाखूष असतो. कारण त्या पुस्तकामध्ये ज्या व्यक्तिरेखा रंगविलेल्या असतात त्यांचे प्रभाव ग्रहण करण्याची आणि त्या व्यक्तिरेखांच्या भावना, त्यांचे विचार यानुसार, आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे जगायला सुरुवात करण्याची न टाळता येण्याजोगी एक प्रवृत्ती त्याच्या प्रकृतीमध्ये आहे.

तुम्हाला कल्पना नाहीये, पण तुम्हाला वाटते त्यापेक्षा अनेक जणं या पत्रलेखकासारखी असतात. अशा व्यक्ती जेव्हा एखादे पुस्तक वाचतात तेव्हा ते वाचताना, स्वत:मध्ये तशा प्रकारच्या (पुस्तकात वर्णन केल्यासारख्या) भावना, विचार, इच्छा, हेतू, वेगवेगळ्या योजना त्यांना जाणवू लागतात; इतकेच काय पण त्या पुस्तकामध्ये वर्णन करण्यात आलेले आदर्शसुद्धा अशा व्यक्ती मानू लागतात. ते जणूकाही त्या पुस्तकाच्या वाचनात वाहवत जातात. आणि त्याची त्यांना जाणीवसुद्धा नसते, कारण अशा व्यक्तींचा नव्याण्णव टक्के स्वभाव हा जणू मऊ लोण्याने बनलेला असतो. त्याच्यावर अंगठ्याने थोडा जरी दाब दिला तर, त्याच्यावर त्या अंगठ्याचा ठसा उमटतो.

आणि (त्यांच्या बाबतीत) प्रत्येक गोष्टच ही त्या ‘अंगठ्या’सारखी असते. म्हणजे एखादा अभिव्यक्त झालेला विचार असेल, एखादे वाचलेले वाक्य असेल, एखादी पाहिलेली वस्तू असेल किंवा दुसरी एखादी व्यक्ती काय करत आहे याचे निरीक्षण करणे असेल किंवा शेजाऱ्याच्या इच्छेचे निरीक्षण करणे असेल, अशा साऱ्या गोष्टीच जणू त्या ‘अंगठ्यासारख्या’ ठसा उमटविणाऱ्या असतात. आणि मग व्यक्ती जेव्हा त्यांच्याकडे पाहते तेव्हा त्या साऱ्या इच्छा तिथेच (व्यक्तीच्या आतमध्येच) असतात, एकमेकांमध्ये अगदी मिसळून गेलेल्या असतात, (श्रीमाताजी हाताची बोटे एकमेकांत गुंफून दाखवितात) त्यातील प्रत्येक इच्छाच दुसऱ्या इच्छेवर वरचढ होण्याचा प्रयत्न करत असते आणि परिणामतः अंतरंगामध्ये आणि बाहेर एक प्रकारचा सततचा झगडा चालू असतो. जणू विद्युतप्रवाह बाहेर पडावा तसा तो माणसांमधून बाहेर पडत असतो आणि आत जात असतो; आले लक्षात?

व्यक्तीला या सगळ्याची जाणीवदेखील नसते. त्या सर्वच इच्छा स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांचा परस्परांमध्ये अखंड झगडा चालू असतो आणि त्यामध्ये जी इच्छा सर्वात प्रबळ असते, ती यशस्वी होते. परंतु या इच्छा अनेकविध असल्याने आणि त्या सगळ्यांशी व्यक्तीला एकाकी झुंज द्यावी लागत असल्याने, हा झगडा सोपा नसतो. त्यामुळे समुद्राच्या लाटांवर एखादा लाकडाचा तुकडा जसा खालीवर हेलकावे खात असतो तशी व्यक्तीची अवस्था होते (व्यक्तीचे स्वतंत्र, पृथगात्म व्यक्तित्व नसते तेव्हा व्यक्तीची अशी अवस्था असते.)… (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 256-257)

साधना, योग आणि रूपांतरण – २५३

प्राणाचे रूपांतरण

प्राणशक्ती (Vitality) म्हणजे जीवन-शक्ती. जेथे कोठे जीवन असते, मग ते वनस्पतींमध्ये असू दे, प्राण्यांमध्ये असू दे किंवा माणसामध्ये असू दे, तेथे जीवन-शक्ती असते. प्राणाशिवाय जडभौतिकामध्ये जीवन असू शकत नाही, प्राणाशिवाय कोणतीही जिवंत कृती घडू शकत नाही. प्राण ही एक आवश्यक अशी शक्ती असते आणि जर प्राण हा साधनभूत म्हणून तेथे नसेल तर, शारीरिक अस्तित्वामध्ये कोणतीच गोष्ट निर्माण होऊ शकत नाही किंवा केली जाऊ शकत नाही. इतकेच काय पण साधनेसाठीसुद्धा प्राणशक्तीची आवश्यकता असते.

हा प्राण जितका उपयुक्त ठरू शकतो तेवढाच तो घातकदेखील ठरू शकतो. प्राण पुनर्जीवित न होता जर तसाच राहिलेला असेल, आणि तो जर इच्छावासना आणि अहंकाराचा गुलाम झालेला असेल तर, तो घातक ठरू शकतो. अगदी आपल्या सामान्य जीवनातसुद्धा मनाद्वारे आणि मानसिक इच्छाशक्तीद्वारे या प्राणाचे नियंत्रण करावे लागते, अन्यथा तो अव्यवस्था निर्माण करू शकतो किंवा अनर्थ घडवू शकतो. लोकं जेव्हा प्राणप्रधान मनुष्यासंबंधी बोलतात तेव्हा ती, मन किंवा आत्म्याद्वारे नियंत्रित न झालेल्या प्राणशक्तीचे वर्चस्व असलेल्या व्यक्तीविषयी बोलत असतात.

प्राण हा एक चांगले साधन बनू शकतो पण तो अगदी वाईट मालक असतो. या प्राणाला मारायची किंवा त्याला नष्ट करायची आवश्यकता नसते पण त्याला आंतरात्मिक आणि आध्यात्मिक नियमनाने शुद्ध करण्याची आणि त्याचे रूपांतर करण्याची आवश्यकता असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 106)

साधना, योग आणि रूपांतरण – २१७

चैत्य पुरुष (psychic being) अग्रस्थानी आणा आणि मन, प्राण व शरीरावर त्याची सत्ता चालवीत त्याला तिथे सुस्थिर करा. ज्यामुळे चैत्यपुरुष त्याच्या एकाग्र अभीप्सेची, विश्वासाची, श्रद्धेची आणि समर्पणाची शक्ती त्या तिघांपर्यंत पोहोचवू शकेल. आणि प्रकृतीमधील अनुचित असे जे काही आहे, जे ‘प्रकाश’ आणि ‘सत्य’ यांपासून दूर जाऊन, अहं व प्रमादाकडे वळले आहे त्याचा थेट आणि तात्काळ बोध तो चैत्यपुरुष मन, प्राण व शरीराला करून देऊ शकेल.

सर्व प्रकारचे अहंकार काढून टाका; तुमच्या चेतनेच्या प्रत्येक गतिविधीमधून ते अहंकार काढून टाका. वैश्विक चेतनेचा विकास करा. अहं-केंद्रित दृष्टिकोन विशालतेत, निर्व्यक्तिकतेत (impersonality), वैश्विक ‘ईश्वरा’च्या जाणिवेत, वैश्विक शक्तींच्या बोधात, वैश्विक आविष्काराच्या, (ईश्वरी) लीलेच्या आकलनात आणि साक्षात्कारात लीन होऊ द्या.

जीवात्मा हा ‘ईश्वरी’ अंश असतो, ‘जगन्माते’पासून त्याची उत्त्पत्ती झालेली असते आणि तो आविष्करणाचे साधन असतो. (तुमच्या) अहंने ज्याची जागा घेतली आहे तो जीवात्मा शोधून काढा. ‘ईश्वरा’चा अंश असल्याची आणि त्याचे एक साधन असल्याची जाणीव ही सर्व अभिमानांपासून, अहंच्या जाणिवेपासून किंवा त्याच्या हक्कापासून, श्रेष्ठतेच्या आग्रहीपणापासून, मागणी वा इच्छावासानांपासून मुक्त असली पाहिजे. कारण हे सर्व घटक जर तिथे असतील तर, ती खरी गोष्ट नाही असे समजावे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 333)