Posts

कृतज्ञता – २८

कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपण आपल्यामधील अहंकारावर मात केली पाहिजे आणि या रूपांतरणाच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत. ‘इतरजण तरी कुठे रूपांतरित झाले आहेत,’ या सबबीखाली मानवी अहंभाव स्वतःचा परित्याग करण्यास नकार देतो. परंतु ही एक प्रकारे त्याच्यावर असणारी दुरिच्छेची पकड असते, कारण इतर काय करतात किंवा काय करत नाहीत याकडे लक्ष न देता, स्वतःमध्ये रूपांतर घडविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते.

हे रूपांतर, अहंकाराचा निरास करणे हा स्थायी शांती आणि आनंद मिळविण्याचा एकमेव मार्ग आहे, हे जर लोकांना समजले तर मग आवश्यक प्रयत्न करण्यास ते संमती देतील. हा ठाम विश्वासच त्यांच्यामध्ये जागृत करण्याची आवश्यकता आहे.

प्रत्येकाला हे वारंवार सांगितले पाहिजे की, तुमच्या अहंकाराचा निरास करा म्हणजे शांती तुमच्यावर सत्ता प्रस्थापित करेल.

‘ईश्वरी’ साहाय्य प्रामाणिक अभीप्सेला नेहमीच प्रतिसाद देते.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 428)

साधनेची मुळाक्षरे – १९

कुटुंब, समाज, देश हे अधिक विस्तारित अहंकार आहेत – ते म्हणजे ‘ईश्वर’ नव्हेत. व्यक्ती जर ‘ईश्वरी आदेशा’बाबत जागरूक असेल आणि त्यानुसार कार्य करत असेल किंवा स्वतःमध्ये ‘ईश्वरी शक्ती’च कार्यरत आहे अशी जर व्यक्तीला जाणीव असेल तर, कुटुंब, समाज, देश यांच्यासाठी कार्य करत असूनही, मी ‘ईश्वरा’ साठी कार्य करत आहे, असे ती व्यक्ती म्हणू शकते; अन्यथा, देश वगैरे म्हणजे जणू देवच, ही मनाची कल्पना असते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 438)

साधनेची मुळाक्षरे – ०५

मन स्थिर करण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती मिळविण्यासाठी, प्रकृतीचे शुद्धिकरण होणे आणि तिची तयारी होणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी अनेक वर्षेसुद्धा लागतात. योग्य वृत्तीने केलेले कर्म हा यासाठी सर्वांत सोपा मार्ग आहे – म्हणजेच इच्छा किंवा अहंकारविरहित असलेले कर्म; इच्छा, मागणी किंवा अहंकाराची कोणतीही स्पंदने निर्माण झाली की त्याला लगेच नकार देत केलेले कर्म; ‘दिव्य माते’ प्रत अर्पण म्हणून केलेले कर्म; ‘दिव्य माते’चे स्मरण करत आणि तिच्या शक्तीने आविष्कृत व्हावे आणि कार्य हाती घ्यावे म्हणून केलेली तिची प्रार्थना, की ज्यामुळे केवळ आंतरिक शांततेतच तुम्हाला तिची (दिव्य मातेची) उपस्थिती आणि तिचे कार्यकारकत्व जाणवू शकेल असे नव्हे तर, कर्मामध्येदेखील ते तुम्हाला जाणवू शकेल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 226)

विचार शलाका – २०

मानवी प्रकृतीमध्ये असलेली – निष्क्रियता, जडत्व, आळस, अल्पसंतुष्टता, सर्व प्रयत्नांबद्दल असेलेले वैर – यांविरुद्ध लढा दिला पाहिजे असे श्रीअरविंद येथे (Thoughts and Glimpses मधील उताऱ्यात) सांगत आहेत. बरेचदा संघर्षाची भीती वाटते म्हणून शांतीचे भोक्ते बनलेल्या आणि ही शांती प्राप्त करून घेण्यापूर्वीच विश्रांतीची इच्छा बाळगणाऱ्या व्यक्ती आपण जीवनांत पाहतो. अशा व्यक्ती अल्पशा प्रगतीमुळेच संतुष्ट होतात आणि त्यानंतर अर्ध्या वाटेवरच विसावा घेता यावा म्हणून, आपल्या कल्पना आणि इच्छा यांद्वारे ते त्या अल्पस्वल्प प्रगतीलाच अद्भुत साक्षात्कार ठरवून मोकळे होतात.

सामान्य जीवनांत तर असा अनुभव अधिकच येतो. त्याची सुरुवात वास्तविक पाहता समाजाच्या सुखवस्तू, गर्भश्रीमंत वर्गामध्ये झालेली दिसते. या सुखवस्तू ध्येयाचा त्यांनी मानवतेसमोर जो आदर्श ठेवला त्यामुळेच आजच्या मानवाला मृतवत बनवले आहे आणि मनुष्य आज असा झाला आहे. “तारुण्य आहे तोपर्यंत तुम्ही काम करा. पैसा व मानसन्मान मिळवा, दूरदर्शीपणाने काही कमाई बाजूला ठेवा, बरेचसे भांडवल साठवा. एखाद्या हुद्द्याची जागा मिळवा म्हणजे साधारण चाळीशीच्या सुमारास तुम्हास स्वस्थपणे बसता येईल; साठवलेल्या संपत्तीचा उपभोग घेता येईल, पुढे मग पेन्शन आहेच.” म्हणजेच निढळ्या घामाने मिळविलेल्या विश्रांतिसुखाचा आस्वाद तुम्ही घ्या, असे म्हटले जाते. एकाच ठिकाणी बसून राहणे, वाटेतच थांबणे, पुढे पाऊल न टाकणे, झोपी जाणे, उतरणीस लागणे व अकालीच परलोकाच्या वाटेस लागणे व शेवटी या जगापासून स्वत:ची सुटका करून घेणे हेच जीवनाचे उद्दिष्ट सांगितले जाते. खाली बसायचे, पुढे पाऊलही टाकायचे नाही!

ज्या क्षणी प्रगती करणे तुम्ही थांबवता, त्याक्षणी तुमचा अध:पात सुरू होतो. ज्या क्षणी तुम्ही, आहे त्यात संतोष मानता व अधिक काही मिळविण्याची आकांक्षा सोडून देता, त्या क्षणापासून तुमचा मृत्यू सुरू होतो. जीवन ही गती आहे, धडपड आहे. जीवन म्हणजे सतत पुढे पुढे कूच करत राहणे, जणू गिर्यारोहण करणे. भावी अनुभव व साक्षात्कार यांकरता सतत उंच उंच चढत जाणे म्हणजे जीवन. विश्रांतीची गरज भासणे, विश्रांतीची इच्छा धरणे यापेक्षा दुसरी भयंकर गोष्ट नाही. कर्मामध्ये, प्रयत्नामध्ये, पुढे पुढे कूच करण्यातच तुम्हाला विश्रांती लाभली पाहिजे. ‘ईश्वरी कृपे’वर संपूर्ण भार टाकल्यामुळे जिवाला जी विश्रांती व स्वस्थता लाभते, वासना-विरहिततेमुळे व अहंकारावरील विजयामुळे जी विश्रांती मिळते तीच खरी विश्रांती होय.

सतत विशाल होण्यात, विश्वाला व्यापणारी चेतना प्राप्त करून घेण्यात खरे स्वास्थ्य, खरी विश्रांती असते. अखिल जगाएवढे व्यापक, विस्तृत व्हा म्हणजे नेहमीच विश्रांत स्थितीत तुम्ही विराजमान व्हाल. कर्मबाहुल्यांत, युद्धाच्या धुमश्चक्रीत, प्रयत्नसातत्यामध्येच तुम्हाला अनंत व शाश्वतकाळची विश्रांती आढळून होईल.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 65-66)

विचार शलाका – १०

स्वत:च्या अहंकारामध्ये जो जगतो, स्वत:च्या अहंकारासाठी जो जगतो, स्वत:चा अहंकार सुखावेल या आशेने जो जगतो तो मूर्ख असतो. तुम्ही जोपर्यंत अहंकाराच्या वर उठत नाही, जेथे अहंकाराची आवश्यकताच उरत नाही, अशा चेतनेच्या एका विशिष्ट अवस्थेप्रत जोपर्यंत तुम्ही पोहोचत नाही; तोपर्यंत ध्येय प्राप्त होईल अशी आशाच तुम्ही बाळगू शकत नाही.

एके काळी व्यक्तिगत चेतनेच्या घडणीसाठी अहंकार अनिवार्य आहे असे वाटत होते पण अहंकारासोबतच सर्व अडथळे, दुःखभोग, अडचणी यांचाही जन्म झाला की ज्या गोष्टी आज आपल्याला विरोधी शक्ती आणि अदिव्य शक्ती वाटतात. पण आंतरिक शुद्धी व अहंकार-मुक्ती यांसाठी अशा विरोधी शक्ती देखील आवश्यक होत्या. अहंकार हा एकाच वेळी त्या विरोधी शक्तींच्या कृतीचा परिणाम आणि त्यांच्या दीर्घकाळ टिकून राहण्याचे कारणदेखील असतो. जेव्हा अहंकार नाहीसा होईल, त्याच्याबरोबरच विरोधी शक्तीदेखील नाहीशा होतील. कारण त्यांना या जगात अस्तित्वात राहण्याचे काही कारणच उरणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 218)

विचार शलाका – ०९

अगदी क्षुल्लक गोष्टीनेदेखील असमाधानी होणाऱ्या तुमच्या अहंकाराला, तुमच्या अस्तित्वाची दारे उद्दाम आणि उद्धट अविश्वासाच्या अशुभ वृत्तीकडे उघडण्याची सवयच लागते की ज्यामुळे तो, जे जे पवित्र व सुंदर असते त्यावर, विशेषत: तुमच्या जिवाच्या अभीप्सेवर आणि ‘परमेश्वरी कृपे’कडून मिळणाऱ्या मदतीवर, चिखलफेक करण्यात काळाचा अपव्यय करतो.

हे असेच चालू दिले तर त्याचा शेवट हा महाभयंकर अशा आपत्तीत व विनाशात होतो. हे संपविण्यासाठी अतिशय कठोर अशी पावले उचलली गेली पाहिजेत, आणि त्यासाठी तुमच्या जिवाचे सहकार्य आवश्यक असते. जिवाने सजग झालेच पाहिजे आणि अहंकाराची अशुभ वृत्तीकडे उघडणारी दारे निश्चयपूर्वक बंद करून, अहंकाराशी लढा देण्यासाठी त्याने सहाय्य केले पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 23)

विचार शलाका – ०७

अहंकार स्वत:चा अधिकार सोडण्यास नकार देतो त्यामुळेच जीवनात नेहमी सर्व तऱ्हेची कटुता येते.

*

सारे जे काही घडत असते, ते आपल्याला केवळ एकमेव धडा शिकविण्यासाठीच घडत असते; तो म्हणजे, जर आपण अहंकाराचा त्याग केला नाही तर शांती ना आपल्याला मिळेल, ना इतरांना! आणि तेच, जीवन जर अहंकारविरहित असेल तर तो एक अद्भुत चमत्कार ठरतो.

*

अहंकाराच्या लीलेविना कोणतेही संघर्ष झाले नसते. आणि नाटके करण्याची प्राणाची प्रवृत्ती नसती तर जीवनात नाट्यमय घटनाही घडल्या नसत्या.

*

तुमच्या अडचणींच्या प्रमाणावरूनच तुम्हाला किती अहंकार आहे ते तुमचे तुम्हाला कळते.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 257-258)

लोक काय करतात, काय विचार करतात किंवा काय म्हणतात यामुळे व्यथित होणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे आणि व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्व, फक्त ईश्वराच्याच प्रभावाखाली आले नसल्याचा आणि ते पूर्णतः ईश्वराभिमुख झाले नसल्याचा तो पुरावा आहे. मग अशा वेळी, प्रेम, सहिष्णुता, समंजसपणा, धीर या सगळ्या गोष्टींनी युक्त असे ईश्वरी वातावरण स्वतःबरोबर बाळगण्याऐवजी, दुसऱ्याच्या अहंकाराला प्रत्युत्तर म्हणून कठोरपणा आणि दुखावलेल्या भावनांनिशी व्यक्तीचा अहंकारच स्वत: बाहेर उफाळून येतो आणि त्यामुळे विसंवाद अधिकच वाढीस लागतो. ईश्वराचे विभिन्न व्यक्तींबाबत विविध पद्धतीने कार्य चालू असते, हे अहंकाराला कधीच उमगत नाही आणि व्यक्तीने स्वतःच्या अहंकारी दृष्टिकोनातून गोष्टींचे मूल्यमापन करणे, ही एक अशी मोठी चूक असते की ज्यामुळे, गोंधळच वाढीला लागतो. आपण आवेगाने आणि असहिष्णुतेने जे जे काही करतो ते ईश्वरी असू शकत नाही कारण ‘ईश्वर’ शांती आणि सुसंवादामध्येच कार्य करतो.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 279)

प्रत्येकामध्ये असणाऱ्या क्षुद्र अहंकाराला, दुसऱ्यामधील (खरे किंवा खोटे) दोष शोधणे आणि ते दोष खरे आहेत की खोटे आहेत याची पर्वा न करता, त्याविषयी बोलत राहणे आवडते. वास्तविक, अहंकाराला त्यांच्याबाबतीत निर्णय देण्याचा अधिकारच नसतो कारण अहंकारापाशी योग्य दृष्टिकोन किंवा योग्य वृत्ती नसते. स्थिर, निःस्वार्थी, नि:पक्षपाती असणारा आणि सर्वांविषयी करुणा व प्रेम बाळगणारा ‘आत्मा’च प्रत्येक व्यक्तीमधील सामर्थ्य व दुर्बलता योग्य प्रकारे पाहू शकतो, जोखू शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 351-352)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १९

(धम्मपदातील कालच्या वचनाचे विवेचन करताना, त्याची अकरणात्मक बाजू (Negative) आधी श्रीमाताजींनी सांगितली. ती आपण काल विचारात घेतली. आता त्या सकारात्मक बाजू (Positive) सांगत आहेत. वाचकांच्या सोयीसाठी धम्मपदातील ते वचन पुन्हा देत आहोत.)

धम्मपद : नैतिक नियमांचे पालन करून, किंवा बहुविध प्रकारच्या ज्ञानाने, किंवा ध्यानधारणेच्या सरावाने किंवा विजनवासातील जीवन जगण्याने किंवा “जे या संसारी जगात जगतात त्यांना अनभिज्ञ असलेला असा मुक्तीचा आनंद मला लाभला आहे” असा विचार करणाऱ्या व्यक्तीला भिक्षु म्हटले जात नाही. भिक्षुंनो, सावध असा, जोपर्यंत तुम्ही सर्व इच्छावासनांचा निरास करीत नाही तोपर्यंत सावध असा.

श्रीमाताजी : बुद्धाने असे म्हटले आहे वा त्याने म्हटल्याचे सांगितले गेले आहे की, जेव्हा व्यक्ती सर्व वासनाविकारांपासून मुक्त होते तेव्हा ती अनिवार्यपणे अनंत अशा आनंदामध्ये प्रवेश करते. पण हा आनंद कदाचित काहीसा कोरडा, रुक्ष असू शकतो आणि मला तरी तो काही सर्वात जवळचा मार्ग वाटत नाही.

या देहाने ही समस्या सोडवायची असेल तर धैर्य आणि निश्चय बाळगून झोकून द्या; वासनांच्या मागे धावण्याचा लांबचा, दुष्कर, कष्टदायक आणि निराशाजनक मार्ग सोडून, जर व्यक्तीने स्वत:ला साधेपणाने, पूर्णपणाने, विनाअट, नफ्यातोट्याची कोणतीही समीकरणे न मांडता, त्या परमोच्च सत्याप्रत, परमोच्च संकल्पशक्तिप्रत, परमोच्च अस्तित्वाप्रत समर्पित केले; स्वत:चे संपूर्ण अस्तित्व, अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी जर ‘त्या’च्या हातात संपूर्णतया सोपविले, तर तो अहंकारापासून सुटका करून घेण्याचा सर्वात वेगवान आणि क्रांतिकारी मार्ग आहे. लोकांना वाटेल की, तो आचरणात आणणे खूप अवघड आहे, परंतु तेथे एक प्रकारची ऊब आहे, उत्कटता आहे, उत्साह आहे, प्रकाश आहे, सौंदर्य आहे, उत्कट आणि सर्जशनशील जीवन आहे.

हे खरे आहे की, वासनांशिवाय अहंकार दीर्घकाळ अस्तित्वात राहू शकत नाही. व्यक्तीच्या जाणिवा इतक्या घट्ट झालेल्या असतात की, जेव्हा अहंकार धुळीला मिळतो तेव्हा व्यक्तीच्या अस्तित्वाचाच काही भाग जणूकाही धुळीला मिळतो आणि आपण निर्वाणामध्ये प्रविष्ट होण्यास सज्ज झालो आहोत, असे त्या व्यक्तीला वाटते.

त्या सर्वोच्च अस्तित्वाच्या वैभवामध्ये अहंकाराचा विलय असा आपण येथे खऱ्या निर्वाणाचा अर्थ घेत आहोत. संपूर्ण, समग्र, परिपूर्ण, नि:शेष आणि देवघेवीविना असे जे आत्मदान, त्यालाच मी सकरणात्मक मार्ग (Positive Side) म्हणते.

स्वत:चा कोणताही विचार न करणे, स्वत:साठी न जगणे, स्वत:शी काहीही निगडित न करणे, आणि सर्वाधिक सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत असे जे आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्ये निमग्न राहणे ह्यामध्ये इतका अगाध आनंद आहे की, त्याची तुलना दुसऱ्या कशाबरोबरच होऊ शकत नाही.

ही एकच गोष्ट अर्थपूर्ण आहे, प्रयत्न करून पाहण्याजोगी आहे. इतर सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ कालापव्यय असतो.

वळणावळणाच्या रस्त्याने, धीम्या गतीने, कष्टपूर्वक, पायरीपायरीने वर्षानुवर्षे पर्वत चढत जाणे आणि अदृश्य पंख पसरवून, थेट शिखराकडे झेपावणे यामध्ये जो फरक आहे, तो येथे आहे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 267-269)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)