भारत – एक दर्शन ०९

(भारताची आध्यात्मिकता आणि भारताची बहुप्रसवा सर्जनशीलता या दोन गोष्टीमध्येच ‘भारताचा आत्मा’ किंवा ‘भारतीयत्व’ आहे असे नाही. तर अजून तिसरी एक गोष्ट आहे. त्यासंबंधी श्रीअरविंद येथे सांगत आहेत.)

‘प्रखर बुद्धिमत्ता’ ही प्राचीन भारतीय स्वभावाची ताकद होती. ती एकाच वेळी कठोर आणि समृद्ध, मजबूत आणि सूक्ष्म, बलशाली आणि नाजूक होती तसेच ती तत्त्वतः विशाल आणि तपशीलाने विलक्षण होती. सुव्यवस्था आणि योजनापूर्वक मांडणी ही भारतीय स्वभावाची मुख्य प्रवृत्ती होती, परंतु ती सुव्यवस्था आंतरिक धर्माच्या आणि वस्तुंच्या सत्याच्या शोधावर आधारित होती आणि विवेकपूर्ण आचरणाच्या शक्यतेवर कायमच तिची दृष्टी होती.

भारत हा प्रामुख्याने ‘धर्म’ आणि ‘शास्त्रा’ची भूमी राहिलेला आहे. त्याने प्रत्येक मानवी किंवा वैश्विक क्रियाव्यापारांच्या आंतरिक सत्याचा, त्याच्या नियमाचा म्हणजे धर्माचा शोध घेतला आहे. शोध लागल्यानंतर, त्याला व्यापक रूप देण्यासाठी, तसेच योजनापूर्वक मांडणीचा तपशीलवार नियम वास्तवामध्ये उपयोगात आणण्यासाठी आणि तो जीवनाचाच नियम व्हावा यासाठी भारताने पुष्कळ परिश्रम घेतले.

आत्म्याच्या शोधामुळे भारताचा पहिला कालखंड प्रकाशमय होता, दुसऱ्या कालखंडात त्याने धर्माचा शोध पूर्ण केला; तिसरा कालखंड हा प्रारंभिक, साध्यासरळ, सूत्रबद्ध शास्त्राच्या तपशीलवार स्पष्टीकरणाचा होता. परंतु यातली कोणतीच गोष्ट अन्य दोन गोष्टींना वगळणारी नव्हती, तर हे तीनही घटक कायमच अस्तित्वात होते.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 08-09]

भारत – एक दर्शन ०८

भारताला मानवाच्या पलीकडे असलेल्या अगणित देवदेवता दिसल्या, या देवदेवतांच्या अतीत असणारा ‘ईश्वर’ दिसला आणि त्या ‘ईश्वरा’च्या अतीत मानवाची स्वतःची अनिर्वचनीय अशी अनंतता दिसली. भारताला असे दिसून आले की, आपल्या जीवनाच्या पलीकडे जीवनाच्या अनेक श्रेणी आहेत, तसेच आपल्या सद्यकालीन मनाच्या अतीत असलेल्या मनाच्या अनेक श्रेणी त्याला दिसल्या आणि या साऱ्याच्या अतीत भारताला चैतन्याचे वैभव दिसले. मग त्या अंतर्ज्ञानाच्या शांत धडाडीने, ज्या धडाडीला भीती माहीत नाही, आणि आध्यात्मिक असो, बौद्धिक असो, नैतिक असो किंवा प्राणिक धैर्य असो, त्या धैर्याच्या कृतीपासून जी धडाडी कच खात नाही किंवा जिच्यामध्ये न्यूनगंडाची कोणतीही भावना नसते, अशा धडाडीने भारताने उद्घोषित केले की, मानवाने जर त्याच्या इच्छाशक्तीला आणि ज्ञानाला वळण लावले तर उपरोक्त गोष्टींपैकी कोणतीच गोष्ट अप्राप्य नाही. मानव मनाच्या या श्रेणींवर विजय प्राप्त करून घेऊ शकतो, तो स्वतः आत्मा बनू शकतो, तो स्वतः देव बनू शकतो, तो स्वतः ‘ईश्वरा’शी एकात्म पावू शकतो, तो स्वतःच अनिर्वचनीय ‘ब्रह्म’ बनू शकतो.

आणि मग भारतीय मानसिकतेचे वैशिष्ट्य असलेल्या तर्कशुद्ध व्यावहारिकतेने आणि वैज्ञानिक दृष्टीने आणि सुरचित पद्धतीने, भारताने त्वरेने त्याचा मार्ग शोधायला सुरुवात केली. त्यामुळे, युगानुयुगांपासून चालत आलेल्या या अंतर्दृष्टीमुळे आणि अभ्यासामुळे, भारताची आध्यात्मिकता, त्याची शक्तिशाली आंतरात्मिक प्रवृत्ती, अनंताशी दोन हात करून, त्या अनंताला प्राप्त करून घेण्याची उत्कट आस, त्याची अतूट अशी धार्मिक भावना, त्याचा आदर्शवाद, त्याचा योगमार्ग, कला आणि तत्त्वज्ञानाकडे असलेला सातत्यपूर्ण कल या गोष्टी भारताच्या रोमारोमांत ठासून भरल्या आहेत.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 07]

भारत – एक दर्शन ०७

ज्याप्रमाणे कोणताही आधार नसताना, स्वप्नवत जादुई ढगांमधून गिरीशिखरं उदयाला येऊ शकत नाहीत त्याप्रमाणेच ‘आध्यात्मिकता’ ही पृथ्वीवर काहीही नसताना, एखाद्या पोकळीमध्ये बहरू शकत नाही. आपण जेव्हा भारताच्या गतकाळाकडे पाहतो तेव्हा त्याच्या आध्यात्मिकतेच्या खालोखाल आपल्या नजरेत भरते ती त्याची विस्मयकारक प्राणशक्ती, त्याची जीवनाची अक्षय शक्ती, जीवनाचा आनंद, आणि अकल्पनीय अशी बहुप्रसवा सर्जनशीलता!

किमान तीन हजार वर्षांपासून – खरंतर त्याही आधीपासून – प्रजासत्ताक आणि राज्ये व साम्राज्ये, तत्त्वज्ञाने व ब्रह्मांडशास्त्रं आणि शास्त्रं व पंथ आणि कला व काव्य आणि सर्व प्रकारची प्राचीन स्मारकं, राजमहाल व मंदिरे आणि सार्वजनिक कार्ये, समाज आणि संस्था आणि धर्माज्ञा, कायदे आणि विधिविधाने, प्रथा-परंपरा, भौतिक शास्त्रे, आंतरात्मिक शास्त्रे, योगपद्धती, राजकारण आणि प्रशासनव्यवस्था, लौकिक कला, आध्यात्मिक कला, व्यापारउदीम, उद्योग, कलाकौशल्ये – ही यादी न संपणारी आहे आणि या प्रत्येक मुद्यामध्येसुद्धा विविध उपक्रमांची रेलचेल आहे. या साऱ्याची भारत मुबलकतेने आणि सातत्याने, उदारतेने, अक्षय बहुआयामी निर्मिती करत आला आहे.

भारत निर्माण करत राहतो, करतच राहतो, तो कधीच संतुष्ट होत नाही, तो कधीच थकत नाही, या निर्मितीला जणू अंतच नाही. त्याला विश्रांती घेण्यासाठी थोडीशी उसंत, सुस्त पडून राहण्यासाठी थोडा वेळ किंवा लोळत पडण्यासाठी माळरान यांची क्वचितच गरज भासते असे दिसते.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 07-08]

भारत – एक दर्शन ०६

(युरोपियन लोकांची देशाबद्दलची संकल्पना कशी संकुचित आहे, हे सांगून झाल्यावर, भारतीय मनाची देशाकडे पाहण्याची दृष्टी किती सखोल आहे, हे श्रीअरविंद येथे सांगत आहेत.)

देश, जमीन हा राष्ट्राचा केवळ बाह्यवर्ती देह असतो, त्याचा ‘अन्नमय कोश’ असतो, किंवा त्याला स्थूल शारीरिक देह असे म्हणता येईल.

माणसांच्या समूहांमुळे, समाजामुळे, लाखो लोकांमुळे राष्ट्राचा हा देह व्यापून जातो आणि ते सारे केवळ त्यांच्या अस्तित्वांद्वारेच या देहामध्ये प्राणाची फुंकर घालतात, तो हा ‘प्राणमय कोश’, म्हणजे राष्ट्राचा प्राणदेह असतो. हे दोन्ही देह स्थूल आहेत, मातेचे ते भौतिक आविष्करण असते.

स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह असतो. विचार, साहित्य, तत्त्वज्ञान, मानसिक आणि भावनिक क्रियाकलाप, आशा, सुख, आकांक्षा, कृतार्थता, सभ्यता आणि संस्कृती या साऱ्यासाऱ्यांतून राष्ट्राचे सूक्ष्म शरीर आकाराला येते. शारीर-दृष्टीला दिसणाऱ्या बाह्य अस्तित्वाप्रमाणेच सूक्ष्म शरीर देखील मातेच्या जीवनाचाच एक भाग असतो.

राष्ट्राचा सूक्ष्म देह हा राष्ट्राच्या ‘कारण शरीरा’मध्ये जे खोलवर दडलेले अस्तित्व असते त्यातून उदयाला येतो, युगानुयुगे घेतलेल्या अनुभवांमधून जी विशिष्ट अशी मानसिकता तयार झालेली असते, ती त्या राष्ट्राला इतरांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण बनवते.

मातेचे हे तीन देह आहेत. परंतु त्या तिन्हीच्याही पलीकडे तिच्या जीवनाचा एक ‘उगमस्रोत’ असतो, जो अमर्त्य, अचल असा असतो; प्रत्येक राष्ट्र हे त्याचे केवळ आविष्करण असते, त्या वैश्विक ‘नारायणा’चे, ‘अनेकां’मध्ये वसणाऱ्या ‘एका’चे – ज्याची आपण सर्वजण बालके आहोत – त्या ‘एका’चे ते आविष्करण असते.

– श्रीअरविंद [CWSA 06-07 : 1115-1116]

भारत – एक दर्शन ०४

‘आध्यात्मिकता’ ही भारतीय मनाची गुरूकिल्ली आहे; भारतीय मनामध्ये अनंततेची जाणीव उपजतच आहे.

जीवनाच्या बाह्यवर्ती गोष्टींची जी शक्ती असते केवळ त्यामध्ये जीवन परिपूर्णत्वाने जगता येत नाही, जीवन योग्य प्रकारे समजावून घ्यायचे तर ते केवळ त्या प्रकाशामध्ये समजावून घेता येत नाही, याची जाण भारताला प्रारंभापासूनच होती. आणि ही अंतर्दृष्टी भारताने अगदी तर्कबुद्धीच्या युगामध्ये आणि वाढत्या अज्ञानयुगामध्येसुद्धा कधीही गमावलेली नाही. भारताला जडभौतिक नियम आणि शक्तींच्या माहात्म्याची जाण होती; भौतिक शास्त्रांच्या थोरवीवर त्याची बारकाईने नजर होती; सामान्य जीवनाच्या कलेचे व्यवस्थापन कसे करायचे हे भारताला ज्ञात होते.

परंतु भारताला हेही समजले की, जोपर्यंत अति-भौतिकाशी (supra-physical) योग्य प्रकारे संबंध प्रस्थापित होत नाही तोपर्यंत भौतिकाला आपली सार्थकता प्राप्त होत नाही; ब्रह्मांडाच्या जटिलतेचे स्पष्टीकरण मानवाच्या उथळ दृष्टीने पाहून किंवा त्याच्या सद्यकालीन परिभाषेमध्ये करता येत नाही, हे भारताच्या लक्षात आले. त्याच्या हे लक्षात आले की, मानवाला सहसा ज्याची जाणीव नसते अशा शक्ती मानवाच्या अंतरंगामध्येच आहेत, त्याच्या पाठीशी आहेत; मानवाला स्वतःच्या अगदी अल्प भागाचीच जाणीव आहे हे त्याला ज्ञात होते. अदृष्याने दृश्याला नेहमीच परिवेष्टित (surrounds) केलेले असते; ऐंद्रिय जाणिवेच्या सभोवताली अतिंद्रिय असते, एवढेच काय पण सांताच्या सभोवती अनंत नेहमीच व्यापून असते, याची जाण भारताला होती.

मनुष्यामध्ये स्वतःच्या पलीकडे विस्तारीत होण्याची शक्ती आहे, तो स्वतः आत्ता जसा आहे त्याहूनही अधिक पूर्ण आणि अधिक सखोल बनण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे हेही भारताला ज्ञात होते – हे सत्य युरोपला आत्ता नुकते कुठे उमगू लागले आहे आणि त्यांच्या सामान्य बुद्धिमतेला ते आत्तासुद्धा खूपच महान असे वाटत आहे.

 

– श्रीअरविंद [CWSA 20 : 06-07]

भारत – एक दर्शन ०३

जीवनविषयक भारतीय संकल्पना ही युरोपीयन संकल्पनांपेक्षा अधिक सखोल अशा केंद्रातून निघते आणि ती युरोपीयन संकल्पनांपेक्षा तुलनेने अधिक आंतरिक मार्गांवरून वाटचाल करत, एका अगदी वेगळ्या उद्दिष्टाप्रत जाऊन पोहोचते. भारतीय विचारदृष्टीचे एक वैशिष्ट्य हे आहे की, ती रूपांच्या माध्यमातून वेध घेते, इतकेच काय पण शक्तीच्या माध्यमातूनदेखील वेध घेते आणि सर्वत्र, प्रत्येक गोष्टीमध्ये ‘आत्म्या’चा शोध घेते.

भारतीयांच्या जीवनविषयक इच्छेचे हे वैशिष्ट्य आहे की, तिला जर आत्म्याचे सत्य गवसले नाही आणि त्या सत्यानुसार ती जगली नाही तर तिला कृतार्थ झाल्यासारखे वाटत नाही, स्वतःला परिपूर्णतेचा स्पर्श झाल्यासारखे तिला वाटत नाही, अधल्यामधल्या कोणत्याही स्थितीमध्ये कायमचे समाधान मानून राहणे तिला न्याय्य वाटत नाही. जगाविषयीची, ‘प्रकृती’विषयीची आणि अस्तित्वाविषयीची भारतीय संकल्पना भौतिक नसून, ती मानसिक आणि आध्यात्मिक आहे. जड भौतिकद्रव्य आणि अचेतन शक्ती याहून ‘चैतन्य’, आत्मा, चेतना या गोष्टी केवळ महत्तर आहेत असे नाही तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात आहेत आणि त्यातूनच जड भौतिकद्रव्य आणि अचेतन शक्ती या निम्नतर गोष्टींचा उदय होतो. सर्व प्रकारचे सामर्थ्य म्हणजे गुप्त आत्म्याची शक्ती असते किंवा त्याचे माध्यम असते; जगाला धारण करणारी ‘शक्ती’ ही सचेत ‘संकल्पशक्ती’ आहे आणि ‘प्रकृती’ ही तिच्या कार्यकारी शक्तीची यंत्रणा आहे. जडभौतिक द्रव्य हे त्यामध्ये लपलेल्या चेतनेचे शरीर किंवा क्षेत्र आहे, भौतिक विश्व हे ‘चैतन्या’चे रूप आणि चलनवलन आहे. मनुष्य म्हणजे जडद्रव्यापासून जन्माला आलेला प्राण आणि मन नाही आणि तो भौतिक प्रकृतीच्या कायमच आधीन राहणारा आहे, असेही नाही तर, प्राण आणि शरीर यांचा उपयोग करून घेणारा असा तो ‘आत्मा’ आहे. भारतीय मनुष्य अस्तित्वाच्या या संकल्पनेवर ज्ञानयुक्त श्रद्धा ठेवतो, त्या संकल्पनेनुसार जीवन जगण्याचा तो प्रयत्न करतो. त्याच्या उच्चकोटीच्या परिश्रमांचे शास्त्र हेच आहे आणि साधनाही हीच असते. अंतत: प्राण आणि शरीराला जखडलेल्या मनाचे कवच फोडून बाहेर यायचे, आणि एका महत्तर आध्यात्मिक चेतनेमध्ये प्रवेश करायचा ही त्याची आस असते; भारतीय संस्कृतीचा अगदी गाभाभूत अर्थ हाच आहे. ज्या भारतीय आध्यात्मिकतेविषयी बरीच चर्चा केली जाते ती आध्यात्मिकता याच संकल्पनेच्या आधारे घडलेली आहे.

(टीप – श्रीअरविंद येथे आध्यात्मिकतेविषयीची प्राचीन संकल्पना स्पष्ट करत आहेत, हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. परंतु त्यांची आध्यात्मिकतेविषयीची संकल्पना याहून अधिक व्यापक आहे, हे आपण जाणतोच.)

– श्रीअरविंद [CWSA 20 : 154-155]

भारत – एक दर्शन ०२

‘भारतीय’ संस्कृती आणि ‘युरोपीय’ संस्कृती यांच्यामधील भेदाचे मूळ हे आहे की, भारतीय सभ्यतेचे (civilisation) ध्येय ‘आध्यात्मिक’ आहे. या ध्येयाने भारतीय संस्कृतीच्या समृद्ध, विविध विलासी लय-रूपांना विशिष्ट वळण लावले आहे, त्यामुळे या संस्कृतीला तिचे अनन्यसाधारण स्वरूप आलेले आहे.

‘आध्यात्मिक अभीप्सा’ ही या संस्कृतीची शासक शक्ती होती, ही अभीप्सा हाच तिच्या विचारांचा गाभा होता आणि तीच तिची वर्चस्व गाजविणारी अभिलाषा होती. भारतीय संस्कृतीने आध्यात्मिकता हे जीवनाचे उच्चतम ध्येय ठरवले, एवढेच नव्हे, तर मानववंशाच्या भूतकालीन परिस्थितीमध्ये तिला शक्य झाले तितके सर्व जीवनच तिने आध्यात्मिकतेकडे वळविले.

परंतु धर्म हा मानवी मनातील आध्यात्मिक प्रेरणेचे पहिले आणि अपूर्ण असले तरी, स्वाभाविक रूप असल्याने व भारतीय संस्कृतीत अध्यात्मकल्पना प्रधान असून ती जीवनाची पकड घेत असल्याने, भारतीयांना आपला विचार व आचार धर्माच्या साच्यात घालण्याची आवश्यकता वाटली, तसेच जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये नेटाने, सातत्याने धार्मिक भावना भरण्याची आवश्यकता वाटली, त्यामुळे भारतीय संस्कृती ही व्यापक धार्मिक-तात्त्विक असण्याची अपेक्षा निर्माण झाली.

धर्ममते, पंथ यांची सत्ता ज्या कनिष्ठ पातळीवरील साधनामार्गांवर चालते त्या पातळ्यांपेक्षा उच्चतम आध्यात्मिकतेची पातळी खूपच वरची असते आणि ती एका मुक्त, व्यापक अवकाशात विहरत असते. आणि त्यामुळे साहजिकच ती धर्माने घालून दिलेल्या मर्यादा सहजासहजी सहन करत नाही. आणि जेव्हा कधी ती त्या मर्यादा मान्य करते तेव्हाही, उच्चतम आध्यात्मिक पातळी त्या मर्यादांच्या अतीत जाते. ती ज्या अनुभूतीमध्ये जीवन जगत असते ती अनुभूती औपचारिक धार्मिक मनाला दुर्बोध असते, अनाकलनीय असते. परंतु सर्वोच्च आंतरिक उंचीप्रत मनुष्य तत्काळ पोहोचू शकत नाही. आणि ही उंची त्याने एकदम गाठावी अशी अपेक्षा त्याच्याकडून बाळगली, तर तो तेथे कधीच पोहोचू शकणार नाही.

त्याला उन्नत होण्यासाठी प्रथम खालच्या आधारांची, पायऱ्यांची आवश्यकता असते. धर्ममत, पूजा, मूर्ती, चिन्ह, आकार, प्रतीक, अर्धवट स्वाभाविक मिश्र प्रेरणेची परवानगी व परिपूर्ती, या गोष्टींची, स्वतःच्या आंतरिक आत्म्याचे मंदिर बांधत असताना, आधार म्हणून, पायऱ्या म्हणून, उभे राहायचे स्थान म्हणून माणसाला आवश्यकता असते. हे मंदिर बांधून पूर्ण झाल्यानंतरच आधार वगैरे काढून घेता घेता येऊ शकतात, बांधलेले पाड (scaffolding) काढून टाकता येऊ शकतात. ‘हिंदुधर्म’ हे ज्या धार्मिक संस्कृतीचे नाव आहे त्या संस्कृतीने हा हेतू साध्य केला, एवढेच नव्हे तर इतर प्रचलित पंथांकडे जी जाण अभावानेच आढळते ती हेतुची स्पष्ट जाणही हिंदुधर्माला होती, असे दिसते. (आत्ममंदिराची उभारणी केली जात असताना आधार देणे हा धर्माचा हेतू आहे याची हिंदुधर्माला जाण आहे.)

हिंदुधर्माने स्वत:ला कोणतेही नाव दिले नाही कारण त्याने स्वत:वर कोणत्याही पंथाच्या मर्यादा घालून घेतल्या नाहीत; त्याने कोणत्याही एकाच गोष्टीला वैश्विक समर्थन दिलेले नाही; त्याने कोणत्याच मतप्रणालीला बिनचूक म्हणून घोषित केलेले नाही; त्याने मुक्तीचा कोणताही एकच एक मार्ग वा प्रवेशद्वार सांगितलेले नाही; हिंदुधर्म म्हणजे कोणता एकच एक असा पंथ वा संप्रदाय नसून, मानवी आत्म्याने ‘ईश्वराभिमुख’ राहत, सातत्याने केलेल्या विस्तारित प्रयत्नांची ती परंपरा आहे. आध्यात्मिक आत्मरचना आणि आत्मशोधासाठी, अनेकांगी आणि अनेक पातळ्यांवरील व्यवस्था यामध्ये आहे; या साऱ्यामुळेच ज्या नावाने हा धर्म ओळखला जातो, ते शाश्वत धर्म, सनातन धर्म, हेच नाव स्वत:ला धारण करण्याचा त्याला पुरेपूर अधिकार आहे. या धर्माच्या अर्थाची आणि त्याच्या आत्म्याची न्याय्य आणि योग्य समज आपल्याला असेल तर आणि तरच भारतीय संस्कृतीचा खरा अर्थ आणि तिचा आत्मा यांचे आपल्याला आकलन होऊ शकेल.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 178-179]

भारत – एक दर्शन ०१

 

“जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी” असे म्हटले जाते. तेव्हा स्वर्गापेक्षाही जिची महानता अधिक आहे अशी आपली मातृभूमी म्हणजे ‘भारत’. भारत या शब्दामध्ये भा आणि रत ही दोन पदं आहेत. भारत या शब्दाची संस्कृतातील व्युत्त्पत्ती ‘भा नाम अभा, अभा नाम प्रभा, प्रभा नाम ज्ञानम्‌, तत्र रतः’ अशी आहे; म्हणजेच ज्ञानामध्ये रममाण झालेल्या लोकांचा देश म्हणजे ‘भारत’, अशी भारताची व्याख्या आहे.

भारताला एक महान परंपरा लाभलेली आहे, ज्ञानवारसा लाभलेला आहे. एकेकाळी सर्व जगाचे लक्ष ज्या भारताकडे वळलेले होते, त्या भारताच्या वैभवसंपन्नतेचे काय वर्णन करावे? भारत एकेकाळी समृद्धीच्या, ज्ञानशोधांच्या, कर्मकौशल्याच्या, कलानिपुणतेच्या गिरीशिखरावर विराजमान होता. सरस्वती आणि लक्ष्मी दोघीजणी येथे गुण्यागोविंदाने नांदत होत्या. भारतामध्ये आजही टिकून असलेली प्राचीन मंदिरे, वास्तुकलेचे नमुने याची साक्ष देतात.

परंतु परधार्जिणेपणाचा, अवमानाचा, यातनांचा एक अचेतन कालखंडही या भारताने सोसला. सारी समृद्धता, ज्ञानवैभव, कलाकौशल्य नामशेष होत गेले. भारतभूमीला दास्यत्व पत्करावे लागले. भारत आणि भारतीयांच्या प्रत्येक गोष्टीकडेच नकारार्थी दृष्टीने पाहणाऱ्या काही विद्वज्जनांच्या विखारी प्रचारामुळे भारतीय लोकांच्या मनामध्ये खोलवर न्यूनगंड निर्माण झाला. तो वाढतच राहिला आणि भारत खचत खचत गेला.

पुढे अनेकानेकांच्या प्रयत्नांमुळे, बलिदानामुळे, चातुर्यामुळे, व्यूहरचनेमुळे, मुत्सद्दीपणामुळे भारताला यथावकाश स्वातंत्र्य मिळाले. पण दुर्दैवाची बाब अशी की, ते होते विभाजित स्वातंत्र्य. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांमध्ये भारताने काय कमावले आणि काय गमावले याचा लेखाजोखा आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. कारण त्यातील काही गोष्टींचे आपण साक्षी आहोत.

आज जग पुन्हा एकदा भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे. एकेकाळी भारताच्या केवळ भौतिक समृद्धतेला भुललेले जग, आता काहीसे अधिक सुजाण झाले आहे. सोनेनाणे, पैसाअडका, जडजवाहीर, किमती मसाले, धनधान्य इत्यादी भौतिक संपत्तीपेक्षा, अधिक मौल्यवान संपत्ती भारताकडे आहे, याची जाणीव आता जगाला झाली आहे. अर्थसंपदेच्या बाबतीत भारताचा जगामध्ये कितवा का क्रमांक असेना, पण योगमार्ग, दर्शनं, पराविद्या, अध्यात्म, तत्त्वज्ञान, यांची भांडारं आणि मुख्यतः आंतरिक शांतीचे झरे भारतात जागोजागी आहेत, त्याचा शोध घ्यायला हवा, याची जाण आता जगाला झाली आहे. आणि म्हणूनच भारताकडे जिज्ञासेने येऊ पाहणाऱ्या परदेशी व्यक्तींची संख्या आज वाढत आहे.

अशा वेळी, एक भारतीय नागरिक म्हणून आपण स्वतःतरी या बाबतीत कितपत सुजाण आहोत, हे स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची आवश्यकता आहे. आपल्याला भारताच्या समृद्ध वारशाची खरंच ओळख आहे का? की, केवळ इतिहासाच्या गौरवशाली वारशाचे ढोल बडविण्यामध्येच आपण कृतकृत्यता मानतो? आपल्याला भारताच्या समृद्ध वारशाची खरंच ओळख आहे का? की आपण केवळ पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाने, भारताला नावे ठेवत राहतो? एकीकडे नुसतेच स्तुतिपाठक आणि दुसरीकडे निंदानालस्ती करणारे आपल्याच अस्तनीतले निखारे, हे दोघेही भारताचे सारखेच नुकसान करत नसतात का? तेव्हा आता गरज आहे, या दोन्ही टोकांच्या विचारसरणीचा त्याग करून, भारताची खरी महानता कशामध्ये दडलेली आहे, याचा शोध घेण्याची!

भारत पारतंत्र्यामध्ये असताना, देशबांधवाच्या मनात देशप्रेमाचे स्फुल्लिंग पेटविण्यासाठी ‘कर्मयोगिन्’ साप्ताहिकाच्या माध्यमातून श्रीअरविंद यांनी भारतीय संस्कृतीचे, तिच्या समृद्ध वारशाचे जे संस्मरण केले होते, त्याचाच मागोवा आपण उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘भारत – एक दर्शन’, या मालिकेच्या माध्यमातून घेणार आहोत. भारत हा नेहमीच श्रीअरविंदांच्या चिंतनाचा विषय राहिलेला होता. त्यांनी भारताविषयी विपुल लेखन केले आहे, त्यातील निवडक भागाचा समावेश या मालिकेमध्ये आपण करणार आहोत. सद्यकालीन भारत पुन्हा एकदा त्याच गिरीशिखरावर विराजमान होण्यासाठी एक नागरिक म्हणून आपल्याला नेमके काय करता येणे शक्य आहे, याची दिशा तुम्हाआम्हाला, आपल्या सर्वांना लाभावी, या भूमिकेतून भारताचे ‘दर्शन’ घेण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न!

संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक.

(इसवी सन : १९१०)
मला राजकारणात काही करता येण्यासारखे नव्हते म्हणून मी राजकारण सोडले असे म्हणता येण्यासारखे नाही, अशी ही कल्पना देखील माझ्यापासून कोसो दूर आहे. मी त्यापासून दूर आलो कारण कोणत्याही गोष्टीचा माझ्या योगसाधनेमध्ये मला हस्तक्षेप नको होता आणि याबाबतीत मला अगदी निश्चित असा ‘आदेश’ प्राप्त झाला होता.

मी राजकारणाशी असलेले संबंध पूर्णत: तोडून टाकले कारण तसे करण्यापूर्वी मला ह्याची आतूनच जाणीव झाली होती की, मी जे कार्य तिथे हाती घेतले होते ते पुढे चालविले जाणारच, मी ज्या दिशेने त्या कार्याचा विचार केला होता, त्याच दिशेने इतरांकडून केले जाणार आहे, आणि मी ज्या कार्याला सुरुवात केली होती त्या चळवळीचा माझ्या प्रत्यक्ष वैयक्तिक कृतीविना किंवा माझ्या उपस्थितीविनाही अंतिम विजय होणारच, हे मला ज्ञात होते. माझ्या राजकारण निवृत्तीमागे निरर्थकतेची कोणतीही भावना किंवा नैराश्याची यत्किंचितही प्रेरणा नव्हती.

इतर गोष्टींबाबत बोलायचे झाले तर, जागतिक घडामोडींबाबतच्या कोणत्या महत्त्वाच्या घटनेमध्ये माझा संकल्प शेवटी अपयशी झाला असे मला तरी माहीत नाही आणि हो, हे शक्य आहे की, जागतिक शक्तींना तो संकल्प पूर्ण करण्यासाठी खूप वेळ लागला असेल.

– श्रीअरविंद
(CWSA 35 : 26)