तारुण्य हे, व्यक्ती किती वयाची आहे यावर अवलंबून नसते, तर ते प्रगती करण्याच्या आणि विकसित होण्याच्या तिच्या क्षमतेवर अवलंबून असते. प्रगती करणे म्हणजे व्यक्तीमध्ये असलेल्या क्षमता तिने सातत्याने अधिकाधिक परिपूर्ण करत नेणे आणि विकसित होत जाणे म्हणजे स्वतःच्या क्षमता व स्वतःचे सामर्थ्य सतत वाढवत नेणे.

व्यक्तीचे वय वाढले आहे म्हणजे ती आता वृद्ध झाली आहे असे समजणे चुकीची आहे. व्यक्ती जर अक्षम झाली असेल किंवा ती प्रगती करण्यास आणि विकसित होण्यास नकार देत असेल तरच ती वृद्ध होते. वीस वर्षांची म्हातारी माणसं आणि सत्तर वर्षांची काही तरुण माणसं मला माहीत आहेत. जीवनात आता आपण स्थिरस्थावर व्हावे आणि तरुणवयात केलेल्या कष्टांची फळे चाखावीत असे व्यक्तीला ज्या क्षणी वाटू लागते; करण्यासारखे जे काही होते ते आता करून झाले आहे आणि जे काही साध्य करायचे होते ते आता साध्य झाले आहे, असे व्यक्तीला ज्या क्षणी वाटू लागते; थोडक्यात म्हणजे, व्यक्ती परिपूर्णत्वाच्या मार्गावर वाटचाल करण्याचे किंवा प्रगती करण्याचे ज्या क्षणी थांबविते त्या क्षणीच तिची परागती आणि तिचे वार्धक्य निश्चित झालेले असते.

व्यक्तीला जर खरी पद्धत गवसली असेल आणि तिच्या शरीराला योग्य रितीने प्रशिक्षित करण्यात आले असेल तर, शरीराची प्रगती करत राहण्यास किंवा शरीराच्या सामर्थ्यामध्ये वाढ करत नेण्यास कोणतीच सीमा नसते, हे व्यक्ती स्वतःच्या शरीराला शिकवू शकते. आपण इथे (श्रीअरविंद आश्रमात) ज्या गोष्टींवर प्रयोग करू इच्छितो त्यांपैकी हा एक प्रयोग आहे. आपल्याला वार्धक्याबद्दलच्या प्रचलित असणाऱ्या सर्व प्रकारच्या सामूहिक समजुती मोडीत काढायच्या आहेत आणि मानवी क्षमता कल्पनातीत प्रमाणात विस्तारता येतात, याचा आदर्श जगापुढे ठेवायचा आहे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 257)

 

श्रीअरविंद हे भूतकाळाशी किंवा इतिहासाशीदेखील संबंधित नाहीत. श्रीअरविंद म्हणजे प्रत्यक्षात येणारा भविष्यकाळ आहेत. तुम्हाला जर मागे रेंगाळत राहिलेले पांथस्थ होऊन जगायचे नसेल तर, वेगवान प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या शाश्वत तारुण्याचा तुम्ही आश्रय घेतला पाहिजे.
• श्रीमाताजी (CWM 12 : 211-212)

 

भावी काळ हा तरुणांचा आहे. सद्यस्थितीत, एक नूतन व युवा जग आकाराला येत आहे आणि त्याची निर्मिती तरुणांनीच केली पाहिजे. हे जग जसे नूतन आहे तसेच ते सत्य, धैर्य, न्याय, उदात्त आकांक्षा आणि निखालस परिपूर्तीचे सुद्धा आहे. आपण असे जग निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

भ्याड लोकांना किंवा जे स्वतःच्या स्वार्थासाठी धडपडत आहेत अशा लोकांना किंवा नुसत्या वाचाळवीरांना, म्हणजे जे आरंभशूर असतात आणि त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या अनुयायांना जे तसेच गर्तेत सोडून देतात अशा लोकांना, भावी घडामोडीच्या काळामध्ये कोणताही थारा नाही.

ज्या पायावर राष्ट्राचे भवितव्य उभारले जाऊ शकते तो एकमेव पाया म्हणजे धाडसी, मोकळे, प्रांजळ, शुद्ध अंतःकरणाचे, धैर्यशील आणि आकांक्षा बाळगणारे तरुण.

– श्रीअरविंद (CWSA 08 : 168)

 

प्रामाणिकपणा, विनम्रता, चिकाटी आणि प्रगतीसाठी असणारी दुर्दम्य तृष्णा या गोष्टी आनंदी व सफल जीवनासाठी आवश्यक असतात. पण या सगळ्या गोष्टींपेक्षा आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते आणि ती म्हणजे, प्रगतीच्या अगणित शक्यता असतात, याची व्यक्तीला खात्री असली पाहिजे. प्रगती म्हणजे तारुण्य. व्यक्ती अगदी शंभर वर्षांची असतानादेखील तरुण असू शकते.

– श्रीमाताजी (CWM 16 : 431)

 

तुम्ही तरुण मुलं म्हणजे देशाची आशा आहात आणि या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःला घडविले पाहिजे.

*

एका गोष्टीबाबत तुम्ही निश्चितपणे खात्री बाळगू शकता आणि ती गोष्ट म्हणजे, तुमचे भवितव्य तुमच्या हाती आहे. तुम्ही जसे असावे असे तुम्हाला वाटते तसे तुम्ही व्हाल. तुमचा आदर्श, तुमची आकांक्षा जेवढी अधिक उच्च असेल तेवढे त्याचे प्रत्यक्षीकरण अधिक उच्च असेल. मात्र त्यासाठी तुम्ही दृढ निश्चय केला पाहिजे आणि तुमच्या जीवनाचे खरे ध्येय तुम्ही कधीही विसरता कामा नये.

*

तरुण असणे म्हणजे भविष्यामध्ये जीवन जगणे.
आपण जे बनायला हवे तसे बनण्यासाठी, आपण सद्यस्थितीत जे आहोत त्याचा त्याग करण्याची नेहमी तयारी ठेवणे म्हणजे तरुण असणे.
अमुक एखाद्या गोष्टीमध्ये कदापिही सुधारणा होणे शक्य नाही, असा विचार मनाला कधीही न शिवणे म्हणजे तरुण असणे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 122)

 

शिक्षिका : शाळेला लागलेली सुट्टी व्यतीत करण्याचा उत्तम मार्ग कोणता असे विद्यार्थी मला विचारत होते. त्यांना काय सांगावे?

श्रीमाताजी : मुलांना असे सांगावे की, स्वतःच्या आवडीचे एखादे काम करण्यासाठी किंवा काहीतरी नवीन शिकण्यासाठी किंवा त्यांच्या प्रकृतीमध्ये किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये एखादी कमतरता, एखादी उणीव असेल तर त्यावर मात करण्यासाठी सुट्टी म्हणजे एक चांगली संधी असते. त्यांनी अगदी मोकळेपणाने एखादा उपक्रम हाती घ्यायला हरकत नाही, त्याच्या माध्यमातून त्यांना स्वतःमधील काही क्षमतांचा शोध लागण्याचीसुद्धा शक्यता असते; त्यादृष्टीने ही एक चांगली संधी असते.

– श्रीमाताजी (CWM 12 : 356)

 

(मुलांचे नैतिक शिक्षण आणि त्यासाठी त्यांना आवश्यक असणारी संधी याविषयीचे विचार आपण कालच्या भागात लक्षात घेतले.)

मुलामध्ये जर काही दुर्गण असतील, त्याला वाईट सवयी लागलेल्या असतील, त्याच्यावर कुसंस्कार झालेले असतील – मग ते मनाचे असोत किंवा शरीराचे असोत – तरीही तो कोणीतरी गुन्हेगार आहे अशा पद्धतीने त्याला कठोरपणाने वागणूक देता कामा नये; तर संयम, नकार आणि सद्गुणांची स्थापना करणे या राजयोगाच्या पद्धतीनुसार दुर्गुणांपासून सुटका करून घेण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्या दुर्गणांचा विचार त्याने पाप किंवा अपराध म्हणून करता कामा नये तर, बऱ्या होऊ शकणाऱ्या आजाराची ती लक्षणं आहेत आणि दृढ संकल्पाद्वारे व सातत्यपूर्ण प्रयत्नाने त्यामध्ये बदल होऊ शकतो, असा विचार करण्यास त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. मनामध्ये जेव्हाजेव्हा मिथ्यत्वाचा (falsehood) उद्भव होतो तेव्हा त्यास नकार देण्यासाठी आणि सत्याद्वारे त्याची जागा घेण्यासाठी प्रत्येक मुलाला प्रोत्साहित केले पाहिजे; भीतीची जागा धैर्याने, स्वार्थीपणाची जागा त्यागाने आणि वैरभावाची जागा प्रेमाने घेण्यासाठी त्याला प्रोत्साहित केले पाहिजे. ज्या गुणांची अजून पुरेशी घडण झालेली नाही त्यांचा दोष म्हणून अव्हेर केला जाता कामा नये, याबाबत बरीच काळजी घेतली गेली पाहिजे.

बऱ्याचदा काही मुलांच्या अंगी एक प्रकारचा व्रात्यपणा आणि बेपर्वार्ई आढळून येते. पण तो व्रात्यपणा नसतो, तर त्यांच्या अंगी असलेले सामर्थ्य, महानता आणि उदात्तता ओसंडून वाहत असते; आणि दिसताना तो व्रात्यपणा असल्यासारखे दिसते. त्यांच्यातील या वृत्तीचे खच्चीकरण करता कामा नये, तर तिचे शुद्धीकरण केले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 391-392)

 

(विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण कसे द्यावे हे श्रीअरविंद यांनी सांगितले होते, ते आपण कालच्या भागात विचारात घेतले. त्या संदर्भात ते पुढे लिहीत आहेत…)

मुलांच्या अंतरंगात उठणाऱ्या नैतिक भावावेगांना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची संधी – भलेही मग ती संधी त्यांच्या मर्यादित क्षेत्रातील का असेना – जोपर्यंत त्यांना दिली जात नाही तोपर्यंत नैतिक शिक्षणाचा प्रभाव त्यांच्यावर पूर्ण क्षमतेने पडू शकत नाही. ब्राह्मणाकडे असणारी ज्ञानतृष्णा, आत्म्याप्रत असणारी भक्ती, शुचिर्भूतता, त्यागबुद्धी; क्षत्रियाकडे असणारे धैर्य, साहस, सन्मान, उदात्तता, दाक्षिण्य, देशभक्ती; वैश्याकडे असणारी परोपकारवृत्ती, कौशल्य, उद्योग, दानशूरतेचे उपक्रम आणि सढळपणा; आणि शूद्राने स्वत:ला विसरून अगदी नि:स्वार्थपणे व प्रेमळपणाने केलेली सेवा या सर्व गोष्टी म्हणजे आर्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत.

आम्ही आपल्या संपूर्ण राष्ट्रामध्ये आपल्या युवकांमध्ये अशाच प्रकारची नैतिक वृत्ती असावी अशी इच्छा बाळगत आहोत. पण आर्य परंपरेनुसार स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी जोपर्यंत आपण या युवकांना देत नाही तोपर्यंत आपल्याला ती तशी वृत्ती त्यांच्यामध्ये कशी काय आढळून येईल? मोठे झाल्यानंतर त्यांची जीवने ज्या द्रव्याने घडली जावीत असे आपण अपेक्षित करत आहोत तशी जीवने बालपणी व कुमारवयामध्ये त्यांना परिचित झालेल्या मूल्यांच्या आधारे घडविण्याची संधी आपण त्यांना दिली पाहिजे. म्हणूनच, प्रत्येक मुलाला, त्याच्या प्रकृतीमध्ये जे सर्वोत्तम आहे त्याचे विकसन करण्यासाठी बौद्धिक प्रोत्साहन दिले गेले पाहिजे आणि त्याला प्रत्यक्ष व्यवहारात देखील तशी संधी दिली गेली पाहिजे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 01 : 391)

विद्यार्थ्यांना सदाचरणासाठी प्रेरित केले पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यांच्यावर कोणतीही गोष्ट लादता कामा नये किंवा त्यांच्यावर जबरदस्तीसुद्धा करता कामा नये; हा नैतिक शिक्षणाचा पहिला नियम आहे.

स्वतःच्या नैतिक आचरणाद्वारे विद्यार्थ्यांसमोर उदाहरण घालून देणे, रोजच्या रोज त्यांच्याशी संवाद साधणे आणि पुस्तकांच्या आधारे त्यांच्यासमोर काही आदर्श ठेवणे ही नैतिक शिक्षण देण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे.

या पुस्तकांमध्ये लहान मुलांसाठी भूतकाळातील भव्योदात्त उदाहरणे असली पाहिजेत आणि ती उदाहरणे नैतिक धडे म्हणून असता कामा नयेत तर, त्यामध्ये विद्यार्थ्यांना गोडी वाटली पाहिजे. आणि कुमार वयातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पुस्तकांमध्ये महान व्यक्तींचे महान विचार असले पाहिजेत; त्यांच्या उच्चतम भावनांना प्रज्वलित करतील असे, सर्वोच्च आदर्शांप्रत आणि आकांक्षाप्रत त्यांना प्रेरित करतील असे साहित्यामधील उतारे त्यामध्ये असले पाहिजेत. तसेच उच्चतर आदर्श, उदात्त भावभावना आणि महान विचार जिथे मूर्तरूपात आलेले आढळतील; अशी उदात्त उदाहरणे ज्यामधून दिसून येतील अशा प्रकारच्या इतिहासातील नोंदी आणि चरित्रं यांचा समावेश त्यामध्ये असला पाहिजे. हा एक उत्तम प्रकारचा सत्संग असतो आणि त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. अर्थात त्याद्वारे तात्पर्य सांगणे, उपदेश देणे टाळले पाहिजे. शिक्षक विद्यार्थ्यांसमोर ज्या महान गोष्टींचे उदाहरण ठेवत असतील त्याच गोष्टींद्वारे खुद्द त्या शिक्षकाच्या वैयक्तिक जीवनाची जडणघडण झाली असेल तर त्या गोष्टींचा मुलांवर होणारा परिणाम शतगुणित होतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 01 : 390-391)

 

शिक्षक : माताजी, शिक्षकांनी आणि प्रशिक्षकांनीच विद्यार्थ्यांना शिस्त लावली पाहिजे ना?

श्रीमाताजी : विद्यार्थ्यांना अनियमित, उद्धट किंवा निष्काळजी होण्यापासून रोखणे हे अर्थातच अगदी आवश्यक आहे. दुष्टपणाच्या किंवा हानीकारक खोड्या चालवून घेता कामा नयेत.

परंतु एक सर्वसाधारण व निरपवाद नियम असा असला पाहिजे की, विद्यार्थ्यांकडून ज्या गुणांची आपण अपेक्षा करतो त्या गुणांचे मूर्तिमंत उदाहरण शिक्षकांनी आणि त्यातही विशेषतः शारीरिक शिक्षणाच्या प्रशिक्षकांनी झाले पाहिजे. शिस्त, नियमितपणा, चांगले वळण, धैर्य, चिकाटी, प्रयत्नांची पराकाष्ठा या गोष्टी उपदेशाद्वारे शिकविण्यापेक्षा उदाहरणाद्वारे अधिक चांगल्या प्रकारे शिकविता येतात. जी गोष्ट करण्यास तुम्ही विद्यार्थ्यांना मनाई करता, ती गोष्ट तर तुम्ही त्यांच्यासमोर कधीच करता कामा नये, हा अगदी महत्त्वाचा नियम आहे.

आणखी असे की, कशाप्रकारे सांगितले असता त्या विद्यार्थ्याला सुयोग्य वळण लागेल यावरचा उपाय विद्यार्थ्यागणिक वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्याला चांगले वळण लावण्याच्या दृष्टीने शिक्षकाने त्याच्याबरोबर चातुर्याने व विवेकाने वागले पाहिजे.

आणि म्हणूनच शिक्षक किंवा प्रशिक्षक होणे ही एक सर्वोत्तम साधना असते. अर्थात ती साधना कशी आचरणात आणायची ते त्या शिक्षकाला माहीत असले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 361-362)