भारताचे पुनरुत्थान – १४

भारताचे पुनरुत्थान – १४

उत्तरार्ध

इच्छाशक्ती ही सर्वशक्तिमान असते परंतु ती ‘ईश्वरी इच्छा’ असली पाहिजे; म्हणजे ती निःस्वार्थ, स्थिरचित्त आणि परिणामांबाबत निश्चिंत असली पाहिजे. येशू ख्रिस्ताने म्हटले होते की, “तुमच्याकडे मोहरीच्या दाण्याएवढी जरी श्रद्धा असेल तरी तुम्ही एखाद्या पर्वतासमोर उभे राहून त्याला आवाहन करू शकता आणि तुम्ही तसे केल्यावर तो खरोखरच तुमच्यापाशी येईल.” येथे ‘श्रद्धा’ या शब्दाचा अर्थ वास्तविक ‘ईश्वरी इच्छे’सहित परिपूर्ण श्रद्धा असा आहे. श्रद्धा तर्कवितर्क करत बसत नाही, तिला जाण असते. कारण दृष्टीवर तिची सत्ता असल्याने, ईश्वरी इच्छा काय आहे हे त्या दृष्टीला स्पष्ट दिसते आणि तिला हेसुद्धा ज्ञात असते की, जे घडणार आहे ते ईश्वराच्या इच्छेनुसारच घडणार आहे. श्रद्धा अंध नसते; उलट आध्यात्मिक दृष्टी उपयोगात आणल्यामुळे श्रद्धा सर्वज्ञ बनू शकते.

इच्छाशक्ती ही सर्वव्यापीसुद्धा असते. ती ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात येते त्या सर्वांमध्ये स्वतःहून झेपावून प्रवेश करू शकते आणि स्वतःची शक्ती, तिचा विचार, तिचा सळसळता उत्साह तात्पुरत्या किंवा स्थायी स्वरूपात ती त्या सर्वांना प्रदान करू शकते. एकांतवासात राहणाऱ्या एखाद्या माणसाचा विचार हा, निःस्वार्थ व निःशंक संकल्पशक्तीचा अवलंब केल्यामुळे, राष्ट्राचा विचार बनू शकतो. एखाद्या एकट्या वीराची इच्छा ही लाखो भित्र्या लोकांच्या हृदयांमध्येदेखील धैर्य निर्माण करू शकते. ही साधना आपण सिद्धीस नेलीच पाहिजे. आपल्या मुक्तीची ही पूर्वअट आहे.

आपण आजवर अपरिपूर्ण श्रद्धेसहित सदोष व अपूर्ण इच्छा आणि अपरिपूर्ण निरपेक्षता यांचा अवलंब करत आलो आहोत. वास्तविक, आपल्यासमोर असलेले कार्य हे पर्वत हलविण्यापेक्षा काही कमी कठीण आहे असे नाही. ते कार्य करू शकेल अशी शक्ती अस्तित्वात आहे. परंतु ती शक्ती आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या एका गुप्त दालनामध्ये दडून बसलेली आहे. आणि त्या दालनाच्या किल्ल्या ईश्वराच्या हातात आहेत. चला, आपण त्याचा शोध घेऊ या आणि त्याच्याकडे त्या किल्ल्या मागू या.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 536-537)

श्रीअरविंद