योग आणि मानवी नातेसंबंध – ०६
आत्मीयता, जिव्हाळा, स्नेह, प्रेम अशा भावना टिकून राहत नाहीत, असे नाही. इतर साऱ्या गोष्टी परस्परांना विभक्त करत असल्या तरीसुद्धा केवळ सवयीमुळे तामसिक उपजत प्रेम टिकून राहते, उदा. विशिष्ट असे कौटुंबिक प्रेम. अनेक अडथळे आले, परस्पर परस्परांना अनुरूप नसतील तरीदेखील, किंवा अगदी टोकाचा बेबनाव असला तरीदेखील रजोगुणात्मक प्रेम टिकून राहते कारण एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची प्राणिक गरज असते आणि त्यामुळे ते एकमेकांना धरून राहतात किंवा मग दोघांचीही ती गरज असते आणि मग ते पुन्हापुन्हा भेटण्यासाठी विलग होत राहतात आणि विलग होण्यासाठी पुन्हापुन्हा भेटत राहतात किंवा मग भांडणाकडून सलोखा किंवा सलोख्यातून पुन्हा भांडण असे सतत सुरू राहते. सात्त्विक प्रेमातील जिव्हाळा, उत्कटता किंवा तजेला नाहीसा झाला तरी ते प्रेम बरेचदा आदर्शाप्रत असणाऱ्या कर्तव्यबुद्धीमुळे किंवा अन्य एखाद्या आधारावर टिकून राहते. परंतु मानवी स्नेहामध्ये आंतरात्मिक तत्त्वाचा रंग मिसळण्याइतपत किंवा त्या स्नेहावर प्रभाव गाजविण्याइतपत जेव्हा आंतरात्मिक तत्त्व प्रबळ होते तेव्हाच, त्या स्नेहामध्ये खरी विश्वसनीयता असते. आणि या कारणानेच, मैत्री ही मानवी स्नेहसंबंधातील सर्वाधिक काळ टिकणारी गोष्ट असते किंवा ती तशी बरेचदा असू शकते; कारण त्यामध्ये प्राणाची (vital) ढवळाढवळ कमी प्रमाणात असते आणि जरी त्यामध्ये अहंकाराची ज्वाला असली तरी, ती शांत असते आणि ती नेहमीच ऊब व प्रकाश देणारी अशी शुद्ध अग्नीची ज्वाला असते. तथापि अशी अगदी विश्वासार्ह मैत्री बहुधा अगदी थोड्या व्यक्तींबरोबरच असते; निःस्वार्थी, प्रेमळ, निष्ठावान मित्रांची फौज असणे ही गोष्ट इतकी दुर्मिळ असते की, अशी मैत्री भ्रम असल्याचे बेलाशकपणे समजण्यात येते.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 296)
- प्रामाणिकपणा आणि चिकाटी - April 30, 2026
- ईश्वराच्या निवासाचे दरवाजे - April 29, 2026
- अप्रामाणिकपणाचा अडथळा - April 28, 2026







