दुर्गुणांचे शुद्धीकरण
(मुलांचे नैतिक शिक्षण आणि त्यासाठी त्यांना आवश्यक असणारी संधी याविषयीचे विचार आपण कालच्या भागात लक्षात घेतले.)
मुलामध्ये जर काही दुर्गण असतील, त्याला वाईट सवयी लागलेल्या असतील, त्याच्यावर कुसंस्कार झालेले असतील – मग ते मनाचे असोत किंवा शरीराचे असोत – तरीही तो कोणीतरी गुन्हेगार आहे अशा पद्धतीने त्याला कठोरपणाने वागणूक देता कामा नये; तर संयम, नकार आणि सद्गुणांची स्थापना करणे या राजयोगाच्या पद्धतीनुसार दुर्गुणांपासून सुटका करून घेण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्या दुर्गणांचा विचार त्याने पाप किंवा अपराध म्हणून करता कामा नये तर, बऱ्या होऊ शकणाऱ्या आजाराची ती लक्षणं आहेत आणि दृढ संकल्पाद्वारे व सातत्यपूर्ण प्रयत्नाने त्यामध्ये बदल होऊ शकतो, असा विचार करण्यास त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. मनामध्ये जेव्हाजेव्हा मिथ्यत्वाचा (falsehood) उद्भव होतो तेव्हा त्यास नकार देण्यासाठी आणि सत्याद्वारे त्याची जागा घेण्यासाठी प्रत्येक मुलाला प्रोत्साहित केले पाहिजे; भीतीची जागा धैर्याने, स्वार्थीपणाची जागा त्यागाने आणि वैरभावाची जागा प्रेमाने घेण्यासाठी त्याला प्रोत्साहित केले पाहिजे. ज्या गुणांची अजून पुरेशी घडण झालेली नाही त्यांचा दोष म्हणून अव्हेर केला जाता कामा नये, याबाबत बरीच काळजी घेतली गेली पाहिजे.
बऱ्याचदा काही मुलांच्या अंगी एक प्रकारचा व्रात्यपणा आणि बेपर्वार्ई आढळून येते. पण तो व्रात्यपणा नसतो, तर त्यांच्या अंगी असलेले सामर्थ्य, महानता आणि उदात्तता ओसंडून वाहत असते; आणि दिसताना तो व्रात्यपणा असल्यासारखे दिसते. त्यांच्यातील या वृत्तीचे खच्चीकरण करता कामा नये, तर तिचे शुद्धीकरण केले पाहिजे.
– श्रीअरविंद (CWSA 01 : 391-392)
- आपल्याला काय संपादन करायचे आहे? - July 26, 2026
- आपले कार्य काय? - July 25, 2026
- विचार-कणिका - July 24, 2026





