ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: जीवनऋतू

ब्रह्मचर्याश्रम

(श्रीअरविंद येथे भारतीय परंपरेतील वर्णाश्रम व्यवस्थेविषयी तपशील आणि त्या पाठीमागे असलेला विचार समजावून सांगत आहेत. व्यक्तीने या समाजव्यवस्थेमध्ये राहून, समाजऋण फेडून स्वतःचा विकास करून घेत, अध्यात्मप्रांतांत मार्गक्रमण करायचे असते; प्राचीन काळी असलेल्या या व्यवस्थेविषयी ते लिहितात…)

भारतीय प्रणालीने व्यक्तीला एक चौकट आखून दिली आहे. या प्रणालीने व्यक्तीला तिच्या जीवनासाठी एक श्रेणीबद्ध रचना आखून दिली आहे आणि व्यक्तीला उन्नती करण्यासाठी एक प्रकारच्या शिडीसारखा या प्रणालीचा उपयोग होऊ शकतो. अशा प्रकारची विलक्षण सोय हे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चार आश्रमांचे उद्दिष्ट होते. जीवनाचे हे विभाजन स्वाभाविक अशा चार कालावधींमध्ये करण्यात आले होते आणि जीवनविषयक ही जी सांस्कृतिक कल्पना होती ती प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने यातील प्रत्येक टप्प्याची आखणी करण्यात आली होती. विद्यार्थिदशेचा एक कालावधी असे, गृहस्थजीवनाचा एक कालावधी असे, एकांतवासात राहण्याचा किंवा अरण्यवास स्वीकारून राहण्याचा एक कालावधी असे आणि नंतर सामाजिक जीवनापासून मुक्त होऊन राहण्याचा, परिव्राजकावस्थेचा असा एक कालावधी असे.

ब्रह्मचर्याश्रम

मनुष्याने जीवनामध्ये जे जाणून घेणे आवश्यक आहे, जे करणे आणि जे बनणे आवश्यक आहे त्या गोष्टी करण्यासाठी आवश्यक अशी पायाभरणी विद्यार्थिजीवनात केली जात असे. आवश्यक असणाऱ्या कला, शास्त्रं, ज्ञानशाखा यांचे तपशिलवार ज्ञान त्याला दिले जात असे. आणि त्याच वेळी मनुष्याच्या नैतिक प्रकृतीला वळण लावण्यावर अधिक भर दिला जात असे. आध्यात्मिक ज्ञानाची जी वैदिक सूत्रं होती त्यामध्ये व्यक्तीने पारंगत असावे, हा प्रारंभिक काळामध्ये एक अनिवार्य घटक असे.

प्राचीन काळामध्ये हे सर्व शिक्षण शहरी जीवनाच्या धकाधकीपासून दूर आणि त्या शिक्षणाला अनुकूल असणाऱ्या वातावरणामध्ये दिले जात असे. जी व्यक्ती या जीवनचक्रातून यशस्वीरित्या पार झाली आहे अशी व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत असे. ज्या व्यक्तीला काही लक्षणीय आध्यात्मिक ज्ञानाचा साक्षात्कार झाला आहे, अशी व्यक्तीच बरेचदा शिक्षकपदी कार्यरत असे. परंतु कालांतराने शिक्षण हे अधिकाधिक बौद्धिक व ऐहिक स्वरूपाचे होत गेले. ते शहरांमध्ये व विद्यापीठांमध्ये दिले जाऊ लागले. हळूहळू चारित्र्याच्या आंतरिक तयारीपेक्षा व ज्ञानापेक्षा, बुद्धीच्या प्रशिक्षणावर आणि शिक्षणावर भर देण्यात येऊ लागला. प्राचीन काळी आर्यांची अर्थ, काम, धर्म व मोक्ष या जीवनाच्या चारही महान उद्दिष्टांबाबत तयारी झालेली असे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 20 : 174-175)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

उच्चतर सत्यासाठी कनिष्ठ सत्याचा परित्याग

  जो मनुष्य सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे…

2 hours ago

मानवी अस्तित्वाचा संपूर्ण अर्थ

  मनुष्यप्राणी, सामान्यतः जसे जीवन जगतो त्या त्याच्या जीवनाची घडण अर्ध-स्थिर, अर्ध-तरल अशा अतिशय अपरिपूर्णतेने…

1 day ago

‘परमानंद‌’ हे विश्वाचे रहस्य

  मनुष्य‌ आणि ईश्वर‌ यांच्या भेटीचा अर्थ नेहमीच, मनुष्यामध्ये ईश्वरत्वा‌चा प्रवेश आणि अंतर्भाव तसेच मनुष्याचे…

2 days ago

जग – ईश्वराचे आविष्करण‌

  जग ही जिवाची आत्मवंचना (self-delusion) आहे किंवा जग ही सैतानाची निर्मिती आहे असे आम्ही…

3 days ago

आविष्करण‌ आणि अभिव्यक्ती

  (अंतिमत: नेहमी सत्याचाच विजय होतो असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती विपरीत दिसते,…

4 days ago

विश्वाचे गंतव्यस्थान?

  साधक : सृष्टीला निश्चित असे ध्येय आहे का? असे एखादे अंतिम गंतव्यस्थान आहे का…

5 days ago