तुम्ही जर अगदी तळमळीने ईश्वराला म्हणाल, “मला फक्त तूच हवा आहेस”, तर ईश्वर अशी परिस्थिती घडवून आणेल की तुम्हाला प्रामाणिक होणे भागच पडेल. तुमच्या अस्तित्वातील कोणतातरी एखादा भाग जेव्हा म्हणतो की, ‘हे ईश्वरा, मला फक्त तूच हवा आहेस.’ अशा वेळी तुमच्या त्या अभीप्सेमुळे काय होते? तर, तो तुम्हाला त्याचे अस्तित्व कळू देणार नाही, तो तुम्हाला दिसणारसुद्धा नाही, पण तो येईल. तुम्हाला त्याची पुसटशी चाहूलदेखील लागणार नाही पण तो सर्व परिस्थितीची अशा रितीने रचना करेल की, तुम्ही पूर्णपणे ईश्वराचे होण्यामध्ये ज्या गोष्टी अडथळा निर्माण करत होत्या त्या गोष्टी अगदी अपरिहार्यपणे तो तुमच्या मार्गामधून काढून टाकेल.
पण मग अशा रितीने तुमच्यापासून सर्व गोष्टी बाजूला केल्या गेल्यामुळे, तुम्ही आक्रोश करू लागता, तक्रार करू लागता. पण नंतर, तुम्ही खरोखरच प्रामाणिक असाल आणि स्वतःच्या नजरेला नजर देऊन, जर थेटपणे स्वतःकडे पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की, तुम्हीच कधी काळी ईश्वराला म्हटले होते, ‘मला फक्त तूच हवा आहेस.’ आता तो तुमच्या सन्निध असेल पण बाकी सारे नाहीसे झालेले असेल. ही खरोखरच एक उच्चतर ईश्वरी कृपा असते. अट एकच असते, तुम्ही ते तसे अगदी खात्रीने, विश्वासाने मागितले पाहिजे.
तुम्ही ते अगदी समग्रपणे म्हटले पाहिजे असेही मी म्हणत नाहीये. कारण जर एखादी व्यक्ती खरोखरच अशा रितीने समग्रपणे ‘मला फक्त ईश्वरच हवा आहे,’ असे म्हणेल तर तिचा सर्व कार्यभागच पूर्ण झालेला असतो. आवश्यकता असते ती तुमच्या अस्तित्वाच्या एखाद्या भागाने, खरंतर, तुमच्या केंद्रवर्ती संकल्पाने, ‘मला फक्त ईश्वरच हवा,’ असे अगदी खात्रीने म्हणण्याची! व्यक्तीने एकदा जरी असे प्रामाणिकपणे म्हटले असेल तर ते तेवढे पुरेसे असते. अर्थात या सर्व गोष्टींना कमी अधिक कालावधी लागतो. कधीकधी तर त्याला अनेक वर्षं लागतात पण व्यक्ती ध्येयापर्यंत जाऊन पोहोचतेच.
• श्रीमाताजी (CWM 06 : 176–177)
तुम्ही जर सचेत अभीप्सेच्या स्थितीमध्ये असाल आणि अगदी प्रामाणिक असाल तर, तुमच्या सभोवताली असणाऱ्या सर्व…
आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला निश्चितच एक महत्त्व असते; पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो…
व्यक्तीला आलेल्या सर्व आध्यात्मिक अनुभवांचे मोल हे फक्त तिच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावरच अवलंबून असते. काही जण…
व्यक्ती जे जे काही करते त्या सर्व गोष्टी ईश्वरार्पण करणे आणि असे करत असताना त्या…
(मला पूर्णयोगाची साधना करायची आहे त्यासाठी मला संन्यास घ्यावा लागेल का, असा प्रश्न एका…
अर्थातच, श्रीमाताजींनी जे काम नेमून दिलेले असते ते त्यांचे स्वतःचे कार्य असते, तो त्यांच्या…