(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील वानप्रस्थाश्रमाचा विचार कालच्या भागात आपण केला. आज ‘संन्यासाश्रम’ ही संकल्पना जाणून घेऊ.)

संन्यासाश्रम

जीवनाच्या अखेरच्या टप्प्यावर व्यक्ती उरलेसुरले बंध टाकून देण्यास आणि सामाजिक जीवनाच्या सर्व प्रकारांपासून पराकोटीच्या आध्यात्मिक निर्लिप्ततेने, अनासक्तीने या जगामध्ये वावरण्यास मोकळी असे. या टप्प्यावर ती व्यक्ती जीवनाच्या अगदी किमान गरजांची पूर्ती करत असे आणि विश्वात्म्याशी संवाद साधून, अनंताच्या प्राप्तीसाठी स्वत:च्या जिवाची तयारी करून घेत असे.

हे जीवनचक्र सर्वांना बंधनकारक होते असे मात्र नाही. त्यातील बहुसंख्य लोक हे पहिल्या दोन टप्प्यांच्या पुढे कधीच जात नसत. बरेच जण वानप्रस्थाश्रमामध्ये किंवा अरण्यवासामध्ये असतानाच निधन पावत असत. अगदी थोडेच जण अंतिम पराकोटीचे धाडस करून, परिव्राजकाचे जीवन स्वीकारत असत.

मानवी जिवाची संपूर्ण वाटचाल डोळ्यांसमोर ठेवून, त्यानुसार या जीवनचक्राची गांभीर्यपूर्वक आखणी करण्यात आलेली असल्यामुळे, प्रत्येक जिवाची खरोखरच जेवढी प्रगती झालेली असेल त्यानुसार प्रत्येक व्यक्ती या प्रणालीचा लाभ घेऊ शकत असे. हे जीवनचक्र पूर्ण करण्याइतपत ज्यांची विद्यमान जन्मामध्येच पुरेशी प्रगती झालेली असे ते, या प्रणालीचा पूर्णपणे लाभ घेऊ शकत असत.

• श्रीअरविंद (CWSA 20 : 175-176)

 

(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील गृहस्थाश्रमाचा अल्पसा विचार कालच्या भागात आपण केला. आज ‘वानप्रस्थाश्रम’ ही संकल्पना जाणून घेऊ.)

वानप्रस्थाश्रम

जीवनाच्या तिसऱ्या टप्प्यावर व्यक्ती अरण्यामध्ये जाऊन राहत असे आणि तेथे एका विशिष्ट एकांतवासात आत्म्याच्या सत्यशोधार्थ साधना करत असे. व्यक्ती तेव्हा कठोर सामाजिक बंधनापासून काहीशी मुक्त होऊन, अधिक मोकळ्या वातावरणात जीवन जगत असे. परंतु तिची इच्छा असेल तर ती व्यक्ती आपल्या अवतीभोवती तरुणांना एकत्र करून त्यांना किंवा चौकस व जिज्ञासू व्यक्तींना, स्वतःच्या ज्ञानाच्या आधारे मार्गदर्शन करू शकत असे आणि अशा रितीने ती व्यक्ती नवोदित पिढीचा शिक्षक किंवा आध्यात्मिक गुरू होऊ शकत असे. (क्रमश:)

• श्रीअरविंद (CWSA 20 : 175)

(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील ब्रह्मचर्याश्रमाचा विचार कालच्या भागात आपण केला. आज ‘गृहस्थाश्रम’ ही संकल्पना जाणून घेऊ.)

गृहस्थाश्रम

ब्रह्मचर्याश्रमामध्ये संपादन केलेले ज्ञान प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरविण्याच्या दृष्टीने आर्य मनुष्य गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करत असे आणि त्याद्वारे त्याला मानवी जीवनाची (अर्थ, काम व धर्म ही) पहिली तीन उद्दिष्टे साध्य करणे शक्य होत असे. गृहस्थाश्रमामध्ये असताना त्याला त्याच्या स्वाभाविक अस्तित्वाची, त्याच्या आवडीनिवडींची, जीवनानंद घेण्याच्या इच्छेची पूर्ती करता येत असे; तो समाजऋण फेडत असे; समाजाच्या गरजा पुरवत असे आणि अशा रितीने स्वतःच्या जीवनातील सर्व जबाबदाऱ्यांची परिपूर्ती करून, तो जीवनाच्या अंतिम आणि सर्वाधिक महत्त्वाच्या प्रयोजनासाठी स्वतःची तयारी करत असे. (क्रमश:)

• श्रीअरविंद (CWSA 20 : 175)

(श्रीअरविंद येथे भारतीय परंपरेतील वर्णाश्रम व्यवस्थेविषयी तपशील आणि त्या पाठीमागे असलेला विचार समजावून सांगत आहेत. व्यक्तीने या समाजव्यवस्थेमध्ये राहून, समाजऋण फेडून स्वतःचा विकास करून घेत, अध्यात्मप्रांतांत मार्गक्रमण करायचे असते; प्राचीन काळी असलेल्या या व्यवस्थेविषयी ते लिहितात…)

भारतीय प्रणालीने व्यक्तीला एक चौकट आखून दिली आहे. या प्रणालीने व्यक्तीला तिच्या जीवनासाठी एक श्रेणीबद्ध रचना आखून दिली आहे आणि व्यक्तीला उन्नती करण्यासाठी एक प्रकारच्या शिडीसारखा या प्रणालीचा उपयोग होऊ शकतो. अशा प्रकारची विलक्षण सोय हे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चार आश्रमांचे उद्दिष्ट होते. जीवनाचे हे विभाजन स्वाभाविक अशा चार कालावधींमध्ये करण्यात आले होते आणि जीवनविषयक ही जी सांस्कृतिक कल्पना होती ती प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने यातील प्रत्येक टप्प्याची आखणी करण्यात आली होती. विद्यार्थिदशेचा एक कालावधी असे, गृहस्थजीवनाचा एक कालावधी असे, एकांतवासात राहण्याचा किंवा अरण्यवास स्वीकारून राहण्याचा एक कालावधी असे आणि नंतर सामाजिक जीवनापासून मुक्त होऊन राहण्याचा, परिव्राजकावस्थेचा असा एक कालावधी असे.

ब्रह्मचर्याश्रम

मनुष्याने जीवनामध्ये जे जाणून घेणे आवश्यक आहे, जे करणे आणि जे बनणे आवश्यक आहे त्या गोष्टी करण्यासाठी आवश्यक अशी पायाभरणी विद्यार्थिजीवनात केली जात असे. आवश्यक असणाऱ्या कला, शास्त्रं, ज्ञानशाखा यांचे तपशिलवार ज्ञान त्याला दिले जात असे. आणि त्याच वेळी मनुष्याच्या नैतिक प्रकृतीला वळण लावण्यावर अधिक भर दिला जात असे. आध्यात्मिक ज्ञानाची जी वैदिक सूत्रं होती त्यामध्ये व्यक्तीने पारंगत असावे, हा प्रारंभिक काळामध्ये एक अनिवार्य घटक असे.

प्राचीन काळामध्ये हे सर्व शिक्षण शहरी जीवनाच्या धकाधकीपासून दूर आणि त्या शिक्षणाला अनुकूल असणाऱ्या वातावरणामध्ये दिले जात असे. जी व्यक्ती या जीवनचक्रातून यशस्वीरित्या पार झाली आहे अशी व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत असे. ज्या व्यक्तीला काही लक्षणीय आध्यात्मिक ज्ञानाचा साक्षात्कार झाला आहे, अशी व्यक्तीच बरेचदा शिक्षकपदी कार्यरत असे. परंतु कालांतराने शिक्षण हे अधिकाधिक बौद्धिक व ऐहिक स्वरूपाचे होत गेले. ते शहरांमध्ये व विद्यापीठांमध्ये दिले जाऊ लागले. हळूहळू चारित्र्याच्या आंतरिक तयारीपेक्षा व ज्ञानापेक्षा, बुद्धीच्या प्रशिक्षणावर आणि शिक्षणावर भर देण्यात येऊ लागला. प्राचीन काळी आर्यांची अर्थ, काम, धर्म व मोक्ष या जीवनाच्या चारही महान उद्दिष्टांबाबत तयारी झालेली असे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 20 : 174-175)

 

प्रामाणिकपणामध्ये विजयाची निश्चिती असते.
*
निरपवाद प्रामाणिकपणा आणि सत्यत्व यामध्येच मुक्ती आहे.

• श्रीमाताजी (CWM 14 : 65, 66, 67)

 

तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचे समर्पण हे जेवढे अधिक परिपूर्ण असेल तेवढ्या अधिक प्रमाणात कृपा व संरक्षण तुमच्यासोबत असेल. आणि ‘दिव्य माते’चे संरक्षण आणि ‘तिची कृपा’ तुमच्यासोबत असताना, तुमच्या वाटेला जाण्याची हिंमत कोण करू धजावेल किंवा तुम्हाला कोणाची भीती बाळगण्याची गरजच काय? तिच्या कृपेचा आणि संरक्षणाचा थोडासा अंशदेखील तुम्हाला सर्व अडीअडचणी, अडथळे आणि धोके यांमधून पार करू शकतो; तर मग, तिने जर पूर्णतयाच तुम्हाला कवळून घेतले तर, कोणतीही असत्‌‍-शक्ती, मग ती कितीही बलवान का असेना, ती या जगातील असो किंवा इतर अदृश्य जगतांमधील असो, तिची बाधा न पोहोचता, सर्व संकटांपासून मुक्त होऊन, तुम्ही तुमच्या मार्गावरून पूर्ण सुरक्षितपणे वाटचाल करू शकता; कारण तो मार्ग ‘दिव्य माते’चा असतो.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 08)

(श्रीमाताजी येथे सामान्य आघात आणि महाकालीचे प्रहार यातील फरक सांगत आहेत…)

साधक : एखाद्या व्यक्तीला किती आघात सहन करावे लागणार त्यांचे प्रमाण हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते का?

श्रीमाताजी : हो, ते त्या व्यक्तीवर अवलंबून असते. म्हणजे मी म्हटले त्याप्रमाणे ते तिच्या प्रगती करण्याच्या क्षमतेवर, तिच्या सामर्थ्यावर आणि ईश्वरी शक्तीला तिच्याकडून होणाऱ्या प्रतिरोधावर अवलंबून असते. ज्यांना या आघातांची आवश्यकता नसते असे फारच थोडे जण असतात.

साधक : महाकालीच्या आघाताचे स्वरूप कसे असते?

श्रीमाताजी : महाकालीने केलेल्या प्रहारामुळे तुम्हाला खूप आनंद होतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये एक गोडशी ऊब जाणवते. तुम्हाला समाधान वाटते.

साधक : व्यक्तीने तशा प्रहाराची इच्छा बाळगली पाहिजे का? की तो प्रहार आपोआपच होतो?

श्रीमाताजी : हो, व्यक्तीला प्रगती करण्याची खरोखरच इच्छा असली पाहिजे, त्या इच्छेमध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. व्यक्तीने खरोखर अगदी प्रामाणिकपणे असे म्हटले पाहिजे, “हो, मला प्रगती करायची आहे”, “काहीही झाले तरी मला प्रगती करायची आहे.” तेव्हा मग महाकालीकडून प्रहार केला जातो. परंतु मी म्हटले त्याप्रमाणे, ज्यामध्ये उत्कट आनंदाची धारणा असते अशा समृद्धीच्या शक्तीसहित तो आघात होतो.

तुम्ही जर एकदा निर्णय घेतला असेल, उदाहरणार्थ, स्वतःमधील एखादी चुकीची सवय थांबविण्याचा तुम्ही निश्चय केला असेल, किंवा तुम्ही जी चूक एकदा केली होती तीच पुन्हा न करण्याचा निश्चय केला असेल किंवा करायला अवघड वा अशक्यप्राय आहे आणि तरीही ती केली पाहिजे, अशी कोणतीतरी गोष्ट करण्याचा निर्णय तुम्ही घेतला असेल आणि असा निर्णय घेऊन, स्वतःच्या इच्छेबाबत तुमच्यापाशी पूर्ण प्रामाणिकपणा असेल तर, अशा वेळी तुम्ही जे करायचे ठरविले आहे तेच करण्यास भाग पाडण्यासाठी तुमच्यावर जर प्रचंड आघात झाला, तर तो आघातच असतो पण तेव्हा तुम्हाला तुमचा गौरव झाल्यासारखे वाटते, तुम्ही आनंदी होता, तुम्हाला हृदयामध्ये काहीतरी भव्योदात्त असे वाटू लागते. (कारण तो महाकालीचा प्रहार असतो.)

निव्वळ बाह्यवर्ती, यांत्रिक, भौतिक चेतनेमध्ये आणि अज्ञानदशेमध्ये जीवन जगत असताना, ज्या ज्या मूर्खपणाच्या गोष्टी तुम्ही करता, त्याचे स्वाभाविक परिणाम म्हणून अटळपणे व अघटितपणे तुमच्यावर होणारे आघात आणि तुम्ही स्वतःवर प्रभुत्व मिळविण्याचा निश्चय केल्यानंतर, तुम्ही ज्या उच्चतर अवस्थेत उन्नत होता आणि काहीही झाले तरी, सत्याच्या चेतनेमध्येच जीवन व्यतीत करायचा तुम्ही निर्धार करता, प्रगतीसाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण प्रगती करायचीच, असे जेव्हा तुम्ही ठरविता तेव्हा अशा तुमच्या उच्चतर अवस्थेमध्ये, तुमच्यावर होणारे आघात यांमध्ये जमीन-अस्मानाचे अंतर असते.

या उच्चतर अवस्थेमध्ये तुमच्या बाबतीत ज्या घटना घडतात त्या इतक्या अर्थपूर्ण असतात की, तुम्हाला त्या घटनांमध्ये दीप्तिमान असणारे सत्य स्पष्टपणे दिसून येते; जणू काही तुम्हाला दीपस्तंभ दिसावा त्याप्रमाणे तुमचा मार्ग उजळवून टाकणारा प्रकाश तुम्हाला दिसतो, तो प्रकाश तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि हे सारे तुम्हाला स्पष्टपणे दिसून येते. तुमच्या पाठीवर एखादा धोंडा येऊन कोसळावा त्याप्रमाणे तो आघात तुमचा विनाश करणारा नसतो तर, त्यामध्ये उत्कट दीप्तिमानता असते. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की, फक्त पहिल्या पायरीवरच प्रयत्नांची खरी आवश्यकता असते. येथे पहिली पायरी म्हणजे त्या अज्ञानदशेच्या पातळीवरून बाहेर पडून तिच्या वर असणाऱ्या पातळीवर चढून जाणे आणि असे झाल्यानंतर मग सारे, सारे काही बदलून जाते. परंतु व्यक्तीने त्या पातळीवरून पूर्णतः बाहेर पडले पाहिजे, तिने तिथेच थांबून राहता कामा नये, व्यक्तीने दोन दगडांवर पाय ठेवता कामा नये, कारण तसे चालत नाही.

– श्रीमाताजी (CWM 06 : 324-326)

(महाकालीचे प्रहार कधीकधी व्यक्तीच्या प्रगतीसाठी आवश्यक का असतात त्याचे कारण कालच्या भागात आपण विचारात घेतले. त्यावर एका साधकाने शंका विचारली आहे.)

साधक : मग व्यक्तीवर सर्व आघात एकदमच का होत नाहीत?

श्रीमाताजी : तसे झाले तर ते तुम्हाला मारक ठरेल. कारण तो प्रहार जर तुम्हाला वठणीवर आणण्याइतपत पुरेसा जोरदार असेल तर तो तुम्हाला चिरडूनदेखील टाकू शकेल. तुमचं अगदी चिपाड होऊन जाईल. परंतु तुम्ही जर थोडी थोडी प्रगती करत राहिलात, आज थोडी, उद्या थोडी अशी क्रमाक्रमाने प्रगती करत राहाल, ते आघात पचवत राहाल तर मग तुम्ही टिकून राहू शकाल.

अर्थातच ही गोष्ट आंतरिक सामर्थ्यावर, आंतरिक प्रामाणिकपणावर आणि प्रगती करण्याच्या तुमच्या क्षमतेवर, अनुभवातून शहाणपण शिकण्यावर आणि मुख्य म्हणजे, मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे ते शहाणपण विसरून न जाण्यावर अवलंबून असते. ते न विसरण्याइतपत जर व्यक्ती भाग्यवान असेल तर मग ती वेगाने प्रगती करू शकते. अशी व्यक्ती वेगाने पुढे जाऊ शकते.

आणि त्याच वेळी जर समजा व्यक्तीकडे आंतरिक नैतिक सामर्थ्य असेल तर, तिची प्रगती अधिक वेगाने सुद्धा होऊ शकते. म्हणजे समजा, व्यक्ती त्या दुःखाग्नीमुळे पोळून निघाली आणि त्याची धग कमी होऊ न देता जर ती व्यक्ती त्या दुःखाच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचली तर, तिची प्रगती अधिक वेगाने होऊ शकते. परंतु बहुसंख्य लोक एवढे सामर्थ्यशाली नसतात. उलट ते चटकन ती गोष्ट लपवून ठेवण्याचा, अगदी स्वतःपासूनसुद्धा ती गोष्ट लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. व्यक्ती स्वतःच स्वतःला अगदी क्षुद्र किरकोळ स्पष्टीकरणं देत असते. व्यक्तीने जो मूर्खपणा केलेला असतो त्यासाठी ती अनेकानेक कारणं सांगत असते. (क्रमशः)

• श्रीमाताजी (CWM 06 : 324)

(एखाद्या व्यक्तीमध्ये प्रगती करण्याची प्रामाणिक आस असेल तर तिच्या प्रगतीसाठी, वेळप्रसंगी महाकालीकडून तिच्यावर प्रहारदेखील केले जातात, या बाबतीतले तथ्य श्रीमाताजी येथे उलगडवून दाखवीत आहेत. हा भाग विस्तृत असल्यामुळे क्रमशः देत आहोत.)

श्रीमाताजी : प्रामाणिक असणे खरोखरच खूप कठीण असते… आणि म्हणूनच तुमच्यावर वारंवार आघात होत राहतात. कधीकधी तर ते आघात अधिकच भयानक होतात कारण तुमच्यामधील मूर्खपणा नाहीसा करण्याचा तोच एकमेव मार्ग असतो; संकटे का कोसळतात त्याचे हे कारण आहे. जेव्हा तुम्ही अतीव वेदनादायी अशा परिस्थितीमध्ये सापडलेले असता आणि तुमच्यावर खोलवर परिणाम करेल अशा परिस्थितीला तुम्हाला सामोरे जावे लागते, तेव्हाच तुमच्यातील मूर्खपणा थोड्याफार प्रमाणात तरी नाहीसा होतो. पण तो थोडा नाहीसा झाला तरी, अजूनही आतमध्ये थोडातरी शिल्लक असतोच आणि म्हणूनच दुःखसंकटादी साऱ्या गोष्टी इतक्या दीर्घकाळ चालू राहतात…

आपण म्हणजे कोणीच नाही, आपण काहीच करू शकत नाही, आपले अस्तित्वच नाही, आपण खरोखर अगदी कोणीच नाही, त्या दिव्य चेतनेखेरीज आणि ईश्वरी कृपेखेरीज खरोखर कोणते अस्तित्वच नाही, याची व्यक्तीच्या अंतःकरणात खोलवर जाण येण्यासाठी जीवनामध्ये कितीतरी आघात आवश्यक असतात.

ज्या क्षणी व्यक्तीला या गोष्टीची जाण येते त्या क्षणीच सारे दुःखभोग संपून जातात; सारी संकटे, अडचणी दूर होतात. व्यक्तीला जेव्हा हे पूर्णपणे कळते तेव्हा दिव्य चेतनेला विरोध करणारे तिच्यामध्ये काहीच शिल्लक राहत नाही… अर्थात या गोष्टीला खूप काळ लागतो. (क्रमशः)

• श्रीमाताजी (CWM 06 : 323-324)

(श्रीमाताजीकृत प्रार्थना…)

हे ईश्वरा, तू परिपूर्ण ज्ञान आहेस, परम चेतना आहेस. जो तुझ्याशी सायुज्य पावतो तो – जोपर्यंत त्याचे तुझ्याशी ऐक्य टिकून असते तोपर्यंत – सर्वज्ञ असतो. परंतु ही अवस्था प्राप्त होण्यापूर्वीदेखील, ज्याने स्वतःच्या अस्तित्वाच्या पूर्ण प्रामाणिकपणाने आणि सचेत संकल्पशक्तीच्या आधारे, तुझ्याप्रति आत्मदान केलेले असते; ज्याने स्वतःमध्ये आणि स्वतःच्या संपूर्ण प्रभावक्षेत्रामध्ये, तुझ्या ‘दिव्य प्रेमाचा दिव्य कायदा’ विजयी व्हावा आणि तो आविष्कृत व्हावा यासाठी ‘तुला साहाय्यभूत होण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन,’ असा निर्धार केलेला असतो, त्याच्या जीवनातील सर्व गोष्टी बदलून गेल्या आहेत असे त्याला आढळते. सर्व परिस्थिती ही आता तुझ्या दिव्य कायद्याची अभिव्यक्ती करू लागली आहे आणि ती तुझ्याप्रति आत्मनिवेदन करण्यास साहाय्य करू लागली आहे असे त्याला आढळते. त्याच्यासाठी, जे सर्वोत्तम आहे तेच नेहमी घडून येते.

पण असे असूनही, जर त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये जर कोठे अजूनही काही तमोमयता शिल्लक असेल, एखादी अज्ञानी इच्छावासना अजूनही रेंगाळलेली असेल, कदाचित अशी एखादी इच्छा त्याच्यामध्ये शिल्लक आहे हे त्याला लगेच कळणारसुद्धा नाही, पण आज ना उद्या त्याच्या हे नक्की लक्षात येईल की, ती परम-उदार अशी शक्ती त्याचे खुद्द त्याच्यापासूनसुद्धा रक्षण करत आहे. त्याच्या विकसनासाठी, त्याच्या समग्र परिवर्तनासाठी व त्याच्या रूपांतरणासाठी आणि त्या ईश्वरी शक्तीला साधन म्हणून त्याचा उपयोग करता यावा यासाठी सर्वाधिक अनुकूल परिस्थिती त्या शक्तीने त्याच्यासाठी राखून ठेवली आहे, असे त्याच्या लक्षात येईल.

व्यक्ती जेव्हा याविषयी सचेत होते आणि तिला ही गोष्ट पूर्णपणे पटते तेव्हा ती भावी परिस्थितीविषयी किंवा भविष्यात काय घटना घडतील याची चिंता करत बसत नाही. त्या क्षणाला जे करणे सर्वोत्तम आहे, असे तिला वाटते ते परिपूर्ण प्रशांततेमध्ये ती करत असते. त्या कृतीमधून आमच्या मर्यादित बुद्धीला जे परिणाम अपेक्षित असतात ते तसे परिणाम दिसून आले नाही तरी आमच्या मनात एक ठाम विश्वास असतो की, त्याचा परिणाम म्हणून सर्वोत्तम तेच घडेल.

आणि म्हणूनच हे ईश्वरा, आमचे अंतःकरण भाररहित, हलके झाले आहे; आमचे विचार शांत झाले आहेत. आणि म्हणूनच हे ईश्वरा, आम्ही तुझ्याकडे पूर्ण विश्वासाने येतो आणि शांतिपूर्णतेने म्हणतो, हे ईश्वरा, तुझाच संकल्प सिद्धीस जाऊ दे कारण त्यातूनच खरा सुसंवाद प्रत्यक्षात येणार आहे.

• श्रीमाताजी (CWM 01 : 102)