व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही व्यक्तीमध्ये अजूनही कोठेतरी अप्रामाणिकपणा शिल्लक असल्याची खूण असते. सामान्यतः तो अप्रामाणिकपणा प्राणात (vital) लपून राहिलेला असतो. जेव्हा प्राण सहकार्य करण्यास संमती देतो (जे मुळातच खूप मोठे पाऊल उचलण्यासारखे आहे) म्हणजे जेव्हा तो ठरवितो की, तो सुद्धा सहकार्य करणार आहे, त्याचे सारे प्रयत्न आणि ऊर्जा, ते कार्य पूर्ण करण्यासाठी तो खर्च करणार आहे, तेव्हासुद्धा आतमध्ये कोठेतरी काहीतरी दडून राहिलेले असते. सर्व गोष्टी चांगल्या होतील आणि त्याचे परिणाम अनुकूल असतील; अशी एक अपेक्षा तिथे दडलेली असते. ही अपेक्षा अहंजन्य, वैयक्तिक अशी गोष्ट असते आणि तीच प्रामाणिकपणाला संपूर्णपणे झाकून टाकते. त्यामुळे व्यक्तीला स्वत:चे दोष, स्वत:च्या चुका दिसत नाहीत.
परंतु, व्यक्ती जर पूर्णपणे प्रामाणिक असेल तर, जेव्हा ती करता कामा नये अशी एखादी गोष्ट करू लागते त्याच क्षणी, अगदी त्याच क्षणी, अगदी स्पष्टपणे, म्हणजे जोरकसपणे नव्हे पण तरीही अगदी नेमकेपणाने तिला जाणवते की, ‘नाही, ही गोष्ट मी करता कामा नये.’ अशा वेळी, व्यक्ती जर अनासक्त असेल तर ती चुकीची गोष्ट करणे व्यक्ती लगेचच थांबविते, अगदी त्वरित थांबविते.
पण व्यक्तीमध्ये आसक्ती असते, अगदी निष्काम कर्माबाबतीतसुद्धा आसक्ती असते, हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमचे जीवन जरी अगदी नि:स्वार्थ अशा एखाद्या कार्यासाठी वाहून घेतलेले असले, तरी तेथेही अहंकार शिल्लक असतोच. ते कार्य करण्याची तुमची स्वतःची अशी एक खास, वैयक्तिक पद्धत असते; तुमच्या मनात एक आशा असते की, याचा परिणाम अमुक असा होईल, तुम्हाला त्यातून अमुक अमुक मिळेल आणि मग ती गोष्ट अमुक प्रकारे पार पडेल इत्यादी इत्यादी. म्हणजे लक्षात घ्या की, ते कार्य तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करत नसता; पण जेव्हा ते कार्य तुम्ही हाती घेता, तेव्हा ते कार्य यशस्वी होईल, त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल, म्हणजे तुम्हाला व्यक्तिश: असे नव्हे, तर तुम्ही जे कार्य करत आहात ते कार्य यशस्वी होईल अशी अपेक्षा तुम्ही बाळगत असता. त्यामुळे कोणतीतरी एखादी अगदी छोटीशी गोष्ट, खोलवर, तळाशी दडून बसते पण तिची तुम्हाला जाणीव नसते… परंतु तशी अपेक्षासुद्धा जर तुम्ही बाळगली नसती तर, जे करणे आवश्यक होते ते करण्यात कुचराई करताक्षणीच, तुम्ही काहीतरी चूक करत आहात हे तुमच्या लक्षात आले असते. तुम्हाला अगदी नेमकेपणाने त्याची जाणीव झाली असती. एका मिलिमिटरचा एक हजारांश भाग असावा इतके ते स्पंदन सूक्ष्म असते. हो, ते तिथे असते, आणि तेवढे पुरेसे असते, तुम्हाला जाणवते की, ‘माझी चूक झाली आहे.’
काहीही झाले तरी चालेल पण तुमच्याकडून कोणताही प्रमाद घडता कामा नये असे वाटण्यासाठी, तुमच्याकडे परिपूर्ण प्रामाणिकपणा असावा लागतो. कोणत्यातरी भ्रमात जीवन जगण्यापेक्षा, असा परिपूर्ण प्रामाणिकपणा काहीही घडवून आणू शकतो, म्हणजे उदाहरणार्थ अगदी एखाद्या गोष्टीचा त्याग करण्यासही तो तयार असतो परंतु हे अतिशय अवघड असते; त्यासाठी वेळ लागतो, पुष्कळ परिश्रम करावे लागतात.
तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करत असता, तेव्हा नेहमीच मन आणि प्राण, तुम्ही जे जे काही करत असता त्यापासून काही ना काहीतरी लाभ मिळविण्याचा प्रयत्न करत असतात; मग तो वैयक्तिक समाधानाचा लाभ असेल किंवा एखाद्या आनंदाचा लाभ असेल, किंवा तुमच्या मनात स्वतःबद्दलची जी चांगली प्रतिमा असते तिच्या लाभासाठी असेल, हे मन किंवा प्राण तो लाभ उठविण्याचा प्रयत्न करत असतात. (आणि म्हणूनच) स्वतःला न फसविणे ही गोष्ट अतिशय अवघड असते.
– श्रीमाताजी (CWM 05 : 54-55)
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…
प्रश्न : माताजी, प्रामाणिकपणाचा खरा अर्थ काय? श्रीमाताजी : प्रामाणिकपणाच्या असंख्य श्रेणी आहेत. विचार…