ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

(उत्तरार्ध)

‘भांडणतंटे न करतासुद्धा व्यक्ती जीवन जगू शकते,’ असे म्हणणे कदाचित काहीसे विचित्र वाटेल. कारण, गोष्टी आज जशा आहेत, तशा पाहिल्या तर हे जीवन जणू काही भांडणतंट्यांनीच बनलेले असावे असे दिसते. म्हणजे असे की, जी माणसं एकत्र राहतात त्यांचा मुख्य उद्योग हा जणू भांडणतंटे करणे हाच असतो, असे दिसते. मग ती भांडणे उघड असोत किंवा छुपी असोत. तुम्ही प्रत्येक वेळी अगदी आरडाओरडाच करता असे नाही किंवा अगदी हमरीतुमरीवर येता असेही नाही; मात्र आतून तुम्ही सतत एकसारख्या चिडचिडलेल्या अवस्थेमध्ये वावरत असता. कारण तुम्हाला स्वतःमध्ये जे परिपूर्णत्व आणण्याची इच्छा असते ते तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसत नाही. खरंतर ती गोष्ट प्रत्यक्षात आणणे तुम्हालासुद्धा अवघड असते; परंतु तुम्हाला असे वाटत असते की, इतरांनी मात्र ती प्रत्यक्षात आणलीच पाहिजे. “ते असे कसे काय वागू शकतात?” असे तुम्ही म्हणता. (त्यांनी ‘जसे’ वागता कामा नये असे तुम्हाला वाटते) ‘तसे‌’ वागणे तुम्हालासुद्धा किती कठीण जाते, हे तेव्हा तुम्ही पूर्णपणे विसरून गेलेले असता.

…प्रत्येक गोष्टीकडे हसतमुखाने पाहा. ज्या गोष्टींमुळे तुमची चिडचिड होते त्या गोष्टींकडे तुम्ही एक धडा या दृष्टीने पाहा. तसे कराल तर तुमचे जीवन अधिक शांतिपूर्ण आणि अधिक परिणामकारक होईल. कारण जे परिपूर्णत्व तुम्ही स्वतः प्रत्यक्षात आणू इच्छित असता, ते तुम्हाला इतरांमध्ये दिसले नाही तर, त्यामुळे तुमची जी चिडचिड होते त्यामध्ये तुमच्यातील पुष्कळशी ऊर्जा तुम्ही निश्चितपणे गमावून बसता. परिपूर्णत्व इतरांनी प्रत्यक्षात उतरवले पाहिजे या मुद्द्यापाशीच तुम्ही थांबता आणि वास्तविक जे उद्दिष्ट तुम्ही साध्य करून घेतले पाहिजे त्याविषयी, तुम्ही क्वचितच जागरूक असता. तुम्ही जर त्याविषयी जागरूक असाल तर, तुम्हाला जे कार्य नेमून देण्यात आलेले आहे ते करायला सुरुवात करा. म्हणजे, तुम्ही स्वतः काय केले पाहिजे ते प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करा आणि इतर काय करतात याची चिंता करणे सोडून द्या. कारण, खरंतर ते तुमचे कामच नाही.

खऱ्याखुऱ्या योग्य दृष्टिकोनाचा मार्ग सांगायचा झाला तर तो हाच आहे की, “जे कोणी तुमच्या अवतीभोवती आहेत, जीवनात जी कोणती परिस्थिती तुमच्या वाट्याला आली आहे, ज्या कोणत्या व्यक्ती तुमच्या जवळ आहेत त्या म्हणजे, तुम्ही कोणती प्रगती केली पाहिजे हे तुम्हाला दाखवून देणारे जणू काही ईश्वरी चेतने‌ने तुमच्यासमोर धरलेले आरसेच असतात. इतरांच्या एखाद्या गोष्टीचा तुम्हाला जर धक्का बसला तर, त्याचा अर्थ हाच की, ‘तुम्ही ते कार्य तुमच्या स्वतःमध्ये करणे आवश्यक आहे.’ व्यक्ती जर स्वतःच्या अंगी खरेखुरे परिपूर्णत्व बाणवेल तर तिला तेच परिपूर्णत्व इतरांमध्येही आढळून येईल.

– श्रीमाताजी (CWM 10 : 22-23)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

स्वत:ला न फसविणे अवघड

  व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…

7 hours ago

प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन

  आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…

1 day ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४

  (भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…

2 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०३

  (भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…

3 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०२

  भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…

4 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०१

  साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…

5 days ago