ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

जीवन जगण्याचे शास्त्र – २०

जीवन जगण्याचे शास्त्र – २०

(मानसिक आणि प्राणिक अविचलता म्हणजे काय ते कालच्या भागात आपण समजावून घेतले. आता हा त्याचा पुढील भाग…)

तुम्ही जडता अथवा सुस्त निष्क्रियता या गोष्टींना स्थिरशांती (calm) समजण्याची गल्लत कधीही करू नका. अविचलता (Quietude) ही अत्यंत सकारात्मक स्थिती असते. संघर्ष नाही म्हणजे आता शांती आहे असा येथे अर्थ नसून, ती खऱ्या अर्थाने सकारात्मक शांती असते. ती शांती सक्रिय, संक्रमणशील, शक्तिशाली असते; ती प्रत्येक गोष्ट सुव्यवस्थित करते, संघटित करते, त्यावर नियंत्रण ठेवते आणि स्थिरता आणते. मी नेहमी त्या स्थिरशांतीबद्दल सांगत असते.

मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला सांगते की, “शांत व्हा,” तेव्हा “जा आणि झोप काढा, सुस्त व निष्क्रिय व्हा आणि काहीही न करता नुसते बसून राहा;” असे काही मला सांगायचे नसते. खरंतर, मला याच्या अगदी विरूद्ध सांगायचे असते. खरी स्थिरता, अविचलता ही एक फार मोठी शक्ती असते, ते एक फार मोठे सामर्थ्य असते.

खरंतर या समस्येकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिले तर असे म्हणता येते की, जे खरोखरच खूप बलवान, सशक्त, शक्तिशाली असतात ते नेहमीच स्थिरशांत असतात. जे दुर्बल असतात तेच प्रक्षुब्ध असतात. तुम्ही जेव्हा खरोखरच सुदृढ, सशक्त बनता तेव्हा शांतियुक्त, शांत, स्थिर होता आणि तेव्हा, तुम्हाला अस्वस्थ करण्याच्या इराद्याने बाहेरून तुमच्यावर धावून येणाऱ्या विरोधी लाटांचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारी तग धरून राहण्याची क्षमता तुमच्यापाशी असते.

खरी अविचलता ही नेहमी शक्तीची खूण असते. बलवान व्यक्तींकडेच स्थिरशांती असते. आणि हे अगदी प्राकृतिक क्षेत्रामध्येसुद्धा (physical field) तितकेच खरे असते. सिंह, वाघ, हत्ती यांसारख्या प्राण्यांचे तुम्ही निरीक्षण केले आहे की नाही मला माहीत नाही, पण जेव्हा ते सक्रिय नसतात, तेव्हा ते नेहमीच पूर्णतया शांत असतात, स्तब्ध असतात. एखादा सिंह जेव्हा स्वस्थ बसून तुमच्याकडे पाहत असतो तेव्हा जणूकाही तो तुम्हाला म्हणत असतो, “किती अस्वस्थ आहात तुम्ही!” तो तुमच्याकडे अशा शहाणीवेच्या प्रशांत वातावरणात पाहत राहतो. आणि तेथे त्याची सारी ताकद, ऊर्जा, शारीरिक सामर्थ्य या गोष्टी एकवटलेल्या, गोळा झालेल्या आणि केंद्रित झालेल्या असतात आणि जेव्हा त्याला आज्ञा दिली जाते तेव्हा कोणत्याही क्षोभाशिवाय कृती करण्यासाठी तो सज्ज असतो.

मी अशी अनेक माणसं पाहिली आहेत की, जी अर्धा तास सुद्धा चुळबूळ न करता शांत बसू शकत नाहीत. ते पाय तरी हलवतील, हात किंवा डोकंतरी हलवतील; त्यांना सातत्याने सर्वकाळ अस्वस्थपणे हालचाली करत राहावे लागते, कारण त्यांच्यापाशी स्थिरशांत बसण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती किंवा सामर्थ्य नसते. आवश्यक असेल तेव्हा स्तब्ध राहायचे, स्वतःच्या सर्व ऊर्जा एकत्रित करायच्या आणि तुमच्या इच्छेनुसार त्या खर्च करायच्या. तुम्हाला जर आवश्यक असेल तर पूर्णपणे; अन्यथा, तुम्हाला अमुक एक कृती करण्यासाठी आवश्यकता असेल त्या प्रमाणात त्या खर्च करायच्या; आणि प्रत्येक कृतीमध्येसुद्धा परिपूर्ण स्थिरशांती बाळगायची, ही नेहमीच सामर्थ्याची खूण असते. ते सामर्थ्य शारीरिक किंवा प्राणिक किंवा मानसिक असू शकते. परंतु तुम्ही थोडेजरी क्षुब्ध, अस्वस्थ असाल तर तुम्ही कोणत्यातरी एखाद्या बाबतीत दुर्बल आहात हे खात्रीने धरून चाला. आणि तुमची अस्वस्थता जर सर्वांगीण असेल तर तुम्ही पूर्णतः दुर्बल आहात असे समजा.

– श्रीमाताजी (CWM 08 : 329-330)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

2 hours ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago