भारताचे पुनरुत्थान – ११

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. ०५ मार्च १९०८

भारताला आता जर का एका महान सामाजिक क्रांतीची आवश्यकता असेल तर ती याच कारणासाठी की, भारताचा प्राचीन व अविचल आत्मा ज्यामधून अभिव्यक्त होऊ शकत नाही अशा रूपांशी आपण अजूनही जखडून राहिलो तर, त्यामुळे स्वराज्याचा आदर्श सिद्धीस जाऊ शकणार नाही. भारतमातेने भूतकाळात पांघरलेली जीर्ण वस्त्रं बदलली पाहिजेत म्हणजे तिचे सौंदर्य पुन्हा एकदा उजळून निघेल. तिने तिच्या देहरूपामध्येदेखील बदल केला पाहिजे म्हणजे त्यामधून तिचा आत्मा नव्याने अभिव्यक्त होऊ शकेल. असा बदल केला तर ती युरोपाची नक्कल होईल अशी भीती बाळगण्याचे काही कारण नाही. कारण तिची व्यक्तिविशिष्टता (individuality) इतकी बलशाली आहे की, तिच्याबाबतीत अशा प्रकारचे अवमूल्यन होऊच शकणार नाही. तसेच तिचा आत्मा एवढा स्थिरचित्त आणि स्वयंपूर्ण आहे की, ती अशा तऱ्हेची शरणागती पत्करणेही शक्य नाही.

भारतामध्ये पुन्हा आर्थिक क्रांतीची आवश्यकता असेल तर ती एवढ्यासाठीच की, अन्यथा वाणिज्य-क्षेत्रातील व उद्योग-क्षेत्रातील स्वराज्याला तिच्या जुन्या औद्योगिक जीवनाच्या सुरेख पण अरूंद इमारतीमध्ये वाव मिळणार नाही. स्वतंत्र आणि परिपूर्ण राष्ट्रीय जीवनाच्या औद्योगिक उर्जांना बलशाली क्षेत्राची आणि विशाल जलप्रवाहांची आवश्यकता असते. युरोपने आत्ता ज्याप्रमाणे मानवतेच्या उदात्त भावभावनांची पायमल्ली चालविली आहे, तशाच प्रकारच्या रोगग्रस्त आणि विस्कळीत समाजस्थितीमध्ये आर्थिक क्रांती आपल्याला नेऊन ठेवेल अशी भीती बाळगण्याचेदेखील कारण नाही. जी शिकवण म्हणजे भारतमातेचे जणू जीवनच आहे, जी तिच्या अमरत्वाचे रहस्य आहे अशी शिकवण ही – पाश्चात्त्य देशांमध्ये ‘उद्योगधंद्या’च्या नावाखाली संघटित स्वार्थीपणा, क्रूरपणा आणि लोभ, हाव यांना जी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे – त्याचीच प्रतिकृती ठरण्याइतपत कदापिही विस्मरणात जाऊ शकणार नाही. भारतमाता स्वत:ची परिस्थिती स्वतः निर्माण करेल, समाजामध्ये व्यवस्थेचे रहस्य शोधण्यासाठी समाजवाद जो व्यर्थ आटापिटा करत असतो ते रहस्य भारतमाता शोधून काढेल आणि जग व आत्मा यांच्यामध्ये सुसंवाद कसा प्रस्थापित करायचा असतो हेदेखील ती पृथ्वीवासियांना पुन्हा एकदा शिकवेल.

सध्या जे काही घडत आहे त्यामध्ये एक महान आणि महत्त्वाचे रूपांतर घडून येत आहे, आणि हे रूपांतर केवळ आपल्यासाठीच नव्हे तर अखिल जगासाठी महत्त्वाचे असणार आहे, याचा बोध आपल्याला होऊ शकला आणि त्यामागील सत्य आपल्याला प्रतीत झाले तर येणाऱ्या काळात, कोणतीही भीती वा शंका न बाळगता आपण स्वतःला त्यात झोकून देऊ.

भारत हा राष्ट्रांचा गुरू आहे. मानवी जिवाला गंभीर आजारांमधून बाहेर काढणारा जणू धन्वंतरी म्हणजे भारत आहे. जगत्-जीवनाची पुन्हा एकवार नवरचना करावी आणि मनुष्याला त्याच्या आत्म्याची शांती पुन्हा एकदा प्राप्त करून द्यावी हे भारताचे नियत कार्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 905-906)

भारताचे पुनरुत्थान – १०

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. २२ फेब्रुवारी १९०८

मनुष्याच्या अंतरंगामध्ये ईश्वराचे वास्तव्य असते (याचे प्रत्यंतर येणे) म्हणजे संपूर्ण साक्षात्कार आणि तोच समग्र धर्म आहे. जेव्हा भारताला (आद्य) शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य यांच्याकडून मिळालेल्या शिकवणुकीचे स्मरण होईल; श्रीरामकृष्ण (परमहंस) कोणते सत्य प्रकट करण्यासाठी आले होते याची जेव्हा भारताला जाणीव होईल तेव्हा भारताचा अभ्युदय होईल. वेदान्त हेच भारताचे जीवन आहे.

जो हिंदू आहे तो कधीच आपण (मानव) म्हणजे केवळ बौद्धिक जीव आहोत, असा विचार करणार नाही. ज्याने ईश्वर कधीच पाहिलेला नाही त्याने खुशाल बुद्धीचे गुणगान करावे, असे हिंदुधर्म मानतो. केवळ ईश्वराच्याच महानतेचे आणि तेजस्वितेचे गुणगान करावे असा आदेश त्या ईश्वरानेच हिंदुधर्माला दिला आहे आणि हिंदुधर्म हजारो वर्षे त्याचेच गुणगान करत आला आहे.

पहिल्यांदा जेव्हा कधी आपण युरोपियन शिक्षण स्वीकारले, तेव्हाच आपण विज्ञानाच्या (science) प्रकाशाने स्वत:ची दिशाभूल होऊ देण्यास संमती दिली. विज्ञान हा एका मर्यादित खोलीतील प्रकाश आहे, जग उजळवून टाकू शकेल असा सूर्य नव्हे. विज्ञानाची गोळाबेरीज म्हणजे अपराविद्या. पण त्याहून अधिक उच्च अशी एक विद्या आहे, महान असे एक ज्ञान आहे. जेव्हा आपण अपरा विद्येच्या प्रभावाखाली वावरत असतो, तेव्हा आपणच कर्ते आहोत अशा भ्रमात आपण वावरत असतो आणि जणू काही बुद्धीच सार्वभौम व सर्वशक्तिमान आहे असे समजून, आपण ज्या परिस्थितीत आहोत ती परिस्थिती बुद्धीच्या साहाय्याने समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण हा भ्रामक आणि मायिक दृष्टिकोन असतो.

एखाद्याने एकदा जरी स्वत:च्या अंतरंगात वसलेल्या ईश्वराची दिव्य प्रभा अनुभवलेली असेल तर बुद्धी हीच सर्वोच्च असते, यावर तो पुन्हा कधीच विश्वास ठेवणार नाही. (बुद्धीपेक्षा श्रेष्ठ) एक उच्चतर आवाज असतो, एक अमोघ अशी आकाशवाणी असते. हृदयामध्ये ईश्वराचा अधिवास असतो. ईश्वर मेंदुद्वारे कार्य करतो, पण मेंदू हे त्याच्या अनेक साधनांपैकी एक साधन असते. मेंदू ज्या गोष्टीची योजना आखण्याची शक्यता असते, ती गोष्ट हृदयाला आधीच ज्ञात असते. आणि जो कोणी मेंदुच्या पलीकडे जाऊन, हृदयापर्यंत पोहोचू शकतो तोच शाश्वताची (Eternal) वाणी ऐकू शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 891-892)

भारताचे पुनरुत्थान – ०९

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. २१ फेब्रुवारी १९०८

जगाचे भवितव्य हे भारतावर अवलंबून आहे. जेव्हा कधी भारत त्याच्या निद्रेमधून जागा होतो तेव्हा तो झळाळणारे काही अद्भुत प्रकाशकिरण जगाला प्रदान करतो आणि ते प्रकाशकिरण अनेकानेक राष्ट्रांना प्रकाशित करण्यासाठी पुरेसे असतात. भारताला एखादा विचार करण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो मात्र तोच विचार करण्यासाठी इतर राष्ट्रांना शतकानुशतके व्यतीत करावी लागतात.

ईश्वराने भारताच्या हाती प्राचीन वेदविद्येचा ग्रंथ दिला आणि तो ग्रंथ उघडण्याची योग्य वेळ येत नाही तोपर्यंत तो ग्रंथ त्याच्या हृदयामध्ये कुलूपबंद करून ठेवण्याचा आदेशही त्याला दिला. कधीकधी त्यातील एखादे प्रकरण तर कधी एखादे पान उघड करून दिले जात असे, तर कधीकधी अगदी एखादे वाक्यसुद्धा! आणि अशी वाक्यं ही पुढे युगानुयुगांसाठी प्रेरणा बनून राहिली आहेत आणि त्यांनी मानवतेचे शेकडो वर्षे भरणपोषण केले आहे.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 890)

भारताचे पुनरुत्थान – ०८

(श्री. अरविंद घोष यांनी ३१ जानेवारी १९०८ रोजी नागपूर येथे केलेल्या भाषणातील अंशभाग)

राष्ट्राचा आत्मसन्मान हाच आपला धर्म आणि आत्मयज्ञ हीच आपली एकमेव कृती किंवा हेच आपले एकमेव कर्तव्य! आपल्यामधील दैवी गुण प्रकट व्हावेत यासाठी आपण पुरेसा वाव दिला पाहिजे. क्षुल्लक भावनांचा त्याग केला पाहिजे. मरणाचा प्रसंग आला तरी घाबरता कामा नये.

मागे हटू नका; राष्ट्रासाठी यातना सहन करा. ईश्वर हाच तुमचा आधार आहे. तुम्ही जर असे केलेत तर भारताला त्वरित त्याचे गतवैभव आणि कीर्ती पुन्हा प्राप्त होईल. जगातील स्वतंत्र राष्ट्रांच्या खांद्याला खांदा लावून भारत उभा राहील. तो इतर राष्ट्रांना शिक्षित करेल; त्याच्यामधून खऱ्या ज्ञानाचे तेज ओसंडून वाहील आणि भारत वेदान्ताची तत्त्वे रुजवेल. आपले राष्ट्र हे मानववंशाच्या आणि संपूर्ण जगाच्या हितासाठी पुढे सरसावेल. संपूर्ण जग हे त्याच्याद्वारे संचालित केले जाईल. पण केव्हा? जेव्हा आपण सर्वजण आपल्या राष्ट्राचे ऋण फेडण्यास तयार होऊ तेव्हाच हे घडून येईल.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 860)

भारताचे पुनरुत्थान – ०७

(श्री. अरविंद घोष यांनी मुंबईमध्ये दि. १९ जानेवारी १९०८ रोजी केलेल्या भाषणातील हा मजकूर…)

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. २३ फेब्रुवारी १९०८

सध्या भारतामध्ये स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणविणारा एक पंथ आहे, हा पंथ तुमच्याकडे (महाराष्ट्रामध्ये) बंगालमधून आलेला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी या पंथाचा स्वीकार केलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवून घेऊ लागलात तेव्हाच तुम्ही त्याचा स्वीकार केला आहे. तुमच्या लक्षात आले का? याचा अर्थ काय होतो हे तुमच्या ध्यानात आले का? तुम्ही कशाचा स्वीकार केला आहे हे तुम्हाला समजले का? का तुम्ही आपण कोणीतरी अधिक श्रेष्ठ आहोत या बौद्धिक ठाम विश्वासाच्या अभिमानापोटी त्या पंथाचा स्वीकार केला आहे?

तुम्ही स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवता. पण राष्ट्रीय विचारसरणी (Nationalism) म्हणजे काय? तर, ती म्हणजे केवळ राजकीय कार्यक्रम नाही. राष्ट्रीय विचारसरणी म्हणजे ईश्वराद्वारे प्रदान करण्यात आलेला एक धर्म आहे. हा असा एक पंथ आहे की ज्यामध्ये तुम्हाला जगावेच लागेल. केवळ एक प्रकारच्या बौद्धिक अभिमानापोटी जर कोणी स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवून घेत असेल, आपण अधिक महान देशभक्त आहोत, जे स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवून घेत नाहीत त्यांच्यापेक्षा आपण कोणीतरी उच्चतर आहोत असे जर एखादा समजत असेल तर त्याने स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणण्याचे धाडस करू नये हे बरे!

तुम्ही जर राष्ट्रप्रेमी बनू इच्छित असाल, तुम्ही जर राष्ट्रीय विचारसरणीच्या धर्माला संमती देऊ पाहत असाल तर तुम्ही ती गोष्ट धार्मिक वृत्तीनेच केली पाहिजे. तुम्ही तुमच्या स्व-देशाच्या मुक्तीसाठी कार्य करणारे ‘ईश्वरा’चे साधन आहात, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवलीच पाहिजे. त्यासाठी तुम्ही ‘ईश्वरा’चे साधन म्हणूनच जीवन जगले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 818-819)

भारताचे पुनरुत्थान – ०६

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. २० सप्टेंबर १९०७

श्रीयुत बाळ गंगाधर टिळक यांनी जातिव्यवस्थेवर एक निश्चित स्वरूपाचे भाष्य केल्याचे ‘द बेंगाली’ या कलकत्त्यामधील एका वर्तमानपत्राने नोंदविले आहे. “सामाजिक विषमतेची आज प्रचलित असणारी संकल्पना ही समाजामध्ये प्रचंड हानी घडवून आणत आहे,’’ असे प्रतिपादन दख्खन प्रांतातील या राष्ट्रीय विचारसरणी असलेल्या नेत्याने केले आहे. हे विधान श्रीयुत टिळक यांच्यासारख्या तळमळीच्या हिंदू आणि अतिशय प्रामाणिक राष्ट्रप्रेमीच्या दृष्टीने अगदी सहज स्वाभाविक असे आहे. मूळ जातिव्यवस्थेचे अवमूल्यन होऊन त्यातून तयार झालेल्या भ्रष्ट कल्पना; जात, अभिमान आणि उद्धटपणा यांच्या मिथ्या पायावर आधारित असलेला मानसिक दृष्टिकोन; जन्मावर आधारित असणारी दैवदत्त श्रेष्ठत्वाची कल्पना, एक अलवचीक आणि असहिष्णु विषमता या गोष्टी हिंदुधर्माच्या मूळ तत्त्वाशी, म्हणजे जो हिंदुधर्म प्रत्येक व्यक्तीमध्ये अविचल आणि अविभक्त असणारे ‘ईश्वरत्व’ पाहतो त्याच्या त्या तत्त्वाशी, त्याच्या सर्वोच्च शिकवणुकीशी मिळत्याजुळत्या नाहीत. त्या ‘ईश्वरी एकते’ची राष्ट्रामध्ये प्रचिती घेण्याची उत्कट आकांक्षा बाळगणे म्हणजे राष्ट्रीय विचारसरणी (Nationalism)!

ही अशी एकता असते की, जिच्यामध्ये सर्व घटक-व्यक्ती, वरकरणी पाहता राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक घटक म्हणून त्यांची कार्ये, कितीही वैविध्यपूर्ण आणि असमान दिसत असली तरीसुद्धा, त्या सर्व घटक-व्यक्ती वस्तुतः आणि मूलतः एक व एकसमानच असतात. भारत जगापुढे राष्ट्रीय विचारसरणीची जी आदर्श संकल्पना मांडणार आहे त्या आदर्श संकल्पनेमध्ये, दोन माणसांमध्ये, दोन जातींमध्ये, दोन वर्गांमध्ये एक प्रकारची मूलभूत समता असेल. श्रीयुत टिळक यांनी निर्देश केल्याप्रमाणे, राष्ट्र म्हणजे जणू विराट पुरुष असून, सर्व जीव हे जरी विभिन्न असले तरी, ते त्या विराट पुरुषाचे समान आणि संघटित घटक असतील. आपल्या देशाच्या धर्माचा आणि तत्त्वज्ञानाचा हा आदर्श आपल्या प्रत्येक देशबांधवाच्या घराघरांत पोहोचविणे हे भारतीय राष्ट्रप्रेमीचे कार्य असेल आणि आपल्या धर्माची ती आग्रही शिकवण असेल.

आम्हाला हुकूमशाही (autocracy) अमान्य आहे कारण हुकूमशाही म्हणजे राजकारणाच्या क्षेत्रामध्ये उपरोक्त मूलभूत समतेलाच नकार देण्यासारखे आहे. आम्ही जातिव्यवस्थेच्या झालेल्या आधुनिक विपर्यासाला आक्षेप घेण्याचे कारणही हेच आहे की, त्यामुळे त्या मूलभूत समतेलाच समाजजीवनामध्ये हरताळ फासला जातो. आम्ही जेव्हा राष्ट्राची एका लोकशाही राजकीय एकतेमध्ये पुनर्व्यवस्था लावण्याचा आग्रह धरत आहोत तेव्हा आम्हाला याची जाण आहे की, पुनर्व्यवस्थेचे तेच तत्त्व सामाजिकदृष्ट्याही अपरिहार्यपणे जोर धरेल आणि तो जोर धरला गेलाच पाहिजे; आमचे विरोधक कल्पना करतात त्याप्रमाणे आम्ही त्याचे क्षेत्र फक्त राजकीय प्रांतापुरतेच मर्यादित करू इच्छितो असे गृहीत धरले तर, आमचे सारे प्रयत्न निष्फळ ठरतील; कारण एकदा का ते तत्त्व राजकारणामध्ये प्रत्यक्षात उतरले तर त्याने समाजामध्येसुद्धा अपरिहार्यपणे स्वतःचे जोरकस प्रतिपादन केलेच पाहिजे. कोणत्याही प्रकारची मक्तेदारी ही, मग ती वंशावर आधारित असो वा अनुवंशिकतेवर आधारित असो, ती राष्ट्रप्रेमींच्या भविष्यकालीन योजनेचा म्हणजे, ज्याच्या आगमनासाठी ते आज धडपडत आहेत, संघर्ष करत आहेत त्या योजनेचा आणि त्यांच्या वर्तमान स्वप्नाचा भाग असूच शकणार नाही.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 679-680)

भारताचे पुनरुत्थान – ०५

वंदे मातरम् हा मंत्र जन-मानसात दुमदुमू लागला होता. नव्हे, आता हा मंत्र म्हणजे स्वातंत्र्याकांक्षी देशभक्तांच्या अस्मितेचा मानबिंदू ठरला होता. त्याच सुमारास ‘बंदे मातरम्’ या नियतकालिकाचा क्षितिजावर उदय झाला आणि त्यामध्ये प्रकाशित होणाऱ्या प्राध्यापक श्री. अरविंद घोष यांच्या जहाल लेखनामुळे, वंदे मातरम् हा मंत्रोच्चार भारतीयांच्या हृदयातील मातृभूमीच्या प्रेमाला आवाहन करणारा ठरला.

‘बंदे मातरम्’ हे कलकत्त्याहून प्रकाशित होणारे दैनिक होते. हे दैनिक म्हणजे संपूर्ण स्वराज्याची संकल्पना साकार करू पाहणाऱ्या भारताच्या राजकीय जनजागृती-कार्यक्रमाचा अविभाज्य भाग होता. अल्पावधीतच हे वृत्तपत्र भारताच्या राजकीय चळवळीचे मुखपत्र बनले. त्यातील लेखांमुळे प्राध्यापक अरविंद घोष प्रथमच प्रसिद्धीच्या झोतामध्ये आले.

वंगभंगाच्या पार्श्वभूमीवर श्री. बिपिनचंद्र पाल यांनी ‘बंदे मातरम्’ हे दैनिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. याचा पहिला अंक दि. ०६ ऑगस्ट १९०६ रोजी प्रकाशित झाला. श्री. अरविंद घोषदेखील या दैनिकाच्या कार्यामध्ये सहभागी झाले. लेखक, संपादक, सल्लागार या नात्याने श्री. अरविंद या नियतकालिकाच्या कामकाजात सक्रिय सहभागी होते.

‘बंदे मातरम्’मधून देशप्रेमाचा आणि परकीय सत्तेच्या गुलामीविरूद्धचा संदेश दिला जात असे पण त्याची शब्दयोजनाच अशी असे की, त्यावर कोणताही कायदेशीर आक्षेप घेणे ब्रिटिश सरकारला शक्य होत नसे. वास्तविक बिटिश सरकार श्री. अरविंद घोष यांना अटक करू इच्छित होते परंतु सरकारला त्यांच्यावरील आरोप सिद्ध करता आला नाही. यामुळे एक गोष्ट मात्र घडली की, आजवर पडद्याआड राहून कार्यरत असणारे अरविंद घोष एकाएकी प्रसिद्धीच्या झोतात आले. आणि तेथूनच पुढे ‘स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी’ या नात्याने त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

‘बंदे मातरम्’ने देशासमोर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि निष्क्रिय प्रतिकार ही चतुःसूत्री ठेवली. निष्क्रिय प्रतिकाराचा सिद्धान्त मांडणारी ‘द डॉक्ट्रिन ऑफ पॅसिव्ह रेझिस्टन्स’ नावाची श्री. अरविंद लिखित लेखमाला ‘बंदे मातरम्’मधून प्रकाशित करण्यात आली.

या नियतकालिकाची आर्थिक बाजू नीट सांभाळता यावी या दृष्टीने श्री. अरविंद यांच्या सूचनेनुसार, ‘बंदे मातरम् कंपनी’ची स्थापना करण्यात आली होती. मात्र पुढे अलिपूर बाँबकेसमध्ये त्यांना अटक झाल्यावर, त्यांच्या अनुपस्थितीमुळे ‘बंदे मातरम्’चे प्रकाशन थांबले.

“श्रीअरविंदांच्या लेखणीची धाडसी वृत्ती, ज्वलंत विचारसरणी, सुस्पष्ट कल्पना, शुद्ध आणि शक्तिशाली शब्दरचना, जळजळीत वक्रोक्ती आणि निखळ विनोदबुद्धी यांची बरोबरी देशातील कोणत्याही भारतीय किंवा अँग्लो-इंडियन दैनिकाला करता आली नाही,” असे उद्गार श्री. बिपिनचंद्र पाल यांनी काढले होते.

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

भारताचे पुनरुत्थान – ०४

(भारत मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचे सध्या १५० वे जयंतीवर्ष सुरू आहे. मुळात बंगाली भाषेत असलेल्या या गीताचा पूर्वाश्रमीच्या श्री. अरविंद घोष यांनी इंग्रजीमध्ये गद्यानुवाद केला आहे. त्याचा मराठी भावानुवाद आज प्रस्तुत करत आहोत….)

हे माते, मी तुला वंदन करत आहे.
जलसमृद्ध आणि धनधान्यसमृद्ध असणाऱ्या हे माते,
दक्षिणवाऱ्यांमुळे तू शीतलतनू झाली आहेस;
सुगीच्या पिकांनी घनगर्द झालेल्या हे माते,
मी तुला वंदन करत आहे.
चंद्रप्रकाशाच्या वैभवामध्ये तुझ्या रात्री न्हाऊन निघाल्या आहेत,
विविध फुलांनी बहरलेले वृक्षरूपी सुंदर वस्त्र
तुझ्या भूमीने परिधान केले आहे,
तुझे हास्य मंजुळ आहे आणि तुझी वाणी मधुर आहे,
परमानंदप्रदायिनी, वरदायिनी असणाऱ्या हे माते,
मी तुला वंदन करत आहे.

सप्त कोटी मुखांमधून उठणाऱ्या गर्जनांनी
आणि सप्त कोटी प्रजाजनांच्या दोन्ही हातांमध्ये उगारलेल्या शस्त्रांमुळे
तू रुद्रभीषण दिसत आहेस, तेव्हा हे माते,
तू दुर्बल आहेस असे म्हणण्याचे धारिष्ट्य कोण बरे करेल?
अपरिमित शक्ती धारण करणाऱ्या रक्षणकर्त्या मातेसमोर,
आणि शत्रूंच्या पलटणी पळवून लावणाऱ्या मातेसमोर
मी नतमस्तक आहे. हे माते, मी तुला वंदन करत आहे.

तूच ज्ञान आहेस आणि तूच आमचा स्वधर्म आहेस,
तूच आमच्या हृदयांमध्ये निवास करत आहेस.
तूच आमचा आत्मा आहेस आणि आमच्या देहामधील प्राणही तूच आहेस.
आमच्या बाहुंमधील शक्तिसामर्थ्य तूच आहेस,
आमच्या हृदयामधील प्रेम आणि श्रद्धादेखील तूच आहेस,
आम्ही सर्व मंदिरांमध्ये तुझ्याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत असतो.
कारण तू युद्ध-शस्त्रे धारण केलेली दशभुजा दुर्गा आहेस,
आणि कमलपुष्पांमध्ये विहरणारी सौंदर्यदेवतादेखील तूच आहेस.
परावाणीरूप असणाऱ्या, वेदप्रदायिनी देवते,
मी तुला वंदन करत आहे.

हे ऐश्वर्यदेवते,
विशुद्ध व अनुपम जलप्रवाहांनी आणि
फुलाफळांनी समृद्ध असणाऱ्या हे माते,
मी तुला वंदन करत आहे.
श्यामलवर्णी, ऋजुस्वभावी, सुहास्यवदन असणाऱ्या,
आभूषणं परिधान केलेल्या, शृंगाराने विनटलेल्या,
वैभवधारिणी हे माते,
वैविध्यसंपन्न हे माते, मी तुला वंदन करत आहे.

– श्रीअरविंद (CWSA 05 : 467-468)

भारताचे पुनरुत्थान – ०३

‘बंदे मातरम्’ या नियतकालिकामधून
कलकत्ता : दि. १९ फेब्रुवारी १९०८

भारतामध्ये दोन महान मंत्र आहेत, त्यातील एक मंत्र म्हणजे ‘वंदे मातरम्’! हा मंत्र म्हणजे आपल्या मातृभुमीविषयी जागृत झालेल्या प्रेमाची सामूहिक आणि सार्वत्रिक गर्जना आहे. आणखी एक अधिक गुप्त आणि गूढ मंत्रदेखील आहे, पण तो अजूनपर्यंत उघड झालेला नाही. यापूर्वीही एकदा विंध्य पर्वतरांगांमधील संन्याशांनी ‘वंदे मातरम्’ हा मंत्र जगाला दिला होता. परंतु आपल्याच स्वकीयांनी विश्वासघात करून तो गमावला होता. कारण तेव्हा आपले राष्ट्र पुनरुत्थानासाठी परिपक्व झाले नव्हते आणि अकाली झालेली जागृती राष्ट्राला वेगाने अधोगतीकडे घेऊन गेली असती, म्हणून आपण तो मंत्र गमावून बसलो.

परंतु इ. स. १८९७ च्या प्रचंड उलथापालथीमध्ये संन्याशांनी पुन्हा एकदा ती गर्जना ऐकली आणि भारताचे पुनरुत्थान व्हावे ही ‘ईश्वरी’ आज्ञा आहे याची त्यांना जेव्हा जाणीव झाली, तेव्हा पुन्हा एकदा ‘वंदे मातरम्’ हा मंत्र जगासमोर प्रकट करण्यात आला. त्याचा प्रतिध्वनी लोकांच्या अंतःकरणांमध्ये निनादत राहिला आणि जेव्हा काही मोजक्या महान हृदयांमध्ये तो निनाद शांततेमध्ये परिपक्व होत गेला तेव्हा संपूर्ण राष्ट्र त्या मंत्राच्या प्रकटीकरणाविषयी जागृत झाले.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 877)

भारताचे पुनरुत्थान – ०२

१६ एप्रिल १९०७ (दै. बंदे मातरम्) – कलकत्ता

महान आणि प्राचीन भारताच्या गतकालीन गतवैभवाबद्दल अनेक जणं शोक व्यक्त करतात आणि प्राचीन काळातील ऋषी, विचार व सभ्यतेचे प्रेरक निर्माणकर्ते हे जणूकाही आमच्या काळातील वीरयुगाचा एक चमत्कार होते आणि सद्यकालीन क्लेशकारक वातावरणामध्ये आणि अधःपतित माणसांमध्ये अशा लोकांनी पुन्हा जन्मच घेऊ नये, असे म्हणताना आढळतात. परंतु (असे म्हणणे) हा अपराध आहे, त्रिवार अपराध आहे.

आपली भारत भूमी ही शाश्वत भूमी आहे, आपली प्रजा चिरंतन आहे, आपला धर्म सनातन आहे; ज्याचे सामर्थ्य, ज्याची महानता, ज्याचे पावित्र्य हे झाकोळले जाऊ शकेल पण ते कधीच, अगदी एका क्षणभरासाठीसुद्धा पूर्णपणे नष्ट होऊ शकणार नाही. वीरपुरूष, ऋषी, संत हे आपल्या भारत भूमीची नैसर्गिक फलसंपदा आहे आणि भारताच्या इतिहासामध्ये असे एकही युग नव्हते की जेव्हा वीरपुरूष, ऋषी, संत-सत्पुरूष जन्माला आले नव्हते. ज्यामधून नवीन भारत उदयास येत आहे असा, ‘वंदे मातरम्’ हा संजीवक मंत्र ज्यांनी (श्री. बंकिमचंद्र चटर्जी यांनी) आपल्याला दिला, त्यांचे नाव उत्तरकालीन युगातील ऋषींच्या नावामध्ये समाविष्ट केले पाहिजे याची जाणीव, अखेरीस का होईना पण आता आपल्याला झाली आहे.

ऋषी आणि संत यांच्यामध्ये फरक असतो. ऋषींचे जीवन कदाचित त्यांच्या श्रेष्ठ पावित्र्यामुळे किंवा त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या आदर्श सौंदर्यामुळे ठळकपणे नजरेत भरणार नाही. ते स्वतः काय होते यामुळे नव्हे तर, त्यांनी जे काही अभिव्यक्त केले होते यामुळे ते महान ठरू शकतात. आपल्या राष्ट्राला आणि अखिल मानवतेला एक महान आणि चैतन्यदायी संदेश देण्याची आवश्यकता होती आणि हा संदेश शब्दरूपात साकार करण्यासाठी ‘ईश्वरा’ने त्यांच्या (बंकिमचंद्रांच्या) मुखाची निवड केली आहे. एका अतिशय महत्त्वपूर्ण अशा दूरदृष्टीचे प्रकटीकरण होण्याची आवश्यकता होती आणि त्या ‘सर्वशक्तिमान ईश्वरा’ने सर्वप्रथम त्यांची दृष्टी उघडली आहे. त्यांना जी दृष्टी प्रदान करण्यात आली होती, त्यांना जो संदेश प्राप्त झाला होता, तो त्यांनी त्यांच्यामध्ये असलेल्या सर्वसामर्थ्यानिशी, अंतःस्फूर्तीच्या एका परमोच्च क्षणी शब्दांमध्ये अभिव्यक्त करून, संपूर्ण जगासमोर घोषित केला होता. माणसांच्या आंतरतम प्रकृतीला हेलावण्यासाठी, त्यांची मने स्वच्छ करण्यासाठी, त्यांच्या अंत:करणाचा ठाव घेण्यासाठी आणि एरवी, माणसांच्या सामान्य क्षणांमध्ये जे करणे त्यांना अशक्य ठरले असते त्या कृती करण्यास त्यांना प्रवृत्त करण्यासाठी त्या संदेशाचा केवळ उच्चार करणेच पुरेसे होते. त्या शब्दांमध्ये मंत्राचे सामर्थ्य होते, त्या मंत्रवत शब्दांच्या प्रकटीकरणासाठी त्यांचा जन्म झाला होता आणि त्या मंत्राचे ते द्रष्टे होते.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 637)