भारताचे पुनरुत्थान – ०७
भारताचे पुनरुत्थान – ०७
(श्री. अरविंद घोष यांनी मुंबईमध्ये दि. १९ जानेवारी १९०८ रोजी केलेल्या भाषणातील हा मजकूर…)
‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. २३ फेब्रुवारी १९०८
सध्या भारतामध्ये स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणविणारा एक पंथ आहे, हा पंथ तुमच्याकडे (महाराष्ट्रामध्ये) बंगालमधून आलेला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी या पंथाचा स्वीकार केलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवून घेऊ लागलात तेव्हाच तुम्ही त्याचा स्वीकार केला आहे. तुमच्या लक्षात आले का? याचा अर्थ काय होतो हे तुमच्या ध्यानात आले का? तुम्ही कशाचा स्वीकार केला आहे हे तुम्हाला समजले का? का तुम्ही आपण कोणीतरी अधिक श्रेष्ठ आहोत या बौद्धिक ठाम विश्वासाच्या अभिमानापोटी त्या पंथाचा स्वीकार केला आहे?
तुम्ही स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवता. पण राष्ट्रीय विचारसरणी (Nationalism) म्हणजे काय? तर, ती म्हणजे केवळ राजकीय कार्यक्रम नाही. राष्ट्रीय विचारसरणी म्हणजे ईश्वराद्वारे प्रदान करण्यात आलेला एक धर्म आहे. हा असा एक पंथ आहे की ज्यामध्ये तुम्हाला जगावेच लागेल. केवळ एक प्रकारच्या बौद्धिक अभिमानापोटी जर कोणी स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवून घेत असेल, आपण अधिक महान देशभक्त आहोत, जे स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवून घेत नाहीत त्यांच्यापेक्षा आपण कोणीतरी उच्चतर आहोत असे जर एखादा समजत असेल तर त्याने स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणण्याचे धाडस करू नये हे बरे!
तुम्ही जर राष्ट्रप्रेमी बनू इच्छित असाल, तुम्ही जर राष्ट्रीय विचारसरणीच्या धर्माला संमती देऊ पाहत असाल तर तुम्ही ती गोष्ट धार्मिक वृत्तीनेच केली पाहिजे. तुम्ही तुमच्या स्व-देशाच्या मुक्तीसाठी कार्य करणारे ‘ईश्वरा’चे साधन आहात, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवलीच पाहिजे. त्यासाठी तुम्ही ‘ईश्वरा’चे साधन म्हणूनच जीवन जगले पाहिजे.
– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 818-819)
- प्रकृतीचे शुद्धीकरण - August 10, 2026
- अडचणींना कसे हाताळावे? - August 9, 2026
- उच्चतर शक्तीचे अवतरण - August 8, 2026





