ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

आत्मसाक्षात्कार – १२

(प्राणाच्या पृथगात्मतेविषयीचा (individualised) विचार आपण काल केला. आज आपण मनाच्या पृथगात्मतेविषयी श्रीमाताजी काय सांगत आहेत ते समजावून घेऊ.)

तुम्हाला जर स्वयमेव तुमच्या शारीर-मनाची (physical mind) जाणीव झाली तर… बरेच जणं त्याला ‘चव्हाटा’ (public square) असे संबोधतात, कारण तेथे प्रत्येक गोष्ट असते, तेथून प्रत्येक गोष्ट जात असते, पुन्हा परतून येत असते… सर्व संकल्पना तेथे (मनामध्ये) जातात, त्या एका जागी प्रवेश करतात, दुसरीकडून बाहेर पडतात. काही इथे असतात, काही तिथे असतात. अशा रितीने मन म्हणजे जणू एक चव्हाटाच असतो. त्यामध्ये कोणतीही सुव्यवस्था नसते आणि त्यामुळे बहुधा संकल्पना तिथे एकत्र येतात, एकमेकांवर आदळतात आणि मग सर्व तऱ्हेचे गोंधळ उडतात.

परंतु मग कधीतरी एखाद्या दिवशी व्यक्ती सजग होते आणि विचार करू लागते की, ‘माझं मन’ असे मी कशाला बरं म्हणू शकेन? किंवा ‘माझं मन’ म्हणजे काय? व्यक्तीला स्वतःच्या पद्धतीने विचार करायलादेखील अनेक वर्षं लागतात. ही एक साधीशी गोष्ट करण्यामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक वर्षं सजगतेने, अतिशय काळजीपूर्वक, अगदी सयुक्तिक, अतिशय सुसंगत असे काम करावे लागते; सुव्यवस्था लावावी लागते, निवड करावी लागते, घडण करावी लागते. व्यक्तीला असे वाटत असते की, माझी माझी स्वतःची अशी एक विचारसरणी आहे, पण असे अजिबात नसते.

व्यक्ती ज्या लोकांशी संवाद साधत असते, ती जी पुस्तके वाचत असते आणि तिची जी काही मनोवस्था (mood) असते त्यावर ती पूर्णतः अवलंबून असते. तुमचे पचन व्यवस्थित झाले आहे की तुम्हाला अपचन झाले आहे; खुली हवा नसलेल्या एका खोलीत तुम्ही स्वतःला बंदिस्त करून घेतले आहे की, तुम्ही स्वच्छ मोकळ्या हवेत आहात; तुमच्या नजरेसमोर एखादे सुंदर दृश्य आहे, स्वच्छ सूर्यप्रकाश आहे की पाऊस पडत आहे, अशा सगळ्या गोष्टींवर तुमचे त्या त्या वेळचे विचार अवलंबून असतात. आणि तुम्हाला त्याची जाणीवसुद्धा नसते. तुमच्याशी संबद्ध नसलेल्या, पूर्णपणे असंबद्ध अशा ढिगभर गोष्टींचा तुम्ही विचार करत राहता. मात्र एक सुव्यवस्थित, सुसंगत, तर्कसंगत विचारसरणी तयार होण्यासाठी बारकाईने तपशिलवार, प्रदीर्घ काम करण्याची आवश्यकता असते.

यामधील गमतीचा भाग असा की, जेव्हा तुम्ही अशा तऱ्हेची एक सुंदर, सुरचित, सशक्त, शक्तिशाली मानसिक रचना घडविण्यामध्ये यशस्वी होता, नेमकी तेव्हाच तुम्हाला पहिली गोष्ट सांगण्यात येते ती अशी की, “तुम्हाला ईश्वराशी ऐक्य पावण्यासाठी सक्षम व्हायचे असेल तर, या सर्व मानसिक रचना तुम्ही मोडून काढल्या पाहिजेत.” (अर्थात हेही तितकेच सत्य आहे की,) जोपर्यंत तुम्ही ती रचना घडवलेली नसते, तोपर्यंत तुम्ही ईश्वराशी एकरूपही होऊ शकत नाही कारण तोपर्यंत तुम्ही म्हणजे नुसता एक वस्तुंचा ढिगारा असता, तुम्ही ‘तुम्ही’ नसता आणि त्यामुळे त्या वस्तुंच्या ढिगाऱ्याखेरीज ईश्वराला देण्यासारखे तुमच्यापाशी काहीच नसते. आत्मदान करता येण्यापूर्वी व्यक्ती आधी स्वतंत्रपणे अस्तित्वात असली पाहिजे. मी (प्राणाबाबतीत) जे सांगितले तेच मी आत्ता पुन्हा येथे (मनाबाबत) सांगितले. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 258-259)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…

8 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…

1 day ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…

5 days ago