आत्मसाक्षात्कार – ०८
(‘ईश्वरामध्ये आपला अहंकार विलीन करायचा असेल तर, तो कसा करावा, असा प्रश्न एका साधकाने विचारला आहे. त्यावर श्रीमाताजींनी खूप विस्तृत उत्तर दिले आहे.
अहंकार विलीन करण्यापूर्वी आधी व्यक्तीचे स्वत:चे स्वतंत्र असे व्यक्तित्व, एक पृथगात्म व्यक्तित्व, (individualised) निर्माण व्हावे लागते, व्यक्तीचे असे स्वतंत्र व्यक्तित्व नसते तेव्हा तिची अवस्था कशी असते, त्याची आवश्यकता का असते; इत्यादी सर्व गोष्टी श्रीमाताजी येथे तपशिलवार सांगत आहेत. हा भाग विस्तृत असल्याने तो क्रमश: देत आहोत. पण नंतर हे सर्व भाग एकत्रितपणे वाचल्यास सर्व विषय अधिक नेमकेपणाने लक्षात येईल, हे येथे नमूद करावेसे वाटते.)
श्रीमाताजी : ‘ईश्वरा’मध्ये व्यक्तीने आपला अहंकार कसा विलीन करायचा, असे तुम्हाला विचारायचे आहे का? अहंकार विलीन करायचा असेल तर, त्यासाठी व्यक्ती आधी, पूर्णपणे स्वतंत्र, पृथगात्म (individualised) झाली पाहिजे. अन्यथा, अहंकाराचे ईश्वरामध्ये विलीनीकरण करणे शक्य होणार नाही. पूर्णपणे पृथगात्म होणे म्हणजे काय? आणि बाहेरच्या सर्व प्रभावांना प्रतिकार करण्याची क्षमता असणे म्हणजे काय, हे तुम्हाला माहीत आहे का?
काही दिवसांपूर्वी मला एक पत्र आले होते. त्यात त्या पत्रलेखकाने लिहिले होते की, (आध्यात्मिक ग्रंथांव्यतिरिक्त) सामान्य साहित्य उदा. कादंबऱ्या, नाटके इ. पुस्तके वाचण्याबाबत तो जरा नाखूष असतो. कारण त्या पुस्तकामध्ये ज्या व्यक्तिरेखा रंगविलेल्या असतात त्यांचे प्रभाव ग्रहण करण्याची आणि त्या व्यक्तिरेखांच्या भावना, त्यांचे विचार यानुसार, आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे जगायला सुरुवात करण्याची न टाळता येण्याजोगी एक प्रवृत्ती त्याच्या प्रकृतीमध्ये आहे.
तुम्हाला कल्पना नाहीये, पण तुम्हाला वाटते त्यापेक्षा अनेक जणं या पत्रलेखकासारखी असतात. अशा व्यक्ती जेव्हा एखादे पुस्तक वाचतात तेव्हा ते वाचताना, स्वत:मध्ये तशा प्रकारच्या (पुस्तकात वर्णन केल्यासारख्या) भावना, विचार, इच्छा, हेतू, वेगवेगळ्या योजना त्यांना जाणवू लागतात; इतकेच काय पण त्या पुस्तकामध्ये वर्णन करण्यात आलेले आदर्शसुद्धा अशा व्यक्ती मानू लागतात. ते जणूकाही त्या पुस्तकाच्या वाचनात वाहवत जातात. आणि त्याची त्यांना जाणीवसुद्धा नसते, कारण अशा व्यक्तींचा नव्याण्णव टक्के स्वभाव हा जणू मऊ लोण्याने बनलेला असतो. त्याच्यावर अंगठ्याने थोडा जरी दाब दिला तर, त्याच्यावर त्या अंगठ्याचा ठसा उमटतो.
आणि (त्यांच्या बाबतीत) प्रत्येक गोष्टच ही त्या ‘अंगठ्या’सारखी असते. म्हणजे एखादा अभिव्यक्त झालेला विचार असेल, एखादे वाचलेले वाक्य असेल, एखादी पाहिलेली वस्तू असेल किंवा दुसरी एखादी व्यक्ती काय करत आहे याचे निरीक्षण करणे असेल किंवा शेजाऱ्याच्या इच्छेचे निरीक्षण करणे असेल, अशा साऱ्या गोष्टीच जणू त्या ‘अंगठ्यासारख्या’ ठसा उमटविणाऱ्या असतात. आणि मग व्यक्ती जेव्हा त्यांच्याकडे पाहते तेव्हा त्या साऱ्या इच्छा तिथेच (व्यक्तीच्या आतमध्येच) असतात, एकमेकांमध्ये अगदी मिसळून गेलेल्या असतात, (श्रीमाताजी हाताची बोटे एकमेकांत गुंफून दाखवितात) त्यातील प्रत्येक इच्छाच दुसऱ्या इच्छेवर वरचढ होण्याचा प्रयत्न करत असते आणि परिणामतः अंतरंगामध्ये आणि बाहेर एक प्रकारचा सततचा झगडा चालू असतो. जणू विद्युतप्रवाह बाहेर पडावा तसा तो माणसांमधून बाहेर पडत असतो आणि आत जात असतो; आले लक्षात?
व्यक्तीला या सगळ्याची जाणीवदेखील नसते. त्या सर्वच इच्छा स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांचा परस्परांमध्ये अखंड झगडा चालू असतो आणि त्यामध्ये जी इच्छा सर्वात प्रबळ असते, ती यशस्वी होते. परंतु या इच्छा अनेकविध असल्याने आणि त्या सगळ्यांशी व्यक्तीला एकाकी झुंज द्यावी लागत असल्याने, हा झगडा सोपा नसतो. त्यामुळे समुद्राच्या लाटांवर एखादा लाकडाचा तुकडा जसा खालीवर हेलकावे खात असतो तशी व्यक्तीची अवस्था होते (व्यक्तीचे स्वतंत्र, पृथगात्म व्यक्तित्व नसते तेव्हा व्यक्तीची अशी अवस्था असते.)… (क्रमश:)
– श्रीमाताजी (CWM 06 : 256-257)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…