ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

भारताचे पुनरुत्थान – ११

भारताचे पुनरुत्थान – ११

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. ०५ मार्च १९०८

भारताला आता जर का एका महान सामाजिक क्रांतीची आवश्यकता असेल तर ती याच कारणासाठी की, भारताचा प्राचीन व अविचल आत्मा ज्यामधून अभिव्यक्त होऊ शकत नाही अशा रूपांशी आपण अजूनही जखडून राहिलो तर, त्यामुळे स्वराज्याचा आदर्श सिद्धीस जाऊ शकणार नाही. भारतमातेने भूतकाळात पांघरलेली जीर्ण वस्त्रं बदलली पाहिजेत म्हणजे तिचे सौंदर्य पुन्हा एकदा उजळून निघेल. तिने तिच्या देहरूपामध्येदेखील बदल केला पाहिजे म्हणजे त्यामधून तिचा आत्मा नव्याने अभिव्यक्त होऊ शकेल. असा बदल केला तर ती युरोपाची नक्कल होईल अशी भीती बाळगण्याचे काही कारण नाही. कारण तिची व्यक्तिविशिष्टता (individuality) इतकी बलशाली आहे की, तिच्याबाबतीत अशा प्रकारचे अवमूल्यन होऊच शकणार नाही. तसेच तिचा आत्मा एवढा स्थिरचित्त आणि स्वयंपूर्ण आहे की, ती अशा तऱ्हेची शरणागती पत्करणेही शक्य नाही.

भारतामध्ये पुन्हा आर्थिक क्रांतीची आवश्यकता असेल तर ती एवढ्यासाठीच की, अन्यथा वाणिज्य-क्षेत्रातील व उद्योग-क्षेत्रातील स्वराज्याला तिच्या जुन्या औद्योगिक जीवनाच्या सुरेख पण अरूंद इमारतीमध्ये वाव मिळणार नाही. स्वतंत्र आणि परिपूर्ण राष्ट्रीय जीवनाच्या औद्योगिक उर्जांना बलशाली क्षेत्राची आणि विशाल जलप्रवाहांची आवश्यकता असते. युरोपने आत्ता ज्याप्रमाणे मानवतेच्या उदात्त भावभावनांची पायमल्ली चालविली आहे, तशाच प्रकारच्या रोगग्रस्त आणि विस्कळीत समाजस्थितीमध्ये आर्थिक क्रांती आपल्याला नेऊन ठेवेल अशी भीती बाळगण्याचेदेखील कारण नाही. जी शिकवण म्हणजे भारतमातेचे जणू जीवनच आहे, जी तिच्या अमरत्वाचे रहस्य आहे अशी शिकवण ही – पाश्चात्त्य देशांमध्ये ‘उद्योगधंद्या’च्या नावाखाली संघटित स्वार्थीपणा, क्रूरपणा आणि लोभ, हाव यांना जी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे – त्याचीच प्रतिकृती ठरण्याइतपत कदापिही विस्मरणात जाऊ शकणार नाही. भारतमाता स्वत:ची परिस्थिती स्वतः निर्माण करेल, समाजामध्ये व्यवस्थेचे रहस्य शोधण्यासाठी समाजवाद जो व्यर्थ आटापिटा करत असतो ते रहस्य भारतमाता शोधून काढेल आणि जग व आत्मा यांच्यामध्ये सुसंवाद कसा प्रस्थापित करायचा असतो हेदेखील ती पृथ्वीवासियांना पुन्हा एकदा शिकवेल.

सध्या जे काही घडत आहे त्यामध्ये एक महान आणि महत्त्वाचे रूपांतर घडून येत आहे, आणि हे रूपांतर केवळ आपल्यासाठीच नव्हे तर अखिल जगासाठी महत्त्वाचे असणार आहे, याचा बोध आपल्याला होऊ शकला आणि त्यामागील सत्य आपल्याला प्रतीत झाले तर येणाऱ्या काळात, कोणतीही भीती वा शंका न बाळगता आपण स्वतःला त्यात झोकून देऊ.

भारत हा राष्ट्रांचा गुरू आहे. मानवी जिवाला गंभीर आजारांमधून बाहेर काढणारा जणू धन्वंतरी म्हणजे भारत आहे. जगत्-जीवनाची पुन्हा एकवार नवरचना करावी आणि मनुष्याला त्याच्या आत्म्याची शांती पुन्हा एकदा प्राप्त करून द्यावी हे भारताचे नियत कार्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 905-906)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…

14 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…

5 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…

6 days ago