श्रीमाताजी आणि समीपता – १५
माणसं ज्याला ‘प्रेम’ असे संबोधतात तशा प्रकारची सामान्य प्राणिक भावना ‘ईश्वराभिमुख’ प्रेमामध्ये असता कामा नये; कारण सामान्य प्रेम हे प्रेम नसते, तर ती केवळ एक प्राणिक वासना असते, उपजत प्रवृत्ती असते, आणि स्वामित्वाची व वर्चस्व गाजविण्याची ती प्रेरणा असते. हे दिव्य ‘प्रेम’ तर नसतेच, पण इतकेच नव्हे तर ‘योगा’मध्ये या तथाकथित प्रेमाचा अंशभागसुद्धा मिसळलेला असता कामा नये. ईश्वराबद्दलचे खरे प्रेम म्हणजे आत्मदान (self-giving) असते, ते निरपेक्ष असते, ते शरणागती आणि समर्पण यांनी परिपूर्ण असते; ते कोणताही हक्क सांगत नाही, ते कोणत्याही अटी लादत नाही, कोणताही व्यवहार करत नाही; मत्सर, अभिमान किंवा क्रोधाच्या हिंसेमध्येही सहभागी होत नाही कारण या गोष्टी मूलतःच सामान्य प्रेमामध्ये नसतात.
खऱ्या प्रेमाला प्रतिसाद म्हणून, ‘दिव्य माता’ स्वतःच तुमची होऊन जाते, अगदी मुक्तपणे! अर्थात हे सारे आंतरिकरित्या घडत असते. तिची उपस्थिती तुम्हाला तुमच्या मनात, तुमच्या प्राणामध्ये, तुमच्या शारीरिक चेतनेमध्ये जाणवते; तिची शक्ती तुमचे दिव्य प्रकृतीमध्ये पुनःसृजन करत असल्याचे तुम्हाला जाणवते; ती तुमच्या अस्तित्वाच्या साऱ्या वृत्ती-प्रवृत्ती हाती घेऊन त्यांना पूर्णत्वप्राप्तीचे आणि कृतार्थतेचे वळण देत असल्याचे तुम्हाला जाणवते; तिचे प्रेम तुम्हाला कवळून घेत आहे आणि आपल्या कडेवर घेऊन ती तुम्हाला ईश्वराच्या दिशेने घेऊन चालली आहे, असे तुम्हाला जाणवू लागते. या गोष्टींचा अनुभव यावा आणि अगदी जडभौतिकापर्यंत तुमचे सर्वांग तिने व्यापून टाकावे अशी आस तुम्ही बाळगली पाहिजे. आणि येथे काळाची किंवा पूर्णतेची कोणतीच मर्यादा असत नाही. एखादी व्यक्ती जर खरोखरच तशी आस बाळगेल आणि तिला ईप्सित ते साध्य होईल तर, तेथे अन्य कोणत्याही गोष्टीसाठी किंवा एखादी इच्छा पूर्ण झाली नाही वगैरे गोष्टींना वावच उरणार नाही. व्यक्ती जर खरोखर तशी आस बाळगेल तर तिला ते निश्चितपणे प्राप्त होते, व्यक्तीचे जसजसे शुद्धीकरण होत जाईल आणि तिच्या प्रकृतीमध्ये आवश्यक असणारा बदल जसजसा होत जाईल तसतसे तिला ते अधिकाधिक प्राप्त होते.
कोणत्याही स्वार्थी हक्काच्या आणि इच्छांच्या मागण्यांपासून मुक्त असे तुमचे प्रेम असू द्या; तसे ते झाले तर तुम्हाला असे आढळेल की, तुम्ही जेवढे पेलू शकता, आत्मसात करू शकता तेवढे सर्व प्रेम प्रतिसादरूपाने तुम्हाला मिळत आहे.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 461)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…