साधना, योग आणि रूपांतरण – ३११
रूपांतरण
(रूपांतरण प्रक्रिया कशी स्वारस्यपूर्ण असते व त्यादरम्यान व्यक्तीला स्वत:विषयी कसे नवनवे शोध लागतात, हे आपण कालच्या भागात समजावून घेतले.)
उदाहरणादाखल, एका अगदी साध्याशा निश्चयाचा विचार करू या. (तो वरवर पाहता साधासा आहे.) “मी पुन्हा कधीही खोटं बोलणार नाही,” असे तुम्ही ठरविता. आणि अचानकपणे, तुम्हाला माहीतही नसते की तुम्ही खोटं का आणि कसे बोललात; पण तुम्ही अनाहूतपणे खोटं बोलता आणि बोलणं झाल्यानंतर मग ते तुमच्या लक्षात येते. तुम्ही म्हणता, “पण हे काही बरोबर नाही. मी जे आत्ता काही बोललो ते बरोबर नाही. मला काही तरी वेगळेच म्हणायचे होते.” मग तुम्ही शोध घेता. “हे असे कसे काय घडले? मी असा कसा विचार केला आणि मी असे कसे काय बोललो? माझ्या तोंडातून हे उद्गार कोणी काढले? मला असे बोलण्यास कोणी भाग पाडलं?…” असा खूप शोध तुम्ही घेता. अशा वेळी तुम्ही स्वतःच्या वागण्याचे समर्थन करता आणि म्हणता की, “ते उद्गार माझे नव्हते, ते बाहेरून आले होते” किंवा “ती गोष्ट अनाहूतपणे झाली होती, तो एक निसटता क्षण होता.” आणि नंतर मग तुम्ही त्याचा विचारही करत नाही. आणि मग पुन्हा पुढच्या वेळी तीच गोष्ट घडते.
त्या ऐवजी तुम्ही जर शोध घेतलात, “तुमच्यामधील जो कोणी खोटं बोलत आहे त्याचा हेतू काय असेल?” आणि मग तुम्ही शोध घेतच राहता, आणि मग तुम्हाला तुमच्यामध्येच एका कोपऱ्यात असे काहीतरी दडलेले आढळते की जे स्वतःला पुढे दामटू पाहात असते, किंवा ते त्याचा दृष्टिकोन ठामपणे रेटू इच्छित असते. (अनेकानेक कारणं सांगता येऊ शकतात.) लोकांचे तुमच्याविषयी मत चांगले झाले पाहिजे आणि तुम्ही कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती आहात असे त्यांना वाटले पाहिजे, म्हणून तुम्ही वस्तुतः जसे आहात त्याच्यापेक्षा तुम्ही काहीसे वेगळे असल्याचे ते भासवत असते. आणि तो तुमच्यामधील खोटं बोलण्यास प्रवृत्त झालेला घटक असतो. तुमच्या सक्रिय चेतनेमधून नाही, तर तुमच्या चेतनेच्या पाठीमागे जे दडून बसले होते त्याने तुम्हाला खोटं बोलण्यास भाग पाडलेले असते. तुम्ही जेव्हा सजग नसता तेव्हा मग तो घटक तुमचे तोंड, तुमची जीभ वापरतो आणि तुमच्या तोंडातून ते वदवून घेतो. आणि अशा रीतीने तुमच्या तोंडातून खोटं बाहेर पडते.
मी तुम्हाला हे एक उदाहरण दिले. अशी लाखो उदाहरणं आहेत आणि हे सारे मोठे रोचक असते. आणि व्यक्तीला स्वतःच्या अंतरंगामध्ये या सगळ्याचा शोध लागतो, आणि ती प्रामाणिकपणे म्हणते, “मला यामध्ये बदल केलाच पाहिजे,” तेव्हा तिला असे आढळते की, आता तिला एक प्रकारची आंतरिक स्वच्छ दृष्टी प्राप्त झालेली आहे. आणि मग इतरांमध्येसुद्धा कसे, काय चाललेले असते याविषयी ती हळूहळू सजग होऊ लागते आणि त्यांनी जसे वागावे असे या व्यक्तीला वाटत असते तसे जरी समोरची व्यक्ती वागली नाही तरीही आता त्याचा व्यक्तीला राग येत नाही. उलट गोष्टी कशा घडतात ते व्यक्तीला कळायला लागते; अमुक एक व्यक्ती ‘अशी का आहे’, ‘प्रतिक्रिया कशा तयार होतात’ हे आता व्यक्तीला उमगू लागते. आणि या ज्ञानामुळे व्यक्ती आता (रागराग करत नाही) तर नुसतेच स्मित करते. आता ती व्यक्ती कठोरपणे निष्कर्ष काढत नाही, तर आता व्यक्ती स्वतःमधील आणि इतरांमधील अडचणी दिव्य चेतनेला अर्पण करते. त्या अडचणींच्या अभिव्यक्तीचे केंद्र कोणते का असेना, त्यामध्ये रूपांतरण घडून यावे यासाठी व्यक्ती त्या गोष्टी दिव्य चेतनेला अर्पण करते.
– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…