साधना, योग आणि रूपांतरण – ३०९
रूपांतरण
(व्यक्ती स्वतःला हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बंदिस्त करून घेऊ शकत नाही. हे मानसिक स्तरावर कसे व का अवघड असते ते कालच्या भागात पाहिले.)
तुम्ही केलेले काम शंभर वेळा बिघडेल, तुम्ही एकशे एक वेळा ते पुन्हा कराल. ते काम हजार वेळा होत्याचे नव्हते होईल, तरीसुद्धा तुम्ही ते पुन्हा एकदा कराल आणि मग एक वेळ अशी येईल की जेव्हा ते ’होत्याचे नव्हते’ होणार नाही.
व्यक्ती जर एकाच घटकाने बनलेली असती तर मग हे सोपे झाले असते. पण व्यक्ती अनेक घटकांनी मिळून बनलेली असते. आणि त्यामुळे असे होते की, अग्रभागी असणारा असा एखादा घटक असतो, त्याने (अमुक एका गोष्टीमध्ये सुधारणा होण्यासाठी) खूप परिश्रम केलेले असतात, तो खूप सचेत असतो आणि नेहमी जागरूक असतो आणि तो जेव्हा सक्रिय असतो तेव्हा सारे काही सुरळीत चाललेले असते; म्हणजे तेव्हा व्यक्ती स्वतःमध्ये कोणत्याही विरोधी गोष्टींना प्रवेश करू देत नाही, तेव्हा ती अगदी सजग असते आणि मग… व्यक्ती झोपी जाते, आणि दुसऱ्या दिवशी जागी होते तेव्हा आता दुसराच एखादा घटक सक्रिय झालेला असतो आणि मग व्यक्ती स्वतःच्या मनाशी म्हणते, “पण मी कालपर्यंत केलेल्या कामाचे काय झाले, ते सगळे काम कुठे गेले?”… आणि मग व्यक्तीला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागते.
सर्व घटकांना चेतनेच्या क्षेत्रामध्ये नेऊन, त्या सर्व घटकांमध्ये एक एक करून, जोवर परिवर्तन होत नाही तोपर्यंत व्यक्तीला पुन्हा पुन्हा अशी नव्याने सुरुवात करावी लागते. आणि मग जेव्हा तुमच्या परिश्रमांची परिसीमा होते तेव्हा मग परिवर्तन घडून येते, आता तुम्ही प्रगतीचा एक टप्पा पार केलेला असतो. नंतर पुन्हा, प्रगतीचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी तुम्हाला स्वतःला तयार करावे लागते. पण तरीही तोवर निदान एक टप्पा तरी पार पडलेला असतो. अशा रीतीने व्यक्तित्वाचे सर्व घटक जेव्हा एका पाठोपाठ एक या पद्धतीने पृष्ठभागावर आणले जातात आणि तुम्ही जोपर्यंत त्या सर्व घटकांवर अगदी निरपवादपणे, चेतना, इच्छा आणि तुमचे ध्येय यांचा प्रकाश टाकत नाही तोपर्यंत हे असे करत राहावे लागते. सर्व गोष्टींमध्ये परिवर्तन होईल अशा पद्धतीने तुम्हाला हे करत राहावे लागते. आणि मग तेव्हा कुठे व्यक्तित्वाचे संपूर्ण रूपांतरण झालेले असते.
तुमचा उत्साहभंग करण्यासाठी मी हे सांगत नाहीये, पण मी तुम्हाला जाणीव करून देऊ इच्छिते. नंतर मग तुम्ही असे म्हणता कामा नये की, “मला हे इतके अवघड आहे हे आधी माहीत असते तर मी या गोष्टीची सुरुवातच केली नसती.” हे सारे अतिशय अवघड आहे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. दृढ निश्चयाने प्रारंभ करा आणि जरी यामध्ये यश येण्यासाठी कितीही दूरवरची वाटचाल करावी लागली तरी ते पूर्णत्वास जाईपर्यंत कार्यरत राहा. त्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. (क्रमश:)
– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…