ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

अनुभवांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन

साधना, योग आणि रूपांतरण – ९३

“व्यक्तीने नेहमी तिच्या अनुभवांपेक्षा अधिक महान असले पाहिजे.”

म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, तुम्हाला आलेल्या अनुभवाचे स्वरूप कोणतेही असले, त्याचे सामर्थ्य किंवा त्याची अद्भुतता कितीही असली तरी, त्या अनुभवाचा तुमच्यावर वरचष्मा असता कामा नये. म्हणजे त्यामुळे तुमचा तोल ढळता कामा नये आणि तुमच्या योग्य आणि स्थिरशांत दृष्टिकोनाबरोबर असलेला तुमचा संपर्कही ढळता कामा नये. म्हणजे, त्याने तुमच्या समग्र अस्तित्वाचे नियंत्रण करता कामा नये. इतके तुम्ही त्याच्या आधीन होता कामा नये.

म्हणजे असे की, जेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा अधिक बलवान असलेल्या एखाद्या शक्तीच्या किंवा चेतनेच्या संपर्कात येता तेव्हा, या चेतनेचे किंवा त्या शक्तीचे तुमच्यावर पूर्णपणे वर्चस्व चालवू देण्याऐवजी, तुम्ही स्वतःला नेहमी याची आठवण करून दिली पाहिजे की, शेकडो-हजारो अनुभवांमधील हा केवळ एक अनुभव आहे आणि परिणामी, त्याचे स्वरूप परिपूर्ण नाही, तर ते सापेक्ष आहे. (त्यामुळे) आलेला अनुभव कितीही सुंदर असला तरी, तुम्हाला त्याहूनही सुंदर असे अनुभव येऊ शकतात आणि आलेही पाहिजेत. तो अनुभव कितीही अपवादात्मक असेना का, त्याहूनही अधिक उत्कृष्ट अनुभव असतात. तुम्हाला आलेला तो अनुभव कितीही उच्च असेना का, तुम्ही भविष्यामध्ये नेहमीच त्याहून अधिक उच्चतर अनुभवाप्रत पोहोचू शकता. आणि अशा प्रकारे, त्याचा अहंकार होऊ न देता, तो अनुभव म्हणजे विकसनाच्या साखळीतील एक अनुभव आहे, या दृष्टीने तुम्ही त्याच्याकडे पाहता आणि एक निरामय शारीरिक संतुलन कायम ठेवू शकता. आणि त्यामुळे सामान्य जीवनाबरोबर असलेली सापेक्षतेची जाणीवही तुम्ही गमावत नाही. तुम्ही अशा प्रकारे वागलात, तर मग कोणताही धोका असत नाही. हे कसे करायचे असते हे ज्याला माहीत असते त्याला तसे करणे नेहमीच अगदी सोपे वाटते, परंतु हे कसे करायचे असते हे ज्याला माहीत नसते त्याला ते काहीसे अवघड वाटू शकते. हे करण्याचा एक मार्ग आहे.

ईश्वरी कृपा म्हणजे परमेश्वराची अभिव्यक्ती आहे. त्या कृपेप्रति संपूर्ण आत्मदान ही जी संकल्पना आहे ती कधीही विस्मरणात जाता कामा नये. तुम्ही जेव्हा स्वतःला ईश्वराप्रति देऊ करता, तुम्ही जेव्हा समर्पित होता; सर्वातीत, सर्व निर्मितीच्या अतीत असणाऱ्या त्या ईश्वराच्या हाती जेव्हा तुम्ही स्वतःला संपूर्णपणे सोपविता, आणि त्या अनुभवापासून काही वैयक्तिक लाभ मिळवू पाहण्याऐवजी, तुम्ही ईश्वरी कृपेला तो अनुभव अर्पण करता आणि तो अनुभव हा ईश्वराकडून आलेला आहे आणि त्याचे फल तुम्ही त्यालाच परत केले पाहिजे हे जाणता तेव्हा, तुम्ही बऱ्यापैकी सुरक्षित असता.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, कोणतीही महत्त्वाकांक्षा नको, प्रौढी नको, किंवा अभिमानदेखील नको. तुमच्यापाशी प्रामाणिक आत्मदान, प्रामाणिक विनम्रता असेल तर तुम्ही सर्व संकटांपासून सुरक्षित असता. “व्यक्तीने तिच्या अनुभवांपेक्षा अधिक महान असले पाहिजे” असे मी जेव्हा म्हणते तेव्हा मला हा अर्थ अभिप्रेत असतो.

– श्रीमाताजी (CWM 08 : 277-278)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…

19 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…

5 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…

6 days ago