ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – ४०

(ध्यानाची उद्दिष्टे काय असावीत यासंबंधीचा विचार आपण येथे समजावून घेत आहोत. त्याचा हा पूर्वार्ध…)

कधीकधी एखाद्या विशिष्ट विषयावर विचारांची एकाग्रतापूर्वक मालिका या स्वरूपात ‘ध्यान’ (meditation) करायला सांगितले जाते; तर कधीकधी एका विशिष्ट प्रतिमेवर, शब्दावर किंवा संकल्पनेवर मनाची अनन्य एकाग्रता स्थिर करण्यास सांगण्यात येते. येथे ‘ध्यान’ म्हणण्यापेक्षा स्थिर असे ‘निदिध्यासन’ (contemplation) अपेक्षित असते. उपरोक्त दोन पद्धतींव्यतिरिक्त, ध्यानाच्या अन्य पद्धतीही असतात. त्यामुळे या दोन किंवा अधिक पद्धतींमधील निवड ही आपण योगामध्ये आपल्यासमोर कोणते उद्दिष्ट ठेवतो यावर अवलंबून असते.

सद्यस्थितीत विचारी मन (thinking mind) हे आपल्या हाती असणारे असे एक साधन आहे की, ज्याच्या साहाय्याने आपण आपल्या आंतरिक अस्तित्वाचे सचेत रीतीने आत्म-व्यवस्थापन करू शकतो. परंतु बहुतांशी व्यक्तींमध्ये, विचार म्हणजे विविध संकल्पना, संवेदना आणि प्रभाव यांचा एक गोंधळलेला प्रवाह असतो….

ज्याप्रमाणे शरीराच्या कार्यप्रणालीवर व प्राणिक क्रियांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी हठयोग्यांकडून स्थिर आसन व सुनियंत्रित श्वसनाच्या प्रक्रिया (प्राणायाम) उपयोगात आणल्या जातात, अगदी त्याचप्रमाणे मनाच्या कार्यप्रणालीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी राजयोग्यांकडून ‘विचारांची एकाग्रता’ ही प्रक्रिया उपयोगात आणली जाते. ध्यानाद्वारे आपण आपल्या चंचल मनाला ताळ्यावर आणतो आणि त्याच्या सर्व ऊर्जांची बचत व्हावी आणि त्या ऊर्जा कोणत्यातरी ईप्सित ज्ञानाच्या प्राप्तीवर किंवा स्वयंशिस्तीवर केंद्रित करता याव्यात यासाठी आपण मनाला एखाद्या व्यायामपटूप्रमाणे प्रशिक्षण देतो. ही गोष्ट माणसं सहसा सामान्य जीवनामध्येही करत असतात परंतु ‘प्रकृती’च्या या उच्चतर कार्यप्रणालीला ‘योग’ आपल्या हाती घेतो आणि तो तिला तिच्या संपूर्ण शक्यतांपर्यंत घेऊन जातो. मन ज्योतिर्मय रीतीने एका विचारवस्तुवर केंद्रित केले असता, आपण सार्वत्रिक ‘चेतने’मधील प्रतिसादाला जाग आणू शकतो आणि त्याच्याद्वारे त्या वस्तुविषयीचे ज्ञान आपल्या मनात ओतले जाऊन, आपल्या मनाचे समाधान केले जाते; किंवा त्याच्याद्वारे, त्या वस्तुचे केंद्रवर्ती किंवा मूलभूत सत्यदेखील आपल्यापाशी उघड केले जाते, योग या तथ्याची दखल घेतो.

(ध्यानाद्वारे) आपण ईश्वरी ‘शक्ती’चा प्रतिसाददेखील जागृत करत असतो, आणि त्यामुळे आपण ज्याचे ध्यान करतो त्याच्या कार्यप्रणालीवर आपल्याला विविध मार्गांनी चढतेवाढते प्रभुत्व मिळविता येते किंवा आपण ज्याचे ध्यान करतो ती गोष्ट आपल्यामध्ये निर्माण करण्यास किंवा आपल्यामध्ये ती सक्रिय करण्यास तो ‘ईश्वरी’ शक्तीचा प्रतिसाद आपल्याला सक्षम बनवितो. (उदाहरणार्थ) अशा प्रकारे, ‘दिव्य प्रेमा’च्या संकल्पनेवर आपण मन केंद्रित केले तर आपल्याला त्याच्या तत्त्वाचे आणि त्याच्या कार्यप्रणालीचे ज्ञान होते, आपण त्याच्याशी सायुज्य पावू शकतो, ते ‘दिव्य प्रेम’ आपल्या स्वतःमध्ये विकसित करू शकतो आणि आपले हृदय व आपली इंद्रिये त्याच्या धर्माचे पालन करतील याकडे आपण लक्ष पुरवू शकतो. (क्रमश:)
– श्रीअरविंद (CWSA 13 : 445-446)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

2 hours ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago