ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

सत्याप्रत जाण्याचा पूर्णयोगाचा मार्ग

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२९)

महत्तर चेतना जर मनाच्या अतीत असेल आणि त्या चेतनेप्रत आपण पोहोचू शकलो तरच आपण त्या ‘परब्रह्मा’ला जाणू शकतो आणि त्यामध्ये प्रवेश करू शकतो. अशा प्रकारची महत्तर चेतना असते किंवा नाही यासंबंधीची कोणतीही बौद्धिक अटकळ, तार्किक विचार यांच्या आधारे आपण प्रगतिपथावर फार दूरवर जाऊन पोहोचू शकत नाही. परब्रह्माची अनुभूती मिळविण्यासाठी, तेथपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी, आणि त्यामध्येच जीवन जगण्यासाठी आपल्याला एका मार्गाची आवश्यकता असते. आपल्याला जर तो मार्ग सापडला तर, बौद्धिक अटकळ आणि तर्क हे अपरिहार्यपणे अगदी दुय्यम स्थानी जाऊन पडले पाहिजेत आणि (तसे झाल्यास) त्यांच्या असण्याचे प्रयोजनच शिल्लक राहणार नाही. तरीही तत्त्वज्ञान, ‘सत्या’ची बौद्धिक अभिव्यक्ती या गोष्टी शिल्लक राहू शकतील. आणि प्रामुख्याने, या महान शोधाला अभिव्यक्त करण्याचे साधन म्हणूनच त्या गोष्टी असतील आणि ती परब्रह्माची अनुभूती मानसिक परिभाषेमध्ये मांडता येत असेल, आणि शक्य असेल तेवढ्या प्रमाणात ती मांडली तर, आशय तेवढा शिल्लक राहील आणि तोही अशा लोकांसाठी शिल्लक राहील की जे अजूनही मानसिक बौद्धिक स्तरावरच जीवन जगत आहेत.

(बुद्धीच्या आधारे ‘परतत्त्वा’चे, ‘सत्या’चे आकलन करून घेण्याच्या भारतीय किंवा पाश्चात्त्य चिंतनांबद्दल विस्ताराने ऊहापोह करून झाल्यानंतर, हे प्रयत्न कसे अपुरेच ठरतात, यासंबंधी श्रीअरविंद यांनी आधी सांगितले आहे. आणि आता, ‘पूर्णयोगा’च्या परिभाषेत ‘सत्य’ कशाला म्हणायचे हे श्रीअरविंद येथे सांगत आहेत…)

अखिल ब्रह्माचा ‘बुद्धिपूर्वक विचार’ केल्याने नव्हे तर, चेतनेच्या परिवर्तनामुळे व्यक्ती अज्ञानातून ‘ज्ञाना’कडे जाऊ शकते. हे ‘ज्ञान’ अशा प्रकारचे असते की, आपण जे जाणतो ते आपण स्वतः बनतो. बाह्यवर्ती चेतनेमधून थेट आणि सखोल आंतरिक चेतनेमध्ये प्रवेश करणे, अहंकार आणि शरीराच्या कक्षा ओलांडून चेतना विशाल करणे, आंतरिक संकल्प आणि अभीप्सेद्वारा चेतना उन्नत करणे आणि मनाच्या अतीत होईपर्यंत चेतनेचे आरोहण करत करत, तिला ‘प्रकाशा’प्रत खुली करणे, आत्मदान आणि समर्पणाच्या माध्यमातून अतिमानसिक ‘ईश्वरा’चे अवतरण घडविणे आणि परिणामतः मन, प्राण आणि शरीराचे रूपांतर घडविणे हा ‘सत्या’प्रत जाण्याचा ‘पूर्णयोगा’चा मार्ग आहे. याला इथे आम्ही ‘सत्य’ असे संबोधतो आणि आमच्या ‘योगा’मध्ये (‘पूर्णयोगा’मध्ये) तेच आमचे ध्येय असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 352 and 355)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४५

अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…

18 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…

5 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४०

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…

6 days ago