ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१६)

चेतनेच्या दोन अवस्था असतात; त्यांपैकी कोणत्याही एका अवस्थेमध्ये व्यक्ती जीवन जगू शकते. एक अवस्था असते ती म्हणजे जीवनलीलेच्या वर राहून तिला नियंत्रित करणारी ‘उच्चतर चेतना’. तिला ‘जीवात्मा’, ‘आत्मा’, ‘ईश्वर’ अशा विविध नावांनी संबोधण्यात येते. दुसरी अवस्था असते ती म्हणजे, माणसं ज्या चेतनेमध्ये जगत असतात ती ‘सामान्य चेतना.’ ही चेतना काहीशी वरवरची असते आणि ती जीवनलीलेसाठी ‘आत्म्या’ चे एक साधन म्हणून उपयोगात आणली जाते.

सामान्य चेतनेमध्ये राहून कृती करणारी, जीवन जगणारी माणसं मनाच्या सामान्य आंदोलनांनी संपूर्णपणे संचालित केली जातात आणि ती साहजिकच दुःख, सुख व काळजी, इच्छावासना आणि तत्सम सर्व गोष्टींच्या, म्हणजे ज्या गोष्टींनी हे सर्वसामान्य जीवन बनलेले असते, त्या गोष्टींच्या आधीन असतात. त्यांना मानसिक शांती आणि आनंद मिळू शकतो, पण ती शांती आणि तो आनंद कधीच चिरस्थायी किंवा सुरक्षित असू शकत नाही.

प्रकाश, शांती, शक्ती आणि परमानंद या सर्व गोष्टी म्हणजे ‘आध्यात्मिक चेतना.’ एखादी व्यक्ती जर संपूर्णपणे अशा चेतनेमध्येच राहू शकली तर काही प्रश्नच नाही; स्वाभाविकपणे आणि सुरक्षितपणे या सर्व गोष्टी तिला लाभतात. पण एखादी व्यक्ती अंशत: जरी त्यामध्ये राहू शकली किंवा व्यक्तीने स्वतःला सातत्यपूर्वक त्या चेतनेप्रत खुले ठेवले, तर जीवनातील धक्क्यांमधून सुरक्षितरित्या बाहेर पडण्यासाठी पुरेशा प्रमाणात आध्यात्मिक प्रकाश, शांती, सामर्थ्य आणि आनंद या गोष्टी तिला प्राप्त होतात. या आध्यात्मिक चेतनेला खुले झाल्याचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीला काय प्राप्त होणार आहे हे ती व्यक्ती कशाचा शोध घेत आहे, यावर अवलंबून असते; व्यक्ती जर शांतीच्या शोधात असेल तर तिला शांती लाभते; व्यक्तीला जर प्रकाश वा ज्ञान हवे असेल तर ती महान प्रकाशामध्ये जीवन जगू लागते आणि सामान्य माणसाचे मन मिळवू शकेल त्यापेक्षा कितीतरी अधिक सखोल व अधिक सत्य असे ज्ञान तिला प्राप्त होते. व्यक्ती जर शक्ती वा सामर्थ्य मिळवू इच्छित असेल तर व्यक्तीला आंतरिक जीवनासाठी आध्यात्मिक सामर्थ्य किंवा बाह्य कार्य व कृती यांचे नियमन करणारी ‘योगिक’ शक्ती प्राप्त होते; अशा व्यक्तीला जर आनंद हवा असेल तर, सामान्य मानवी जीवन देऊ शकते अशा हर्ष व आनंदापेक्षा कितीतरी अधिक महान अशा परमानंदामध्ये ती व्यक्ती प्रविष्ट होते.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 440-441)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…

11 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…

1 day ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…

5 days ago