ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०१)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०१)

सामान्य माणसाचे बहुतांशी जीवन हे बाह्यवर्ती जाणिवेमध्येच व्यतीत होत असते. पण कधीतरी जीवनात असेही क्षण येतात की जेव्हा तो अंतर्मुख होतो. तो ज्याला देव, ईश्वर, परमेश्वर इत्यादी नावांनी संबोधतो त्याचा अतीव उत्कटतेने, तळमळीने, आर्ततेने धावा करतो. ज्या प्रसंगाच्या कात्रीत सापडल्यामुळे त्याने त्याचा धावा केलेला असतो, ईश्वराशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला असतो, तो प्रसंग पार पडतो आणि तो माणूस पुन्हा पहिल्याप्रमाणेच संसाराच्या रहाटगाडग्यामध्ये गरागरा फिरत राहतो. त्याच्या जीवनातून ईश्वर पुन्हा दूरस्थ होतो.

असेच वारंवार, कदाचित जन्मानुजन्मे होत राहते. आणि या संसारी जीवनाचा, आजूबाजूच्या मंडळींचा, जीवनव्यवहाराचा अनुभव घेऊन पूर्ण होताहोताच त्याला या जीवनाचे अधिक काही महान, अधिक काही गहन प्रयोजन असले पाहिजे, असे आतून जाणवू लागते. त्याचा शोध घेतला पाहिजे असे त्याला वाटू लागते. माणूस म्हणून जन्माला आलेलो आपण, आपणही किड्यामुंगीसारखे जीवन जगून एक दिवस निघून जायचे का? आपण माणूस म्हणून जन्माला आलो तर आपले काही कर्तव्य आहे का ? लाभलेल्या जीवनाचा आपण कशा प्रकारे विनियोग करायचा आहे, आपल्याकडून माणूस म्हणून नेमके काय अपेक्षित आहे? हे व यासारखे प्रश्न मनात डोकावू लागतात.

आणि मग कधीतरी ‘ईश्वरीकृपे’ने त्या जिवाची ‘आत्मशोधा’ला सुरुवात होते. त्या शोध – प्रवासामध्ये विविध तीर्थस्थाने, मठ, मंदिर, आश्रम इत्यादी ठिकाणांना भेटी दिल्या जातात. संत-सत्पुरुष, बुवा, बाबा, महाराज म्हणून ज्यांना समाजात मान्यता मिळालेली असते, त्यांच्याकडे जाऊन, त्यांच्याशी चर्चा करून, आपले प्रश्न विचारून त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. पण आपल्या आत्मशोधाची तहान कशानेच भागत नाही.

आणि मग त्या वाटचालीने श्रांतक्लांत झालेला तो जीव थकूनभागून एका झाडाखाली विसाव्याला बसावा आणि जवळून झुळूझुळू वाहणाऱ्या पाण्याचा नाद त्याच्या कानी पडावा तसे काहीसे होते. जवळच असलेल्या पाण्याच्या नादाच्या दिशेने तो जातो, त्या प्रवाहामधून ओंजळभर पाणी घेतो आणि त्या शीतल पाण्याने त्याची तहान भागते. तसेच काहीसे आत्मशोधाच्या या प्रवासात होत असावे.

श्रीअरविंदरूपी महासागर त्या शीतल पाण्याच्या प्रवाहासारखाच पत्ररूपाने अखंडपणे प्रवाहित होत राहिला होता. प्रत्येकाची तहान वेगळी, प्रत्येकाचा प्रश्न वेगळा, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, प्रत्येकाची मानसिक ठेवण वेगळी, प्रत्येकाच्या जीवनाची धाटणी वेगळी. पण येणाऱ्या प्रत्येक पांथस्थाची तहान शमविण्याचे सामर्थ्य श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये आहे. त्यातील काही निवडक पत्रे उद्यापासून सुरु होणाऱ्या ‘आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर…’ या मालिकेमध्ये आपण विचारात घेणार आहोत.

संपादक,
अभीप्सा मराठी मासिक

Latest posts by अभीप्सा मराठी मासिक (see all)
अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

स्वत:ला न फसविणे अवघड

  व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…

6 hours ago

प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन

  आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…

1 day ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४

  (भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…

2 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०३

  (भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…

3 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०२

  भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…

4 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०१

  साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…

5 days ago