आध्यात्मिकता ४३
(तिमिर जावो….भाग ०२)
(तुमच्या व्यक्तिमत्त्वामधील) ही काळोखी बाजू ज्याक्षणी तुम्हाला आढळून येते, त्याक्षणी तुम्ही तिचे नीट निरीक्षण केलेत आणि “हा मी आहे,” असे म्हणाला नाहीत, आणि त्याऐवजी जर तुम्ही असे म्हणालात की, “नाही, ही माझी काळी छाया आहे, माझ्यामधून हा अंश बाहेर काढून टाकलाच पाहिजे,” आणि मग त्या काळोख्या भागावर प्रकाश टाकलात, आणि सद्भावनापूर्ण भागाच्या ज्ञानानिशी आणि प्रकाशानिशी, त्या काळोख्या भागाच्या नजरेला नजर भिडवून पाहिलेत, इथे त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करायचा नाही (कारण तसे करणे अतिशय अवघड असते.) पण तुम्ही त्याला शांत राहायला भाग पाडले पाहिजे…
प्रथमतः त्यापासून स्वतःला दूर केले पाहिजे, मग त्यावर तीव्र प्रकाश टाकून, त्याला अशा रीतीने दूर भिरकावून दिले पाहिजे, की ती गोष्ट पुन्हा परतून माघारी येणार नाही. अशीही काही उदाहरणे आहेत की, त्यांच्यामध्ये परिवर्तन घडविणे शक्य झालेले आहे, पण अशी उदाहरणे अगदीच दुर्मिळ असतात.
अशी काही उदाहरणे आहेत की, जेव्हा त्या काळोख्या अंशावर किंवा त्या काळ्या छायेवर इतका प्रखर प्रकाश टाकण्यात आला की त्या प्रकाशाद्वारे त्या भागाचे परिवर्तन झाले आणि त्याचे त्या व्यक्तीच्या सत्तत्त्वामध्ये (truth) रूपांतर झाले. पण ही गोष्ट अगदीच दुर्मिळ आहे. असे करता येते, पण हे अगदीच दुर्मिळ आहे.
सहसा, असे म्हणणे अधिक चांगले की, “नाही, हा मी नाही, मला हे नको आहे, या स्पंदनाचा आणि माझा काही संबंध नाही, ती गोष्ट माझ्यालेखी अस्तित्वातच नाही, ती गोष्ट माझ्या प्रकृतीच्या विरोधी आहे.” आणि अशा रीतीने, सतत त्यावर जोर देऊन, ती हाकलून लावत, त्यावर प्रहार करतकरत, सरतेशेवटी व्यक्ती स्वतःला त्यापासून विलग करू शकते. (क्रमश:…)
– श्रीमाताजी [CWM 06 : 263]
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…