व्यक्तीच्या अंतरंगात ईश्वरी कृपेविषयी जर अशी श्रद्धा असेल की, ‘ईश्वरी कृपा’ माझ्याकडे लक्ष ठेवून आहे आणि काहीही झाले तरी ईश्वरी कृपा आहेच, आणि ती माझ्यावर लक्ष ठेवून आहे तर, तिच्या साहाय्याने व्यक्ती कोणत्याही संकटामधून पार होऊ शकते, व्यक्ती अशी श्रद्धा नेहमीच, आयुष्यभर बाळगू शकते. या श्रद्धेच्या साहाय्याने व्यक्ती सर्व अडचणींना सामोरी जाऊ शकते, अशा व्यक्तीला कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही कारण तिच्यापाशी श्रद्धा असते आणि ईश्वरी कृपादेखील तिच्यासोबत असते.

श्रद्धा अनंतपटीने शक्तिशाली, अधिक सचेत, दीर्घायू अशी शक्ती असते; …ती ईश्वरी कृपेखेरीज अन्य कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसते आणि म्हणून ती ‘सत्या’वरच विसंबून असते आणि त्यामुळे तिला कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही.

– श्रीमाताजी [CWM 05 : 297]

तुमच्या प्राणिक प्रकृतीची जुनी सवय तुम्हाला पुन्हापुन्हा (तुमच्या अस्तित्वाच्या) बाह्यवर्ती भागात जायला भाग पाडते; परंतु त्या उलट तुम्ही चिकाटीने, तुमच्या खऱ्या अस्तित्वामध्ये म्हणजे तुमच्या आंतरिक अस्तित्वामध्ये राहण्याची आणि तेथूनच सर्व गोष्टींकडे पाहण्याची सवय लावून घेतली पाहिजे. तेथूनच तुम्हाला खऱ्या विचारांची, खऱ्या दृष्टीची प्राप्ती होते, तेथूनच तुम्हाला सर्व गोष्टींचे आणि तुमच्या प्रकृतीचे आणि तुमच्या ‘स्व’चे योग्य आकलन होते.

– श्रीअरविंद [CWSA 30 : 228]

तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये स्वतःचे एकत्रीकरण अधिक दृढपणे केले पाहिजे. तुम्ही जर स्वतःला सतत विखरत (disperse) राहिलात आणि आंतरिक वर्तुळ ओलांडून पलीकडे गेलात, तर सामान्य बाह्यवर्ती प्रकृतीच्या क्षुद्रतेमध्ये आणि ती प्रकृती ज्या गोष्टींप्रति खुली आहे अशाच गोष्टींच्या प्रभावाखाली राहाल. तुम्ही सतत वावरत राहाल.

अंतरंगामध्ये राहून जीवन जगायला शिका, तसेच नेहमी अंतरंगात राहून, श्रीमाताजींशी नित्य आंतरिक संपर्क ठेवून कृती करायला शिका. सुरुवातीला ही गोष्ट नेहमी आणि समग्रपणे करणे कठीण वाटू शकेल, परंतु व्यक्ती जर नेटाने तसे करत राहिली तर तसे करता येणे शक्य असते, आणि असे करायला शिकणे ही किंमत चुकती करूनच, व्यक्तीला ‘योगा’मध्ये सिद्धी प्राप्त होऊ शकते.

– श्रीअरविंद [CWSA 30 : 227]

ज्या प्रकाशाच्या आधारे कृती करायची तो प्रकाशच गवसलेला नसेल तर कृतिप्रवणतेवरील हा सगळा भर निरर्थक ठरतो. योगामधून जीवन वगळता कामा नये, योगामध्ये जीवनाचा समावेश असलाच पाहिजे, याचा अर्थ जीवन आहे तसेच स्वीकारण्यासाठी, म्हणजे त्याच्या अडखळणाऱ्या अज्ञानानिशी, दुःखानिशी, मानवी इच्छा आणि तर्कबुद्धी यांच्या अंधकारमय गोंधळानिशी जीवन स्वीकारण्यासाठी आपण बांधील आहोत, असा होत नाही. जीवन ज्या आवेगांची, उपजत प्रेरणांची अभिव्यक्ती करत असते त्या साऱ्यानिशी जीवनाचा स्वीकार करण्यासाठी आपण बांधील आहोत, असा याचा अर्थ होत नाही.

सातत्याने नवप्रवाह निर्माण करणाऱ्या मानवी बुद्धीमुळे आणि ऊर्जेमुळे सारे काही ठीक होईल असे कृतिप्रवणतेच्या समर्थकांना वाटत असते. परंतु मानवी बुद्धीचा एवढा प्रचंड विकास आणि ज्याला इतिहासामध्ये तुलनाच नाही अशा ऊर्जेच्या अचाट उत्पादनानंतरसुद्धा झालेली जगाची सद्यस्थिती आपण पाहू लागलो तर, कृतिप्रवणतेचे समर्थक ज्या भ्रमामध्ये राहून (त्यांच्या कृतीमुळे सारे काही ठीक होईल या भ्रमामध्ये राहून) परिश्रम करत असतात त्या भ्रमाचा, जगाची सद्यस्थिती म्हणजे सूचक पुरावाच असल्याचे आढळते.

(कृतिप्रवणतेच्या समर्थनाची भूमिका आणि योगाची भूमिका यातील फरक श्रीअरविंद येथे स्पष्ट करत आहेत…) केवळ चेतनेच्या परिवर्तनाद्वारेच या जीवनाचा खरा आधार शोधला जाऊ शकतो, ही ‘योगा’ची भूमिका आहे; अंतरंगाकडून बहिरंगाकडे हा येथे खरंतर नियम असतो. परंतु अंतरंग म्हणजे पृष्ठभागाच्या मागे अर्धापाऊण इंच आतमध्ये असा त्याचा अर्थ होत नाही. व्यक्तीने आत खोलवर जाऊन आपल्या ‘आत्म्या’चा, ‘स्व’चा, आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘दिव्य सद्वस्तु’चा शोध घेतला पाहिजे आणि तेव्हाच आपले जीवन ही खरी अभिव्यक्ती ठरू शकेल; आपण म्हणजे आजवर जी एक अपुरी, अपरिपूर्ण, नेहमीच पुनरावृत्त होणारी गोंधळलेली, धूसर आणि अंध वस्तू होतो त्याऐवजी, आपण काय असू शकतो त्याची, आपले जीवन ही खरी अभिव्यक्ती ठरू शकेल.

आपल्या जुन्याच गोंधळात राहायचे आणि अपघाताने, योगायोगाने का होईना पण कोणतातरी एखादा नवीनच शोध लागेल अशा आशेने अंधारात चाचपडत राहायचे की, जोपर्यंत आपल्या अंतरंगामध्ये व बाहेरही असणाऱ्या देवतेचा शोध आपल्याला लागत नाही आणि आपण आपल्या अंतरंगामध्ये तिची मूर्ती घडवत नाही तोपर्यंत, मागे राहून, अंतरंगातील ‘प्रकाशा’चा शोध घ्यायचा, या दोन्हीमधून आपल्याला एका गोष्टीची निवड करायची आहे.

– श्रीअरविंद [CWSA 28 : 444]

मन स्थिर करण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती मिळविण्यासाठी, प्रकृतीचे शुद्धिकरण होणे आणि तिची तयारी होणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी अनेक वर्षेसुद्धा लागतात. योग्य वृत्तीने केलेले कर्म हा त्यासाठीचा सर्वांत सोपा मार्ग आहे.

(योग्य वृत्तीने केलेले कर्म म्हणजे कोणते कर्म?) – असे कर्म की जे इच्छाविरहित किंवा अहंकारविरहित असते – इच्छा, मागणी किंवा अहंकाराची कोणतीही स्पंदने निर्माण झाली की त्याला लगेचच नकार देऊन केलेले कर्म हे योग्य वृत्तीने केलेले कर्म असते; ‘दिव्य माते’चे स्मरण करत आणि तिच्या शक्तीने आविष्कृत व्हावे आणि तिने कार्य हाती घ्यावे म्हणून तिची प्रार्थना करून केलेले कर्म, की ज्यामुळे आंतरिक शांततेप्रमाणेच, कर्मामध्येदेखील तुम्हाला दिव्य मातेची उपस्थिती आणि तिचे कार्यकारकत्व जाणवू शकेल; अशा प्रकारचे ‘दिव्य माते’प्रत अर्पण म्हणून केलेले कर्म हे योग्य वृत्तीने केलेले कर्म असते.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 226]

संन्यासवादी जीवनपद्धती ही आध्यात्मिक पूर्णतेसाठी अगदी अनिवार्यपणे आवश्यकच असते किंवा आध्यात्मिक मार्ग म्हणजे संन्यासवादी मार्गच असतो, असे मी मानत नाही.

एखाद्या कार्यामध्ये किंवा कोणत्याही कर्मामध्ये, किंवा ‘ईश्वरा’ला आपल्याकडून ज्या कर्माची अपेक्षा आहे त्या सर्व प्रकारच्या कर्मांमध्येसुद्धा अहंकार आणि कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करून, ‘ईश्वरा’प्रत समर्पण करण्याचा, आध्यात्मिक आत्मदान करण्याचा आणि आध्यात्मिक आत्म-प्रभुत्वाचा आणखी एक मार्गदेखील आहे.

तसे नसते तर, भारतामध्ये ‘जनक’ किंवा ‘विदुरा’सारख्या थोर आध्यात्मिक व्यक्ती आढळल्या नसत्या; इतकेच काय ‘श्रीकृष्ण’देखील आढळला नसता; किंवा अगदी असताच तर तो ‘श्रीकृष्ण’ वृंदावन, मथुरा, द्वारका यांचा ‘अधिपती’ झाला नसता; तो राजपुत्र आणि योद्धा किंवा ‘कुरूक्षेत्रा’तील सारथी झाला नसता; तर तो फक्त एक थोर तपस्वीच बनून राहिला असता.

‘महाभारता’मध्ये किंवा अन्यत्र, ‘भारतीय धर्मशास्त्रा’मध्ये आणि ‘भारतीय परंपरे’मध्ये, जीवनाच्या परित्यागावर आधारित आध्यात्मिकतेला आणि कर्मप्रधान आध्यात्मिक जीवनाला एकसारखेच स्थान देण्यात आलेले आहे. जीवनाच्या परित्यागावर भर देणारा संन्यासवादी मार्ग हाच तेवढा ‘भारतीय परंपरे’तून आलेला आहे, आणि ‘सर्वकर्माणि’, सर्व प्रकारच्या कर्मांचा आणि जीवनाचा स्वीकार हा मार्ग ‘युरोपियन किंवा पाश्चात्त्य’ आहे, तो आध्यात्मिक नाही, किंवा तो ‘भारतीय’ नाही असे म्हणता येत नाही.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 250]

(श्रीअरविंद येथे साधकांना सांगत आहेत की, एखादी गोष्ट कोणत्या वृत्तीने केली जाते, तिची उभारणी कोणत्या तत्त्वाच्या आधारावर केली जाते आणि तिचा उपयोग कोणत्या कारणासाठी केला जातो, यावर सारे काही अवलंबून असते.)

राजकारण हा काही नेहमीच चांगला स्वच्छ कारभार असतो असे नाही, किंबहुना बरेचदा तो तसा नसतोच. असे असूनही मी राजकारण केले आणि अगदी सर्वात जहाल असे क्रांतिकारी राजकारण, ज्याला ‘घोर कर्म’ म्हणता येईल असे राजकारण केले.

युद्धालादेखील आध्यात्मिक प्रकारचे कृत्य असे म्हणता येणार नाही तरीही मी युद्धाला साहाय्य केले आणि माणसांना युद्धावर पाठविले. ‘श्रीकृष्णा’ने ‘अर्जुना’ला अत्यंत भयानक प्रकारचे युद्ध करण्याचे आवाहन केले आणि त्याच्या उदाहरणाद्वारे, माणसांनी सर्व प्रकारची मानवी कर्मे, ‘सर्वकर्माणि’ करावीत म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले आहे. आता, ‘श्रीकृष्ण हा आध्यात्मिक मनुष्य नव्हता किंवा त्याने अर्जुनाला दिलेला सल्ला चुकीचा होता किंवा तो तत्त्वतः गैरलागू होता’ असे म्हणून तुम्ही वाद घालत बसणार का? श्रीकृष्ण तर याही पुढे जात उद्घोषित करतो की, एखाद्या मनुष्यास त्याच्या मूलभूत प्रकृतिधर्मानुसार, त्याच्या स्वभावानुसार आणि त्याच्या क्षमतेनुसार जे कर्म करण्यास सांगण्यात आले आहे, ते कर्म जर त्याने त्याच्या आणि त्या कर्माच्या धर्मानुसार केले आणि योग्य प्रकारे आणि योग्य वृत्तीने केले तर, तसे कर्म केल्याने तो ‘ईश्वरा’प्रत जाऊ शकतो.

‘ब्राह्मण’, ‘क्षत्रिय’ यांच्याप्रमाणेच श्रीकृष्ण ‘वैश्य’ धर्माला आणि त्याच्या कर्मालाही मान्यता देतो. श्रीकृष्णाच्या भूमिकेतून पाहायचे झाले तर, एखाद्या व्यक्तीने व्यापारउदिम करणे, पैसे मिळविणे, नफा मिळविणे आणि तरीसुद्धा तो आध्यात्मिक असणे, त्याने ‘योगसाधना’ करणे, त्याला आंतरिक जीवन असणे शक्य आहे.

‘भगवद्गीता’ आध्यात्मिक मुक्तीचे साधन म्हणून सातत्याने कर्माचे समर्थन करते. ‘भक्ती’ आणि ‘ज्ञानमार्गा’प्रमाणेच ‘कर्ममार्गा’चे महत्त्वही प्रतिपादन करत आहे. श्रीकृष्ण कर्माला एक अधिक उच्चतर नियम (law) लावू पाहत आहे. कर्म निरपेक्षपणे केले पाहिजे, बक्षिसाच्या किंवा फलाच्या आसक्तीविना, निरहंकारी भूमिकेतून वा वृत्तीने, ‘ईश्वरा’प्रत केलेले अर्पण किंवा अर्पण केलेली समिधा या स्वरूपात कर्म केले गेले पाहिजे असे त्याचे सांगणे आहे.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 249]

आपल्या कर्मांचा ‘अधिपती’ असणारा ईश्वर, हा आपल्या प्रकृतीचे रूपांतरण करत असतानादेखील आपल्या प्रकृतीचा आदर करत असतो; कोणत्याही स्वैर लहरीनुसार नव्हे तर, तो नेहमीच प्रकृतीच्या माध्यमातून कार्य करत असतो. आपल्या या अपूर्ण प्रकृतीमध्येच आपल्या पूर्णत्वाची सामग्री सामावलेली असते. पण ती अपरिपक्व दशेत असते, ती विरूप झालेली, अस्थानी, कशीही अव्यवस्थितपणे फेकून दिलेली किंवा अगदीच बापुडवाण्या अयोग्य अशा क्रमाने मांडलेली असते.

ही सर्व सामग्री धीराने पूर्णत्वाला नेली पाहिजे, ती शुद्ध केली पाहिजे, तिची पुनर्रचना केली पाहिजे, तिची पुनर्घडण केली पाहिजे, तिचे रूपांतरण केले पाहिजे. तिला कशाही तऱ्हेने छिन्नविछिन्न करता कामा नये वा तिचे भंजनही करता कामा नये, तिला मारून टाकता कामा नये किंवा विकृत करता कामा नये, जोरजबरदस्तीने किंवा नकाराने तिचा नाशही करता कामा नये.

हे जग आणि या जगात राहणारे आपण सर्व म्हणजे ‘त्याची’ निर्मिती आहोत, त्याचे आविष्करण आहोत. आपल्या संकुचित आणि अज्ञानी मनाला समजू शकणार नाही अशा रीतीने तो आपल्याला आणि या विश्वाला हाताळत असतो. जोपर्यंत मन शांत होऊन दिव्य ज्ञानाप्रत खुले होत नाही तोपर्यंत आपल्या मनाला ते समजू शकणार नाही. आपल्या दोषांमध्ये सत्याचे असे एक द्रव्य असते की जे, आपल्या चाचपडणाऱ्या बुद्धीला, त्याचा अर्थ उलगडवून दाखवावा म्हणून परिश्रम करत असते. मानवी बुद्धी दोष काढून टाकते पण त्याचबरोबर त्यामध्ये अंतर्भूत असणारे सत्यही काढून टाकते आणि ती आधीच्या दोषाच्या जागी तितक्याच एका अर्ध-सत्याची, अर्ध-दोषाची स्थापना करते.

परंतु जोपर्यंत आपण त्यामध्ये दडलेल्या आणि प्रत्येक मिथ्या आवरणाच्या खाली सुरक्षित ठेवण्यात आलेल्या सत्याप्रत पोहोचण्याइतपत सक्षम होत नाही तोपर्यंत ‘दिव्य प्रज्ञा’ आपल्या चुका सहन करते. पापाचरणाकडे नव्हे तर पूर्णत्वाकडे जाणे, तसेच ज्याला आपण ‘ईश्वरी गुण’ असे संबोधू शकतो त्याप्रत जाणे हेच ज्या धडपडणाऱ्या ‘शक्ती’चे उद्दिष्ट असते; अशा ‘शक्ती’ची चुकीच्या दिशेने पडलेली पावले म्हणजे आपली पापं असतात. बरेचदा ही पापं म्हणजे जो गुण रूपांतरित केला जाणे आवश्यक असतो अशा एखाद्या गुणावरील आवरणं असतात, त्या ओंगळवाण्या आवरणांपासून तो गुण मुक्त करावा लागतो…

– श्रीअरविंद [CWSA 23 : 245-246]

एकदा का एखाद्याने योगमार्गामध्ये प्रवेश केला की, मग अगदी काहीही झाले, किंवा कोणत्याही अडचणी उद्भवल्या तरी ध्येयापर्यंत जाण्याचा निश्चय दृढ ठेवायचा, एवढी एकच गोष्ट त्याने करायची असते. खरेतर, योगाची परिपूर्ती कोणीही स्वतःच्या क्षमतेद्वारे करू शकत नाही – तुमच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या महत्तर ‘शक्ती’द्वारेच ही परिपूर्ती होऊ शकते – सर्व प्रकारच्या चढउतारांमध्ये, त्या ‘शक्ती’ला नेटाने केलेल्या आवाहनामुळे ही परिपूर्ती होऊ शकते. तुम्ही अगदी सक्रियपणे ‘अभीप्सा’ बाळगू शकत नसलात तरीदेखील, साहाय्य लाभावे म्हणून श्रीमाताजींच्या दिशेने अभिमुख राहा – ही एकच गोष्ट अशी आहे की, जी नित्य केली पाहिजे.

– श्रीअरविंद [CWSA 32 : 294]

साधक : श्रीअरविंद नेहमीच असे सांगतात की, श्रीमाताजी तुमच्या अंतरंगात आहेत.

श्रीमाताजी : हो, खरे आहे, अगदी पूर्णपणे बरोबर आहे. मी ‘शाश्वत ज्योती’ मध्ये एक ‘ईश्वरी अस्तित्व’ या नात्याने ‘उपस्थित’ आहे, संजीवन देणारी आणि कृतिप्रवण करणारी ‘शक्ती’ या नात्याने मी उपस्थित आहे, सर्व शांतीपूर्ण गोष्टी आणि माधुर्य प्रदान करणारी ‘शांती’ या नात्याने मी उपस्थित आहे, ओसंडून वाहणारा आणि उन्नयन करणारा ‘मोद’, शुद्धिकरण करणारा ‘प्रकाश’ आणि संमती प्रदान करणारे ‘स्पंदन’ या नात्याने मी तेथे उपस्थित आहे.

श्रीअरविंद तेथे एक चिरस्थायी ‘सत्त्व’ म्हणून उपस्थित आहेत आणि मी तेथे एक ‘मार्गदर्शक’ म्हणून उपस्थित आहे. वास्तविक, दोघांमध्ये एकच अस्तित्व आहे. एक, जो निरीक्षण करतो तो साक्षी आहे आणि दुसरी प्रत्यक्षात उतरविणारी शक्ती आहे. आणि जोपर्यंत व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत तिला काहीच समजू शकत नाही…..

होय, श्री अरविंदांना आणि मला जो जाणतो, (वास्तविक, ही एकच गोष्ट आहे, एकच अस्तित्व आहे.) – त्याच्यासाठी सारे अडथळे, साऱ्या अडचणी, सर्व पाश, सत्याच्या मार्गावरील सारे तथाकथित अडथळे गळून पडतात आणि ते कायमसाठी काढून टाकले जातात. केवळ या जन्मातच असे नव्हे तर, मृत्युनंतरच्या जीवनातील आणि त्यानंतर येणाऱ्या सगळ्या जीवनांमधील सुद्धा – अगदी शाश्वतकाळपर्यंत काढून टाकले जातात. अशा व्यक्तीसाठी ‘परमेश्वर’ हा सर्व शक्तिमान असतो.

[The Supreme by Mona Sarkar]