(जे ईश्वराची सेवा करू इच्छितात त्यांनी ही प्रार्थना जरूर करावी…)

सर्व अडथळ्यांवर मात करून विजयी होणाऱ्या हे ‘ईश्वरा’, हे ‘प्रभू’ तुझा जयजयकार असो.

असे वरदान दे की, आमच्यातील कोणतीही गोष्ट ‘तुझ्या’ कार्यात अडसर ठरू नये.

असे वरदान दे की, कशामुळेही ‘तुझ्या’ आविष्करणामध्ये विलंब होऊ नये.

असे वरदान दे की, सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येक क्षणी ‘तुझी’च इच्छा कार्यरत राहील.

‘तुझा’ मानस आमच्यामध्ये परिपूर्ण व्हावा, आमच्या प्रत्येक तत्त्वामध्ये, आमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक क्रियेमध्ये, आमच्या सर्वोच्च उंचीपासून ते आमच्या देहाच्या अगदी सूक्ष्मतम अशा पेशींपर्यंत तुझीच इच्छा पूर्णत्वाला जावी म्हणून, आम्ही ‘तुझ्या’समोर उभे आहोत.

असे वरदान दे की, आम्ही ‘तुझ्या’प्रत पूर्णपणे आणि सदोदित एकनिष्ठ राहू. इतर कोणत्याही प्रभावाविना आम्ही पूर्णत: ‘तुझ्या’च प्रभावाला खुले राहू, असे वरदान दे.

असे वरदान दे की, आम्ही ‘तुझ्या’प्रत एक प्रगाढ आणि उत्कट कृतज्ञता बाळगण्यास कधीही विसरणार नाही.

असे वरदान दे की, ‘तुझ्या’कडून प्रसादरूपाने, हरघडी मिळालेल्या अद्भुत गोष्टींचा आमच्याकडून कधीही अपव्यय होणार नाही.

असे वरदान दे की, आमच्यातील सर्वकाही ‘तुझ्या’ कार्यात सहभागी होईल आणि ‘तुझ्या’ साक्षात्कारासाठी सज्ज होईल.

हे ‘ईश्वरा’, हे ‘प्रभू’ सर्व साक्षात्कारांच्या परमोच्च स्वामी, तुझा जयजयकार असो. आम्हाला ‘तुझ्या विजया’बद्दलची सक्रिय आणि उत्कट, संपूर्ण आणि अविचल अशी श्रद्धा प्रदान कर.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 382)

हे ‘दिव्य’ प्रेमा, ‘परमप्रज्ञे’, परिपूर्ण ‘एकत्वा’, मी अन्य कोणी नाही तर, मी केवळ ‘तू’च व्हावे यासाठी दिवसातील प्रत्येक क्षणाला मी ‘तुला’ आवाहन करते.

या देहाद्वारे ‘तुझी’ सेवा घडू दे, ते तुझे साधन (Instrument) असल्याची जाणीव त्याला होऊ दे आणि माझी सर्व चेतना ‘तुझ्या’ चेतनेमध्ये विलीन होऊ दे. आणि त्या चेतनेद्वारे, ‘तुझ्या’ दिव्य दृष्टीने मला सर्व वस्तुमात्रांचे चिंतन करता येऊ दे.

हे ‘प्रभू’, हे ईश्वरा, ‘तुझी’ सार्वभौम ‘शक्ती’ आविष्कृत होईल असे वरदान दे; ‘तुझे’ कार्य सिद्धीस जाईल असे वरदान दे; आणि ‘तुझी’ सेविका निःशेषतया ‘तुझ्या’ सेवेमध्ये स्वतःला झोकून देऊ शकेल, असे वरदान दे.

माझ्यातील ‘मी’ कायमचा नाहीसा होऊ दे आणि केवळ साधन तेवढे शिल्लक राहू दे.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 134)

‘प्रामाणिकपणा’चा अर्थ

‘प्रामाणिकपणा’मध्ये नुसत्या सचोटीपेक्षा (honesty) बराच अधिक अर्थ सामावलेला आहे. म्हणजे असे की, तुम्ही जे बोलता तेच तुम्हाला अभिप्रेत असते, तुम्ही जे प्रतिपादित करता त्याची तुम्हाला जाणीव असते, तसेच तुमच्या इच्छेमध्ये खरेपणा असतो. साधक जेव्हा ‘ईश्वरा’चे साधन बनण्याची आणि ‘ईश्वरा’शी एकरूप होण्याची अभीप्सा बाळगत असतो, तेव्हा त्याच्यातील ‘प्रामाणिकपणा’चा अर्थ असा असतो की, तो खरोखरच कळकळीने ‘अभीप्सा’ बाळगत असतो व ‘ईश्वरा’व्यतिरिक्तच्या इतर सर्व इच्छांना किंवा आवेगांना तो नकार देत असतो.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 50]

लोक काय करतात, काय विचार करतात किंवा काय म्हणतात याने व्यथित होणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे आणि व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्व, केवळ ईश्वराच्याच प्रभावाखाली आले नसल्याचा आणि ते पूर्णतः ईश्वराभिमुख झाले नसल्याचा तो पुरावा आहे.

– श्रीमाताजी
(CWM 14:279)

प्रामाणिकपणा – ४७

प्रामाणिक असण्यामध्ये एक अद्भुत आनंद असतो. प्रामाणिकपणाच्या प्रत्येक कृतीमध्येच प्रामाणिकपणाचे स्वतःचे असे बक्षिस अनुस्यूत असते. शुद्धीकरणाची भावना, ऊर्ध्वमुख होत झेपावत जाणे, व्यक्तीने मिथ्यत्वाचा अगदी एखादा छोटासा कण दूर केला तरी त्यामुळे मिळालेली मुक्ती, या गोष्टी हे प्रामाणिकपणाचे बक्षिस असते. प्रामाणिकपणा हे सुरक्षाकवच असते, तेच संरक्षण असते, प्रामाणिकपणा हाच मार्गदर्शक असतो आणि अंतिमतः प्रामाणिकता ही एक रूपांतरकारी शक्ती असते.
– श्रीमाताजी [CWM 08 : 400]

प्रामाणिकपणा – ४६

एखाद्या व्यक्तीने भूतकाळात कितीही ठोकरा खाल्लेल्या असल्या किंवा कितीही चुका केलेल्या असल्या तरीसुद्धा, जर ती व्यक्ती ‘ईश्वरा’च्या निवासाचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावेल तर, तिच्यासाठी ते दरवाजे कधीच बंद नसतात. मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतर्यामी असणाऱ्या ‘ईश्वरी’ तत्त्वावरील तेजस्वी व काळोखी आवरणे असतात. हे ईश्वरी तत्त्व जेव्हाकधी त्या आवरणाचा भेद करते तेव्हा, आत्म्याच्या उत्तुंगतेकडे जाताना ते तत्त्व, त्या दोन्ही आवरणांचे दहन करू शकते.

श्रीअरविंद [CWSA 29 : 42]

प्रामाणिकपणा – ४५

तुम्हाला घरी राहून आणि कार्यमग्न असतानादेखील साधना करणे शक्य आहे. त्यासाठी सुरुवातीला ही गोष्ट आवश्यक असते की, जितके जमेल तितके श्रीमाताजींचे स्मरण ठेवावे, शक्य असेल तेवढा, त्या ‘दिव्य माता’ आहेत असा विचार करून, दररोज एका ठरावीक वेळी हृदयामध्ये श्रीमाताजींवर लक्ष एकाग्र करा, त्या तुमच्यामध्येच आहेत अशी जाणीव तुम्हाला व्हावी म्हणून अभीप्सा बाळगा. तुमचे सारे कर्म त्यांना अर्पण करा आणि त्यांनी तुम्हाला अंतरंगातून मार्गदर्शन करावे आणि तुमचा सांभाळ करावा, अशी त्यांच्याकडे प्रार्थना करा. ही प्राथमिक पायरी आहे पण बहुतेक वेळा या पायरीवरच बराच वेळ द्यावा लागतो. परंतु जर का एखादी व्यक्ती यातून प्रामाणिकपणे आणि चिकाटीने पार झाली तर, हळू हळू मानसिकता बदलू लागते आणि साधकामध्ये अशी एक नवीन चेतना उमलू लागते की, जिच्याद्वारे साधकाला अंतरंगामधून ‘श्रीमाताजीं’च्या उपस्थितीची अधिकाधिक जाणीव होऊ लागते; प्रकृतीमधील, जीवनातील त्यांच्या कार्याची जाणीव होऊ लागते किंवा मग अशा व्यक्तीला, साक्षात्काराच्या दिशेने द्वारे खुली करणाऱ्या इतर कोणत्यातरी आध्यात्मिक अनुभूतीची जाणीव होऊ लागते.

– श्रीमाताजी
[CWSA 32 : 186]

प्रामाणिकपणा – ४४

तुम्ही तुमचे कर्म ‘ईश्वरा’च्या चरणांशी पूर्ण प्रामाणिकपणे अर्पण केलेत तर, तुमचे कर्म हे ध्यानाइतकेच महत्त्वाचे ठरेल.
*
तुम्ही प्रामाणिक राहा, मग आवश्यकताच पडली तर तुमच्या चुका हजार वेळासुद्धा सुधारण्याची माझी तयारी आहे.
*
जेव्हा जेव्हा एखाद्या ठिकाणी प्रामाणिकपणा असतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तेथे तुम्हाला साहाय्य मार्गदर्शन लाभतेच. तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी ‘ईश्वरी’ कृपा तेथे असतेच आणि मग पुढे फार काळ तुमच्याकडून चुका घडत नाहीत.

– श्रीमाताजी
[CWM 16 : 178], [CWM 14 : 68], [CWM 03 : 192]

प्रामाणिकपणा – ४३

‘ईश्वरी कृपे’बाबत शंकाच असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक असेल तर तो ‘ईश्वरा’पर्यंत पोहोचेलच हे अगदी खरे आहे. परंतु याचा अर्थ असा नव्हे की तो अगदी लगेचच, अगदी सहजपणे, विनाविलंब ‘ईश्वरा’पर्यंत पोहोचेल. तुमची अडचण इथेच आहे, तुम्ही ‘ईश्वरा’साठी पाच वर्षे, सहा वर्षे अशी काहीतरी एक मुदत निश्चित करता, आणि तुम्हाला कोणताच परिणाम दिसून आला नाही तर मग शंका घेता. एखादा मनुष्य मूलतः प्रामाणिक असू शकतो परंतु साक्षात्काराचा आरंभ होण्यापूर्वी त्याच्यामधील अनेक गोष्टी बदलणेच आवश्यक असतात, असे असू शकते. त्याच्या प्रामाणिकपणाने त्याला नेहमीच चिकाटी बाळगण्यासाठी सक्षम बनविले पाहिजे – कारण ही ‘ईश्वरा’बद्दलची जी आस असते तिला कोणतीच गोष्ट विझवू शकत नाही, विलंब, निराशा, कोणती एखादी अडचण किंवा अन्य कोणत्याही गोष्टी ती आस विझवू शकत नाहीत.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 116–117]

प्रामाणिकपणा – ४२

तुमची इच्छा नसतानासुद्धा जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा, तुम्ही केली पाहिजे अशी पहिली गोष्ट म्हणजे, तो आवेग पुन्हा येऊ नये ही इच्छा बाळगली पाहिजे. पण या उलट, ती गोष्ट नाहीशी होऊच नये असे तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल, तर ती गोष्ट तशीच ठेवा, मात्र मग योगसाधना करण्याचा प्रयत्न करू नका. सर्व अडीअडचणींवर मात करण्याचा संकल्प तुम्ही आधी केला नसेल तर, मग योगमार्गाचा अवलंबच करू नका. योगमार्गाचा स्वीकार करण्याचा तुमचा निर्णय हा प्रामाणिक आणि परिपूर्णच असला पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 04 : 77]