व्यक्ती जेव्हा आध्यात्मिक जीवनात प्रवेश करते तेव्हा सामान्य प्रकृतीशी संबंधित असणारे कौटुंबिक बंध गळून पडतात – व्यक्ती या जुन्या गोष्टींबाबत तटस्थ होऊन जाते. ही तटस्थता म्हणजे एक प्रकारची मुक्ती असते. त्यामध्ये कटुता असण्याची अजिबात आवश्यकता नाही. जुन्या भौतिक जिव्हाळ्याचे बंध तसेच कायम राहणे म्हणजे सामान्य प्रकृतीला बांधून राहण्यासारखे असते आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीला अडसर निर्माण होतो.

-श्रीअरविंद
(CWSA 31 : 291)

तुम्ही कोण होतात त्याचा विचार करू नका, तर तुम्ही जे बनण्याची आस बाळगून आहात त्याचाच विचार करा; तुम्ही जे साध्य करू इच्छिता त्यामध्येच पूर्णतः राहा. तुमच्या मृत भूतकाळाकडे पाठ फिरवा आणि थेट भविष्याकडे पाहा.

– श्रीमाताजी
(CWM 03:84)

पृथ्वीवर जडद्रव्याची जी विशिष्ट परिस्थिती होती त्यामुळे ‘मृत्यू’ अपरिहार्य झाला. अचेतनतेच्या (unconsciousness) प्राथमिक पायरीपासून उत्तरोत्तर चेतनेकडे विकसित होत जाणे हाच जडतत्त्वाच्या उत्क्रांतीचा अर्थ आहे. आणि जेव्हा ही विकासाची प्रक्रिया प्रत्यक्ष घडू लागली तेव्हा या प्रक्रियेत, आकारबंधांचा विलय, विघटन ही एक अटळ अशी आवश्यकता ठरली. सुसंघटित व्यक्ति-चेतनेला एक स्थिर असा आधार मिळावा म्हणून एका निश्चित बांधीव आकाराची गरज होती. आणि असे असूनसुद्धा या आकारबंधाच्या स्थिरतेमुळेच मृत्यू अटळ बनला. जडद्रव्य आकारबद्ध होणेच भाग होते; अन्यथा वैयक्तिकीकरण (पृथकीकरण) (individualisation) होणे आणि प्राणशक्तीला वा चेतनाशक्तीला सघन असे मूर्तरूप येणे अशक्य होते. आणि त्यांच्याविना पार्थिव, जडतत्त्वाच्या पातळीवर पुढे सुसंघटित अस्तित्व निर्माण होण्यास आवश्यक अशा पायाभूत परिस्थितीची उणीव भासली असती. पण निश्चित, घनीभूत अशी घडण होताच एकाएकी त्याच्या ठिकाणी अलवचिकता, कठीणता आणि पाषाणवतता येण्याची प्रवृत्ती आढळून आली. हा पृथक आकारबंध अतिशय बंधनकारक असा साचा बनला; तो शक्तींच्या गतीचे अनुसरण करू शकत नाही; या वैश्विक गतिमानतेशी सुमेळ राखत तो स्वत:मध्ये क्रमश: बदल घडवू शकत नाही; तो प्रकृतीच्या अपेक्षा अखंडपणे भागवू शकत नाही किंवा तिची गती देखील पकडू शकत नाही; तो प्रवाहाबाहेर फेकला जातो. मात्र एका विशिष्ट क्षणी, आकारबंध आणि त्याला चालना देणारी शक्ति या दोहोंमधील वरील प्रकारच्या वाढत्या असमानतेमुळे व विसंवादामुळे त्या आकारबंधाचे संपूर्णत: विलयन, विघटन अटळ होऊन बसते. एक नवीन आकारबंध निर्माण करावयास हवा ज्यामुळे एक नवीन (आकारबंध व त्याला चालना देणारी शक्ती यांमध्ये) सुमेळ आणि समानता शक्य होईल.

हा आहे मृत्युचा खरा अर्थ आणि ही आहे मृत्यूची प्रकृतीमधील उपयुक्तता! पण हा आकारबंध जर का अधिक वेगवान व अधिक लवचिक झाला आणि बदलत्या चेतनेनुरुप स्वत:मध्ये बदल घडविण्याविषयी शरीरातील पेशींना जागृत करता आले तर मूलगामी विघटनाची गरजच उरणार नाही, आणि मृत्यू ही अटळ गोष्ट राहणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 37)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

**

(सप्टेंबर १९०९)

…भारतभरातील जे युवक आज एका मार्गाच्या शोधात आहेत, कार्य करण्यासाठी धडपडू पाहत आहेत, त्यांना या भावावेगावर स्वार होऊ द्या आणि शक्तिसंपादन करण्याची साधने शोधून काढू द्यात. जे उदात्त कार्य आपल्याला सिद्धीस न्यावयाचे आहे ते कार्य केवळ भावावेगाने साध्य होणार नाही, तेथे सामर्थ्याची आवश्यकता आहे. तुमच्या पूर्वजांच्या शिकवणुकीतून प्राप्त होऊ शकेल अशा शक्तीच्या आधारे, ‘असाध्य ते साध्य’ होऊ शकेल. ती ‘शक्ती’ तुमच्या शरीरामध्ये उतरू पाहण्याच्या तयारीत आहे. ती शक्ती म्हणजे साक्षात ‘माता’च होय. तिला शरण जायला शिका. तुम्हाला साधन म्हणून उपयोगात आणून ती दिव्य ‘माता’ ते कार्य इतक्या त्वरेने आणि इतक्या सामर्थ्याने पूर्णत्वाला नेईल की, त्यामुळे जग आश्चर्यचकित होऊन जाईल. या शक्तिविना तुमचे सारे प्रयत्न धुळीस मिळतील. आता जर तुमच्या हृदयांमध्ये मातेच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना झालीच आहे, तुम्हीही तिची सेवा करावयास शिकले आहात आणि तिची उपसना करत आहात, तर आता तुमच्या अंतरंगातील मातेला समर्पित व्हा. कार्यपूर्तीचा अन्य कोणताच मार्ग नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 222-223)

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

तुम्ही कार्यासाठी जोपर्यंत त्या ‘शक्ती’चा उपयोग केलात आणि तुम्ही जोपर्यंत त्या कार्याला धरून राहिलात तोपर्यंत त्या शक्तीचे साहाय्य तुम्हाला लाभले. त्या कार्याचे स्वरूप हे धार्मिक आहे की अ-धार्मिक ही बाब प्रथमतः तितकीशी महत्त्वाची नसते, ज्या दृष्टिकोनातून ते कार्य केले जाते तो आंतरिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. तो दृष्टिकोन आंतरात्मिक (psychic) नसून प्राणिक (vital) असेल, तर अशा वेळी व्यक्ती स्वतःला त्या कार्यात झोकून देते आणि आंतरिक संपर्क गमावून बसते. आणि तो दृष्टिकोन जर आंतरात्मिक असेल तर, व्यक्तीचा आंतरिक संपर्क टिकून राहतो, आणि त्या कार्याला ‘शक्ती’चे साहाय्य लाभत आहे किंवा ती ‘शक्ती’च ते कार्य करत आहे, असे त्या व्यक्तीला जाणवते आणि साधना प्रगत होत राहते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 271)

कृतज्ञता – १४

प्रश्न : ‘ईश्वरी कृपा’ कृतज्ञतापूर्वक स्वीकारण्याचा मार्ग कोणता?

श्रीमाताजी : सर्वप्रथम तुम्हाला त्याची आवश्यकता जाणवली पाहिजे.

हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्या ईश्वरी कृपेविना तुम्ही असाहाय्य आहात याची जाणीव करून देणारी, एक विशिष्ट अशी आंतरिक विनम्रता असणे आवश्यक आहे. खरोखरच, तुम्ही त्याविना अपूर्ण आणि शक्तिहीन असता. सुरुवात करायची तर ही पहिली गोष्ट आहे. ही पहिली अट आहे…

…आणि मग, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही सापडलेले असता, त्या परिस्थितीतून केवळ ती ईश्वरी कृपाच तुम्हाला तारू शकते, तीच तुम्हाला उपाय सुचवू शकते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी लागणारे सामर्थ्यदेखील तीच देऊ शकते, फक्त ईश्वरी ‘कृपा’च हे सारे करू शकते, अशी जाणीव जर तुम्हाला झाली तर, अगदी स्वाभाविकपणे तुमच्यामध्ये एक उत्कट आस निर्माण होते, चेतना खुलेपणात अभिव्यक्त झालेली असते. तुम्ही जर धावा कराल, आस बाळगाल आणि प्रतिसाद मिळावा अशी आशा बाळगाल तर, अगदी स्वाभाविकपणे तुम्ही त्या ईश्वरी ‘कृपे’प्रत खुले होता.

आणि नंतर ईश्वरी ‘कृपा’ तुम्हाला जो प्रतिसाद देते, त्याकडे तुम्ही अगदी बारकाईने लक्ष दिले पाहिजे, ती ‘कृपा’ तुम्हाला तुमच्या त्रासामधून बाहेर काढते, ती तुमच्या समस्येवर उपाय सुचविते किंवा तुमच्या अडचणीमधून बाहेर पडण्यास तुम्हाला साहाय्य करते. पण एकदा का तुमची त्या त्रासापासून सुटका झाली आणि तुम्ही त्या अडचणीमधून बाहेर आलात तर, तुम्हाला त्यातून बाहेर काढणारी ‘ईश्वरी कृपा’च होती, हे तुम्ही विसरता कामा नये; तुम्हीच स्वतःला त्या परिस्थितीतून बाहेर काढले आहे, असे समजता कामा नये. हा खरोखरच, महत्त्वाचा मुद्दा आहे. अडचण दूर झाली की, लगेचच बहुसंख्य लोक असे म्हणतात, “त्या अडचणीतून मी स्वतःला कसे बाहेर काढले, माझे मलाच माहीत.”

तर हे सारे असे असते. आणि नंतर तुम्ही कडीकोयंडा लावून दरवाजा बंद करून टाकता आणि त्यानंतर मग तुम्ही काहीही ग्रहण करू शकत नाही. तुमच्या अशा प्रकारच्या आंतरिक मूर्खपणापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी तुम्ही स्वतः काहीच करू शकत नाही, याची तुम्हाला पुन्हा एकदा जाणीव व्हावी म्हणून, पुन्हा एखादा तीव्र झटका, एखादी भयानक अडचण आवश्यक होऊन बसते. कारण आपण शक्तिहीन आहोत याची जाणीव जेव्हा तुमच्यामध्ये वाढू लागते तेव्हाच, तुम्ही थोडेसे खुले आणि लवचीक होऊ लागता. कारण, तुम्ही जे काही करता ते तुमच्या स्वतःच्या कौशल्यावर आणि तुमच्या स्वतःच्या क्षमतांवर अवलंबून आहे असे जोपर्यंत तुम्हाला वाटत असते तोपर्यंत, तुम्ही एकच दरवाजा बंद करता असे नाही, तर खरोखरच तुम्ही एकापाठोपाठ अनेक दरवाजे बंद करत असता, अगदी कडीकोयंडे लावून ते बंद करत असता. तुम्ही जणू काही एखाद्या गढीमध्ये स्वतःला बंद करून घेता आणि मग त्यामध्ये कोणत्याच गोष्टीचा प्रवेश होऊ शकत नाही. ही मोठीच उणीव आहे, व्यक्ती चटकन साऱ्या गोष्टी विसरून जाते. स्वाभाविकपणे ती स्वतःच्याच क्षमतांवर समाधानी राहते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 322-323)

हे परमेश्वरा, अस्तित्वाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये, सर्व कृतींमध्ये, सर्व वस्तुंमध्ये, सर्व जगतांमध्ये व्यक्ती तुला (ईश्वराला) भेटू शकते, तुझ्याशी एकत्व पावू शकते कारण, तू सर्वत्र, सदोदित विद्यमान आहेस. एखादी व्यक्ती तिच्या अस्तित्वाच्या एखाद्या कृतीद्वारे तुझ्याप्रत पोहोचलेली असते किंवा या ब्रह्मांडातील एखाद्या जगतामध्ये तुला भेटलेली असते आणि ती व्यक्ती म्हणते, “मला तो परमेश्वर गवसला.” आणि मग अशी व्यक्ती अधिक शोध घ्यायचा थांबवते; त्या व्यक्तीला असे वाटते की, जणू ती मानवी संभाव्यतांच्या शिखरावरच जाऊन पोहोचली आहे. पण असे समजणे ही केवढी मोठी चूक आहे.

सर्व स्थितीमध्ये, सर्व प्रकारांमध्ये, सर्व वस्तुमात्रांमध्ये, सर्व जगतांमध्ये, सर्व घटकांमध्ये आम्ही तुझा शोध घेतला पाहिजे आणि तुझ्याशी एकत्व पावले पाहिजे आणि त्यामधून, एखादाही घटक जरी बाजूला राहून गेला, मग भले तो कितीका लहान असेना, तर मग ते सायुज्य पूर्ण होऊ शकणार नाही, मग तो साक्षात्कार परिपूर्ण होणार नाही. आणि म्हणून तुझा शोध लागणे ही अनंत अशा शिडीवरील केवळ एक सुरुवातीची पायरी आहे.

हे मधुर स्वामी, सार्वभौम रूप-परिवर्तनकारा, सर्व प्रकारच्या दुर्लक्षाची, निष्काळजीपणाची, सर्व आळशी निरुत्साहाची परिसमाप्ती कर, आमच्या सर्व ऊर्जा तू एकत्रित कर, आणि त्यांचे दुर्दम्य, अजय अशा संकल्पशक्तीमध्ये परिवर्तन कर.

हे प्रकाशा, प्रेमा, अनिर्वचनीय शक्तिरूपा, तू त्यांच्यामध्ये शिरून त्यांचे रूपांतर करावेस म्हणून, सर्व अणुरेणू तुझ्याप्रत आकांत करत आहेत.

सर्वांना सायुज्यतेचा परम आनंद प्रदान कर.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 200)

सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करता यावी म्हणून ‘ईश्वरी कृपा’ आपल्याला आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी, सर्व परिस्थितीमध्ये साहाय्य करत असते.
*
‘परमेश्वरा’ची शक्ती अनंत आहे, आपली श्रद्धाच कमी पडते.
*
‘ईश्वरा’चे साहाय्य असेल तर अशक्य असे काहीच नाही.

– श्रीमाताजी (CWM 14:86-90)

अमर्त्यत्वासंबंधी गीतेची शिकवण

मानवी अस्तित्वाचे वास्तविक सत्य कोणते? सर्वोच्च ध्येय कोणते ? विश्वाच्या या महान चक्रांमध्ये युगानुयुगे माणसाचा जन्म आणि मृत्यू पुन्हापुन्हा होत राहतो ती म्हणजे एक प्रदीर्घ प्रगती असते; या प्रगतीद्वारे तो स्वतःची तयारी करत असतो आणि अमर्त्यत्वासाठी स्वतःला सुयोग्य बनवत असतो. आणि तो स्वतःला कशा प्रकारे तयार करेल? त्यासाठी योग्य माणूस कोण? मी म्हणजे प्राण आहे आणि मी म्हणजे शरीर आहे या संकल्पनेच्या जो अतीत झाला आहे; जो या जगाचे भौतिक आणि संवेदनात्मक स्पर्श त्यांच्या त्यांच्या मूल्यानुसार स्वीकारत नाही किंवा भौतिक मनुष्याला (Physical man) ते स्पर्श ज्या मोलाचे वाटतात त्या मोलाने जो हे स्पर्श स्वीकारत नाही; जो मी स्वतः आत्मा आहे आणि सर्वजण देखील आत्मे आहेत हे जाणतो, जो स्वतः स्वतःच्या शरीरामध्ये नाही तर, आत्म्यामध्ये राहायला शिकलेला आहे आणि इतरांशी व्यवहार करत असतानादेखील जो त्यांच्याशी भौतिक अस्तित्व म्हणून केवळ व्यवहार करत नाही तर, इतरांबरोबर देखील जो आत्मवत व्यवहार करतो, तो मनुष्य अमर्त्यत्वासाठी योग्य असतो. मृत्युचे अस्तित्व नसणे म्हणजे अमर्त्यत्व असा त्याचा अर्थ नाही. — ज्याला जन्मतः मन मिळालेले आहे अशा प्रत्येक प्राणिमात्राला ही गोष्ट आधीच मिळालेली असते, — परंतु अमर्त्यत्व म्हणजे जन्म आणि मृत्युच्या अतीत असणे. अमर्त्यत्व हे असे एक आरोहण असते की, ज्या आरोहणामुळे मनुष्य, मनो-मार्गदर्शित शरीर (mind-informed body) म्हणून जगणे सोडून देतो आणि अंततः आत्मा म्हणून, परम आत्म्याच्या ठिकाणी जीवन जगतो.

जो कोणी दुःख आणि शोकाच्या अधीन असतो, संवेदना आणि भावना यांचा गुलाम असतो, क्षणभंगुर गोष्टींच्या स्पर्शाने व्याप्त असतो असा कोणीही अमर्त्यत्वासाठी सुयोग्य बनू शकत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 61-62)

सर्वसाधारण एक तत्त्व म्हणून आणि नित्य विशिष्ट उपयोगामध्येदेखील, आपल्याकडून ज्या श्रद्धेची अपेक्षा आहे ती श्रद्धा सरते शेवटी समग्र अस्तित्वाने स्वतःच्या सर्व घटकांनिशी, ‘देवा’च्या उपस्थितीस आणि देवाच्या मार्गदर्शनास व त्याच्या ‘शक्ती’स दिलेल्या एका विशाल, उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या व नित्य शुद्धतर, पूर्णतर आणि अधिक शक्तिशाली होत जाणाऱ्या सहमतीमध्ये परिणत होते. मनुष्याला स्वतःबद्दल, त्याच्या स्वतःच्या कल्पनांबद्दल, त्याच्या शक्तींबद्दल एक श्रद्धा प्रदान करण्यात आली आहे; जेणेकरून तो स्वतः कार्य करेल, निर्मिती करेल, आणि उच्चतर गोष्टींप्रत उन्नत होईल आणि अंततः त्याचे सारे सामर्थ्य हे जणू आत्मवेदीमधील सुयोग्य समिधा बनेल. आपल्यामध्ये असलेल्या स्वतःच्या आध्यात्मिक इच्छेवर आणि ऊर्जेवर तसेच ऐक्य, स्वातंत्र्य आणि पूर्णत्वाच्या दिशेने आपण ज्या शक्तीच्या आधारे यशस्वीरित्या मार्गक्रमण करू शकतो त्या आपल्या शक्तीवर आपली दृढ व बळकट श्रद्धा असली पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ‘दिव्य शक्ती’च्या उपस्थितीची जाणीव होत नाही आणि आपण तिच्या उपस्थितीने भारले जात नाही तोपर्यंत म्हणजे, दिव्य शक्तीवरील श्रद्धेच्या उदयापूर्वी तरी अनिवार्यपणे आपण आपल्यामध्ये असलेल्या आध्यात्मिक इच्छेवर, ऊर्जेवर व शक्तीवर दृढ व बळकट श्रद्धा बाळगली पाहिजे किंवा किमान तिची जोड तरी त्या दिव्य शक्तीला दिली पाहिजे.

‘शास्त्र’ असे सांगते की, निर्बल व्यक्तींना आत्मविजय संपादन करता येत नाही. ”नायमात्मा बलहीनेन लभ्यः।” पांगळा करणारा स्वतःमधील सर्व अविश्वास, सिद्धीच्या सामर्थ्याविषयीच्या सर्व शंका म्हणजे षंढत्वाला दिलेली संमतीच असते, ती दौर्बल्याची कल्पना असते आणि आत्म्याच्या सर्वशक्तिमत्तेला दिलेला तो नकार असतो, अशा अविश्वासाला हतोत्साहित (discouraged) केलेच पाहिजे. आत्ताची सद्यकालीन अक्षमता, अगदी तिचा दबाव कितीही जास्त भासला तरी, ती श्रद्धेची केवळ एक कसोटी आहे; एखादी तात्पुरती अडचण आणि त्यावर मात करण्यासाठी असलेली अक्षमतेची भावना या गोष्टी पूर्णयोगाच्या साधकाच्या दृष्टीने निरर्थक असतात; कारण आपल्या अस्तित्वामध्ये आधीपासूनच सुप्त रूपाने असलेल्या पूर्णत्वाचे विकसन हे त्याचे उद्दिष्ट असते; कारण मनुष्य स्वतःमध्ये, स्वतःच्या आत्म्यामध्ये, दिव्य जीवनाचे बीज बाळगून असतो; त्याच्या प्रयत्नामध्येच यशाची शक्यता अंतर्भूत असते, गृहीत असते आणि त्याचा विजयही एक प्रकारे निश्चित असतो कारण त्या पाठीमागे सर्वसामर्थ्यशाली शक्तीची हाक आणि तिचे मार्गदर्शन असते. परंतु त्याचवेळी स्वतःवर असलेल्या या श्रद्धेला राजसिक अहंकाराच्या सर्व स्पर्धांपासून आणि आध्यात्मिक गर्वापासून विशुद्ध केलेच पाहिजे.

साधकाने ही संकल्पना शक्य तेवढी मनात बाळगली पाहिजे की, व्यक्तीचे सामर्थ्य हे तिचे स्वतःचे (अहंभावात्मक) सामर्थ्य नसते तर, ते वैश्विक दिव्य ‘शक्ती’चे सामर्थ्य असते आणि त्या शक्तीचा कोणताही अहंभावात्मक वापर हा मर्यादेचे कारण ठरतो आणि अंततः तो अडथळा बनतो. आपल्या अभीप्सेच्या पाठीमागे असणाऱ्या वैश्विक दिव्य ‘शक्ती’चे सामर्थ्य अमर्याद असते आणि जेव्हा तिला योग्य रितीने आवाहन केले जाते तेव्हा तिचे ते सामर्थ्य आपल्यामध्ये ओतण्यात आणि आपल्यामध्ये सद्यस्थितीत असलेले किंवा भविष्यात येऊ शकतील असे अडथळे आणि अक्षमता दूर करण्यामध्ये, ती अपयशी ठरू शकत नाही. कारण आपल्या संघर्षाचा कालावधी आणि वेळा या प्रथमतः साधनरूपाने आणि अंशतः आपल्या श्रद्धासामर्थ्यावर आणि आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असल्या तरीसुद्धा अंततः ‘ईश्वरा’च्या, एकमेवाद्वितीय अशा त्या ‘योगस्वामी’च्या, म्हणजे सारे काही चातुर्याने निर्धारित करणाऱ्या गुप्त ‘आत्म्या’च्या हाती असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 779-780)