कर्म आराधना – ३१
तुम्हाला ईश्वरी कार्याचे खरे कार्यकर्ते व्हायचे असेल तर, इच्छा-वासनांपासून आणि स्व-संबंधित अहंकारापासून पूर्णतः मुक्त असणे हे तुमचे पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. तुमचे संपूर्ण जीवन म्हणजे ‘परमेश्वरा’प्रत केलेले अर्पण असले पाहिजे, एक यज्ञ असला पाहिजे. ‘दिव्य शक्ती’ची सेवा करणे, ती ग्रहण करणे, तिने भरून जाणे आणि तिच्या कार्यामध्ये तिचे आविष्करण करणारे एक साधन बनणे हेच कर्म करण्यामागचे तुमचे एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे. तुमची इच्छा आणि तिची इच्छा यांच्यामध्ये कोणतेही अंतर शिल्लक राहणार नाही तोपर्यंत तुम्ही दिव्य चेतनेमध्ये विकसित होत राहिले पाहिजे, तुमच्यामध्ये तिच्या आवेगाखेरीज अन्य कोणताही उद्देश असता कामा नये, तुमच्यामध्ये आणि तुमच्या माध्यमातून घडणाऱ्या तिच्या सचेत कार्याशिवाय अन्य कोणतेही कर्म तुमच्यामध्ये शिल्लक राहता कामा नये.
तुमच्यामध्ये अशा प्रकारचे गतिमान एकत्व साधण्याची क्षमता जोवर येत नाही तोपर्यंत, तुम्ही स्वत: म्हणजे दिव्य शक्तीच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेला असा एक देह आणि आत्मा आहात, की जो सारी कर्मे तिच्यासाठीच करत आहे, असा विचार तुम्ही स्वतःबद्दल केला पाहिजे. स्वतंत्र कर्तेपणाची भावना तुमच्यामध्ये अजूनही खूप प्रभावी असली आणि कर्म करणारा मीच आहे, अशी तुमची भावना असली तरीसुद्धा तुम्ही ते कर्म त्या ईश्वरी शक्तीसाठीच केले पाहिजे. अहंकारी निवडीचा सर्व ताणतणाव, वैयक्तिक लाभासाठीची सर्व लालसा, स्वार्थी इच्छांच्या सर्व अटी या प्रकृतीमधून काढून टाकल्या पाहिजेत. तेथे फळाची कोणतीही मागणी असता कामा नये, तसेच काहीतरी बक्षीस मिळावे म्हणून धडपड करता कामा नये; ‘दिव्य माते’चा आनंद आणि तिच्या कार्याची परिपूर्ती हेच तुमचे एकमेव फळ आणि दिव्य चेतनेमध्ये सातत्यपूर्ण प्रगती आणि स्थिरता, सामर्थ्य, आणि आनंद हेच तुमचे पारितोषिक! सेवेचा आनंद आणि कर्मामधून आंतरिक विकासाचा आनंद हा निःस्वार्थी कार्यकर्त्यासाठी पुरेसा मोबदला असतो. (क्रमश:)
– श्रीअरविंद
[CWSA 32 : 12-13]
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…