कर्म आराधना – ०२

(जे ईश्वराची सेवा करू इच्छितात त्यांनी ही प्रार्थना जरूर करावी…) सर्व अडथळ्यांवर मात करून विजयी होणाऱ्या हे ‘ईश्वरा’, हे ‘प्रभू’ तुझा जयजयकार असो. असे वरदान दे की, आमच्यातील कोणतीही गोष्ट ‘तुझ्या’ कार्यात अडसर ठरू नये. असे वरदान दे की, कशामुळेही ‘तुझ्या’ आविष्करणामध्ये विलंब होऊ नये. असे वरदान दे की, सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येक क्षणी ‘तुझी’च इच्छा कार्यरत राहील. ‘तुझा’ मानस आमच्यामध्ये परिपूर्ण व्हावा, आमच्या प्रत्येक तत्त्वामध्ये, आमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक क्रियेमध्ये, आमच्या सर्वोच्च उंचीपासून ते आमच्या देहाच्या अगदी सूक्ष्मतम अशा पेशींपर्यंत तुझीच इच्छा पूर्णत्वाला जावी म्हणून, आम्ही ‘तुझ्या’समोर उभे आहोत. असे वरदान दे की, आम्ही ‘तुझ्या’प्रत पूर्णपणे आणि सदोदित एकनिष्ठ राहू. इतर कोणत्याही प्रभावाविना आम्ही पूर्णत: ‘तुझ्या’च प्रभावाला खुले राहू, असे वरदान दे. असे वरदान दे की, आम्ही ‘तुझ्या’प्रत एक प्रगाढ आणि उत्कट कृतज्ञता बाळगण्यास कधीही विसरणार नाही. असे वरदान दे की, ‘तुझ्या’कडून प्रसादरूपाने, हरघडी मिळालेल्या अद्भुत गोष्टींचा आमच्याकडून कधीही अपव्यय होणार नाही. असे वरदान दे की, आमच्यातील सर्वकाही ‘तुझ्या’ कार्यात सहभागी होईल आणि ‘तुझ्या’ साक्षात्कारासाठी सज्ज होईल. हे ‘ईश्वरा’, हे ‘प्रभू’ सर्व साक्षात्कारांच्या परमोच्च स्वामी, तुझा जयजयकार असो. आम्हाला ‘तुझ्या विजया’बद्दलची सक्रिय आणि उत्कट, संपूर्ण आणि अविचल अशी श्रद्धा प्रदान कर.

– श्रीमाताजी

(CWM 01 : 382)

कर्म आराधना – ०१

प्रस्तावना

श्रीअरविंदांच्या पूर्णयोगातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘कर्म’. पूर्णयोगामध्ये मानवतेची सेवा करण्यावर किंवा कोणत्यातरी विशिष्ट मानसिक आदर्शानुसार सेवा करण्यावर भर नसून, ईश्वराची सेवा करण्यावर भर आहे. मानवतेची सेवा केल्याने व्यक्ती व्यापक होऊ शकते खरी परंतु, बरेचदा तीच सेवा, आपण इतरांचे कल्याण करत आहोत याची प्रौढी मिरविणाऱ्या राजसिक अहंकारावर पांघरूण घालते. फारफार तर आपल्याला मानवी दशेमध्येच जखडून ठेवणारा तो एक सात्त्विक भ्रम ठरू शकतो. परंतु प्रथमत: ईश्वराचे साधन आणि माध्यम बनून, सर्व मानवी संकल्पनांच्या अतीत जाणे, ‘पूर्णयोगा’मध्ये अभिप्रेत आहे; जेणेकरून मानवाच्या माध्यमातून ‘ईश्वरा’ला या पृथ्वीवर ‘स्वतःच्या’ वैभवाचा वर्षाव करता येईल. आपल्या समग्र अस्तित्वाने केलेल्या ‘प्रार्थनेमध्ये आणि आराधनेमध्ये’ कर्माचे रूपांतर केल्यानेच ही गोष्ट चांगल्या रीतीने करता येते. ‘ईश्वरा’ची सेवा केल्याने, आपली मानवी चेतना ही गतिमान ‘दिव्य चेतने’च्या आणि तिच्या रूपांतरकारी शक्तीच्या संपर्कात येते. आजपासून आपण “कर्म आराधना” या मालिकेद्वारे श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या विचारधनाच्या माध्यमातून पूर्णयोगातील ‘कर्म’ हा पैलू समजावून घेणार आहोत.

– संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक.

कृतज्ञता – ३१

आज सायंकाळी आपण श्रीअरविंदांच्या स्मृतींचे चिंतन करू, त्यांनी दाखविलेल्या मार्गाचे ध्यान करू, त्यांच्याप्रत असलेल्या कृतज्ञतेचे ध्यान करू. त्यांनी दाखविलेला मार्ग आपल्यामध्ये जीवित राहावा यासाठी आपण त्या मार्गाचे ध्यान करू. त्यांनी आपल्यासाठी आजवर जे काही केले आणि त्यांच्या सदा प्रकाशमान, सचेतन आणि सक्रिय चेतनेमध्ये – महान साक्षात्कारासाठी ते आजही जे काही करत आहेत – जो साक्षात्कार या पृथ्वीवर केवळ घोषित करण्यासाठीच नव्हे तर, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ते आले आहेत आणि तो मूर्त रूपात आणण्यासाठी ते आजही कार्यरत आहेत, त्या साऱ्याबद्दल आपण जे ‘कृतज्ञता’पूर्वक देणे लागतो, त्यासाठी आपण ध्यान करू.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 172)

कृतज्ञता – २९

सर्व अहंकार आणि सर्व अंधकार नाहीसा करण्यासाठी, कृतज्ञतेची शुद्ध, उबदार, मधुर आणि तेजस्वी ज्योत आपल्या हृदयामध्ये कायमच प्रज्वलित असली पाहिजे. साधकाला त्याच्या उद्दिष्टाप्रत घेऊन जाणाऱ्या ‘परमेश्वरी कृपे’ बद्दलच्या कृतज्ञतेची ही ज्योत कायमच प्रज्वलित असली पाहिजे. व्यक्ती जितकी अधिक कृतज्ञ राहील, तिला ईश्वरी कृपेच्या कृतीची जेवढी अधिक जाणीव असेल आणि त्याबद्दल ती जेवढी अधिक कृतज्ञ राहील, तेवढा मार्ग जवळचा होईल.
*
अहंकार हा आपल्याला काय हवे आहे आणि आपल्यापाशी काय नाही, याचा विचार सातत्याने करत असतो. अहंकार सतत याच विचारांनी व्याप्त असतो.

आपल्याला काय प्रदान करण्यात आलेले आहे, याची आत्म्याला जाणीव असते आणि तो अनंत अशा कृतज्ञतेमध्ये निवास करत असतो.

– श्रीमाताजी
(Bulletin 1964 – 08 : 100), (CWM 14 : 257)

कृतज्ञता – ३०

अंधकाराचा काळ वारंवार येत असतो आणि ही गोष्ट सार्वत्रिक असते. अशा वेळी सहसा, कधी आध्यात्मिक रात्री तर कधी पूर्ण प्रकाशाचे दिवस, असे आलटूनपालटून येत असतात, हे जाणून, कोणतीही काळजी न करता केवळ शांत राहणे पुरेसे असते. परंतु तुम्हाला शांतीमध्ये स्थिर राहता यावे यासाठी म्हणून तुम्ही, तुमच्या हृदयामध्ये ‘ईश्वरा’विषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे. ‘ईश्वर’ तुम्हाला जे साहाय्य करतो त्याबद्दलची ही कृतज्ञता असली पाहिजे. परंतु जर ही कृतज्ञताही झाकोळली गेली तर मात्र अंधकाराचा कालावधी दीर्घकाळ राहण्याची शक्यता असते. असे असले तरी एक वेगवान आणि परिणामकारक उपायदेखील असतो, तो असा की : शुद्धीकरणाची ज्योत तुमच्या हृदयामध्ये कायम प्रज्वलित ठेवली पाहिजे. प्रगतीची आस, उत्कटता, आत्मनिवेदनाची इच्छा ही कायम ज्वलंत असली पाहिजे. जे कोणी प्रामाणिक असतात त्यांच्या हृदयामध्ये ही ज्योत प्रज्वलित होते; मात्र तुम्ही तुमच्या कृतघ्नपणाच्या राखेने ती ज्योत विझू देता कामा नये.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 246-247)

कृतज्ञता – २८

कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपण आपल्यामधील अहंकारावर मात केली पाहिजे आणि या रूपांतरणाच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत. ‘इतरजण तरी कुठे रूपांतरित झाले आहेत,’ या सबबीखाली मानवी अहंभाव स्वतःचा परित्याग करण्यास नकार देतो. परंतु ही एक प्रकारे त्याच्यावर असणारी दुरिच्छेची पकड असते, कारण इतर काय करतात किंवा काय करत नाहीत याकडे लक्ष न देता, स्वतःमध्ये रूपांतर घडविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते.

हे रूपांतर, अहंकाराचा निरास करणे हा स्थायी शांती आणि आनंद मिळविण्याचा एकमेव मार्ग आहे, हे जर लोकांना समजले तर मग आवश्यक प्रयत्न करण्यास ते संमती देतील. हा ठाम विश्वासच त्यांच्यामध्ये जागृत करण्याची आवश्यकता आहे.

प्रत्येकाला हे वारंवार सांगितले पाहिजे की, तुमच्या अहंकाराचा निरास करा म्हणजे शांती तुमच्यावर सत्ता प्रस्थापित करेल.

‘ईश्वरी’ साहाय्य प्रामाणिक अभीप्सेला नेहमीच प्रतिसाद देते.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 428)

कृतज्ञता – २७

अहंकारी मनाचा दृष्टिकोन असा असतो की, माझ्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी साऱ्या जगाचे नुकसान झाले तरी हरकत नाही. असे अहंकारी मन त्याची तत्त्वे साऱ्यांवर लादू पाहत असते.

दिव्य दृष्टीला मात्र, तत्त्व किंवा इच्छावासना, एकसारख्याच भासतात. कारण तिच्या दृष्टीने, इच्छावासना म्हणजे प्राणाचा लहरीपणा असतो तर तत्त्व हा मनाचा लहरीपणा असतो.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 342)

कृतज्ञता – २६

(एक साधक श्रीमाताजीच्या ‘चार तपस्या आणि चार मुक्ती’ लेखामधील पुढील वचन वाचतो…)

“…अशा व्यक्ती पूर्णतः ईश्वराच्या झालेल्या असतात; त्यांच्या जीवनातील साऱ्या घटना या ईश्वरी इच्छेची अभिव्यक्ती असतात आणि त्या साऱ्या घटना अशा व्यक्ती केवळ शांत शरणागतीने स्वीकारतात असे नाही तर, त्या घटनांचा स्वीकार त्या व्यक्ती कृतज्ञतेने करतात; कारण त्यांच्या बाबतीत जे काही घडते ते त्यांच्या भल्यासाठीच घडते याची अशा व्यक्तींना पूर्ण खात्री असते.”

प्रश्न : वरील उताऱ्यामध्ये उद्धृत केल्याप्रमाणे, शांत शरणागती आणि कृतज्ञ शरणागती यामध्ये फरक काय असतो?

श्रीमाताजी : शांत शरणागती आणि कृतज्ञ शरणागती यामधील फरक तुम्हाला जाणून घ्यायचा आहे का? ठीक आहे… तुम्हाला जेव्हा एखादा आदेश मिळतो तेव्हा तुम्ही त्या आदेशाचे बरेचदा नाखुषीने पालन करता कारण, तुम्ही शरणागती पत्करण्याचा निर्धार केलेला असतो आणि त्यामुळे तुम्ही कोणत्याही खुषीविना किंवा आनंदाविना, अगदी शुष्कपणे आणि वरवर त्या आदेशाचे पालन करता आणि तुम्ही स्वतःला सांगता, ”मला अमुक अमुक करायला सांगण्यात आले आहे आणि त्यामुळे आता मी त्याप्रमाणे करत आहे.” याचा अर्थ असा की, तुम्ही काही समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि तुम्हाला जे काही करायला सांगण्यात आलेले असते, त्याचे स्वखुषीने पालन करण्याचा तुम्ही प्रयत्न करत नाही. ही झाली नाखुषीने पत्करलेली शरणागती. तुम्ही तुमच्या नियतीचा स्वीकार करता आणि तुम्ही तक्रार करत नाही ती त्यामुळेच! कारण तुम्ही तक्रार करायची नाही असा निश्चय केलेला असतो, या निश्चयामुळेच तुम्ही तक्रार करत नाही, अन्यथा तुम्ही तक्रार केलीच असती.

दुसरा प्रकार म्हणजे अमुक एक आदेश का देण्यात आला आहे ते समजून घेणे, त्याच्या आंतरिक मूल्याचे आकलन करणे, आणि जे करण्यास सांगण्यात आलेले आहे, ते व्यक्तीने स्वतःच्या सामर्थ्यानिशी, ज्ञानानिशी, आनंदाने अभिव्यक्त करण्याची इच्छा बाळगणे; आणि त्याचा परिणाम म्हणून ईश्वर तुमच्या अधिक सन्निध येण्यासाठी आणि तुमचे पूर्ण समाधान करण्यासाठी बांधील असतो. अशा रीतीने तुम्ही आनंदी होता, समाधानी होता आणि मग तुम्ही त्याला सहकार्य करता. त्यामुळे बराच फरक पडतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 63-64)