कर्म आराधना – ०१

प्रस्तावना

श्रीअरविंदांच्या पूर्णयोगातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘कर्म’. पूर्णयोगामध्ये मानवतेची सेवा करण्यावर किंवा कोणत्यातरी विशिष्ट मानसिक आदर्शानुसार सेवा करण्यावर भर नसून, ईश्वराची सेवा करण्यावर भर आहे. मानवतेची सेवा केल्याने व्यक्ती व्यापक होऊ शकते खरी परंतु, बरेचदा तीच सेवा, आपण इतरांचे कल्याण करत आहोत याची प्रौढी मिरविणाऱ्या राजसिक अहंकारावर पांघरूण घालते. फारफार तर आपल्याला मानवी दशेमध्येच जखडून ठेवणारा तो एक सात्त्विक भ्रम ठरू शकतो. परंतु प्रथमत: ईश्वराचे साधन आणि माध्यम बनून, सर्व मानवी संकल्पनांच्या अतीत जाणे, ‘पूर्णयोगा’मध्ये अभिप्रेत आहे; जेणेकरून मानवाच्या माध्यमातून ‘ईश्वरा’ला या पृथ्वीवर ‘स्वतःच्या’ वैभवाचा वर्षाव करता येईल. आपल्या समग्र अस्तित्वाने केलेल्या ‘प्रार्थनेमध्ये आणि आराधनेमध्ये’ कर्माचे रूपांतर केल्यानेच ही गोष्ट चांगल्या रीतीने करता येते. ‘ईश्वरा’ची सेवा केल्याने, आपली मानवी चेतना ही गतिमान ‘दिव्य चेतने’च्या आणि तिच्या रूपांतरकारी शक्तीच्या संपर्कात येते. आजपासून आपण “कर्म आराधना” या मालिकेद्वारे श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या विचारधनाच्या माध्यमातून पूर्णयोगातील ‘कर्म’ हा पैलू समजावून घेणार आहोत.

– संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक.

अभीप्सा मराठी मासिक