‘परिपूर्णता’ ही अजूनही एक विकसनशील संकल्पना आहे. निर्मिती जेव्हा तिच्या सर्वोच्च शक्यतांप्रत पोहोचते, तेव्हा ती परिपूर्णता असते, असे नेहमीच म्हटले जाते; पण हे असे नसते. आणि नेमक्या याच संकल्पनेला माझा विरोध आहे. या गोष्टी म्हणजे प्रगतीची केवळ एक पायरी असते. म्हणजे असे की, ‘प्रकृती’ तिच्या शक्यतांच्या अगदी अंतिम मर्यादेपर्यंत जाते आणि जेव्हा तिच्या असे लक्षात येते की, आता पुढे जाता येत नाहीये, मार्ग खुंटला आहे, तेव्हा ती सारेकाही नष्ट करून टाकते आणि पुन्हा नव्याने प्रारंभ करते. याला काही परिपूर्णता म्हणता येणार नाही, कारण परिपूर्णता असेल तर गोष्टी नष्ट कराव्या लागता कामा नयेत. ‘प्रकृती’ने जे काही घडवायला सुरुवात केली होती, ते तिला नष्टवत करावे लागता कामा नये, तेव्हाच परिपूर्णता येईल. ‘प्रकृती’ने जे घडवायला सुरुवात केली होती ते पुरेसे नाहीये किंवा तिला स्वतःला जे घडवायचे होते ते काहीतरी वेगळेच होते, असे जाणवल्यावर तिने ते नष्ट केले नाही, असे आत्ताच्या घडीला तरी एकही उदाहरण दिसत नाही. त्यामुळे ‘प्रकृती’ने आपल्या निर्मितीमध्ये परिपूर्णता संपादन केली आहे, असे म्हणता येणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 15)

‘प्रकृती’पाशी पुरेसे द्रष्टेपण असते; ती प्रत्येक वातावरणामध्ये त्या वातावरणाला अनुसरून सुयोग्य अशी गोष्ट निर्माण करत असते. अर्थातच, एखाद्याने माणसाला केंद्रस्थानी ठेवता कामा नये, त्याने असे म्हणता कामा नये की, अमुक अमुक गोष्ट ‘निसर्गा’ने माणसाच्या भल्यासाठी केली आहे. परंतु असे असेल असे काही मला वाटत नाही, कारण या पृथ्वीवर माणसाचा उदय होण्यापूर्वी कितीतरी आधीपासूनच ‘प्रकृती’ने या साऱ्या गोष्टींची निर्मिती केलेली होती.

एखाद्या देशाची पर्यावरणीय परिस्थिती आणि त्या देशामध्ये तयार होणारे उत्पादन यांच्यामध्ये एक प्रकारची सुसंवादिता विकसित झालेली आढळते; जसे की, प्राण्यांचा अधिवास ज्या देशांमध्ये असतो त्या देशाची विशालता आणि तेथील प्राण्यांचा आकार या दोहोंमध्ये एक प्रकारची सुसंवादिता आढळते. उदाहरणार्थ, भारतातील हत्ती हे आफ्रिकेमधील हत्तींपेक्षा आकाराने कितीतरी लहान असतात. आणि असे म्हटले जाते की, आफ्रिकेमध्ये प्रचंड मोकळी जागा आहे आणि त्यामुळे तेथील प्राणीदेखील आकाराने मोठे असतात.

सृष्टीनिर्मितीमध्येच ही एक प्रकारची सुसंवादिता प्रस्थापित झालेली आहे आणि पुढे देश जसजसे आकाराने लहान होत गेले, प्रांत जसजसे आकुंचित होत गेले तसतसे, त्या प्रांतामध्ये राहणारे प्राणीदेखील आकाराने लहानलहान होत गेले. आणि मोकळी जागा आणि त्या प्राण्यांचे आकारमान यांच्यामध्ये सुयोग्य प्रमाण उरले नाही तेव्हा ते प्राणी नष्ट झाले. तुम्ही जर बेसुमार घरं बांधलीत, तर मग तेथे अस्वलं, लांडगे यांसारखे प्राणी शिल्लक राहणार नाहीत, साहजिकच, सर्वात आधी वाघ आणि सिंह नामशेष होतील; आणि मला वाटते यामध्ये माणसांचा हात आहे…

भीती माणसांना अत्यंत विघातक बनवते. पण जसजसे माणसांचे जथेच्या जथे संख्येने वाढत जातील आणि रिकाम्या जागा कमी कमी होत जातील तसतसे प्राणिमात्रांचे आकार कमीकमी होत जातील. मग आपण या सगळ्यांसाठी नियम तरी कसे बनवणार?

– श्रीमाताजी
(CWM 07 : 53-54)

व्यक्तीकडे जेव्हा अशी अंतर्दृष्टी असते, की जी आपल्या अस्तित्वाची आतली द्वारे उघडून देते आणि ज्यामुळे व्यक्ती वस्तुमागील सत्य काय आहे ते पाहायला सुरुवात करते तेव्हा, व्यक्तीला हे उमगू लागते की, अगदी या भौतिक विश्वामध्येसुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्या आपल्या सामान्य नजरेतून निसटून जातात. व्यक्तीने अगदी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली किंवा अगदी दुर्बिणीतून पाहिले तरी, किंवा आधुनिक छायाचित्रणाच्या साधनांद्वारे त्याचे पुनरुत्पादन करण्यात व्यक्ती सक्षम ठरली तरी, या साऱ्या गोष्टी म्हणजे केवळ वर्गीकरण असते, ‘निसर्गा’ची रहस्यं शोधण्याच्या दिशेने टाकलेली ती पहिलीवहिली पावले असतात. ‘निसर्गा’च्या कार्यप्रणाली मागे काय दडलेले आहे, याचे वर्णन कोणतेही मानवनिर्मित यंत्र करू शकणार नाही. ती कार्यप्रणाली इतकी सुंदर, इतकी बहुविध, इतकी सूक्ष्म आणि तिच्या अचूकतेबाबतीत, तिच्या बारकाव्यानिशी केलेल्या कार्याच्या परिपूर्णतेबाबत इतकी उत्कृष्ट आहे, की या छोट्याशा मेंदूने त्याचे वर्णन कधीच करता येणे शक्य नाही. आणि मनुष्याला मात्र असे वाटत असते की, ‘निसर्गा’च्या या कार्यप्रणालीमध्ये यंत्रांच्या मदतीने आणि त्याने लावलेल्या शोधांच्या माध्यमातून तो सुधारणा घडवून आणू शकतो; भौतिक क्षेत्रात त्याने ज्या क्षमता संपादन केलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून ‘निसर्गा’च्या या कार्यप्रणाली तो शास्त्रीय पद्धतीने बदलवून टाकू शकतो, अशी त्याची समजूत असते. मनुष्य त्याच्या सूत्रांद्वारे, त्याच्या अनुभवाच्या पद्धतीद्वारे आणि ‘निसर्गा’च्या कार्यप्रणालीवर विजय मिळविण्याच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या शोधांच्या साहाय्याने ‘निसर्गा’वर प्रभुत्व मिळवू शकतो असा त्याचा उद्दाम विश्वास असतो. केवढी ही मूर्खता, केवढा हा वेडेपणा!… कसली ही तुलना !

अनंताला कवळणाऱ्या ‘निसर्गा’च्या क्षमतेच्या परिघालासुद्धा मनुष्य आजवर स्पर्श करू शकलेला नाही आणि तो ‘निसर्गा’वर सत्ता गाजविण्याचा दावा करत आहे. – हा मनुष्याचा फाजील गर्व आणि त्याचा अहंकार आहे; असाध्य रोगाच्या तावडीत सापडलेल्या आणि ज्याचे आयुष्य गिळंकृत केले जात आहे अशा एखाद्या प्राण्याने व्यर्थ फुशारक्या माराव्यात तसे हे आहे.

आणि तरीही, मनुष्य विजय मिळविण्याची इच्छा बाळगून आहे, त्यावर ठाम आहे, आणि तो अतिशय उत्सुक आहे. परंतु त्यासाठी ज्या मार्गाचा तो अवलंब करत आहे त्यामुळे त्याला प्रदीर्घ काळ लागू शकतो. आणि आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला बरीच वेडीवाकडी वळणं पार करावी लागू शकतात.

– श्रीमाताजी
(Blessings of the Grace : 77-78)

‘निसर्गा’मध्ये वनस्पती ज्याप्रमाणे वाढतात त्याप्रमाणे, व्यक्तीने गोष्टींना सहजस्वाभाविकपणे विकसित होऊ द्यावे. त्यांच्या त्यांच्या वेळेपूर्वीच आपण जर त्यांच्यावर अत्यंत काटेकोर आकार किंवा मर्यादा लादण्याचा प्रयत्न केला तर, त्या गोष्टी त्यांचा नैसर्गिक विकास गमावून बसतील आणि आज ना उद्या त्या नष्ट कराव्याच लागतील.

‘निसर्गां’तर्गत ‘ईश्वर’ अंतिम असे काहीच निर्माण करत नाही, प्रत्येक गोष्टच तात्पुरती असते आणि त्याच वेळी ती त्या कालमान-परिस्थितीला अनुसरून जितकी शक्य आहे तितकी परिपूर्ण देखील असते.

*

आपल्या कार्यप्रणालीमध्ये आपण ‘प्रकृती’चे गुलाम असता कामा नये : प्रयत्न करण्याच्या, बदलण्याच्या, काहीतरी करण्याच्या, नाहीसे करण्याच्या, पुन्हापुन्हा करत राहण्याच्या सवयी तसेच, ऊर्जा, श्रम, साधनसंपदा आणि संपत्तीचा अपव्यय करण्याच्या साऱ्या सवयी हा ‘प्रकृती’च्या कार्याचा मार्ग आहे, हा ‘ईश्वरा’चा मार्ग नव्हे. ‘दिव्य-चेतना’ आधी त्या कार्याचे सत्य काय आहे हे पाहते, दिलेल्या परिस्थितीत ते कार्य करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता तेही ती ‘चेतना’ पाहते. आणि जेव्हा ती कार्य करते तेव्हा ते अंतिम असते; एकदा केलेल्या गोष्टीकडे ती कधीच पुन्हा परतून येत नाही, ती पुढे पुढे वाटचाल करते, यश असो की अपयश त्यास ती आपल्या ध्येयाप्रत जाण्याच्या दिशेने प्रगत होण्याचे एक पाऊल म्हणून उपयोगात आणते.

‘प्रकृती’ प्रगती करण्यासाठी विनाश घडविते, तर ‘दिव्य-चेतना’ विकासाला उत्तेजन देते आणि सरतेशेवटी रूपांतरण घडविते.

*

तुम्हाला तुमची जबाबदारी उमगली नाही आणि तुम्ही सदैव सतर्क आणि उद्यमी राहिला नाहीत तर, ‘प्रकृती’ तुमची थट्टा करेल. तुम्हाला ‘प्रकृती’ करते ती थट्टा थांबवायची असेल तर, तुम्ही अगदी अचूकतेने आणि जबाबदारीने तुमचे कर्म केले पाहिजे. काहीतरी करायचेच राहून गेले आहे, असे होता कामा नये. तुम्ही नेहमीच सावधानता बाळगली पाहिजे, सतर्क राहिला पाहिजेत म्हणजे मग तुम्ही सुरक्षित असाल.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 12)

(श्रीमाताजींनी ‘विश्वात्मक’ प्राणाशी किंवा ‘ईश्वरी’ आनंदाशी एकात्म पावलेल्या व्यक्तिगत प्राणासंबंधी विवेचन केले आहे. एकदा का ही एकात्मता साधली की मग प्राणाचे व्यक्तिगत अस्तित्व शिल्लक राहत नाही, असे त्या म्हणतात.)

उदाहरणार्थ, क्वचितच एखाद्या मानवी वातावरणाने दूषित न झालेल्या गावाकडील निर्जन रस्त्यावरून, जेथे निसर्ग एखाद्या अभीप्सेसारखा, एखाद्या पवित्र प्रार्थनेसारखा अगदी शांत, विशाल, विशुद्ध असतो अशा ठिकाणी किंवा पर्वतराजीमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये, शेजारून खळाळणारे पाण्याचे प्रवाह जिथे वाहत आहेत अशा भटक्या वाटांवरून, किंवा अथांग सागरकिनाऱ्यावरून व्यक्ती जेव्हा एकटीच आपल्या नादात फिरत असते, किंवा ज्याच्याबरोबर त्या व्यक्तीचा पूर्ण सुसंवाद असतो अशा जोडीदाराच्या सहवासात विहार करत असते, तेव्हा तेथे तिला जी संवदेना जाणवत असते ती म्हणजे एक सूक्ष्मसा आनंद असतो, तो मधुर आणि अगाध असतो. जोपर्यंत प्राण व्यक्तिगत असतो, तोपर्यंत हा आनंद बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतो. जेव्हा (व्यक्तीचा) ‘प्राण’ खऱ्या अर्थाने अवैयक्तिक, विश्वात्मक झालेला असतो, तेव्हा ‘ज्यांना ज्यांना त्याची जाणीव असते त्या सर्वांमध्ये असलेला, आल्हाददायक आनंदच’ ती व्यक्ती होऊन जाते; अशा वेळी व्यक्तीला त्या गोष्टीचा आनंदोपभोग घेण्यासाठी, आजूबाजूला कोणतीही विशिष्ट भौतिक परिस्थिती असण्याची आवश्यकता नसते. नाडीगत स्तराबाबत (Nervous plane) सांगायचे तर, अशावेळी व्यक्ती सर्व प्रकारच्या परिस्थितींपासून पूर्णतः मुक्त असते. त्यावेळी व्यक्तीला मुक्ती प्राप्त झालेली असते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 119-120)

प्रस्तावना

‘प्रकृती’ म्हणजे जणू एखादी यांत्रिक अचेतन शक्ती असावी आणि ती या सृष्टीरचनेतील सर्व गोष्टींचे संचालन करत असावी, असे सहसा मानले जाते. ‘प्रकृती’चा सखोल अभ्यास केला, तिचे आकलन करून घेतले तर आपल्याला सारे काही उमगेल, सारे काही ज्ञात होईल आणि सर्व गोष्टींवर प्रभुत्व मिळविता येईल अशी माणसाची समजूत असते. परंतु आपण ‘प्रकृती’च्या विविध पद्धतींकडे थोडे जरी सखोलपणाने पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला खात्री पटते की, ‘प्रकृती’ ही यांत्रिक आणि अचेतन नसून, तिच्या अंतरंगामध्ये आणि तिच्या कार्यप्रणालीच्या पाठीमागे एक परिपूर्ण ‘चित्शक्ती’ आहे आणि ती पूर्वनिर्धारित उद्दिष्टाच्या दिशेने सुयोग्य अशा साधनांचा स्वीकार करत असते.

श्रीअरविंद आणि श्रीमाताजींच्या विशाल आध्यात्मिक ज्ञानाच्या साहाय्याने, आपण या मालिकेमध्ये प्रकृतीची गहन, निगूढ अशी कार्यप्रणाली समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

– संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक.

विचार शलाका – ३३

 

“खरोखर, ‘ईश्वर’च साऱ्या करुणेचा मूळस्रोत असतो, जर तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करत राहिला नाहीत तर, तुमच्या साऱ्या चुका नाहीशा करण्याचे सामर्थ्य त्याच्यापाशीच असते; खऱ्या साक्षात्काराचा मार्ग खुला करणारा ‘ईश्वर’च असतो.”

 

श्रीमाताजींचे हे विधान इ. स. १९६१ मध्ये जेव्हा प्रथम प्रकाशित झाले तेव्हा, या विधानावर भाष्य करताना श्रीमाताजी म्हणाल्या की, ”व्यक्ती जोवर त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहते तोपर्यंत त्या चुका नाहीशा होऊ शकत नाहीत, कारण व्यक्ती प्रत्येक क्षणाला त्या चुका नव्याने करत असते. जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते, मग ती गंभीर असो किंवा नसो, त्या चुकीचे तिच्या जीवनात काही परिणाम होतातच, ते ‘कर्म’ संपुष्टात आणावेच लागते, पण व्यक्ती जर त्या ‘ईश्वरी कृपे’ कडे वळेल तर त्या ‘कृपे’मध्ये, ते परिणाम नष्ट करण्याची शक्ती असते; पण यासाठी व्यक्तीने त्याच त्या चुकीची पुनरावृत्ती करता कामा नये. व्यक्ती त्याच त्याच मूर्खपणाच्या गोष्टी अनंत काळ करत राहील आणि ‘ईश्वरी कृपा’देखील त्याच्या परिणामांचा निरास अनंत काळ करत राहील, असे व्यक्तीने कदापिही समजता कामा नये, कारण हे असे घडत नसते.

 

भूतकाळ पूर्णपणे स्वच्छ केला जाऊ शकतो; त्याचा भविष्यावर कोणताही परिणाम होणार नाही इतका तो विशुद्ध केला जाऊ शकतो; परंतु व्यक्तीने तिची भूतकालीन अवस्था पुन्हा कायमस्वरूपी वर्तमानात ओढता कामा नये, या एकाच अटीवर हे होऊ शकते; तुम्ही स्वत: तुमच्यातील वाईट स्पंदनांना थांबविले पाहिजे, तुम्ही तेच ते स्पंदन पुन्हा पुन्हा अनंत काळ निर्माण करत राहता कामा नये.”

 

– श्रीमाताजी

(CWM 09 : 58)

विचार शलाका – ३२

 

प्राथमिक स्तरावर, दुःखभोग म्हणजे आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे आपल्याला कळावे म्हणून ‘प्रकृती’ने केलेली सूचना असते; आणि सुखोपभोग म्हणजे, आपण ज्या गोष्टींचा पाठपुरावा केला पाहिजे त्यासाठी ‘प्रकृती’ने ठेवलेले प्रलोभन असते.

 

– श्रीअरविंद

(CWSA 13 : 373)

विचार शलाका – ३१

 

व्यक्ती जोवर ‘अज्ञाना’मध्ये जीवन जगत असते तोवर नियती या शब्दाचा काटेकोर अर्थ, व्यक्तीच्या बाह्य अस्तित्वालाच लागू पडतो. आपण ज्याला ‘नियती’ म्हणतो ती म्हणजे वस्तुतः एक परिणाम असतो. जिवाने गतकाळात जी प्रकृती आणि ज्या ऊर्जांचा संचय केलेला असतो, त्यांचे एकमेकांवर जे कार्य चालू असते त्यांचा आणि त्या ऊर्जा ज्या सद्यकालीन प्रयत्नांचा व त्यांच्या भावी परिणामांचा निर्णय करत असतात त्यांचा, तसेच व्यक्तीची सद्यकालीन स्थिती या साऱ्याचा तो परिणाम असतो.

 

पण व्यक्ती ज्या क्षणी आध्यात्मिक मार्गामध्ये प्रवेश करते त्याच क्षणी, या जुन्या पूर्वनिर्धारित नियतीची पिछेहाट व्हायला सुरुवात होते. आणि तिथे एका नवीनच घटकाचा म्हणजे ‘ईश्वरी कृपे’चा, ‘कर्म-शक्ती’पेक्षा भिन्न असणाऱ्या उच्चतर ‘ईश्वरी शक्ती’च्या साहाय्याचा प्रवेश होतो; ही कृपा साधकाला त्याच्या प्रकृतीच्या सद्यकालीन संभाव्यतांच्या पलीकडे उचलून घेऊ शकते. अशा वेळी, त्या जिवाची आध्यात्मिक नियती म्हणजे ईश्वरी निवड असते, जी भविष्याबद्दल आश्वस्त करते. या मार्गावरील चढउतार आणि ते ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ, एवढीच काय ती शंका असते. इथेच, भूतकालीन प्रकृतीच्या दुर्बलतांशी खेळणाऱ्या विरोधी शक्ती, प्रगतीची गती रोखण्यासाठी आणि प्रगतीची परिपूर्ती पुढे ढकलण्यासाठी आटापिटा करत असतात. जे अपयशी ठरतात ते या प्राणिक शक्तींच्या हल्ल्यांमुळे अपयशी ठरतात असे नव्हे, तर ते स्वतः विरोधी ‘शक्तीं’च्या बाजूने होतात आणि आध्यात्मिक सिद्धींपेक्षा ते प्राणिक आकांक्षेला किंवा इच्छेला (आकांक्षा, फुशारकी, लोभ इ. गोष्टींना) अधिक प्राधान्य देतात, हे त्यामागचे कारण आहे.

 

– श्रीअरविंद

(CWSA 28 : 509-510)

विचार शलाका – ३०

 

व्यक्ती जोपर्यंत सामान्य मानवी चेतनेमधून बाहेर पडून, तिच्या खऱ्या क्षेत्रामध्ये म्हणजे, जेथे सर्व बंध मुक्त होतात अशा उच्चतर आध्यात्मिक चेतनेच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत नाही, तोपर्यंत ‘कर्मा’च्या परिणामांचे बंधन शिल्लक असते. शांतीबाबत सांगायचे तर, ‘ईश्वरा’वर पूर्ण भरवसा आणि ‘ईश्वरी संकल्पा’प्रत समर्पण यातून ती प्राप्त होऊ शकते.

 

– श्रीअरविंद

(CWSA 28 : 520)