विचार शलाका – ०३

सर्व वेदना, दुःखभोग, संकटे, चिंता, अज्ञान आणि सर्व प्रकारच्या अक्षमता, दुर्बलता ह्या गोष्टी विलगतेच्या भावनेतून आल्या आहेत. संपूर्णतया केलेले आत्मदान, संपूर्ण आत्मनिवेदनात (consecration) झालेला ‘मी’चा विलय, यामुळे दुःखभोग नाहीसे होतात आणि त्याची जागा, आनंदाने घेतली जाते की, जो कशानेही झाकोळला जात नाही.

आणि असा आनंद जेव्हा या जगामध्ये स्थापित होईल, तेव्हाच दुःखभोगाचे खरेखुरे रूपांतरण झालेले असेल, आणि येथे एक नवजीवन, नवनिर्माण व नव-प्रचिती असेल. हा आनंद सर्वप्रथम चेतनेमध्येच स्थापित झाला पाहिजे. तसे झाले म्हणजे मगच भौतिकाचे रूपांतरण होईल, तत्पूर्वी नाही.

खरे तर, ‘विरोधी'(शक्ती) सोबतच दुःखभोग या जगात आले. आणि असा आनंदच केवळ त्या दुःखभोगांना पराभूत करू शकतो, त्या दुःखभोगांचा अंतिमतः निर्णायक पराभव करू शकेल असे अन्य कोणीही नाही.

‘दिव्यानंदा’नेच निर्मिती केली आहे आणि पूर्णतेस नेणाराही ‘दिव्यानंद’च असेल.

हे मात्र नीट लक्षात ठेवा की, सामान्यतः लोक ज्याला आनंद म्हणतात, त्या आनंदाविषयी मी हे बोलत नाहीये. तो आनंद म्हणजे खऱ्याखुऱ्या आनंदाचे व्यंगचित्रही शोभणार नाही. मला वाटते, इंद्रियसुख, आत्मभानशून्यता आणि बेपर्वाई यांपासून मिळणारा आनंद हा व्यक्तीला मार्गच्युत करणारा राक्षसी आविष्कार असतो.

मी ज्या आनंदाविषयी बोलते आहे, तो आनंद म्हणजे परिपूर्ण शांती, छायाविरहित प्रकाश, सुसंवाद, संपूर्ण व सर्वांगीण सौंदर्य, अनिरुद्ध सामर्थ्य होय. तो असा आनंद आहे की, जो अर्करूपाने, ‘संकल्प’रूपाने आणि त्याच्या ‘जाणिवे’ने, स्वत:च एक ईश्वरी ‘अस्तित्व’ आहे!

– श्रीमाताजी
(CWM 07 : 396-397)

विचार शलाका – ०२

दुःखभोग हे प्रथमतः अज्ञानामुळे येतात आणि दुसरे कारण म्हणजे, व्यक्तिरूप चेतनचे ‘दिव्य चेतना’ व ‘दिव्य अस्तित्व’ यांपासून विलगीकरण झालेले असल्यामुळे ते येतात.

जेव्हा ही विलगता नाहीशी होते, जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या विभक्त अशा छोट्याशा ‘स्व’मध्ये न जगता संपूर्णतया ‘दिव्यत्वा’मध्ये जगू लागते तेव्हाच केवळ दुःखभोग पूर्णत: नाहीसे होतात.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 527)

विचार शलाका – ०१

दुःखभोग हे आपल्या पापकर्माची किंवा आपल्यातील वैरभावाची शिक्षा म्हणून आपल्या वाट्याला येतात असे नाही – तसे समजणे ही चुकीची कल्पना आहे. अज्ञानदशेतील जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून जसे सुख किंवा सुदैव अनुभवास येते त्याप्रमाणेच दुःखभोग देखील वाट्यास येतात. आपल्याला आपल्या सत्यचेतनेपासून आणि परमेश्वरापासून विलग करणाऱ्या अज्ञानाचे अटळ परिणाम म्हणजे हर्ष-वेदना, आनंद-दुःख, सुदैव-दुर्दैव ही द्वंद्वे होत. केवळ परमेश्वराकडे परतण्यानेच दुःखभोगापासून आपली सुटका होऊ शकते. गतजन्मांतील कर्म अस्तित्वात असतात आणि बव्हंशी जे घडते ते त्यामुळेच; पण सर्वच गोष्टी काही त्याचे परिणाम नसतात. कारण आपण आपल्या स्वतःच्या चेतनेने आणि प्रयत्नांनी आपल्या कर्मांमध्ये सुधारणा घडवून आणू शकतो. ज्याप्रमाणे भाजणे हा आगीशी खेळण्याचा स्वाभाविक परिणाम असतो त्याप्रमाणे दुःखभोग हा आपल्या गतकालीन प्रमादांचा निव्वळ स्वाभाविक परिणाम असतो; दुःखभोग ही आपल्या गतकालीन प्रमादांची शिक्षा नसते. अशा काही अनुभवाच्या माध्यमातून, जीव हा त्याच्या साधनांद्वारे शिकत असतो आणि जोपर्यंत तो परमेश्वराकडे वळण्यास तयार होत नाही, तोपर्यंत तो विकसित होत राहतो, वृद्धिंगत होत राहतो.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 670)

सद्भावना – ३०

जोवर तुमच्यामध्ये दुसऱ्यांविषयी आपपर भाव शिल्लक असतो तोवर निश्चितपणे तुम्ही ‘सत्या’च्या परिघाबाहेर असता.

तुम्ही कायमच तुमच्या हृदयात सद्भाव आणि प्रेमभाव जतन केला पाहिजे. आणि प्रगाढ शांतीने आणि समतेने त्यांचा सर्वांवर वर्षाव केला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 191)

सद्भावना – २९

साधे असणे खूप चांगले असते, फक्त सदिच्छा बाळगायची, आपल्याला करता येणे शक्य असेल ती उत्तमातील उत्तम गोष्ट आपण करायची आणि ती गोष्ट शक्य तेवढ्या सर्वोत्तम रीतीने करायची. त्यासाठी फार वेगळे असे काही करण्याची गरज नाही; फक्त प्रगतीसाठी, प्रकाशासाठी, सद्भावनापूर्ण शांतीसाठी अभीप्सा बाळगायची. आणि आपण काय केले पाहिजे आणि आपण कोण झाले पाहिजे यासंबंधीचा निर्णय, या विश्वातील सारे काही जो जाणतो त्या ‘ईश्वरा’लाच घेऊ द्यायचा, हे किती छान आहे! मग आपल्याला कोणतीच चिंता उरत नाही, आणि मग आपण अगदी पूर्णपणे आनंदी राहू शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 248)

सद्भावना – २८

एखादी गोष्ट चुकीची आहे हे माहीत नसताना जर ती गोष्ट तुमच्याकडून घडली असेल तर, तेव्हा तुम्ही ती चूक अज्ञानापोटी केलेली असते आणि म्हणून हे साहजिकच आहे की, नंतर जेव्हा तुम्हाला ती गोष्ट चुकीची होती हे समजते, आणि जेव्हा तुमचे अज्ञान नाहीसे झालेले असते तसेच तुमच्यापाशी सद्भाव असतो तेव्हा, तुम्ही तीच चूक परत करत नाही, आणि एवढेच नाही तर, ज्या परिस्थितीत ती चूक पुन्हा घडण्याची शक्यता असते त्या परिस्थितीतूनच तुम्ही बाहेर पडलेले असता.

पण अमुक एक गोष्ट चुकीची आहे हे तुम्हाला माहीत असूनही, जेव्हा तुम्ही ती चूक करता तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, तुमच्यामध्ये कुठेतरी, काहीतरी अशी विकृती आहे की, जिने गोंधळ किंवा दुरिच्छा यांची निवड केलेली असते. किंबहुना, तिने ईश्वर-विरोधी शक्तींच्या बाजूने राहण्याची जाणूनबुजून निवड केलेली असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 306)

सद्भावना – २७

एकदोन दिवसांपूर्वी ‘पवित्र’ (श्रीमाताजींचे एक ज्येष्ठ शिष्य) जेव्हा पत्रांची जुळवाजुळव करत होते तेव्हा, मी इंग्रजीत कोणाला तरी लिहिलेले एक पत्र त्यांच्या पाहण्यात आले.

त्यात असे लिहिले होते की, “जी व्यक्ती आपल्या चेतनेमध्ये सद्भावना बाळगते त्या व्यक्तीला, ती सद्भावना स्वतःहून सर्व वस्तुमात्रांमध्ये गुप्त असलेल्या सद्भावनेचे सर्वत्र दर्शन घडविते. भावनेचा भविष्याकडे थेटपणे घेऊन जाणारा हा एक विधायक मार्ग आहे.”

मला हे फार रोचक वाटले. (हे पत्र काही वर्षांपूर्वी, किमान एक वर्षभर तरी आधी लिहिलेले होते, आणि पवित्रने मला सांगितले की, ते इतर फाईलींमध्ये गहाळ झाले होते, त्यांना ते सापडलेच नव्हते.) आणि ते पत्र जणू मला सांगत होते, “बघ, तू हे आधीच सांगून ठेवले आहेस.” कारण ‘सद्भावना’ म्हणजे सुसंवाद (अर्थात मनोवैज्ञानिक स्तरावरील) होय, सारे काही चांगले व्हावे अशी मानसिक स्तरावरील ती इच्छा असते. मला हे मोठे रोचक वाटले.

पण ते पत्र परत सापडले हे बरे झाले; सद्भावना हे प्रत्येकाच्याच आवाक्यात येऊ शकेल असे एक रूप आहे, जे कोणालाही उमजू शकते. तुमच्याकडून कोणत्याही असाधारण गोष्टींची अपेक्षा केली जात नाही, तर फक्त सद्भावना असावी, एवढीच माफक अपेक्षा केली जाते. मला हे पत्र जेव्हा परत सापडले तेव्हा मी हसले आणि मला ते गमतीशीर वाटले आणि मी म्हणाले, “असेच विधान कदाचित मी प्रसन्नतेबद्दल देखील केले असेल.” मी असे म्हटलेले असेल की, ”प्रसन्न राहा आणि बघा, तुम्हाला सर्वत्र प्रसन्नताच दिसून येईल.” बरेच काही सांगता येण्यासारखे आहे. अशा वेळी मला नेहमीच शोभादर्शक यंत्राची (कॅलिडोस्कोप) आठवण येते; ज्यामध्ये काहीतरी निराळेच अभिव्यक्त करण्यासाठी रंगांची अशी एक रचना असते की, ज्या क्षणी ती गोष्ट अभिव्यक्त होते त्याच क्षणी…ती बदलते, नाहीशी होते, साधीसोपी होऊन जाते आणि अंतिमतः ती सर्वांच्या आवाक्यात येते.

पण एक गोष्ट आहे : पृथ्वीवर सध्या एक ‘भयंकर’ संघर्ष चालू आहे, परंतु त्याच बरोबर एक अद्भुत दिव्य कृपाही आहे, जी नेहमीच साहाय्य करत असते, ती नेहमीच अधिक चांगल्यासाठी धडपडत असते आणि दबाव टाकत असते, “या, प्रसन्न राहा, आणि सद्भावना बाळगा, या, समाधानयुक्त आंतरिक सुसंवाद, आशा, श्रद्धा बाळगा. विघटनाची स्पंदने – म्हणजेच ऱ्हासकारक, पतित करणारी, आणि विनाशाच्या दिशेने घेऊन जाणारी स्पंदने स्वीकारू नका.”

– श्रीमाताजी
(Mother’s Agenda, Vol – 08, May 3, 1967)

सद्भावना – २६

(प्राणामध्ये (Vital) दोन प्रवृत्ती आढळतात – एक म्हणजे निराशेची आणि दुसरी अतिउत्साहाची. या दोन प्रवृत्तींना कसे हाताळावे, याविषयी चर्चा सुरू असताना, श्रीमाताजी पुढे सांगत आहेत…)

अगदी काळजीपूर्वक टाळलाच पाहिजे असा हा एक मोठा अडथळा आहे. असमाधानाचे किंवा चिडचिडेपणाचे अगदी बारीकसे लक्षण जरी आढळले तरी, लगेचच आपण आपल्या प्राणाला असे सांगितले पाहिजे की, ”माझ्या मित्रा, तू शांत राहणार आहेस, तुला जे करायला सांगितले आहे तेवढेच तू करणार आहेस, अन्यथा माझ्याशी गाठ आहे.” आणि दुसरीकडे, “आत्ताच्या आत्ता सारे काही झालेच पाहिजे,’’ असे म्हणणारा, जो अतिउत्साही (प्राण) असतो त्याला असे समजावून सांगितले पाहिजे की, “थोडा शांत हो, तुझी उत्साहशक्ती चांगलीच आहे पण ती अशी पाच मिनिटांतच वाया घालविता कामा नये. आपल्याला ती पुढेही दीर्घकाळ लागणार आहे, तिचे काळजीपूर्वक जतन कर, आणि मला जेव्हा तिची आवश्यकता भासेल तेव्हा मी स्वतःहून तुझ्या सद्भावनेला हाक देईन. तेव्हा तू सद्भावनेने परिपूर्ण आहेस हे दाखवून देशील, तू आज्ञा पाळशील, तू कुरकूर करणार नाहीस, तू विरोध करणार नाहीस, तू बंड करणार नाहीस, तू म्हणशील, ‘हो, हो. मी करीन.” तुला जेव्हा विचारण्यात येईल तेव्हा तू किंचितसा त्याग करशील आणि म्हणशील, “हो, मी अगदी मनापासून करीन.” (प्राणाच्या अतिउत्साहाला तुम्ही अशा प्रकारे आवर घातला पाहिजे.)

– श्रीमाताजी
(CWM 04 : 249)

सद्भावना – २५

व्यक्ती ज्यावेळी अतिशय सतर्क आणि अतिशय प्रामाणिक असते तेव्हा, तिने हाती घेतलेल्या कामाचे किंवा ती करत असलेल्या कृतीचे मूल्य किती आहे किंवा काय आहे यासंबंधी, तिला एखादी आंतरिक पण सुस्पष्ट सूचना मिळू शकते. खरोखर, जिच्यापाशी पुरेपूर सद्भावना आहे अशी एखादी व्यक्ती असेल म्हणजे जी व्यक्ती अत्यंत प्रामाणिकपणाने, तिच्या अस्तित्वाच्या समग्र जाणिवयुक्त भागानिशी, योग्य कृती, योग्य प्रकारे करण्याची इच्छा बाळगत असेल तर नेहमीच अशा प्रकारची अंतःसूचना मिळते. कोणत्याही कारणाने का असेना पण जर का तिने कमीअधिक घातक अशी एखादी कृती करायला सुरुवात केली तर, तिला अशा प्रत्येक वेळी आज्ञा-चक्रापाशी (solar plexus) एक प्रकारच्या अस्वस्थतेची जाणीव होते. ही अस्वस्थता आक्रमक नसते, नाट्यमयरित्या काहीतरी करून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी ती बळाचा वापर करत नाही, परंतु तरीही सतर्क व्यक्तीसाठी ती अस्वस्थता अगदी सुस्पष्ट असते; ती काहीशी पश्चात्तापासारखी किंवा असहमतीसारखी असते. कधीकधी असहकार पुकारण्या इतपतदेखील या अस्वस्थतेची मजल जाऊ शकते. पण मला येथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, त्या अस्वस्थतेमध्ये कोणतीही आक्रमकता नसते, तिच्यामध्ये कोणताही क्रूर असा स्वाग्रह (self-assertion) नसतो. म्हणजे असे की, ती अस्वस्थता कोणताही गोंगाट करत नाही, इजा पोहोचवीत नाही, काहीशी बेचैनी असते इतकेच.

परंतु जर का तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष केलेत, तिच्याकडे लक्ष दिले नाहीत, तिला काही महत्त्व दिले नाहीत तर, कालांतराने ती पूर्णपणे निघून जाते आणि मग पुढे पुढे तर, अशी अस्वस्थता जाणवणेच बंद होते.

असे दुर्लक्ष झाले तर वाढत्या चुकांच्या प्रमाणात अस्वस्थता वाढण्याऐवजी, उलट, ती अस्वस्थता जाणवेनाशी होते आणि चेतना झाकोळून जाते.

पण म्हणून, हेच याचे निश्चित लक्षण आहे असे व्यक्ती म्हणू शकत नाही; कारण जर का तुम्ही ही अशा प्रकारशी लहानशी अंतःसूचना अनेक वेळा डावलली असेल, तर, कालांतराने ती सूचना येईनाशी होते. परंतु मी तुम्हाला सांगते की, अगदी प्रामाणिकपणे तुम्ही तिच्याकडे लक्ष दिलेत तर, ती अंतःसूचना एक अत्यंत खात्रीलायक आणि मोलाची मार्गदर्शक ठरते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 31-32)

सद्भावना – २४

प्रश्न : आजारपण येणे म्हणजे योगमार्गातील परीक्षा असते का?

श्रीमाताजी : परीक्षा? अजिबातच नाही. प्रगती करावी म्हणून व्यक्तीला हेतुपुरस्सर आजारपण देण्यात येते का? नाही, नक्कीच ते तसे नाही. वास्तविक, तुम्ही हीच गोष्ट दुसऱ्या बाजूने विचारात घेतली पाहिजे आणि मग तुम्ही असे म्हणू शकता की, काही माणसं अशीही असतात की, ज्यांची अभीप्सा इतकी सातत्यपूर्ण असते आणि त्यांची सद्भावना इतकी समग्र असते की त्यांच्याबाबतीत जे जे काही घडते त्या साऱ्या गोष्टींकडे ते प्रगती करण्यास उद्युक्त करणारी अशी मार्गावरील कसोटी म्हणून पाहतात. मला अशी काही माणसं माहीत आहेत की जी आजारी पडतात तेव्हा, आजारपण म्हणजे प्रगती करण्यासाठी साहाय्य करणाऱ्या ‘ईश्वरी कृपे’चा पुरावा आहे, असे मानत असत. ती स्वतःला असे सांगत असत की, ही चांगली खूण आहे, आता मी माझ्या आजारपणाचे कारण शोधीन आणि मग आवश्यक ती प्रगती मी करून घेईन. मला अशा प्रकारची जी काही मोजकी माणसं माहीत आहेत, ती अगदी वेगाने प्रगती करतात. आणि काही जण याउलट असतात. ते या गोष्टीचा प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याऐवजी, कोलमडून पडतात. हे त्यांच्यासाठी अतिशय वाईट असते. पण व्यक्ती आजारी पडली तर, तिने योग्य दृष्टिकोन बाळगला पाहिजे तो असा की, ”असे काहीतरी आहे की जे बरोबर चाललेले नाही, ते काय आहे त्याचा मी शोध घेईन.” ‘ईश्वरा’ने तुमच्यावर मुद्दामहून आजारपण धाडले आहे, असा विचार तुम्ही कधीच करता कामा नये….

– श्रीमाताजी
(CWM 05 : 168-169)