(डिसेंबर १९०९)
‘आपली माता’ ह्या स्वरूपात आम्हाला देशाचे दर्शन घडत नाही, हा आपला मुख्य अडथळा आहे. आमच्यापैकी बहुतांशी राजकारणी ‘भारतमाते’चे पूर्ण आणि जवळून दर्शन घेण्यामध्ये अक्षम ठरले आहेत. रणजितसिंग किंवा गुरु गोविंद सिंग ह्यांना भारतमातेऐवजी ‘पंचनद्यां’च्या ‘भूमाते’चेच दर्शन झाले. शिवाजीमहाराज किंवा बाजीराव पेशवे यांना भारतमातेऐवजी, ‘हिंदूंची माता’ या स्वरूपात तिचे दर्शन झाले. इतर महाराष्ट्रीय मुत्सद्द्यांनी फक्त ‘महाराष्ट्रातील लोकांची माता’ या स्वरूपातच तिच्याकडे पाहिले. वंगभंगाच्या काळामध्ये, आम्हाला ‘बंगाल-माते’च्या स्वरूपात तिचे दर्शन होण्याचे भाग्य लाभले, ते एकात्मतेचे दर्शन होते आणि त्यामुळे बंगालची भावी एकात्मता आणि प्रगती सुनिश्चित आहे. पण ‘भारतमाते’ची एकात्म प्रतिमा अजूनही साकार व्हायची आहे. आम्ही काँग्रेसमध्ये ज्या ‘भारतमाते’चे स्तुतिगान करायचो, आराधना करायचो ती पाश्चात्त्य पेहरावातील, ब्रिटिश राजवटीची उपकारांच्या ओझ्याखाली दबलेली एक दासी होती, एक सखी होती, ती काल्पनिक मूर्ती होती, ती अदैवी (undivine) असा भ्रम होती. खरंच ती आमची माता नव्हती. पण त्याहीवेळी, एका निगूढ, धूसर अशा अंधारात लपून असलेली आमची ‘खरी माता’च आमचा आत्मा व आमचे अंत:करण वेधून घेत होती. ज्या दिवशी आपण भारतमातेची खरीखुरी अखंड प्रतिमा पाहू शकू, जेव्हा तिच्या सौंदर्याने आणि कृपाशीर्वादाने मोहित होऊन, आपण आपली जीवने तिच्या सेवेमध्ये मोठ्या आतुरतेने समर्पित करू, तेव्हा हा अडथळा दूर होईल आणि भारताची एकात्मता, स्वातंत्र्य आणि प्रगती ह्या गोष्टी साध्य करण्यास सोप्या झालेल्या असतील. भाषाभाषांमधील भेद हे तेव्हा आपल्यामध्ये दरी निर्माण करणार नाहीत. हिंदी भाषेचा मध्यस्थ भाषा म्हणून स्वीकार केल्याने, परंतु तरीही आपापल्या प्रादेशिक भाषांचा यथोचित सन्मान केल्याने, आपली अक्षमतेपासून सुटका होईल. ‘हिंदु-मुस्लीम’ संघर्षावरील खराखुरा उपाय शोधण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. ‘माता’ म्हणून देशाचे दर्शन होत नसल्यामुळे, या अडथळ्यांना भेदून जावे ही आस आमच्यामध्ये पुरेशा तीव्रतेने, गांभीर्याने जाणवत नाही. आणि म्हणूनच ते अडथळे भेदण्याचे मार्गही आम्हाला आजवर गवसलेले नाहीत आणि संघर्ष अधिकाधिकच उग्र रूप धारण करत चालला आहे. आम्हाला जर कशाची गरज असेल तर ती ‘भारतमाते’च्या खऱ्याखुऱ्या अखंड प्रतिमेची! पण, खऱ्याखुऱ्या दर्शनाऐवजी त्याच्या आभासालाच भुलून, जर का आपण केवळ हिंदुंची माता, किंवा हिंदु राष्ट्रवाद ही कल्पना जोपासली तर आपण पुन्हा एकदा त्याच जुन्या चुकांच्या भक्ष्यस्थानी पडू आणि ‘राष्ट्रवादा’च्या पूर्ण उन्मीलनापासून स्वत:ला वंचित ठेवू.
– श्रीअरविंद
(CWSA 09 : 225-226)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…