ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

‘योगमार्गा’मधील मूलभूत श्रद्धा

साधनेची मुळाक्षरे – १७

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्राचा हा अंशभाग…)
‘ईश्वर’ अस्तित्वात आहे आणि ‘ईश्वर’ हीच एक अशी गोष्ट आहे की, जिचे अनुसरण केले पाहिजे, तिच्या तुलनेत जीवनातील अन्य कोणतीच गोष्ट प्राप्त करून घेण्याजोगी नाही, ही जिवामध्ये उपजत असणारी श्रद्धाच, ‘योगमार्गा’मधील मूलभूत श्रद्धा आहे. ह्या चढत्यावाढत्या श्रद्धेमुळेच तुम्ही या ‘योगा’कडे वळला आहात आणि तुमच्यामधील ही श्रद्धा अजूनही मृत झालेली नाही किंवा मंदावलेली नाही. तुमच्या पत्रावरून असे दिसून येते की, ती अधिक आग्रही आणि स्थायी झाली आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये ती टिकून आहे तोपर्यंत ती व्यक्ती आध्यात्मिक जीवनासाठी निवडली गेली आहे, असे म्हणता येईल. मी तर असे म्हणेन की, त्याची प्रकृती ही कितीही अडथळ्यांनी भरलेली असली, अडीअडचणी आणि नकारांनी ठासून भरलेली असली आणि अगदी अनेक वर्षे संघर्ष करत राहावा लागलेला असला तरीसुद्धा, त्या व्यक्तीला आध्यात्मिक जीवनात यश मिळणार हे निश्चित.

…तर्क आणि सामान्य जाणीव यांच्याशी सुसंगत असणारी श्रद्धा तुम्ही विकसित करणे आवश्यक आहे – ती अशी की, जर ‘ईश्वर’ अस्तित्वात आहे आणि त्याने जर तुम्हाला या ‘मार्गा’ची हाक दिली आहे आणि ती आलेली आहे हे निश्चित, तर मग या सगळ्या पाठीमागे ईश्वरी मार्गदर्शन असेल आणि सर्व प्रकारच्या अडीअडचणींमधून पार होऊन सुद्धा, किंवा त्या अडीअडचणी असतानासुद्धा तुम्ही या मार्गावर येऊन पोहोचालच. अपयशाची आशंका व्यक्त करणाऱ्या विरोधी आवाजांकडे लक्ष देऊ नका किंवा त्यांना प्रतिसाद देणाऱ्या उतावळ्या, घाईगडबड करणाऱ्या प्राणिक आवाजांकडेदेखील लक्ष देऊ नका. मोठमोठ्या अडचणी आहेत आणि त्यामुळे यश मिळण्याची काही शक्यता नाही किंवा ‘ईश्वरा’ने आजवर स्वतःला कधीही प्रकट केले नाही, त्यामुळे तो पुढेही स्वतःला कधीच प्रकट करणार नाही, अशा म्हणण्यावर मुळीच विश्वास ठेवू नका. उलट, ज्यांनी ज्यांनी आपले मन हे एका अतिशय महान आणि अवघड ध्येयावर केंद्रित केलेले असते, अशा लोकांप्रमाणे तुम्हीसुद्धा अशी भूमिका घ्या की, “मला यश मिळेपर्यंत मी वाटचाल करतच राहीन आणि मग भले कितीही अडचणी येवोत, मी यशस्वी होईनच होईन.” यामध्ये ईश्वरनिष्ठ मनुष्य अजून एक भर घालतो, ती अशी की, ”ईश्वर अस्तित्वात आहे, तो आहेच आणि जर का तो अस्तित्वात आहेच तर, मग मी त्याचे जे अनुसरण करत आहे, त्यामध्ये कधीही अपयश येऊ शकणार नाही. मला जोवर तो गवसत नाही, तोवर कितीही दुःखसंकटे आली तरी, त्यांवर मात करून, मी वाटचाल करतच राहीन.”

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 93-94)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

स्वत:ला न फसविणे अवघड

  व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…

7 hours ago

प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन

  आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…

1 day ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४

  (भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…

2 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०३

  (भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…

3 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०२

  भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…

4 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०१

  साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…

5 days ago