मैत्री किंवा स्नेह या गोष्टी योगामधून वगळण्यात आलेल्या नाहीत. ईश्वराशी असलेले सख्यत्व हे साधनेतील एक मान्यताप्राप्त नाते आहे. (आश्रमातील) साधकांमध्ये मैत्री आहे आणि त्याला श्रीमाताजींकडून प्रोत्साहनही दिले जाते. बहुसंख्य मानवी मैत्री ज्या असुरक्षित पायावर आधारलेली असते त्यापेक्षा अधिक भक्कम पायावर ती आधारलेली असावी, असा आमचा प्रयत्न असतो. हे असे याचसाठी आहे कारण मैत्री, बंधुता, प्रेम या पवित्र गोष्टी आहेत, अशी आमची धारणा आहे. आणि त्यामध्ये आम्हाला तसा बदल अपेक्षित आहे – प्रत्येक क्षणाला अहंकाराच्या क्रियांमुळे त्यांच्यामध्ये वितुष्ट आलेले आम्ही पाहू इच्छित नाही, प्राणाचा ज्या गोष्टींकडे कल असतो अशा आवेग, मत्सर, विश्वासघात या गोष्टींनी मैत्री, बंधुता, प्रेम या गोष्टी बिघडाव्यात, वाया जाव्यात किंवा उद्ध्वस्त व्हाव्यात, हे आम्ही पाहू इच्छित नाही. – त्या गोष्टी खऱ्या अर्थाने पवित्र आणि दृढ व्हाव्यात म्हणून त्यांची पाळेमुळे आत्म्यामध्ये रुजवायची आमची इच्छा आहे, ईश्वरत्वाच्या आधारशिलेवर आम्ही त्यांची उभारणी करू इच्छितो. आमचा योग हा संन्यासी योग नाही; शुद्धता हे त्याचे ध्येय आहे पण कठोर तपस्या हे ध्येय नाही. आम्ही ज्या सुमेळाची आस बाळगतो त्या सुमेळामध्ये मैत्री आणि प्रेम हे अपरिहार्य असे स्वर आहेत. हे काही पोकळ स्वप्न नाही, कारण अगदी अपूर्ण अशा परिस्थितीमध्येसुद्धा, मुळाशी हे अपरिहार्य घटक थोड्या प्रमाणात जरी असतील तरीदेखील ती गोष्ट (सुमेळ) शक्य आहे, हे आमच्या लक्षात आले आहे. ती गोष्ट अवघड आहे आणि जुने अडथळे अजूनही हट्टाने चिकटून आहेत. ध्येयाशी अविचल निष्ठा आणि अविरत प्रयत्न असल्याखेरीज कोणताच विजय प्राप्त होऊ शकत नाही. चिकाटीशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही.
*
योगामध्ये मैत्री टिकून राहू शकते पण आसक्ती किंवा तत्सम सामान्य जीवनाशी आणि चेतनेशी जखडून ठेवणारी, व्यग्र करणारी स्नेहबंधने मात्र गळून पडली पाहिजेत – मानवी नातेसंबंधांनी अगदी अल्प आणि दुय्यम स्थान घेतले पाहिजे आणि त्यांनी ईश्वराकडे व्यक्तीचा जो कल आहे त्यामध्ये ढवळाढवळ करता कामा नये.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 294-295)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…