ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: समर्पण

समर्पण आणि क्षमता

समर्पण – ०४

तुमच्या आत्म्याचे जे जे काही आहे ते ते सारे ईश्वराला, ज्याचे तुम्ही एक भाग आहात अशा महत्तर चेतनेला देऊ करणे, हे समर्पणामध्ये अभिप्रेत आहे. समर्पण तुम्हाला क्षीण करणार नाही तर त्यामुळे वृद्धी होईल; ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाची कोणतीही घट करणार नाही, काहीही दुर्बल करणार नाही किंवा तुमचे व्यक्तित्व नष्टही करणार नाही; तर समर्पण तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावी बनवेल, वृद्धिंगत करेल. दानाच्या सगळ्या आनंदासहित असलेले मुक्त समस्त दान हे समर्पणामध्ये अभिप्रेत असते; त्यामध्ये त्यागाची भावना नसते. आपण काही त्याग करत आहोत अशी थोडीशीही भावना तुमच्या मनात असेल तर मग ते काही समर्पण नव्हे. त्याचा अर्थ असा की तुम्ही काहीतरी हातचे राखून ठेवू पाहत आहात किंवा तुम्ही काहीतरी कुरकूर करत, कष्टाने आणि सायासाने देण्याचा प्रयत्न करत आहात; त्यामध्ये भेट देण्याचा कोणताच आनंद नाही; एव्हढेच काय पण तुम्ही काहीतरी देत आहात ही भावनादेखील त्यामध्ये असत नाही.

तुम्ही जेव्हा कोणतीही गोष्ट तुमच्या अस्तित्वाने संकोचून, दबून, अवघडून अशी करत असता तेव्हा ती तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत आहात, हे निश्चित जाणा. खरे समर्पण तुम्हाला व्यापक करते, ते तुमची क्षमता वाढविते; तुम्हाला स्व-प्रयत्नाद्वारे कधीच प्राप्त करून घेता आले नसते एवढ्या मोठ्या प्रमाणात समर्पण तुमच्या गुणवत्तेमध्ये आणि संख्यात्मकतेमध्ये भर घालत असते. गुणात्मकतेतील आणि संख्यात्मकतेतील हे मोठे प्रमाण, तुम्ही समर्पणापूर्वी जे काही मिळवू शकला असता त्याच्यापेक्षा अगदी भिन्न असते. तुमचा एका नवीन जगामध्येच प्रवेश होतो, अशा एका व्यापकतेमध्ये प्रवेश होतो की, जर तुम्ही समर्पण केले नसते तर त्या व्यापकतेमध्ये तुमचा कधीच प्रवेश होऊ शकला नसता.

एखादा पाण्याचा थेंब सागरामध्ये पडला आणि तेथेसुद्धा जर त्याने स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले, तर तो केवळ पाण्याचा एक लहानसा थेंब म्हणूनच शिल्लक राहील, अधिक काहीच बनणार नाही आणि परिणामत: त्या लहानशा थेंबाचा सभोवताली असलेल्या प्रचंडतेपुढे टिकाव लागणार नाही, कारण त्याने समर्पण केलेले नव्हते. परंतु, तेच समर्पणामुळे, तो त्या सागराशी एकजीव होतो आणि मग तो त्या संपूर्ण सागराच्या अथांगतेशी, त्याच्या शक्तीशी, त्याच्या प्रकृतीशी जोडला जातो आणि त्यात सहभागी होतो.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 114-115)

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

14 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago