ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

ईश्वरी चेतनेने माझ्यासमोर धरलेले आरसे

एकत्व – ०६

 

भांडणं न करतासुद्धा व्यक्ती जीवन जगू शकते. असे म्हणणे हे काहीसे विचित्र वाटेल कारण गोष्टी आज जशा आहेत, तशा पाहिल्या तर हे जीवन जणू काही भांडणतंट्यांनीच बनलेले असावे असे दिसते. म्हणजे असे की, जी माणसं एकत्र राहतात त्यांचा मुख्य उद्योग हा जणू भांडाभांडी करणे, मग ती उघडपणे असोत किंवा छुपी असोत, हाच असतो. आपण अगदी प्रत्येक वेळीच बाचाबाची करतो असे नाही, किंवा अगदी हमरीतुमरी वर येतो असेही नाही – सुदैवाने – पण आतून तुम्ही सतत एकसारख्या चिडचिडलेल्या अवस्थेमध्ये वावरत असता कारण, तुम्हाला स्वतःमध्ये जी परिपूर्णता आणावयाची इच्छा असते ती तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सापडत नाही. वास्तविक ती गोष्ट प्रत्यक्षात उतरविणे तुम्हाला देखील अवघड असते – परंतु तुम्हाला मात्र असे वाटत असते की, ती इतरांनी प्रत्यक्षात आणलीच पाहिजे.

…प्रत्येक गोष्टीकडे हसतमुखाने पाहा. ज्या गोष्टींमुळे तुमची चिडचिड होते त्या गोष्टींकडे तुम्ही एक धडा या दृष्टीने पाहा. तसे कराल तर तुमचे जीवन हे अधिक शांतिपूर्ण आणि अधिक प्रभावीदेखील असेल. कारण जी परिपूर्णता तुम्ही स्वतः प्रत्यक्षात आणू इच्छित असता, ती तुम्हाला इतरांमध्ये दिसली नाही तर, तुमची जी चिडचिड होते त्यामध्ये निश्चितपणे तुमच्यामधील पुष्कळशी ऊर्जा तुम्ही गमावून बसता.

इतरांनी परिपूर्णता प्रत्यक्षात उतरवली पाहिजे या मुद्द्यापाशीच तुम्ही थांबता आणि जे उद्दिष्ट वास्तविक तुम्ही साध्य करून घेतले पाहिजे त्याविषयी तुम्ही क्वचितच जागरुक असता. जर तुम्ही त्याविषयी जागरुक झालात, म्हणजे, तुम्हाला जे नेमून देण्यात आले आहे ते कार्य करावयास तुम्ही सुरुवात केलीत तर, म्हणजे, तुमचे जे काही कर्तव्य आहे ते प्रत्यक्षात आणावयास सुरुवात केलीत तर, इतर काय करतात, याची चिंता करणे सोडून द्या. कारण, खरंतर ते तुमचे कामच नाही. आणि खऱ्याखुऱ्या योग्य दृष्टिकोनाचा मार्ग सांगावयाचा झाला तर तो हाच की, “जे कोणी माझ्या अवतीभोवती आहेत, जी कोणती परिस्थिती जीवनात माझ्या वाट्याला आली आहे, माझ्या जवळच्या असणाऱ्या ज्या कोणी व्यक्ती आहेत त्या म्हणजे, मी कोणती प्रगती करावयास हवी हे मला दाखवून देणारे जणू काही ईश्वरी चेतनेने माझ्यासमोर धरलेले आरसेच आहेत. इतरांच्या जर कोणत्या एखाद्या गोष्टीचा मला धक्का बसला तर, त्याचा अर्थ हाच की, मला ते कार्य माझ्या स्वतःमध्ये करणे आवश्यक आहे.”

आणि जर व्यक्ती स्वतःमध्ये अशी खरीखुरी परिपूर्णता बाळगेल तर व्यक्तिला तीच परिपूर्णता बऱ्याचदा इतरांमध्येही आढळून येईल.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 22-23)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

42 minutes ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago