ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

पूर्णयोग आणि बौद्धमत – १६

धम्मपद : स्नेह, प्रेम यामध्ये दुःखाचा उगम होतो, त्यातून भीती उदयाला येते. जो प्रेमापासून मुक्त झाला आहे, त्याला दुःख कशाचे आणि त्याला भीती तरी कशाची?

आसक्तीतून दुःखाचा उमग होतो, त्यातून भीती उदयाला येते. पण जो आसक्तीतून मुक्त झाला आहे, त्याला दुःख कशाचे आणि त्याने भ्यायचे तरी कशाला?

अभिलाषेमधून दुःखाचा उमग होतो, त्यातून भीती उदयाला येते. पण जो अभिलाषेपासून मुक्त झाला आहे, त्याला दुःख कशाचे आणि त्याने भ्यायचे तरी कशाला?

श्रीमाताजी : मला नेहमीच असे वाटत आले आहे की, ‘जाणते बना’ असे सांगण्यासाठी जी कारणे सर्वसाधारपणे दिली जातात ती नेहमीच अगदी किरकोळ असतात. : “असे करू नका, नाहीतर तुम्हाला दुःख सहन करावे लागेल, तसे करू नका, नाहीतर त्यातून तुमच्या मनात भीती निर्माण होईल.” ….परंतु ह्यामुळे जाणीव अधिकाधिक निबर बनत जाते, कठीण बनत जाते कारण ती दुःख-वेदना यांना घाबरत असते.

मला वाटते असे सांगितले गेले पाहिजे की, जाणिवेची एक अशी स्थिती असते की, ज्या स्थितीमध्ये आनंद निर्भेळ असतो, प्रकाश छायेविरहित असतो, जेथे भीतीच्या सर्व शक्यताच नाहीशा होतात; अशी स्थिती अभीप्सेने आणि आंतरिक सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साध्य करून घेता येते. ही अशी अवस्था असते की, ज्या अवस्थेमध्ये व्यक्ती स्वत:साठी जगत नाही, व्यक्ती जे काही करते, जे काही तिला वाटते, तिच्या सर्व कृती ह्या परमेश्वराला अर्पण या भावातून, परिपूर्ण विश्वासातून, स्वत:विषयीच्या चिंता, काळजी यांपासून विनिर्मुक्त होऊन केल्या जातात; स्वत:वरील सर्व प्रकारचे ओझे की, जे आता ओझे वाटतच नाही, ते सारे त्या परमेश्वराला सोपविलेले असते.

स्वत:विषयी कोणतीही काळजी नसणे, स्वत:विषयीचा कोणताही विचार मनात नसणे, हा एक असा आनंद आहे, की जो शब्दांत व्यक्त करताच येणार नाही. स्वत:बद्दल विचार करीत राहणे, काय करावे आणि काय करू नये याची चिंता बाळगणे, तुमच्यासाठी काय चांगले काय वाईट, कशाला मुरड घालावयाची आणि कशाचा ध्यास घ्यावयाचा, ह्यासारखे विचार सतत करीत बसणे – बापरे ! किती थकविणारे आहे, किती कंटाळवाणे, रटाळ, किती अळणी आहे हे !

त्यापेक्षा सूर्यप्रकाशात उमलणाऱ्या एखाद्या फुलाप्रमाणे जर व्यक्ती त्या परम चेतनेसमोर, परम प्रज्ञेसमोर, परम प्रकाश, परम प्रेमासमोर, स्वत:ला अगदी खुली करू शकली; ज्याला सर्वकाही ज्ञात आहे, जो सारे काही करू शकतो, जो तुमच्या जीवनाचा ताबा घेऊ शकतो अशा परमेश्वरासमोर स्वत:ला अगदी खुली करू शकली, तर मग अशा व्यक्तीला कोणत्याही चिंता, काळज्या भेडसावणार नाहीत, ही आदर्श स्थिती आहे.

पण मग हे असे का केले जात नाही?

कारण व्यक्ती त्याचा विचारच करत नाही, व्यक्ती ते करावयाचे विसरून जाते, जुन्या सवयी परत येतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अचेतनामध्ये किंवा अबोध मनामध्ये आत खोलवर कोठेतरी, एक घातक शंका नकळतपणे घर करून असते, ती कानात कुजबुजते : “बघ हं ! तू जर काळजी घेतली नाहीस तर तुझ्याबाबतीत काहीतरी दुर्घटना घडेल. जर तू स्वत:कडे लक्ष पुरविले नाहीस तर काय घडेल काही सांगता येत नाही.” – आणि तुम्ही एवढे खुळे असता, इतके अंध झालेले असता की, तुम्ही तेच ऐकता आणि तुम्ही स्वत:कडे लक्ष पुरवायला सुरुवात करता आणि मग सगळेच बिघडून जाते.

मग तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून तुमच्या पेशींना थोडेसे शहाणपण, थोडेसे सामान्य ज्ञान पुरवावे लागते आणि काळजी करू नका, हे शिकवावे लागते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 255-257)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४५

अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…

18 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…

5 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४०

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…

6 days ago