ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

गत जन्मांतील अनुभवांची उपयुक्तता

प्रश्न : प्रत्येक जन्मामध्ये मन, प्राण आणि शरीर नवीन असल्यामुळे, गत जन्मांमधील अनुभव त्याला कसे उपयोगी पडू शकतील? का आपल्याला त्या सगळ्या अनुभवांमधून पुन्हा एकदा जावे लागते?

श्रीमाताजी : काही अगदी अपवादात्मक व्यक्ती आणि उत्क्रांतीची अतिप्रगत अवस्था वगळता – विकसित होणारा आणि जन्मोजन्मी प्रगत होत राहणारा असा चैत्य पुरुष असतो, मन वा प्राण नाही. तर घडते असे की : ह्या चैत्य पुरुषाचा, कार्यमग्नतेचा आणि विश्रांतीचा एका आड एक असा काळ असतो. जडदेहातील सक्रिय जीवनामध्ये, शारीरिक जीवन जगत असताना येणाऱ्या अनुभवांमुळे एक प्रगतिमय जीवन त्याच्या अनुभवाला येते; ते जीवन देह, प्राण आणि मन यांचे अनुभव घेत असते; नंतर, सहसा, चैत्य पुरुष त्याचे आत्मसातीकरण करण्यासाठी एक प्रकारच्या विश्रांत स्थितीमध्ये जातो – तो कार्यमग्न जीवनामध्ये असताना, जी प्रगती त्याने सिद्ध केलेली असते त्याच्या परिणामांवर तेथे कार्य केले जाते. आणि जेव्हा हे आत्मसातीकरण पूर्ण होते, पृथ्वीवर सक्रिय जीवनात असताना त्याने केलेली ती प्रगती आत जिरवली जाते तेव्हा, आजवर झालेल्या त्या प्रगतीचा परिपाक घेऊन तो नवीन देह धारण करतो आणि प्रगत अशा अवस्थेमध्ये अवतरतो. या किंवा त्या घटकाचा अनुभव पूर्ण करण्याच्या दृष्टीने कोणत्या प्रकारचे जीवन असावे, शरीर कसे असावे, वातावरण कसे असावे ह्या साऱ्याची तो निवड करतो. अतिप्रगत अवस्थेमध्ये चैत्य पुरुष, देह सोडण्यापूर्वीच, त्याच्या पुढील जन्मामध्ये तो कोणत्या प्रकारचे जीवन जगणार आहे हे ठरवू शकतो.

जेव्हा त्याची घडण जवळजवळ पूर्ण होते आणि तो जाणीवसंपन्न झालेला असतो तेव्हा तो नवीन देहाच्या घडणीमध्ये देखील सहभागी होतो आणि सहसा आंतरिक प्रभावाद्वारे, तो अशा प्रकारे त्या देहाचे घटक, द्रव्य निवडतो की, त्यामुळे त्या देहाला जे नवीन अनुभव घ्यावयाचे आहेत त्याच्या गरजा तो सहज स्वीकारू शकेल. पण हे खूपच प्रगत स्थितीमध्ये घडून येते. आणि नंतर, पूर्ण घडण झालेला तो जेव्हा या पृथ्वीतलावर सेवाभावी वृत्तीने परततो, समाजाला मदत करण्याच्या भावनेने येतो आणि ईश्वरी कार्यामध्ये सहभागी होतो तेव्हा, गत जन्मांमधील प्राण व मनाचे काही विशिष्ट घटक हे त्या देहाच्या निर्मितीमध्येही तो उतरवू शकतो. हे जे विशिष्ट घटक आहेत ते गेल्या अनेक जन्मांमधून चैत्य पुरुषाभोवती सुरचित होत गेलेले असतात, सगर्भ झालेले असतात आणि मग ते तसे घटक टिकून राहू शकतात आणि परिणामत: ते एकंदरच प्रगतीमध्ये सहभागी होऊ शकतात. पण हे फारच पुढच्या अवस्थेमध्ये घडून येते. जेव्हा चैत्य पुरुष हा पूर्ण विकसित आणि अत्यंत जाणीवसंपन्न होतो, जेव्हा तो ईश्वरी संकल्पाचे जागृत साधन बनतो तेव्हा, त्याच्याकडून प्राण व मन यांची अशा तऱ्हेने सुरचना केली जाते की, ज्यामुळे प्राण व मन देखील सर्वसाधारण सुमेळामध्ये सहभागी होऊ शकतात आणि टिकून राहू शकतात.

देहाचे जरी विघटन झाले तरी, विकसनाच्या उच्च स्तराकडून मानसिक आणि प्राणिक पुरुषाच्या काही भागांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची अनुमती दिली जाते. म्हणजे असे की, माणसाने एखाद्या कृतीचे जे भाग विशेषेकरून विकसित केले असतील ते – मनाचे वा प्राणाचे काही भाग – हे अगदी त्या आकारामध्ये, त्या रूपामध्ये देखील, (in their form) म्हणजे कृतीच्या ज्या आकारामध्ये ते जसे पूर्ण सुरचित झाले होते, तसेच्या तसे टिकवून ठेवले जातात. उदाहरणार्थ, ज्यांनी स्वत:च्या मेंदूचे विशिष्ट प्रकारे विकसन घडविलेले असते, अशा अतिशय बुद्धिमान लोकांमध्ये, त्यांच्या अस्तित्वाच्या मानसिक भागाची रचना ही एक सुविकसित, सुघटित मेंदू या रूपात तशीच टिकून राहू शकते, त्या मेंदूला त्याचे त्याचे असे स्वत:चे जीवन असू शकते आणि भावी जन्मापर्यंत ते अविकृत स्वरूपात म्हणजे जसे आहे तसेच, त्यात कोणताही बदल न होता टिकून राहू शकते की, ज्यामुळे त्याच्या सर्व लाभांनिशी ते त्या नवीन जन्मातही सहभागी होऊ शकते.

कलाकारांमध्ये, उदाहरणार्थ काही विशिष्ट वादकांमध्ये, ज्यांनी आपल्या हातांचा वापर विशिष्ट अशा जागरूकतेने केलेला होता, त्यांचे प्राणिक व मानसिक द्रव्य हे त्यांच्या हातांच्या रूपाने टिकून राहिले आणि ते हात पूर्णपणाने जागरूक राहिले होते. ज्यांच्याविषयी त्यांना विशेष जिव्हाळा आहे अशा जिवंत व्यक्तींच्या देहांचा ते उपयोग करून घेऊ शकतात.

अन्यथा, अगदी सामान्य लोकांमध्ये म्हणजे ज्यांच्यामध्ये चैत्य अस्तित्व हे पुरेसे विकसित आणि सुघटित झालेले नाही, त्यांच्या बाबतीतही जेव्हा ते चैत्य अस्तित्व देह सोडते तेव्हा, विशेषत: मृत्यूवेळी ती व्यक्ती शांतचित्त आणि एकाग्र असेल तर, त्या व्यक्तीचे मानसिक व प्राणिक आकार काही काळ पर्यंत टिकून राहू शकतात; पण जर का व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला, आवेगपूर्ण स्थितीमध्ये, अनेकविध आसक्तींमध्ये गुंतलेले असताना जर मृत्यू झाला तर, अस्तित्वाचे हे विविध भाग विखुरले जातात, त्यांच्या त्यांच्या स्वत:च्या आयुष्यमानानुसार ते कमीअधिक काळ, त्या त्या संबंधित क्षेत्रांमध्ये जिवंत राहतात आणि नंतर नाहीसे होतात.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 268-270)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

45 minutes ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago