पुनर्जन्माच्या बाबतीत बोलायचे झाले तर हे मान्य करावे लागेल की, सर्व बाबतीत एकसारखाच नियम लागू होत नाही. काही लोकं मृत्युनंतर लगेचच जन्माला येतात – जर मुले त्यांच्या पालकांशी खूपच अनुबद्ध (attached) असतील तर बरेचदा अशा पालकांमधील काही भाग हा त्यांच्या मुलांमध्ये सामावला जातो. काही लोकांना मात्र, पुन्हा जन्माला येण्यासाठी शतकं आणि कधीकधी तर हजारो वर्षेही लागतात. त्यांच्यासाठी सुयोग्य असे माध्यम त्यांना लाभावे म्हणून, परिस्थिती परिपक्व होण्यापर्यंत ते थांबून राहतात.
जर एखादी व्यक्ती ही योगिक दृष्ट्या प्रगल्भ असेल तर, ती व्यक्ती पुढच्या जन्मातील स्वतःचा देह देखील (स्वत:च) घडवू शकते. ते शरीर जन्माला येण्यापूर्वी ती व्यक्ती त्याला आकार देते, साचा तयार करते, त्यामुळे त्याचा खराखुरा निर्माता ती व्यक्तीच असते, अशा वेळी या नवजात बालकाचे पालक हे आगंतुक, केवळ शारीरिक साधन असतात.
मला येथे सांगितले पाहिजे की, पुनर्जन्माबाबत काही गैरसमजुती सर्वसाधारणपणे आढळतात. व्यक्तीच्या अस्तित्वाचे काही घटक हे इतरांबरोबर सम्मीलित होतात आणि नवीन देहांच्या माध्यमातून कार्य करू लागतात, हे जरी खरे असले तरी लोकांची ही जी समजूत असते की, ते तसेच पुन्हा जन्माला येतात, ती मात्र घोडचूक आहे.
त्यांचे संपूर्ण अस्तित्व हे काही परत जन्माला येत नाही, कारण एवढेच की ‘स्वत:’ असे ते ज्याला खरोखर समजत असतात, ते त्यांचे खऱ्या अर्थाने पृथक झालेले असे व्यक्तित्व नसते; तर त्यांच्या बाह्य व्यक्तिमत्त्वालाच, नाम रूपात्मक व्यक्तिमत्त्वालाच ते ‘स्व’ असे समजत असतात. म्हणून ‘अ’ हा पुन्हा ‘ब’च्या रूपाने जन्माला आला असे म्हणणे चुकीचे आहे; कारण अ ही व्यक्ती ब ह्या व्यक्तीपासून ऐंद्रियदृष्टया भिन्न असते; त्यामुळे ब म्हणून ती जन्माला आली असे म्हणता येत नाही. जर तुम्ही असे म्हणाल की, चेतनेच्या एकाच धाग्याने, त्याच्या आविष्करणासाठी अ आणि ब यांचा साधन म्हणून उपयोग केला, तर आणि तरच ते म्हणणे योग्य ठरेल. कारण जे कायम टिकून राहते ते चैत्य अस्तित्व असते, बाह्य व्यक्तिमत्त्व म्हणजे काही चैत्य अस्तित्व नव्हे, बाह्य नाव वा रूप असणारे असे काही तरी म्हणजे चैत्य अस्तित्व नव्हे, तर चैत्य अस्तित्व हे खोल अंतरंगात असते.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 145-146)
अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…