प्रेमगुणांच्या उपयोजनातून निर्धारित झालेली मूर्त आणि व्यवहार्य अशी कृती म्हणजे परोपकार ! कारण नेहमीच अशी एक शक्ती असतेच असते, की जी सर्वांमध्ये वितरित करता येणे शक्य असते, अर्थात ती अत्यंत व्यक्तिनिरपेक्ष रूपात प्रदान केली गेली पाहिजे. ती शक्ती म्हणजे प्रेम, ज्यामध्ये प्रकाशाचा आणि जीवनाचा समावेश असेल असे प्रेम; म्हणजेच बुद्धिमता, आरोग्य, बहरुन येण्याच्या सर्व शक्यता. हो, आनंदी हृदयामधून, प्रसन्न अशा जीवामधून उदित होणारी, ही सर्वात उदात्त अशी परोपकाराची भावना होय.
ज्याने आंतरिक शांती प्राप्त करून घेतली आहे तो मुक्तिचा अग्रदूत असतो; तो जिथे जातो तेथे – आशा आणि आनंदाचा वाहक बनतो. गरीब बिचाऱ्या, रंजल्यागांजल्या मानवांना ह्या गोष्टींपेक्षा दुसरे तरी काय हवे असते? अशी काही माणसं असतात की, ज्यांचे विचार म्हणजे सर्व प्रेमच असते, ज्यांच्यामधून प्रेमच उदित होत असते. अशीही काही माणसं असतात आणि अशा व्यक्तींची केवळ उपस्थितीही इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक कृतिशील, अधिक सच्चा असा परोपकार असते. अशा व्यक्तींनी एखादा शब्दही उच्चारला नाही किंवा कोणत्याही भावमुद्रा केल्या नाहीत तरीही, आजारी माणसं बरी होतात, दुःखितांना दिलासा मिळतो, अज्ञानी लोकांना ज्ञानाचा प्रकाश मिळतो, दुष्ट लोकदेखील शांत होतात, जे दुःखीकष्टी आहेत त्यांना सांत्वन लाभते आणि ज्यामधून त्यांच्यासाठी नवीन क्षितिजेच खुली होतील, अशा प्रकारचे सखोल रूपांतरण त्यांच्यामध्ये होते आणि त्यातूनच प्रगतीच्या अनंत अशा मार्गावर, निःसंशयपणे एक निर्णायक पाऊल पुढे टाकले जाण्याची क्षमता त्यांच्या अंगी येते. ज्या सर्वांच्या सेवक बनतात आणि आपल्या प्रेमाद्वारे सर्वांना स्वतःलाच देऊ करतात अशा व्यक्ती म्हणजे परम परोपकाराचे चालतेबोलते प्रतीकच असतात.
हे माझ्या बांधवांनो, जे जे कोणी परोपकारी होण्याची आस बाळगतात अशा तुम्हा सर्वांना मी निमंत्रित करत आहे, ही सदिच्छा अभिव्यक्त करण्यासाठी माझ्या विचारांमध्ये तुमचे विचार मिसळवा; त्यांच्या उदाहरणाचे अनुसरण करण्यासाठी, आपण दररोज थोडे अधिक प्रयत्न करू. जेणेकरून आपणही त्यांच्यासारखेच या जगामध्ये प्रकाश आणि प्रेमाचे संदेशदूत बनू शकू.
– श्रीमाताजी
(CWM 02 : 105-106)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…